भारतीय समांतर चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा काही चित्रपट केवळ कलाकृती म्हणून नव्हे, तर काळाने दिलेल्या जखमांवर ठेवलेले संवेदनशील हात म्हणून स्मरणात राहतील. बुद्धदेव दासगुप्ता यांचा ‘तहादेर कथा’ हा असाच एक चित्रपट आहे. 1992 साली प्रदर्शित झालेला हा बंगाली चित्रपट केवळ एका अज्ञात स्वातंत्र्यसैनिकाची कथा न सांगता; तो एका पिढीच्या भंगलेल्या स्वप्नांचा, अपेक्षाभंगाचा, विस्मृतीत गेलेल्या त्यागाचा आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या अंतर्मनात दडलेल्या वेदनेचा जिवंत दस्तऐवज बनून जातो.
कमलकुमार मजुमदार यांच्या साहित्यकृतीवर आधारित असलेला हा चित्रपट पाहताना असे वाटत राहते की, आपण एखादी कथा, एखादा चित्रपट पाहात नसून, इतिहासाच्या विस्मरणात गेलेल्या पानांमधून उठणारा एक दीर्घ, उदास नि:श्वास ऐकत आहोत.
चित्रपटाचा नायक शिबनाथ हा ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारा एक निर्भीड क्रांतिकारक आहे. स्वातंत्र्य ही त्याच्यासाठी केवळ एक राजकीय संकल्पना नसून जीवनाचा धर्म आहे. त्या धर्मासाठी तो सर्वस्वाचा त्याग करतो. कारावास भोगतो. अमानुष छळ सहन करतो. रुग्णालयाच्या भिंतींमध्ये आपली तरुणाई गमावतो. त्याच्या आयुष्यातील अकरा वर्षे इतिहासाच्या अंधाऱ्या कोठडीत हरवून जातात.
…आणि जेव्हा तो अखेर मुक्त होऊन घरी परततो, तेव्हा त्याची साधी अपेक्षा असते की, आता त्याच्या संघर्षाला काहीतरी अर्थ मिळेल. पण त्याच्या स्वागतासाठी उभा असतो एक अपरिचित देश, अपरिचित समाज आणि अपरिचित वास्तव.
देशाला स्वातंत्र्य मिळालेले असते. परकीय सत्तेच्या बेड्या तुटलेल्या असतात. लाखो बलिदानांचे, अश्रूंचे आणि त्यागाचे स्वप्न अखेर सत्यात उतरलेले असते. पण काळ पुढे सरकत जातो तसा शिबनाथसारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, तो भारत हळूहळू वास्तवाच्या धुक्यात हरवताना दिसू लागतो.
स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पिढीने ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला होता, ती मूल्ये नव्या व्यवस्थेच्या कोलाहलात मागे पडू लागतात. त्याग, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा यासारख्या संकल्पना हळूहळू सत्तेच्या राजकारणात विरघळून जातात. आदर्शवादाच्या जागी व्यवहारवाद येतो. लोकहिताच्या जागी स्वार्थ येतो. राष्ट्रनिर्मितीच्या स्वप्नांवर वैयक्तिक महत्त्वाकांक्षांची सावली पडू लागते.
हेही वाचा – पल भर में ये क्या हो गया…
एकेकाळी स्वातंत्र्याच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले अनेक लोक नव्या व्यवस्थेत सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्तीच्या मागे धावू लागतात. राजकारण हे समाजपरिवर्तनाचे साधन न राहता सत्तेच्या स्पर्धेचे मैदान बनते. भ्रष्टाचार, संधीसाधूपणा आणि मतलबीपणा हळूहळू सार्वजनिक जीवनाचा भाग बनतात. ज्यांनी कधी देशासाठी संघर्ष केला होता, त्यांच्याच नावावर काही लोक स्वतःचे भविष्य घडवू लागतात.
शिबनाथ जेव्हा या नव्या वास्तवाकडे पाहतो, तेव्हा त्याच्या मनात वेदनेचा एक खोल झरा उगम पावतो. कारण त्याने ज्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले होते, ते केवळ राजकीय सत्ता हस्तांतरित व्हावी यासाठी नव्हते… अशा भारताचे स्वप्न पाहिले होते, जिथे माणसाला सन्मान मिळेल, न्याय मिळेल, समानता मिळेल आणि राष्ट्रहित वैयक्तिक हितापेक्षा मोठे मानले जाईल. पण त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिलेले वास्तव वेगळेच असते.
