डॉ. किशोर महाबळ
विद्यार्थी वर्गात, वर्गाबाहेर, शाळेच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात, आणि अनेकदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपापसात बोलतात, गप्पा मारतात. त्यातही काही विद्यार्थी तर गप्पा मारण्याची एकही संधी सोडत नाहीत, असा शिक्षकांचा नेहमीचा अनुभव असतो. यामुळे शिस्त बिघडते, असेही त्यांना वाटते. या जास्त बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत बसायला लावण्यातच शिक्षकांचा भरपूर वेळ जातो. विद्यार्थ्यांच्या या वागण्यावर आपल्याला टीका करता येईल, पण मुळात ते असे का वागत असावेत, याची कारणेही शोधून काढली पाहिजेत.
शालेय विद्यार्थी अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना आजूबाजूच्या असंख्य गोष्टींबद्दल, घटनांबद्दल खूप उत्सुकता असते. त्यांना रोज असंख्य अनुभवही येत असतात. वयाबरोबर शरीरात होणारे बदल हेही नवे प्रश्न, नवे अनुभव देत असतात. आई, वडील, नातेवाईक, शिक्षक आणि समाजातील अन्य लोकांचे वर्तनही ते बारकाईने बघत असतात, अनुभवत असतात आणि त्याबद्दलही त्यांना बोलावेसे वाटते. नाविन्याची आवड असल्याने काहीही नवीन दिसले, अनुभवले की, ते मित्रमैत्रिणींना सांगावेसे वाटते तसेच ते सांगितल्याशिवाय राहवत नाही. हे शाळेतच सांगता येणे शक्य असते. मात्र, प्रत्यक्षात शाळेत दिवसभरात दर दोन तासिकांच्या मधील अल्पसा वेळ आणि मधली सुट्टी वगळता मुक्तपणे गप्पा मारण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळच नसतो. मग अशावेळी जो वेळ मिळेल, त्या वेळेत ही संवादाची संधी घेतली जाते.
खरेतर आपापसात भरपूर बोलणे ही या वयातील मुलामुलींची मानसिक गरज असते. शिवाय, अनेक गोष्टी ते फक्त आपल्या मित्रांशीच बोलू शकतात. मुलींच्या बाबतीत तर ही बाब फारच महत्त्वाची असते. आपल्या सुख-दुःखाच्या गोष्टी मैत्रिणींना सांगण्यातून त्यांना मानसिक समाधान मिळते. अशा असंख्य कारणांमुळे शाळेत थोडासाही मोकळा वेळ मिळाला तर, विद्यार्थी लगेच आपापसात बोलू लागतात. हे सगळे अगदी नैसर्गिक आहे. म्हणूनच जगातील नामवंत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परस्परांशी मुक्तपणे बोलता यावे, यासाठी दैनंदिन वेळापत्रकात विशेष वेळ दिला जातो. आपल्याकडे अजूनही असा विचार झालेला दिसत नाही. विद्यार्थ्यांमधील या संवादाकडे म्हणूनच फक्त नकारात्मक भूमिकेतूनच न बघता खरेतर सकारात्मक दृष्टीने बघायला हवे.
हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध
या संबंधात आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सर्वच विद्यार्थी खूप बोलके नसतात. काहींना आत्मविश्वास नसल्याने ते सगळ्यांशी बोलत नाहीत, काही शांत आणि अबोल असतात. काही विद्यार्थीच कोणाशीही सहजगत्या संवाद साधू शकतात, हे थोडे बारकाईने निरीक्षण केल्यास लक्षात येईल. त्यांचे मित्रमंडळ खूप मोठे असते. त्यांना सहजगत्या इतरांशी संवाद साधता येतो. त्यांच्यात इतरांपेक्षा काकणभर जास्त आत्मविश्वास असतो. सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे थोडे जास्त वाचन असते आणि त्यामुळे त्यांच्याजवळ इतरांना सांगण्यासारखे भरपूर असते. ते सहसा बहुश्रूत असतात. त्यांच्यात संवाद साधण्याची कला आणि कौशल्य उपजतच असते. असे विद्यार्थी सहसा वक्तृत्व कलेतही निपुण असतात. या सर्व गुणांमुळेच या विद्यार्थ्यासोबत नेहमी मित्र-मैत्रिणींचा घोळका असतो. याशिवाय, काही प्रमाणात नेतृत्वाचेही गुण असतात. हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या तुलनेत एकदम वेगळे आहेत हे चटकन लक्षात येते. या विद्यार्थ्यामध्ये बुद्धिमत्तेची विशेष चमक असते. ही बुद्धिमत्ता त्यांना शिक्षक, प्राध्यापक, राजकीय नेते, संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते होण्यासाठी उपयुक्त ठरते.
