Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    July 23, 2026

    उमाला आलं होतं टेन्शन…

    July 23, 2026

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    July 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कान्होपात्रेचे समर्पण
    अध्यात्म

    कान्होपात्रेचे समर्पण

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीJuly 23, 2026Updated:July 23, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, विठूमाऊली कृपा, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल जप, विठूमाऊली भक्त कथा, कान्होपात्रेची परम भक्ती, कान्होपात्रेची विठ्ठलाला आर्त हाक, कान्होपात्रेचे सौंदर्य, कान्होपात्रेची कहाणी, आषाढी एकादशी, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळीत संत कान्होपात्रेचे स्थान मला अत्यंत आपलेसे वाटणारे आणि हृदयस्पर्शी असे आहे. तिचे मरण तिचे जीवन उजळवून टाकणारे आहे. एका अभागी जीवाचे ईश्वराच्या चरणी झालेले संपूर्ण समर्पण आहे.

    मंगळवेढ्याची एक तेजस्वी, अनन्य सुस्वरूप कन्या, जिच्या अफाट सौंदर्याने जगाला वेड लावले होते. पण जिचे मन मात्र त्या पाषाणाच्या काळ्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांशी एकाग्र, एकरूप झाले होते. कान्होपात्रेचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग ईश्वराला दिलेली तिची अखेरची प्राणांतिक आर्त हाक आहे. जेव्हा सहनशक्तीचे सगळे दोर तुटतात, आणि चोहोबाजूंनी संकटांचा विळखा पडतो, तेव्हा जी आर्तता निर्माण होते, ती या अभंगाच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. हृदय हेलावून टाकणारा हा सर्वश्रेष्ठ अभंग आहे. याइतका सुंदर अभंग क्वचितच आढळेल! आर्तता तर आपल्याला दिसतेच, पण या अभंगानं दगडाला पाझर फोडला होता‌, असा हा अभंग!

    एका नर्तकीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे समाजाच्या नजरेत तिला स्थान नव्हते, तिच्या अंतर्यामी असणारी विठ्ठल भक्ती मात्र गंगेइतकीच निर्मळ होती. तिच्या अलौकिक सौंदर्याची चर्चा बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचली‌ आणि त्याने तिला आपल्या दरबारात आणण्याचे फर्मान सोडले, तेव्हा कान्होपात्रेसमोर अखेरचे दोनच मार्ग उरले होते – एक म्हणजे बादशहाचे दास्यत्व स्वीकारणे किंवा दुसरे म्हणजे आपल्या आराध्य देवतेच्या चरणी विलीन होणे. भक्तासाठी विठ्ठलाशिवाय जगणं ही कल्पनाच भयंकर असते!

    अशा या कसोटीच्या क्षणी, जेव्हा जगणे आणि मरण यांच्या सीमा धूसर होतात, तेव्हा माणसाला फक्त तो परमात्माच आठवतो.

    यदा सर्वे उपायाश्च

    क्षीयन्ते जीवने खलु ।

    त्रिशङ्कौ पतिते जीवे

    विष्णुमेव समाश्रयेत् ॥

    – गीताव्रत

    कधी जेव्हा जीवनातले सगळे उपाय थकतात आणि माणूस ‘त्रिशंकू’सारखा अधांतरी अडकून जातो, ना जगता येत ना मरता येत. तेव्हा केवळ विष्णूचा म्हणजेच त्या परमात्म्याचा आश्रय घेणे, हाच एकमेव मार्ग आधार उरतो. कान्होपात्रेची अवस्था नेमकी अशीच झाली. ती धावत विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचली, गाभाऱ्यात उभी राहिली आणि तिने पांडुरंगाला दरदरून घाम फोडणारी शेवटची याचना केली. त्याला म्हणाली,

    ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले,

    मजलागी जाहले तैसे देवा…’

