दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 ऑगस्ट 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 01 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 28:18; नक्षत्र : मूळ 17:43;
- योग : प्रीति अहोरात्र; करण : वणिज 15:10;
- सूर्य : सिंह; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:02;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
भाद्रपद मासारंभ
पुत्रदा एकादशी
आदित्य पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कवी, समीक्षक, अनुवादक विंदा करंदीकर
टीम अवांतर
कवी गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात धालवली येथे झाला. त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण देवगडमधील कोर्ले येथे झाले. तर पुढील शिक्षण त्यांनी कोल्हापूर येथून पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.
पुढे अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. पुढे केवळ लेखन करण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन अत्यंत साधे होते. स्वावलंबनाचे ते मोठे भोक्ते होते. स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतन ही त्यांनी कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.
हेही वाचा – I Love You अन् अव्यक्त भावना…
विंदा हे मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाचे आधुनिक कवी, निबंधकार, समीक्षक आणि भाषांतरकार होते. पारंपरिक कवितेच्या रुढ चौकटी मोडून मुक्तछंद, प्रतीकात्मकता आणि बौद्धिक आशय यांना मराठी कवितेत प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कवितांमध्ये विज्ञान, तत्त्वज्ञान, मानवतावाद, सामाजिक प्रश्न, व्यक्तीस्वातंत्र्य अशा अनेक मुद्द्यांवर सखोल विचार दिसतो. त्याचमुळे आधुनिक मराठी कवितेचे एक प्रमुख प्रवर्तक म्हणून विंदांचे नाव घेतले जाते.
कविता लेखन हे विंदांच्या निर्मितीचे मुख्य केंद्र होते. त्यांनी 1939 साली पहिली कविता लिहिली. तर ‘स्वेदगंगा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1949 साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘मृदगंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’, ‘अष्टदर्शने’ इत्यादी कवितासंग्रह प्रकाशित झाले. ‘संहिता’ (सं. मंगेश पाडगावकर) ‘आदिमाया’ (सं. विजया राजाध्यक्ष) हे त्यांचे निवडक कवितांचे संपादित संग्रह. या व्यतिरिक्त त्यांनी बाल दोस्तांसाठी लिहिलेल्या कवितांचे एकूण 12 कवितासंग्रहही प्रकाशित झाले.
हेही वाचा – निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!
तालचित्रे, मुक्तसुनीते, विरूपिका, स्वच्छंद असे नवे आकृतीबंध आणि ‘गझल’, (आततायी) अभंग’, ‘सूक्ते’ या पारंपरिक नव्या-जुन्या प्रकारांचाही वापर शिंद्यांनी आपल्या काव्यात केला. भाषा, शैली यांच्या अभिव्यक्तीचे नवनवीन प्रयोग केले. आशयाला व्यक्त करताना जाणवणाऱ्या अपरिहार्यतेतून त्यांनी अभिव्यक्तीच्या या अनेक रूपांचा वापर केला. अक्षर, मात्रा, ओळी यांचे बंधन फारसे स्वीकारले नाही. सहजता, स्वाभाविकता ही त्यांच्या अभिव्यक्तीची वैशिष्टये होती.
बालकविता हा काव्यप्रकार म्हणून जाणीवपूर्वक हाताळणारे ते मराठीतले पहिलेच कवी होते. मराठी बालकवितेचा पायाच जणू त्यांनी घातला. बालकविता अनेकांनी लिहिल्या, मात्र करंदीकरांच्या बालकवितेत लहान मुलांपासून बारा वर्षाचे किशोरवयीन मूलं, त्यांचे मित्र आणि नातेवाईक, त्यांची घरे, त्यांचे स्वभाव विशेष, त्यांचा निरागसपणा यांसारख्या अनेक गोष्टी बघायला मिळतात.
कवितांबरोबरच ‘स्पर्शाची पालवी’, ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’ (सं. विजया राजाध्यक्ष) हे तीन लघुनिबंधांचे संग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. याशिवाय ‘परंपरा आणि नवता’ हा मराठी तर ‘लिटरेचर ॲज अ व्हायटल आर्ट’, ‘अ क्रिटीक ऑफ लिटररी व्हॅल्यूज’ हे इंग्रजी समीक्षाग्रंथ, जगप्रसिद्ध ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल यांच्या ग्रंथाचा ‘ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ हा अनुवाद, ‘फाउस्ट भाग 1’, ‘राजा लियर’ हे अनुवादित साहित्य, संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव’ हे ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभावाचे अर्वाचीन मराठीत केलेले रूपांतर इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये केशवसुत काव्यपुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचे दहा पुरस्कार, सिनियर फुलब्राइट पुरस्कार, सोव्हियत लँड नेहरू वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक, कविराज कुसूमाग्रज पुरस्कार, अखिल भारतीय कवितेसाठी दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील कबीर सन्मान पुरस्कार, मानाचा जनस्थान पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी.लिट. पदवी, याशिवाय सर्वात महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा, भारतीय साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट समजला जाणारा 2003 सालचा साहित्य अकादमीचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आदी पुरस्कारांचा समावेश आहे. 14 मार्च 2010 रोजी या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे निधन झाले.