देश स्वतंत्र झालेला असतो, पण स्वप्ने कैद झालेली असतात.
ध्वज बदललेला असतो, पण माणसांच्या वृत्ती फारशा बदललेल्या नसतात.
सत्ता बदललेली असते, पण सामान्य माणसाच्या वेदना तशाच राहिलेल्या असतात.
म्हणूनच शिबनाथला केवळ आपल्या आयुष्याचा नाही, तर आपल्या संपूर्ण पिढीच्या त्यागाचा अर्थ हरवलेला वाटतो. त्याच्या मनातील सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की, त्याने ज्या भारतासाठी लढा दिला, तो भारत नकाशावर तर अस्तित्वात आहे, पण त्याच्या स्वप्नांमधील भारत मात्र स्वार्थ, भ्रष्ट राजकारण, संधीसाधू वृत्ती आणि नैतिक अधःपतनाच्या गर्दीत कुठेतरी हरवून गेलेला आहे.
फाळणीच्या आगीत त्याचे मूळ गाव सीमापार पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले असते. त्याचे कुटुंब निर्वासित होऊन भारतात स्थलांतरीत झालेले असते. पत्नीच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षांचा कोरलेला संघर्ष, आता मोठी झालेली मुलगी, मुलगा आता त्याच्यासमोर उभे असतात. रक्ताचे नाते असूनही त्यांच्यामध्ये एक न भरून येणारी दरी उभी राहिलेली असते.
या क्षणापासून ‘तहादेर कथा’ एका माणसाच्या घरी परतण्याची कथा राहात नाही. चित्रपटाचे नाव जरी तहादेर म्हणजे ‘त्याची’ कथा असली तरी ती शिबनाथची कथा राहात नाही. ती एका स्वतःलाच हरवून बसलेल्या माणसाच्या, स्वतःच्या आयुष्यात परतण्याच्या असफल प्रयत्नाची कथा बनून जाते.
शिबनाथला घर सापडते, पण आपलेपणा सापडत नाही. आपले कुटुंब सापडते, पण नाती हरवलेली असतात. देश सापडतो, पण त्याने पाहिलेले आदर्श देशाचे स्वप्न भंगले असते आणि म्हणूनच त्याचा एकाकीपणा खूपच असह्य होतो, त्याला तर होतोच पण चित्रपट पाहणाऱ्या आपल्यासारख्या प्रेक्षकांना त्याची धग जास्त जाणवायला लागते.
मिथुनदांनी साकारलेला शिबनाथ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील काही सर्वोत्तम अभिनयांपैकी, सर्वोत्तम भूमिकांपैकी एक मानला जायला हरकत नसावी. पडद्यावर दिसणारा माणूस अभिनेता म्हणून जाणवतच नाही. तो खरोखरच आयुष्याने थकलेला, काळाच्या ओघात मागे पडलेला आणि स्वतःच्याच स्वप्नांच्या अवशेषांमध्ये भटकणारा एक उद्ध्वस्त मनुष्य म्हणून सामोरा येतो.
त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण, शून्य पोकळी आहे. ती पोकळी संवादांनी भरली जात नाही. उलट प्रत्येक क्षणी भीषण शांततेतून ती अधिक गहिरी होत जाते. कधी तो खिडकीबाहेर पाहात बसतो, कधी एखाद्या ओसाड रस्त्यावरून चालत राहतो, कधी कुटुंबाच्या गर्दीत असूनही पूर्णपणे एकटा दिसतो. त्या प्रत्येक क्षणी मिथुनदा अभिनय करत नाहीत; ते अक्षरश: शिबनाथ जगतात.
याच भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण कुठलाही पुरस्कार हे या अभिनयाचे खरे मोजमाप ठरू शकत नाही. कारण शिबनाथ पडद्यावरून उतरून प्रेक्षकाच्या मनात कायमचा राहून जातो.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर शिबनाथ हा खोल जखमा घेऊन जगणारा माणूस आहे. दीर्घ कारावास, छळ, एकाकीपणा आणि सामाजिक तुटलेपणामुळे त्याचे अंतर्मन विदीर्ण झालेले आहे. आजच्या मानसशास्त्रीय भाषेत त्याच्यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची अनेक लक्षणे दिसतात. भूतकाळ त्याची पाठ सोडत नाही. वर्तमान त्याला स्वीकारत नाही. स्मृती आणि वास्तव यांच्यामधील सीमा सतत धूसर होत राहतात.