    ही उपमा किती बोलकी आहे! वाघाच्या जबड्यात कोवळे पाडस जसे तडफडते, तशी माझी अवस्था आहे. ना जगणे शक्य, ना पटकन मरणे! उरल्यात फक्त वेदना आणि गुदमरणं! पाडसाचा मृत्यू अटळ आहे, वाघाचे दात मानेत खोल घुसलेत पण प्राण जात नाही. श्वास घेता येत नाही. अशीच अवस्था कान्होपात्रेची झाली होती. आजवर भोवतालचा संसार आणि आता बादशहाचे तिला उचलून नेण्यासाठी आलेले क्रूर नरभक्षक शिकारी दिसू लागले… या जगात तर तिचे कोणीच नव्हते, ना आई, ना समाज! तिला फक्त एकच आधार, तोच पांडुरंग!

    तेव्हा ‘विठाबाई’ अशी आर्त हाक बाहेर पडली, कान्होपात्रेने टाहो फोडला! मूर्ती थरथरली. लेकराला जेव्हा भीती वाटते, भूक लागते, एकटेपणा वाटतो, तेव्हा त्याला सर्वात आधी आपली ‘आई’ आठवते. वेदना झाली की, ‘आईss’ एवढेच आठवते. ती आपणच कळवळून मारलेली हाक आपण पुढे विसरतो. एकदा तीच, तशीच हाक परमेश्वराला हवीय. मग त्याच्यातली आई धावत येते.

    हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे

    “भोग सगळे भोगून झाले पांडुरंगा, तू असा अंत का पाहतोस? माझा प्राण आता व्याकुळ झाला आहे.”

    आपल्या मनात कधी कधी शंका येते की, ईश्वराने कान्होपात्रेसारख्या इतक्या गोड भक्ताला अशा संकटात का टाकावे?

    पण ईश्वर हा दुःख देत नसून तो दु:खातून मुक्त करणारा वैद्य आहे. आपण काय करतो की, ईश्वरालाच नावे ठेवतो. तूच दुःख दिले आहेस, असे बेधडक बडबडतो. मानवाच्या वाट्याला येणारी संकटे ही त्याच्या प्रारब्धाचीच फळं असतात, ईश्वर त्या संकटात भक्ताची  सोबत करतो. ईश्वरालाही प्रारब्ध चुकत नाही, हे आपल्या लक्षात आलं तर, मग आपला परमेश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि मग आपण परमेश्वरावर राग काढणार नाही.

    न देवः सृजते दुःखं

    प्रारब्धं फलदायकम् ।

    वैद्यवन्मुक्तिदाता सौ

    रोगहर्ता जनार्दनः ॥

    – गीताव्रत

    ईश्वर कधीच दुःख निर्माण करत नाही, तर आपले संचित कर्मच आपल्याला बरे-वाईट फळ देते. वैद्य किंवा डॉक्टर आजार निर्माण करत नाहीत, ते रोगमुक्ती मात्र हमखास करतात. तसेच, जनार्दन हा आपल्या जन्म-मरणाच्या रोगाचे, भोगांचे हरण करणारा महान वैद्य आहे. कान्होपात्रेच्या आयुष्यात जे काही घडले, ते तिच्या गतजन्मीच्या कर्माचे भोग होते. त्या भोगांतून तिची सुटका विठ्ठलाने तिला जवळ घेऊन केली.

    कान्होपात्रेने देवाला अखेरची साद घातली. तिने म्हटले,

    “मोकलूनी आस

    जाहले उदास,

    घेई कान्होपात्रेस

    हृदयात…”

    ‘आस’ मोकळणे म्हणजे जगातील सगळ्या आशा अपेक्षा सुटणे, मोकळ्या होणे, आकांक्षांचा त्याग होणे, सर्वसंगपरित्याग करून संन्यस्त होणे. असह्य वेदनातही कान्होपात्रा पूर्ण रिक्त आणि ‘उदास’ झाली. तिला जन्मभर पांडुरंगाशिवाय कुठलीच ओढ नव्हती. ना तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान! तिला फक्त विठ्ठलाच्या हृदयात छोटीशी जागा हवी होती.

