डॉ. किशोर महाबळ
बाहेरील असंख्य आकर्षणांमुळे आणि मोबाइलसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिकण्याकडे तसेच वर्गातील शिकविण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नसते; म्हणूनच ते अभ्यासात मागे पडतात, त्यांना वाईट सवयी लागतात, असे मत शिक्षक, पालक मांडताना दिसतात. हे मत काही प्रमाणात बरोबर आहे. मात्र ते अर्धसत्य आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यात रस नसण्याचे, हे त्यांच्या नकारात्मक वर्तनाचे खरे कारण वेगळेच असते. मुळात असंख्य विद्यार्थ्यांना वर्गात शिकविलेले समजतच नाही, त्यामुळे विषयांचे नीट अध्ययन होत नाही; विषय नीट समजत नाहीत. असे असूनही दरवर्षी असे लक्षावधी विद्यार्थी हे वरच्या वर्गात पाठवले जातात.
वरील इयत्तेचा अभ्यासक्रम हा अधिक कठीण असतो. तो मागील वर्षातील अभ्यासक्रमाच्या पुढचा टप्पा असतो. मागील वर्षाच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा विद्यार्थ्याने नीट अभ्यास केला आहे, असे गृहित धरून त्यापुढील दर्जाचा अभ्यासक्रम पुढील वर्षी नेमलेला असतो. आधीच्या वर्षाचाच अभ्यास नीट न करता पुढील वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्याला मग नव्या अभ्यासक्रमातील विषय समजत नाही. विषय समजेनासा झाला की, मग अध्ययन करणे कठीण होऊ लागते. आपल्याला काही येत नाही, हे लक्षात आल्यावर अभ्यासातील लक्ष उडते. ‘रिकामे मन सैतानाचे घर’ या म्हणीप्रमाणे मग अभ्यास सोडून सर्व काही करण्यात वेळ जाऊ लागतो.
शाळेत शिकविलेले काहीच कळत नसल्याने होताहोईतो शाळेत जाणे टाळले जाते. मात्र घरच्यांच्या दबावामुळे जर जावेच लागले तर मात्र नाईलाज होतो आणि वर्गात जबरदस्तीने बसावेच लागते. वर्गातील नकारात्मक वर्तनाची ही सुरुवात असते. संवेदनशील आणि जागरूक शिक्षकांनाच प्राथमिक स्तरावरील नकारात्मक वर्तनही चटकन लक्षात येते. अन्य शिक्षकांना मात्र नकारात्मक वर्तनाची वारंवारिता वाढल्यावरच ते लक्षात येते. तोपर्यंत परिस्थिती अनेकदा हाताबाहेर गेलेली असते.
विद्यार्थ्यांचे शाळेतील नकारात्मक वर्तन आणि शिक्षणातील अरूची ही अनेकदा त्यांच्या अध्ययनविषयक समस्येची परिणती असते. विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक समस्यांची योग्यवेळी आणि तातडीने दखलच घेतली गेलेली नसते. आपले शिकविणे हे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समजते आहे की नाही, आपले शिकविणे सोपे, अर्थपूर्ण, रंजक होत आहे की नाही, याचा शोधच शिक्षकांनी घेतलेला नसतो. सर्व विद्यार्थ्यांशी वर्गात संवाद न साधल्याने त्यांच्या समस्यांची जाणीवच झालेली नसते.
कोणत्या विद्यार्थ्याला अध्ययनविषयक समस्या आहेत, हे शिक्षकाला अगदी छोट्या-छोट्या गोष्टींतून लक्षात येऊ शकते. विद्यार्थ्यांशी बोलून, त्याचे वाचन ऐकून, त्याचे लेखन बघून, त्याला प्रश्न विचारून, त्याचे वर्गातील वर्तन बघून, आणि त्याला परीक्षेत मिळणारे गुण बघून उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्याच्या बहुतांश अध्ययनविषयक समस्या चटकन ओळखू शकतो. पण असा प्रयत्नच शिक्षकाने केला नसला तर, विद्यार्थ्यांच्या समस्या तशाच टिकून राहतात. योग्य वेळी त्या सोडविल्या न गेल्याने मग दिवसेंदिवस त्या अधिकच बिकट होत जातात.
