आत्मारामच्या बुढ्याले वावरातून येताना रस्त्याच्या कडेला एक कुत्र्याचे पिल्लू पडलेले दिसले. जोरजोरात श्वास घेत… अर्धवट बेशुद्ध… बुढ्याले दया आली. त्याने पिल्लाला थोडे पाणी पाजून पाहिले… आजूबाजूला कोणी आहे का ते पाहिले… पिल्लाच्या आईचा तपास केला, पण कोणी दिसले नाही. पिल्लाला असेच सोडून दिले तर, ते वाचणे कठीण याची कल्पना आल्याने बुढ्याने त्याला उचलून सरळ घरी आणले. घरी आणल्यावर त्याला ओल्या फडक्याने पुसून बुढ्याने थोडे दूध पाजले आणि त्याला कपड्यात गुंडाळून ठेवले.
आत्माराम संध्याकाळी खताच्या थैल्ल्या घेऊन घरी आला आणि कुत्र्याच्या पिल्लाला पाहून संतापलाच, “अप्पा, काहून हे रिकामे काम घेऊन आला. कुत्रागित्रा कुठे पाळता पुन्हा? डोक्याले काय कमी ताप आहे का? सोताईच्या तब्येतीकडे लक्ष द्या आता.”
आत्मारामच्या बुढ्याने पोराच्या बडबडीकडे लक्षच दिले नाही. तोंडातल्या तोंडात फक्त “मुका जीव” एवढेच उच्चारले.
बुढ्याच्या सेवेला फळ आले आणि दोन-चार दिवसांत पिल्लू चांगलं झालं. त्यानंतर वर्षभरातच पिल्लू चांगल्यापैकी मोठं झालं. आत्माराम सोडून सगळ्यांनाच त्याने लळा लावला. बुढ्याचे आणि पिल्लाचे तर एक विशेष नातेच तयार झाले. बुढ्याने त्याचे नाव आवडीने गोट्या ठेवले. बुढा वावरात जायला निघाला की, गोट्या त्याच्याधीच तयार असे. वावर दीड दोन किलोमीटर होते. बुढा पायीच जायचा. त्यांच्याबरोबर गोट्या जायचा. तिथे बुढा फक्त चक्कर मारायचा, पिकावर रोग पडला का? पाणी बरोबर पोहचतय का? हे बघायचा. मग तिथे एका झाडाखाली सावलीत बराच वेळ बसायचा. तिथेच त्यांच्याजवळ गोट्या बसून राहायचा. उन्हे कलू लागली की, बुढा उठायचा. पाइपमधून पाणी येत असेल तर, चूळ भरून मग पाणी प्यायचा. मग तंबाखू मळून दाढेखाली ठेवून… वहाणा घालायचा. “चाल रे गोट्या” म्हटले की गोट्या उड्या मारत त्याच्या मागे निघायचा. रात्रीच्या जेवणात बुढा गरम भाकरीचा मोठा तुकडा तोडून पहिल्यांदा गोट्याला द्यायचा मगच स्वतः खायचा.
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
आत्मारामला मात्र कुत्रा पाळणे मंजूर नव्हते. आधीचा पाळलेला एक कुत्रा मटणासाठी गावातल्याच अब्दुल खाटीककडे कायमचा निघून गेल्यावर तर, त्याला कुत्र्याची चिडच यायची. पण बुढ्यापुढे तो जास्त बोलत नसे. आत्मारामची नाराजी गोट्याच्याही लक्षात आली असावी म्हणून तो आत्मारामकडे जातच नसे. तो बुढ्याच्या सहवासातच सुखी होता.
नियतीला मात्र हे पाहवले नाही.
झाले असे की, दोन-तीन दिवसांपासून बुड्याईले जरा कसर वाटत होती. गावातल्या डॉक्टरने रक्त तपासले तर काय म्हणे प्लेटलेट का काय ते कमी होतं चालल्या होत्या. मग त्याला शहरात धाडले, मोठ्या दवाखान्यात. पण तिथेही काही उपयोग झाला नाही आणि आठवड्याच्या आतच बुढ्याने राम म्हटला. अचानक झाल्याने खूपच धावपळ झाली. बुढ्याला आत्माराम एकच मुलगा. पण चार मुली, परत आत्मारामचे काका चुलते गावातच. घरी खूप गर्दी झाली. बुढ्याचे अंत्यसंस्कार होऊन पुढचे दोन-तीन दिवस खूपच गडबडीत गेले. मग जरासा निवांतपणा झाला. आत्माराम दुपारी घरी जरा लवंडला होता. त्याच्या बहिणी बुढ्याच्या गोष्टी सांगत होत्या. बोलता बोलता बहीण म्हणाली, “आमचा अप्पा लई मायाळू. अगदी कुत्र्यावरबी जीव लावायचा.”