आपण आपल्या शाळेत थोडा शोध घेतला तर, ज्यांच्यात अशी बुद्धिमत्तेची चमक आहे, असे विद्यार्थी प्रत्येक वर्गात आढळतील. ही बुद्धिमत्ता सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुप्तरूपात असतेच! काहीजणांमध्ये ती अधिक प्रकर्षाने असते. एका विशिष्ट स्तरापर्यंत सर्वांमधील ही बुदधिमत्ता विकसित करण्याचा प्रयत्न करणे, हे गरजेचे आहे. आधुनिक काळात; यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य शिकावेच लागणार. इतरांसमोर आपले मत मांडण्याची, ते इतरांना पटवून देण्याची, नीट मुद्देसूदपणे विचार मांडण्याची क्षमता सर्वच विद्यार्थ्यांना विकसित करावी लागेलच. तेव्हा ही आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता ज्यांच्यात प्रकर्षाने आहे, त्यांच्यात ती अधिक विकसित कशी करता येइल आणि ज्यांच्यात ती सुप्तरूपात आहे, ती विशिष्ट स्तरापर्यंत तरी कशी विकसित करता येईल, याचा आपण विचार करूया.
हेही वाचा – शाळांमधील चित्रकारांचा शोध
आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपापसात संवाद साधण्यासाठी जास्तीतजास्त संधी सहजगत्या कशा देता येईल, याचा विचार करूया. प्रत्येक वर्गात प्रत्येक शिक्षकाने अभ्यासविषयातील कोणत्याही मुद्द्यावर विद्यार्थ्याना गटागटात चर्चा करायला प्रोत्साहन द्यायचे आहे. यासाठी सर्व शिक्षक मोलाची भूमिका बजावू शकतात. भाषा विषयाचे शिक्षक पाठ्यपुस्तकातील एखाद्या विचारप्रवर्तक सुविचारावर परस्परांशी बोलण्यास विद्याथ्र्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. विज्ञानाचे शिक्षक हे वर्गात शिकविलेला सिद्धांत विद्यार्थ्यांनी परस्परांना समजावून देण्यास सांगू शकतात. गणिताचे शिक्षक हेही असेच एखादे गणित विद्यार्थ्यांनी गटात चर्चा करून सोडवावे, असे सांगू शकतात. इतिहासाचे शिक्षक पाठ्यपुस्तकात नोंदविलेली एखादी ऐतिहासिक घटना का घडली असेल, याचा गटांद्वारे विचार करण्यास विद्यार्थ्यांना सांगू शकतात. या पद्धतीने सर्व विषयांचे शिक्षक विद्यार्थ्यांना रोज परस्परांशी संवाद साधण्याची संधी देऊ शकतात.
वर्गात एका बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याचा गट करता येऊ शकतो किंवा थोडा प्रयत्न केला तर समोरच्या आणि मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांचेही गट करता येऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांची रोज वर्गात बसण्याची जागा बदलूनही हे साध्य करता येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांनाही वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी चर्चेची संधी मिळू शकेल. जितक्या जास्त जणांशी त्यांची चर्चा होईल तितका त्यांना अधिक फायदा होईल. विचारशक्तीला चालना मिळेल, मेंदूचा विकास होईल, संवाद कौशल्ये शिकता येतील, पाठ्यपुस्तकांचा अधिक अभ्यास करावा लागेल. इतरांची मते कळल्याने विषयाकडे कोणकोणत्या दृष्टिकोनातून बघता येऊ शकते हे कळेल, सर्जनशीलता वाढेल. कसे बोलावे, आपले मत कसे मांडावे हे शिकता येईल. आपल्या विरोधी मत ऐकण्याची सहिष्णुता विकसित होईल. असे असंख्य फायदे वर्गातील या छोट्या चर्चासत्रांमुळे होतील. या पद्धतीमुळे सर्वच विद्यार्थ्यांना कृतिशील करता येते. सर्वानाच बोलण्याची संधी मिळते. हे सारे आधुनिक शिक्षणपद्धतीत अपेक्षित आहे. चर्चेच्या माध्यमातून विषय चांगला समजतो आणि तो दीर्घकाळ लक्षातही राहतो, असे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राने तर फार पूर्वीच सिद्ध केले आहे. शिवाय विषयाचे आकलन वाढण्यासाठी त्यांना अध्ययन प्रक्रियेत सामील करून घेतले पाहिजे, असा या शास्त्रातला महत्त्वाचा सर्वमान्य सिद्धांत आहेच. असे असूनही विद्यार्थ्यांना परस्परांशी संवाद साधण्याची वारंवार संधी न देऊन आपण जो त्यांच्यावर अन्याय करीत आहोत तो दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.