हेही वाचा – Professor and student : भावना नेहमीच खऱ्या असतात
विषय नीट न समजणे, विषयासंबंधी पूर्वी शिकलेल्या काही मूलभूत गोष्टी न आठवणे, विषयांवर आधारित सोप्या प्रश्नांची उत्तरे न देता येणे, विषयातील माहिती, संकल्पना न आठवणे आणि शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर अपेक्षित असे ज्ञान आत्मसात केलेले नसणे, ही अध्ययन विषयक समस्यांची काही उदाहरणे सांगता येतील. परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकांना या समस्या सहज लक्षात येऊ शकतात आणि येतातही. मात्र विद्यार्थ्यांच्या या अध्ययनविषयक समस्यांबद्दल काय केले जाते? कमी गुण मिळविणारे विद्यार्थी हे बुद्धिमान नाहीत, त्यांना अभ्यासाची आवड नाही. त्यांना काही येत नाही असे मानले जाते. विद्यार्थ्यावरही तशी टीका केली जाते. यामुळे असा विद्यार्थी स्वत:ला कमी लेखू लागतो. अपयशाच्या भीतीने त्याची शिक्षणाची आवड कमी होऊ लागते.
योग्य पद्धतीने विषय न शिकविल्याने, आणि अध्ययन कसे करावे हे न शिकविल्याने विद्यार्थी अभ्यासात मागे पडलेला असतो. त्याची बुद्धिमत्ता कमी असल्यामुळे नव्हे, हे लक्षातच घेतले जात नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक समस्या सोडविण्यास महत्त्व दिले जात नाही आणि काहीही केले जात नाही. विद्यार्थ्यांला मात्र पुढील वर्गात पाठविले जाते. मागच्या वर्गातील विषय नीट न समजता पुढील वर्गात गेल्यावर अध्ययनविषयक समस्या अधिकच वाढत जातात.
कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला विषयातील नेमके काय समजले नाही, याचा शोध घेऊन तो तो भाग रंजकपणे पुन्हा लक्षपूर्वक शिकविणे आणि तो शिकू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्यात यावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. अभ्यास कसा करावा, स्वयंअध्ययन कसे करावे, वाचन लेखन कसे करावे, विषय कसा समजून घ्यावा, यासारख्या बाबी जर शिकविल्या आणि वाचन, लेखन आणि अध्ययनविषयक काही कौशल्ये आत्मसात करण्यास मदत केली तर, प्रत्येक विद्यार्थी अनेक अध्ययनविषयक समस्यांवर सहज मात करू शकतो. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा वारंवार आढावा घेऊन वेळोवेळी आढळलेल्या अध्ययन विषयक समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला तर, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत सर्वच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. तसाच प्रयत्न होणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्याला विषय समजणे सोपे होत जाईल.
