पंधरा दिवसात पांडूच्या लग्नाची पत्रिका आली, पांडूचा फोन पण आला. लग्न कोलगांवला होते. मी आणि दाजी लग्नाला गेलो. पांडूकडून लग्नाला फक्त मित्र नंदू आणि पत्नी तसेच आम्ही दोघे. सगळे मिळून 20 ते 25 माणसे. लग्न लागले, आम्ही आहेर केला. पांडूची चेष्टामस्करी केली आणि निघालो.
पांडू आज गृहस्थाश्रमाला लागला. आता निदान दोनवेळचे जेवण मिळेल. त्याच्या बर्यावाईट प्रसंगात त्याच्या सोबत राहणारी धर्मपत्नी मिळाली, चला चांगले झाले…
पंधरा दिवसांनंतर नंदूचा फोन आला, म्हणाले – “तुमच्या मित्राचे काहीतरी बिघडले आहे. काही बोलत नाही. परवा दुकानात आला, तो पाच-सहा सिगारेटी ओढत बसला. तुम्ही येऊन जा.” मी म्हटले “अजून याच्यामागचे कष्ट, हाल संपत नाहीत काय?” दाजी आणि मी परत कलंबिस्तला पोहोचलो. पांडूची बायको घरात मोबाइलवर बोलत होती, तिने आमची दखलही घेतली नाही. पांडूला शोधले, तो परड्यात पोफळीला पाणी लावत होता. आम्ही त्याला बाजूला घेतले आणि “काय प्रकार आहे,” असे म्हणताच तो रडू लागला. खोदून खोदून विचारल्यावर कळले ते असे, त्याच्या बायकोचे कोलगांवला एका मुस्लिम फळविक्रेत्यावर प्रेम होते, त्या गृहस्थाचे पहिले लग्न झालेले, तो परत हिच्याबरोबर शादी करणार होता. घरच्यांचे ती काहीएक ऐकून घेऊना… तेव्हा, लग्नानंतर सुधारेल म्हणून तिचे पांडूशी लग्न लावून दिले. पण लग्नानंतर ती पांडूशी एक शब्द बोलली नव्हती. त्याच्यासमोर आपल्या याराशी हसत बोलत होती. आम्ही ठरविले, तिच्याशी काही बोलावे, पण आम्ही बोलणार, हे लक्षात येताच ती फोन घेऊन बाहेर गेली. जाताना म्हणाली, “हे लग्न माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने लावले आहे, याविषयी माझ्याशी काहीही बोलू नका.”
केविलवाण्या चेहेर्याच्या पांडूचा निरोप घेऊन आम्ही निघालो. तिच्या आई-वडिलांना भेटायचे ठरविले. पण ते केवळ रडत राहिले. चार दिवसांनी नंदूचा फोन, पांडूची बायको तिच्या याराबरोबर सगळे कपडे, दागिन्यांसकट त्याच्या मोटर सायकलवर बसून गेली आणि दुसर्या दिवशी पांडू पिशवीत दोन-तीन कपडे घालून घराला कुलूप लावून गेला.
हेही वाचा – बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट
गेली दोन वर्षे नंदू आणि मी पांडूचा शोध घेतोय. कोण म्हणतं तो अक्कलकोटला आहे, कोण म्हणतं काशीला गेला, कोण म्हणतं त्याने जीव दिला… कधीतरी पांडू येऊन चावीने कुलूप काढील, या आशेवर मी आणि नंदू आहोत…
मधे दोन वर्षे गेली आणि अचानक बांद्याच्या नंदू केमिस्टचा फोन आला…
“तुमचा मित्र घरी आला आहे अशी बातमी कळली, यावेळी एकटा नाही नवीन बायको आहें सोबत, तुम्ही ताबडतोब या…” माझ्या कानावर विश्वास बसेना. पांडू परत आला, पांडू परत आला… तो सुद्धा सोबत नवीन बायकोसह!