आत्मारामच्या डोक्याला एकदम झिणझिण्या आल्या. गोट्या कुठंय? अप्पा गेल्यापासून गोट्या दिसलाच नाही. तो ताडकन उठला. त्याने घरात बघितले… आजूबाजूला बघितले…. मागील दारी बघितलं… गोट्या दिसलाच नाही. त्याने चपला घातल्या आणि पारापर्यंत गेला. तिथे बसलेल्या पोरांना विचारले,
“बे? आमचा गोट्या दिसलं का तुम्हाले?”
पण सगळीकडून नकार घंटाच आली. फक्त एकाने सांगितलं की, बुढ्याले उचलले तेव्हा गोट्या गल्लीच्या एका कोपऱ्यात बसला होता. उतरलेल्या चेहऱ्याने आत्माराम घरी आला. बुढा जाऊन चार दिवसही झाले नाही, तोपर्यंत बुढ्याचा आवडता कुत्रा असा निघून जावा आणि आपल्या ते लक्षातही येऊ नये, याचे आत्मारामला फार वाईट वाटले. तो हळहळत बसला. अचानक त्याला काय वाटले कोणास ठाऊक, तो तडक उठला, चपला घातल्या आणि मोटरसायकल घेऊन निघाला.
आत्माराम वावरात पोहचला, गाडी लावली, आत नजर टाकली आणि सुटकेचा निश्वास सोडला. बुढा जिथे झाडाखाली बसायचा अगदी तिथेच गोट्या बसला होता. हा इथे असेल हे आधीच आपल्या लक्षात यायला हवे होते. पण हा आला कसा आणि केव्हा?
आत्माराम हळूहळू चालत गोट्याकडे आला. गोट्या मान शरीरात खुपसून मलूल होऊन पडला होता. समोर एका जर्मन थाळीत कडक झालेल्या पोळ्या आणि भाकरीचा तुकडा पडला होता. शेतावर कामाला येणाऱ्या माणसाने बहुदा त्याला पोळी टाकली असावी, पण त्याने त्याला तोंड ही लावले नव्हते. एका कटोरीत माती कचरा असलेले पाणी होते, कटोरी पूर्ण भरलेली होती. म्हणजे गोट्या पाणीही प्यायला नव्हता! आत्मारामला भडभडून आले. गोट्याने दोन-तीन दिवसांत काही खाल्ले नसावे… त्यांच्याशेजारीच बसत त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला,
“बुढाईले देवाने बलिवलं बाबा… आपल्या हातात है का ते? आणि तू इथे असा बगर आन्नपाण्याचा बसशील तर बुढाले आवडीन का ते? चाल बाबा घरी चाल.”
हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!
बोलता बोलता आत्मारामच्या डोळ्यांतून अश्रू पडू लागले. ते अश्रू गोट्याच्या शरीरावर पडताच त्याने अंग थरथरवले आणि तो कूं कूं आवाज करत उभा राहिला. आत्मारामने त्याला उचलले आणि मोटरसायकलच्या सीटवर बसवले.
“राधे… राधे…” आत्मारामने हाक मारताच आत्मारामची बायको गडबडीने उठून बाहेर आली. तिला पाहताच आत्माराम म्हणाला,
“एक-दोन भाकरी टाक.”
‘आता यावेळी?’ तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!
“अगं.. अप्पाच्या पोराने जेवणगिवाणच केले नाही, अप्पा गेल्यापासून. टाक लगीच भाकरी.” आत्माराम गोट्याकडे बोट दाखवून म्हणाला, तशी “बाई गं” म्हणत राधा स्वयंपाकघरात गेली.
“आता बुढा नाही म्हून काय झाले? आम्ही हायेत ना? आता तुह्यावर डब्बल जबाबदारी हायेना भाऊ? आता वावर पण पाहायचे आणि घरही. आता नियम तोडायचा नाही. पहिले तुवा गरम भाकरी मग मला…” भरलेल्या आवाजात आत्माराम गोट्याच्या अंगावरून हात फिरवत बोलत होता आणि त्याच्या कुशीत बसलेला गोट्या सगळं समजल्यासारखं गरम भाकरी मुकाट्यानं खात होता.