एकदा विषय समजू लागला की, शिकण्याची सुप्तरूपात असलेली प्रेरणा आणि आवड वृद्धिंगत होणे सहज शक्य आहे. असे एकदा झाले की, वर्तनविषयक कितीतरी समस्या सुटण्यास मदत होईल. अयोग्य वर्तन करण्यास विद्यार्थ्याला वेळच उरणार नाही आणि वेळ घालवावासा वाटणार नाही. दुर्दैवाने, हे करण्यासाठी आपल्या शिक्षणव्यवस्थेत कोणालाच वेळ नसतो. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक समस्या सोडविण्याकडे लक्ष देणे, हा वर्तनविषयक समस्यांवरील एक मुख्य उपाय आहे, हे शिक्षक आणि पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
प्रत्येक बालकात जन्मत:च निसर्गदत्त अशी शिकण्याची आवड आणि क्षमता असतेच. ती त्याची अन्न, पाणी, वस्त्राएवढीच प्राथमिक गरज असते. स्वयंप्रेरणेने जन्मल्यापासून प्रत्येक मूल हे त्याच्या पद्धतीने अनेक गोष्टी शिकत गेलेले असते. आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दलची प्रचंड उत्सुकता ही त्याला शिकण्यास प्रोत्साहन देत असते. प्रत्येक मूल अत्यंत एकाग्रतेने शिकत असते, सर्व ज्ञानेंद्रियांचा पुरेपुर उपयोग करीत त्याचे हे स्वयंअध्ययन सुरू असते. प्रत्येक विद्यार्थ्यातील अध्ययनाची ही निसर्गदत्त प्रेरणा आणि इच्छा जोपासणे, तिला पोषक ठरेल, असे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे, सातत्याने प्रोत्साहन देणे, त्याला शिक्षण घेण्यात मदत करणे, हे खरेतर शाळांचे आणि शिक्षकांचे प्रधान कार्य असते. विद्यार्थ्यांची उत्सुकता, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, प्रयोगशीलता यांना वाव देणारे, आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणारे अध्यापन असले तर, प्रत्येक विद्यार्थ्यातील शिकण्याची निसर्गदत्त इच्छा आणि आवड वृद्धिंगत करता येते. ती आवड निर्माण झाली की, कितीही विचलित करणारी माध्यमे असली तरीही शिकण्याची प्रक्रिया उत्तमरित्या सुरू राहू शकते.
हेही वाचा – कथालेखक आणि कथाकथनकारांचा शोध
आजही गोष्ट ऐकताना, एखादा खेळ शिकताना आणि खेळताना, खेळाची स्पर्धा बघताना, विज्ञानाचे प्रयोग करताना, गाणी गाताना आणि ऐकताना, वाद्य वाजविताना, छंद जोपासताना, गिर्यारोहण करताना, चित्रे काढताना, प्रश्नमंजुषेसारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याची तयारी करताना आणि प्रत्यक्ष भाग घेताना, मित्रांबरोबर हिरीरीने वादविवाद करताना, चित्रपट बघताना, नाटक आणि नृत्य बघताना किंवा त्यात भाग घेताना, देहभान विसरून जाणारे विद्यार्थी आपण बघतोच. या सर्व ते विद्यार्थी असंख्य गोष्टी अत्यंत आनंदाने शिकतच असतात. अशावेळी मोबाइल किंवा अन्य कोणतीही आकर्षणे त्यांना विचलित करीत नाहीत. कारण ते त्यांना अत्यंत आवडणारी गोष्ट करण्यात आणि शिकण्यात रंगून गेलेले असतात. या सहभागातून होणारे त्यांचे शिक्षण हे अव्वल दर्जाचे असते. या आवडीच्या विषयांबद्दल, कलेबद्दल ते भरपूर माहिती मिळवतात, आणि ते विषय, कला समजून घेण्यासाठी जीवाचे रान करतात हे आपण बघतो.
या विद्यार्थ्यांनी याच पद्धतीने आपल्या अभ्यासक्रमातील विषयही अभ्यासावे यासाठी प्रयत्न करणे हे शिक्षकांचे कार्य आहे. आपला विषय रंजकपणे, सर्जनशीलपणे शिकविला तर, विद्यार्थ्यांना इतर विषय शिकण्यात जसा उत्साह असतो, तसाच उत्साह ते अभ्यासक्रमातील विषयांबद्दलही दाखवतीलच. यामुळे विषय समजू लागतील. विषय शिकण्यात आनंद वाटू लागेल. ज्ञानप्राप्तीचा आनंद विद्यार्थी अनुभवू लागला की, अयोग्य वर्तनात वाया जाणारा त्याचा वेळ सत्कारणी लागेल. बाहेरची कोणतीही प्रभावी आकर्षणे त्याला प्रभावित करू शकणार नाहीत.