मला खूप आनंद झाला. कधी एकदा पांडूला पाहातो, असे झाले. दुसऱ्या दिवशी मी नंदू केमिस्टकडे बांद्याला गेलो आणि दोघे पांडूच्या गावी म्हणजेच घरी पोहोचलो.
घर उघडे होते, दोन वर्षांपूर्वी मी आणि नंदू कुलूप पाहून गेलो होतो, पुन्हा पांडू दिसेल अशी आम्हाला आशा नव्हती… आणि आत्ता घर उघडे होते.
आम्ही आत गेलो, आम्ही येणार याची पांडूला कल्पना नव्हती. पांडू पाठीमागच्या बागेत होता. कोयता घेऊन झाडावर आलेल्या वेली तोडत होता आणि सोबत त्याची पत्नी पण दुसऱ्या झाडाला अळी काढत होती. केवढे सुंदर दृश्य. हेच तर पांडूला हवे होते. त्याला साथ देणारी सहचारिणी हवी होती.
आमच्याकडे दोघांचे लक्ष नव्हते. दोघे एकमेकांशी बोलत काम करत होती. मी मुद्दाम खाकरलो, तेव्हा पांडूचे माझ्याकडे लक्ष गेले. पांडू खूश झाला आम्हाला पाहून… धावत आला आणि मला मिठी मारली. मग नंदूला मिठी मारली. माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन त्याने आनंदाश्रू मोकळे केले…
आम्हाला पाहून त्याची पत्नी आधीच घरात गेली होती. आम्ही तिघे एकमेकांना धरून घरात आलो. तोपर्यत पांडूच्या बायकोने पाणी आणि गुळाचा खडा समोर ठेवला देखील. माझ्या नजरेतील समाधान पांडूने पाहिले आणि तो बोलू लागला,
“अवी, दोन वर्षांपूर्वी माझी परिस्थिती काय होती तू जाणतोस. मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. ती करण्याआधी शेगावला जाऊन गजानन महाराजांचें दर्शन घ्यावे, पहिले आणि शेवटचे! म्हणून थोडे चालत थोडे बसने शेगावला पोहोचलो. कारण मी महाराजांचा भक्त आहें. त्यांना माझे दुःख सांगावे आणि मग आयुष्य संपवावे, असा विचार केला.
शेगावला मी धर्मशाळेत राहिलो. रोज स्वामींचे दर्शन घेत होतो. हळूहळू तिथे असलेल्या सेवेकरी मंडळीची माझी ओळख झाली. माझ्या मनात विचार आला, मला इथे सेवेकरीचें काम मिळेल काय? म्हणजे महाराजांची सेवा झाली आणि माझ्या मनाला शांती मिळेल, हा हेतू. मी काही सेवेकरी मंडळींना माझी इच्छा सांगितली. त्यांनी त्यांच्या मुख्य सेवेकरी माणसाकडे नेले. त्यांनी सांगितले, इथे सेवा द्यावी लागते, त्याचा मोबदला मिळत नाही. सलग पंधरा दिवस सेवा दिल्यावर मधे काही दिवस विश्रांती, पुन्हा सेवा.
मी तयार होतोच. मग एका सेवेकरी ग्रुपमधून मी मंदिर परिसरात सेवा द्यायला लागलो. तेथे अनेकांच्या ओळखी झाल्या. त्यातील महादेवकाका मला फार जवळचे झाले. त्यांच्यासोबत मी भाकर तुकडा खायचो. माझ्याबद्दल त्यानी विचारले, तेंव्हा मी माझी सगळी माहिती दिली.
त्यांचं म्हणणं असायचा, “त्या गजानन बाबावर ईश्वास ठेव, तुझं भलं होईल.”
