“डॉक्टर विनासाखरेचा चहा पितोय, मिठाई बंद, बाहेरचं काहीच खात नाही, कोल्ड्रिंकला हात लावत नाही… तरी रिपोर्टमध्ये शुगर 230!” पेशंटनं ओपीडीत आल्या आल्या वकिली थाटात रिपोर्ट टेबलवर आदळत विचारलं. हा प्रश्न आजकाल इतक्यांदा ऐकायला मिळतो की, अनेकदा पेशंटच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहूनच हसू येतं…
टीटीचं इंजेक्शन म्हणजे गंजलेलं लोखंड लागल्यास, रेबिजचं इंजेक्शन म्हणजे फक्त श्वान चावल्यास तसंच आपल्याकडं बहुतेकांना वाटतं ‘साखर’ म्हणजे फक्त किराणा दुकानातून आणलेली पांढरी साखर!
खरी गोष्ट अशी आहे की, आपल्या शरीराला ‘ग्लुकोज’ मिळवण्यासाठी फक्त साखरेच्या डब्यावर अवलंबून राहावं लागत नाही; शरीराकडं स्वतःची एक भन्नाट ‘साखर निर्मिती यंत्रणा’ असते! मानवी शरीर हा एक अत्यंत बुद्धिमान कारखाना आहे. त्याला मेंदू चालवण्यासाठी, हृदय धडधडण्यासाठी, स्नायूंना ऊर्जा देण्यासाठी थोडक्यात प्रत्येक गोष्टीसाठी सतत ‘इंधन’ लागतं. हे इंधन म्हणजे ‘ग्लुकोज’. म्हणूनच साखर खाणं बंद केलं तरी शरीर म्हणतं “काही हरकत नाही, मी स्वतःच तयार करतो…”
पेशंट म्हणतो, ”मी अजिब्बात साखर खात नाही…” पण मग पोळ्या? भात? बटाटा? ब्रेड? बिस्किटं? फरसाण? शेव? उपमा? पोहे? इडली? डोसा? उत्तप्पा? हे सगळे पदार्थ शरीरात गेल्यावर शेवटी ग्लुकोजमध्येच बदलतात!
हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…
उदाहरणार्थ एक मोठी पोळी म्हणजे शरीरासाठी साखरेचाच स्रोत, एक वाटी साधा भात म्हणजे झटकन मिळणारा साखरेचा स्रोत, बटाटा म्हणजे स्टार्चचा मोठा साठा आणि बेकरी आयटम्स म्हणजे ग्लुकोजचे गुप्त बॉम्बच. तुम्ही चमचाभर साखर टाळली, पण दोन पोळ्या आणि वाटीभर भात खाल्ला तरी शरीराला ग्लुकोज मिळालंच म्हणून समजा…
आपल्या शरीरातलं यकृत म्हणजे एक अत्यंत हुशार ‘स्टोअर मॅनेजर’; आपण जे काही खातो त्यातील ग्लुकोज हे ‘ग्लायकोजन’ स्वरूपात हा मॅनेजर अडीअडचणीसाठी साठवून ठेवतो. जेव्हा बराच वेळ काही खाल्लं जात नाही, शरीरावर कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त ताण येतो, तेव्हा यकृत हा साठा पुन्हा ग्लुकोजमध्ये बदलून रक्तात सोडतं म्हणूनच सकाळी उपाशीपोटी आणि जेवणानंतर रक्तशर्करा तपासतात; कारण रात्री शरीर शांत झोपलेलं असलं तरी यकृताची ‘ग्लुकोज सप्लाय सर्व्हिस’ सुरूच असते!
शरीराची ‘इमर्जन्सी साखर फॅक्टरी’ म्हणजे ‘ग्लुकोनिओजेनेसिस’… हे नाव थोडं अवघडंय पण प्रकार फार रंजक आहे. जेव्हा शरीराला अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही, तेव्हा ते प्रथिनं आणि चरबीपासूनही ग्लुकोज तयार करू लागतं. या प्रक्रियेला ‘ग्लुकोनिओजेनेसिस’ असं म्हणतात.
म्हणजेच शरीर म्हणतं, ”तू काहीच खात नाही, साखर अजिब्बात नाही? काही हरकत नाही, मी चरबी आणि स्नायूंमधूनच बनवतो म्हणूनच काही लोकांची उपाशी राहूनही शुगर वाढलेली असते आणि वजन खालावत जातं… राग, चिंता, अपुरी झोप, मानसिक ताण हे फक्त मनावर परिणाम करत नाहीत, ते थेट रक्तातील साखर वाढवू शकतात.
ताण आला की शरीर ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अॅड्रेनालिन’ सारखी संप्रेरकं सोडतं ही संप्रेरकं यकृताला सांगतात, “अरे, शरीर संकटात आहे पटकन जास्त ग्लुकोज तयार कर.” म्हणूनच अनेकांची रक्तशर्करा ऑफिसचा ताण, कौटुंबिक चिंता किंवा अपुऱ्या झोपेमुळंही वाढते!
शरीरातील स्नायू हे ग्लुकोजचे मोठे ग्राहक असतात. तुम्ही चाललात, व्यायाम केला, जिने चढलात तर स्नायू रक्तातील ग्लुकोज वापरतात, पण दिवसभर खुर्चीत बसून राहिलात तर? साखर रक्तातच फिरत राहते म्हणूनच “मी गोड खात नाही” या इतकंच महत्त्वाचंय “मी हालचाल करतो.”
हेही वाचा – आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!
मग फक्त साखर बंद करून उपयोग होतो का? अगदी नाही; डायबेटीस नियंत्रण म्हणजे फक्त गोड बंद करणं नव्हे. त्यात आहाराचं प्रमाण – कर्बोदकांचं नियोजन – नियमित व्यायाम – पुरेशी झोप – ताणतणाव नियंत्रण – वजन नियंत्रण आणि वेळेवर औषधं घेणं हे सगळं येतं.
‘शुगर’ म्हणजे फक्त गोड पदार्थ नव्हेत हा गैरसमज जितक्या लवकर दूर होईल तितकं चांगलं… कारण अनेकदा “मी साखर खात नाही” म्हणणारा माणूस दिवसातून 2 वेळा बेकरी, 2 वेळा डेअरी, 1 वेळ फर्मेंटेड (चहा-बिस्कीट, भरपूर भात, फरसाण, दाक्षिणात्य पदार्थ) खात असतो आणि मग शरीरात ग्लुकोजचा पूर येतो…
लक्षात ठेवा आपलं शरीर हे विलक्षण बुद्धिमान आहे. त्याला जगण्यासाठी ऊर्जा हवीच असते म्हणून तुम्ही बाहेरून साखर बंद केली तरी, शरीर विविध मार्गांनी ग्लुकोज तयार करत राहतं. म्हणूनच डायबेटीसकडे पाहताना फक्त “साखर खाल्ली का नाही?” एवढाच प्रश्न पुरेसा नसतो.. खरं गणित असतं, तुमच्या संपूर्ण जीवनशैलीचं! आणि म्हणूनच डॉक्टर वारंवार सांगतात, ”साखर कमी करा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर समजून घ्या.”