    कान्होपात्रेचे अन्य अभंग पाहिले तर तिची भक्ती किती श्रेष्ठ होती हे समजते. ती म्हणते,

    “अगा वैकुंठीच्या राया,

    काय तुझी वर्णू माया.”

    ही माया तिला जाणवली होती, उगाच व्यर्थ भरवसा नव्हता. त्या विठ्ठलाचे रूप सावळे परब्रह्म! पण समाजाच्या नजरांनी, बंधनांनी तिला जर्जर केले होते. जीव नको केला होता. तिला सतत आपल्या उद्धाराची आठवण होत होती. परंतु भक्तीच्या क्षेत्रात जात, कुल किंवा व्यवसाय कधीच आड येत नाही, हेच कान्होपात्रेने आपल्या समर्पणातून सिद्ध केले.

    पंढरपूरच्या मंदिरात जेव्हा सैनिकांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने देवाला विनवणी केली की, मला या अपवित्र, राक्षसी हातात देऊ नकोस. तिने देवाला विचारले, “देवा, जर तुझा हा भक्त अपवित्र झाला, तर तुझ्या देवत्वाचे काय?”

    शरणं तव पादाब्जे

    कान्होपात्रा स्थिता सदा ।

    व्याघ्रभीतेव हरिणी

    रक्ष मां करुणानिधे ॥

    – गीताव्रत

    आजवर मी, कान्होपात्रा, सदैव तुझ्या चरणकमलांच्याच आश्रयाला राहिले आहे. मरणप्राय वेदना सोसणाऱ्या, भ्यायलेल्या हरिणीच्या लहान बाळासारखी माझी अवस्था झालीय, हे करुणानिधे, तू माझे रक्षण कर! ही तिची शरणागती खरोखरच अचाट होती… आणि त्या क्षणी एक चमत्कार घडला. कान्होपात्रेचा प्राण मंदिरातच विरघळला आणि तिचा आत्मा त्या सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाला. हे तिचे संत मीराबाईंसारखे मरण होते, हे महामरण होते, ज्याला आपण ‘मुक्ती’ म्हणतो.

    म्हणतात की, तिच्या देहाचे अवशेष मंदिराच्या दक्षिण द्वारपाशी पुरले गेले आणि तिथे एक तरटीचे झाड उगवले. आजही वारकरी त्या झाडाचे दर्शन घेतात आणि कान्होपात्रेच्या त्या दिव्य त्यागाची आठवण काढतात. तिची मुक्ती ही केवळ एका व्यक्तीची मुक्ती नव्हती, तर ती भक्तीच्या विजयाची मोहोर होती.

    कान्होपात्रेच्या मुक्तीच्या क्षणाचे वर्णन करताना अंगावर शहारे येतात. तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. बादशहाचे क्रूर सैनिक दारात उभे होते, पण आतमध्ये मात्र एक अलौकिक सोहळा चालू होता. कान्होपात्रेने देवाला पाहिले, देवाने आपल्या लेकराला पाहिले आणि भक्त-भगवंताचे अद्वैत सिद्ध झाले. जसा एखादा दिवा विझल्यावर त्याचा प्रकाश आकाशात विलीन होतो, तसेच कान्होपात्रेचे चैतन्य त्या परब्रह्मात विलीन झाले. मुक्तीक्षणाचे सार सांगणारा हा श्लोक पहा…

    ज्योतिर्ज्योतौ समालीना

    ब्रह्मरूपा हि साऽभवत् ।

    पाण्डुरङ्गपदाम्भोजे

    मुक्तिमाप सनातनीम् ॥

    – गीताव्रत

    ती दिव्य ज्योत त्या मूळ ज्योतीमध्ये विलीन झाली आणि कान्होपात्रा स्वतः ब्रह्मरूप झाली. पांडुरंगी चरणकमलांमध्ये तिने ती सनातन मुक्ती प्राप्त केली.

    हेही वाचा – देशविदेशातील शक्तिपीठे

    तिचे मरण हे जगासाठी निश्चित दुःखद असले, तरी तिच्यासाठी ते एक महान वरदान होते. ज्या सौंदर्यासाठी जग तिच्यामागे धावत होते, ते सौंदर्य तिने त्या सौंदर्याच्या देवतेच्या चरणी अर्पण केले.