“आमची सेवेकरी मुदत संपली आणि माझे सगळे साथीदार त्यांच्या त्यांच्या घरी जायला निघाले, मी कुठे जाणार? महादेव काका मला म्हणाले, “पोरा, माजा बारूबार माज्या गावाकडं चल, काय असलं तो भाकरी तुकडा खाऊ आणि पंधरा दिसांनी परत येऊ…”
मी त्यांच्याबरोबर त्याच्या गावी गेलो, तीन खोल्यांचं मातीचं घर होत. दोन दुभत्या म्हशी होत्या त्यांच्या. दहा गुंठायचं रान भोवती, पण पाऊस पडत नसल्याने दुष्काळी भाग. त्त्यांची प्रेमळ म्हातारी आणि लेक त्यांच्या घरी होती.
त्यांची लेक सकाळपासून कामाला सुरुवात करायची. म्हशीचे शेण काढायची, मग दूध काढायची. रानातून म्हशींना चारा शोधून आणायची. पण ती गप्प गप्प असायची. घरातले जेवण, भांडीकुंडी सर्व तीच करायची. दोघे नवरा-बायको मात्र तिच्याकडे पाहून डोळे पुसायची. एकदा म्हातारी मला म्हणाली “पांडोबा, या लेकीचं कसं व्हायचं याची चिंता वाटते रे बाबा… तो गजानन बाबा काय तरी इलाज सांगाल.”
मी म्हटलं, “काय झाल?”
“अरे, माजी तरणी पोर यवतमाळच्या नागोजी पाटलाला दिली. पन दोन साल पाऊस पडला न्हाई, पानी न्हाई, कर्ज झालं त्याच्या डोस्क्यावर आनी त्यानं ईश खाऊन जीव दिला की!”
हेही वाचा – पाप आणि पुण्य
“अरेरे… फारच वाईट… आमच्या कोकणात पाऊस भरपूर, त्यामुळं कोणी आत्महत्या करत नाही.”
“होय बाबा, पोरीला घेऊन आलो आमी, अव्हडी तरणी पोर, कशी दिस काढंल?”
“महाराजांवर विश्वास ठेवा, ते काळजी घेतील तिची.”
“होय बाबा, महाराज हाईत मागं… बघू…”
मग माझ्या लक्षात आलं, दोघा म्हाताऱ्यांचं काहीतर हळूहळू बोलणं सुरू होतं. एक दिवस म्हातारी आनी म्हातारे माज्या जवळ बसले. मला म्हातारी म्हणाली “पांडबा, तुज्या लग्नाचा बी खेळखंडोबा झालाय म्हणे, तू बी जीव द्यायला गेला व्हता म्हणे?”
मी मान हालवली.
“असं जीव देऊ नये बाबा, माणसाला जीव लई पुण्याईने मिळतो, तू असं करीनास, बघ तुला पटतंय तर, जबरदस्ती न्हाई. तू आमच्या लेकीबरोबर पाट का लावत न्हाईस?”
“काय?”
आता म्हातारे बोलू लागले “लई दिसापासून मनात होतं, गजानन बाबांनी जणू तुला पाठीवलं, म्हणून तुसानी इथं बोलावून घेतला, माजी पोरगी तुला सुखात ठेवील.”
आणि अव्या, नंदू माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. मी स्वामींना हात जोडले. “स्वामी, तुम्ही चमत्कार घडवता आहात.”
मग दोन दिवसांनी आमचं त्याच्या गावातील गजानन महाराजांच्या देवळात लग्न झालं…”
मी पुढे झालो आणि पांडूला मिठी मारली. शेवटी पांडूला त्याची घरवाली मिळाली होती.
तोपर्यत “जेवणं तयार आहें, पानावर बसा,” असा आतून निरोप आला. मी, नंदू आणि पांडू केळीच्या पानावर वाढलेला भात, आमटी, केळफुलाची भाजी, लोणचं असं जेवणं आनंदाने जेवलो.
मग पांडूला समाधान आणि सुख मिळालं. त्या दोघांनी मिळून बागेत सुपारीची झाडे लावली, काजू कलमे लावली, शेती केली.
दोन वर्षांनंतर मी बायकोला घेऊन आणि नंदू त्याच्या बायकोला घेऊन पांडूच्या बाळाच्या बारशाला जाऊन आलो.