त्याच्या मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा उठत राहतो –
“मी ज्या स्वप्नासाठी सर्वस्व दिले, ते स्वप्न नेमके कुठे हरवले?”
हा प्रश्न केवळ शिबनाथचा नाही. तो स्वातंत्र्यलढ्यातील हजारो अनामिक सैनिकांचा प्रश्न आहे.
चित्रपटातील सर्वात वेदनादायी गोष्ट म्हणजे शिबनाथचा पराभव ब्रिटिश सत्तेमुळे झालेला नाही. त्याचा पराभव त्याच्या स्वतःच्या स्वप्नांनी केला आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी त्याने आयुष्य वेचले, त्याच स्वातंत्र्यानंतरच्या व्यवस्थेमध्ये त्याच्यासाठी जागाच उरलेली नाही. तो इतिहासाचा नायक नसून विस्मृतीच्या अंधारात हरवलेली इतिहासाची एक क्षीण नोंद बनून राहतो.
चित्रपटातील बिपिन हे पात्र या शोकांतिकेला अधिक तीव्र बनवते. एकेकाळी शिबनाथसोबत संघर्ष करणारा बिपिन आता यशस्वी, प्रतिष्ठित आणि सत्तेच्या जवळ पोहोचलेला असतो. त्याने काळाशी तडजोड केली आहे. बदलत्या वास्तवाला स्वीकारले आहे. शिबनाथ आणि बिपिन यांच्यातील संघर्ष हा दोन व्यक्तींमधील नसून दोन भारतांमधील संघर्ष आहे.
एक भारत त्यागाचा, दुसरा तडजोडीचा.
एक भारत स्वप्नांचा, दुसरा व्यवहारांचा…
चित्रपट या दोघांपैकी कोणालाच दोष देत नाही. पण त्यांच्या आयुष्यांमधील अंतर पाहताना प्रेक्षकांच्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते.
अनसूया मजुमदार यांनी साकारलेली हेमांगिनी ही तहादेर कथामधील सर्वात हृदयस्पर्शी आणि मानवी व्यक्तिरेखांपैकी एक आहे. ती केवळ शिबनाथची पत्नी नाही, तर इतिहासाच्या मोठ्या घटनांमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या त्या लाखो स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या अनुपस्थितीत संसार, संघर्ष आणि प्रतीक्षा यांचा भार एकट्याने पेलला.
अकरा वर्षे ती पतीच्या परतीची वाट पाहत जगत असते. या काळात तिने विस्थापनाचे दुःख, आर्थिक असुरक्षितता, मुलांचे संगोपन आणि उद्याच्या अनिश्चिततेशी एकटीने सामना केलेला असतो. तिच्या डोळ्यांत अजूनही प्रेम आहे, पण त्याहून अधिक थकवा आहे. आशा आहे, पण त्याहून अधिक स्वीकार आहे. काळाने तिला वास्तवाची कठोर भाषा शिकवलेली असते.
शिबनाथ परत आल्यानंतरचा तिचा आनंदही अपूर्ण वाटतो. कारण ज्या माणसाची ती वर्षानुवर्षे वाट पाहत होती, तो शरीराने परतलेला असतो; पण त्याचे मन अजूनही भूतकाळाच्या जखमांमध्ये अडकलेले असते. त्यांच्या नात्यात काळाने निर्माण केलेली दरी ती शांतपणे अनुभवत राहते. हेमांगिनीचे प्रेम हळवे किंवा आर्त नाही; ते संयमी, प्रगल्भ आणि निःशब्द आहे. ती शिबनाथवर मनापासून प्रेम करते, पण आयुष्याने तिला वास्तवाचे भान दिलेले आहे. काळाने तिला शिकवलेले आहे की केवळ प्रेमावर संसार उभा राहत नाही. जगण्यासाठी धैर्य, तडजोड आणि वास्तवाचा स्वीकारही तितकाच आवश्यक असतो.
म्हणूनच हेमांगिनी ही केवळ एका स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी राहत नाही; ती त्याग, प्रतीक्षा आणि न बोललेल्या वेदनांचे जिवंत प्रतीक बनते. तिच्या शांत नजरेत आणि संयमी वागण्यात अनेक वर्षांच्या संघर्षाची कहाणी दडलेली आहे, तिच्या प्रत्येक संवादामध्ये आणि मौनामध्ये अनेक वर्षांचा शारीरिक, मानसिक संघर्ष दडलेला आहे… आणि म्हणूनच ती चित्रपट संपल्यानंतरही दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते.