    कान्होपात्रेची ती अखेरची हाक आजही प्रत्येक भक्ताच्या मनात गुंजत असते. आपणही जेव्हा संकटात असू, जेव्हा आपल्याला वाटतं की, आता कोणीही सोबतीला नाही, तेव्हा कान्होपात्रेला स्मरून दिलेली हाक आपल्याला बळ देईल.

    नर्तकीची मुलगी असूनही ती संतपद मिळवू शकली, कारण तिची ओढ त्या विठ्ठलाकडे होती. तिने जगाचे पाय धरण्यापेक्षा विठ्ठलाचे पाय धरणे पसंत केले. तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की, प्रत्यक्ष पांडुरंगाला तिचे रक्षण करण्यासाठी तिला आपल्यातच सामावून घ्यावे लागले. ही भक्तीची पराकाष्ठा आहे. जेव्हा आपण कान्होपात्रेचा अभंग मनोभावे म्हणू,

    ‘तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी…’

    तेव्हा त्या एकाच सत्याची जाणीव होईल की, हे जग अनित्य आहे आणि तो एकच शाश्वत आहे.

    आज प्रत्येक साधकाला कान्होपात्रेची आर्त हाक समजायला हवी. आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींनी हतबल होतो, निराश होतो. पण अशा वेळी जर आपण त्या आराध्याला, विठ्ठलाला हाक दिली, तर तो नक्कीच धावून येईल. तो संकटे देत नाही, पण त्या संकटांशी लढण्याचे बळ तो आपल्याला नक्कीच देईल, तो त्या वैद्यासारखा आहे जो वेदना जाणवू देत नाही. आपल्या कर्माचे औषध देऊन आपल्याला मुक्त करतो.

    प्रत्येक संत आपलं आयुष्य, आपला अभंग, आपल्या रचना या अन्य समाजासाठी तुमच्या माझ्यासाठी निर्माण करतो. कान्होपात्रेने हा जो मार्ग आपल्याला दाखवला, तो पूर्ण शरणागतीचा, समर्पणाचा आहे. आपणही आपल्या जीवनातून ‘मी’पणा घालवला, आणि जर केवळ ‘तो’च उरला तरच आपण त्या परब्रम्हाच्या ‘हृदयात’ स्थान मिळवू शकू.

    या अभंगात कान्होपात्रेचे आर्त आरस्पानी सुंदर दर्शन होते. त्यात भीती आहे, पण त्या भीतीहून अधिक त्या विठ्ठलावर विश्वास आहे. संसाराच्या या व्याघ्रमुखातून सुटण्यासाठी त्या ‘विठाबाई’कडे धाव घेतली पाहिजे. तिची हाक ही केवळ तिची राहिली नाही, तर ती समस्त मानवी समुदायाला ईश्वराला देण्यासाठी ‘आर्त हाक’ शिकवून गेली आहे. तिच्या मुक्तीचा क्षण हा साधकांच्या भक्तीच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे, ज्यात लिहीले आहे की, मृत्यू हा अंत नसून तो एका नवीन, शाश्वत प्रवासाची सुरुवात असते, जर आपण ईश्वराशी जोडले गेलो असू तर..!

    भक्तीत त्या आर्ततेचा थोडा जरी अंश आपण आणू शकलो, तरी आपले जीवन सार्थकी लागेल.

    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    July 23, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    July 22, 2026 अध्यात्म

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    By Team AvaantarJuly 23, 2026

    अध्याय तेरावा न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा

    July 22, 2026

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    July 23, 2026

    उमाला आलं होतं टेन्शन…

    July 23, 2026

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    July 23, 2026

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    July 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जुलै 2026

    July 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 370
    • अवांतर 199
    • आरोग्य 132
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 501
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 798
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    July 23, 2026

    उमाला आलं होतं टेन्शन…

    July 23, 2026

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    July 23, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.