बुद्धदेव दासगुप्ता यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवते. ते आपल्याला कथा सांगत नाहीत; ते आपली मनःस्थिती कथेच्या वास्तव पातळीवर नेऊन ठेवतात. चित्रपटातील घटना आपण निव्वळ त्रयस्थपणे पाहूच शकत नाही; आपल्याही नकळत आपण त्या घटनांचे मूक साक्षीदार, क्वचित हिस्साही बनून जातो. त्यांच्या काव्यात्म दृष्टीमुळे चित्रपट अनेकदा वास्तव आणि स्वप्न यांच्यामधल्या प्रदेशात प्रवेश करतो. अनेक दृश्ये अशी आहेत की, ती पाहताना आपणही शिबनाथसोबत भूतकाळात हरवून जातो. चित्रपटाचे छायांकन हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. बंगालच्या ओसाड भूमी, धूसर आकाश, शांत रस्ते आणि निर्वासित जीवनाचे चित्रण केवळ दृश्यात्मक सौंदर्य निर्माण करत नाही; ते पात्रांच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब बनते. अनेक फ्रेम्स अशा वाटतात जणू एखाद्या उदास कवितेच्या ओळी कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत.
चित्रपटाचे संगीत बिश्वदेब दासगुप्ता यांनी दिले आहे. चित्रपटाच्या पार्श्वसंगीतामध्ये एक गूढ, उदास आणि मनाला अस्वस्थ करणारा भाव दडलेला आहे, जो कथानकातील वेदना, एकाकीपणा आणि अंतर्गत संघर्ष अधिक प्रभावीपणे अधोरेखित करतो. अमर पाल आणि अभिजित बोस यांच्या भावपूर्ण पार्श्वगायनाने चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक सखोलता प्राप्त होते. त्यांच्या स्वरांमधून चित्रपटातील विरह, स्मृती आणि हळव्या भावनांना एक हृदयस्पर्शी अभिव्यक्ती मिळते. बिश्वदेवजींचे संयमी आणि प्रभावी पार्श्वसंगीत प्रसंगांना अधिक वेदनादायी बनवते. अनेक ठिकाणी शांततेलाच संगीताचा दर्जा प्राप्त होतो. ही शांतता पाहणाऱ्याला अस्वस्थ करत राहते.
व्यावसायिकदृष्ट्या हा चित्रपट फार यशस्वी ठरला नाही. मुख्य प्रवाहातील मनोरंजनाची अपेक्षा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी तो नव्हता. त्याची गती संथ होती, त्याचा सूर अंतर्मुख होता आणि त्याचे प्रश्न अस्वस्थ करणारे होते. पण कालांतराने हेच त्याचे सामर्थ्य ठरले. समीक्षकांनी त्याचे मनःपूर्वक स्वागत केले. मिथुनदांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाने मिळवून दिला आणि चित्रपटालाही राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. आज ‘तहादेर कथा’ भारतीय समांतर चित्रपटसृष्टीतील एक अभिजात कलाकृती म्हणून ओळखला जातो.
‘तहादेर कथा’ पाहून झाल्यानंतर चित्रपट संपतो, पण त्याची वेदना संपत नाही. शिबनाथची उदास नजर, त्याची हरवलेली स्वप्ने आणि त्याच्या मनात सतत घुमणारा प्रश्न प्रेक्षकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. हा चित्रपट आपल्याला स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देतो, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो आपल्याला स्मृतीची जबाबदारी शिकवतो. राष्ट्रे अनेकदा आपल्या नायकांचा गौरव करतात; पण कित्येक अज्ञात स्वातंत्र्यसैनिक कालौघात हरवून जातात. शिबनाथ हा अशाच विस्मृतीत गेलेल्या नायकांचा चेहरा आहे.
हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!
म्हणूनच ‘तहादेर कथा’ ही केवळ एका स्वातंत्र्यसैनिकाची कथा नाही. ती स्वप्नभंगाची कथा आहे… ती विस्थापनाची कथा आहे…. ती आदर्शांच्या मृत्यूची कथा आहे… आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती अशा माणसाची कथा आहे, ज्याने देशासाठी सर्व काही दिले, पण शेवटी स्वतःच्या आयुष्यातच परका बनून राहिला.
चित्रपट संपल्यावर मनात एकच प्रश्न उरतो.
स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या लोकांना आपण खरोखर न्याय देऊ शकलो का?


