डॉ. किशोर महाबळ
सर्व विद्यार्थी बुद्धिमान असतात फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रकार वेगळा असतो, हे सांगण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. शहरी मुलांमुलींपेक्षा ग्रामीण भागातील मुलेमुली कमी बुद्धिमत्तेचे असतात, हा विचार आधुनिक बालमानसशास्त्राला आणि शिक्षणशास्त्रात अमान्य आहे, हेही आपण दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत. अर्थात, या शास्त्रांतील नव्या संशोधनाशी आपण अनभिज्ञ असल्याने अजूनही जुन्या विचारांना आपण घट्ट धरून ठेवले आहे. आपल्याला ग्रामीण भागातील मुलामुलींची बुद्धिमत्ता शोधता येत नाही, हा आपला दोष आहे, विद्यार्थ्यांचा नाही आणि हे आपल्याला केवळ आधुनिक बालमानसशास्त्र आणि शिक्षण शास्त्राचा सखोल अभ्यास करूनच समजेल. त्यासाठी या विषयावरील इंग्रजीतील नवे शास्त्रीय ग्रंथ वाचण्याची आपल्याला तयारी करावी लागेल, म्हणजेच पुन्हा विद्यार्थी व्हावे लागेल. हे जमले नाही तर, कमीतकमी ग्रामीण मुलामुली बुद्धिमान नसतात, असे मत मांडणे थांबवावे आणि या मुलामुलींच्या मनात न्यूनगंड निर्माण होणार नाही, एवढी तरी काळजी पालक शिक्षक यांनी घ्यावी.
या लेखात एका नव्या विषयाचा विचार करूया. गायनाच्या स्पर्धेसाठी मोठमोठ्या शाळांतून नेहमी ठराविक मुलामुलींनाच पाठविले जाते असा अनुभव येतो. असे का व्हावे? भरपूर विद्यार्थी असलेल्या शाळेत ज्यांना गाता येते, असे फक्त दोन-चारच विद्यार्थी कसे असतील? उलट, प्रत्येक शाळेत असे आवडीने संगीत शिकणारे, वाद्य शिकणारे अनेक विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. शाळेतील सर्व मुलेमुली ट्रिपमध्ये अंताक्षरी खेळताना हिरीरीने गाणी म्हणताना बघायला मिळतात. त्यातील निवडक मुलेमुली ही उत्तम गाणी म्हणतात, हे आपण मान्य करूया. पण याचा अर्थ इतरांमध्ये ही प्रतिभा नसेलच, असे का गृहित धरले जाते? आत्मविश्वास नसल्याने तसेच कधी प्रयत्नच केला नसल्याने उत्तम गायक होण्याची प्रतिभा असलेले विद्यार्थी केवळ प्रोत्साहन आणि संधीच्या अभावी आपल्यातील संगीतविषयक गुणवत्ता ओळखू शकले नसतील.
संगीत प्रत्येक व्यक्तीला शांतता, समाधान, तृप्ततेचा आनंद देऊ शकते. भावभावना ओळखण्याची क्षमता वाढविते. संवेदनशीलता विकसित करते. उत्तम चालीतील भक्तिपर, देशभक्तिपर तसेच संस्कारक्षम गीते तर दूरगामी परिणाम घडवतात. वारकऱ्यांनी गायलेले अभंग, शाहिराने गायलेला पोवाडा किंवा पंडित भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, शाहीर विठ्ठल उमप यांच्यासारख्या प्रथितयश गायकांचे गायन हे किती परिणामकारक ठरते, हे तर आपण नेहमीच अनुभवतो. ‘वंदेमातरम’च्या गायनाचा स्वातंत्र्य चळवळीवरील प्रभाव आपण जाणतो. शाळेतील सर्व मुलामुलींना आपण उत्तम संगीत शिकविले पाहिजे. सर्वचजण तानसेन होऊ शकणार नाहीत, पण सर्व विद्यार्थ्यांना कानसेन करणे मात्र शक्य आहे. तसे करणे या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संगीताचा शिक्षणात कसा फायदा होतो, याबद्दल खूप सारे संशोधन जगभर होत आहे. त्या संशोधनातून हाती आलेले काही निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसार प्रत्येक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना आपण एका विशिष्ट स्तरापर्यंत चांगले संगीत शिकवू शकलो तर, त्यांच्या शिक्षणात मोलाची भूमिका बजावता येईल.
हेही वाचा – Education : शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा
नव्या संशोधनानुसार लहानपणी गायन किंवा वादन शिकविल्यास, स्मरणशक्ती वाढते. डाव्या मेंदूचा उत्तम विकास होतो. गणितातील कूट प्रश्न सोडविण्यात मदत होते. संगीत शिकणारे विद्यार्थी शाळेत उत्तम गुण मिळवू शकतात. सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता आणि उच्च दर्जाची गुणवत्ता विकसित करण्याची क्षमता वाढते. संगीतात नेमकेपणा, अचूकता, उत्कृष्ट दर्जा आवश्यक असतो. त्यामुळे उत्तम संगीत शिकण्यातून हे गुण विकसित होतात. संगीताच्या शिक्षणामुळे सातत्याने आणि चिकाटीने काम करण्याची सवय लागते. ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्यांना अत्यंत शिस्तीने इतरांबरोबर वारंवार सराव करावा लागतो. यामुळे सहकार्याने काम करण्याची सवय लागते. स्वतःला व्यक्त करण्याची बालकांना संधी मिळते. इतरांसमोर संगीत सादर करण्यातून भीती जाते. धाडस करण्याची सवय लागते. संगीताचे शिक्षण हे मानसिक आरोग्यासाठी तसेच अनेकदा व्यसनांपासून दूर राहण्यात मदत करते. संगीताचा नाद श्रवणशक्तिच्या विकासात मदत करतो. संगीत शिकलेल्या आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती तसेच वाचनाची क्षमता जास्त विकसित होते. त्यांना विदेशी भाषा शिकणे सोपे जाते. गोंधळ आणि गडबडीतही ते कोणताही आवाज चटकन ओळखू शकतात. शिक्षणात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्याना संगीताचे शिक्षण इतर विषयांचे आकलन वाढविण्यास उपयोगी ठरू शकते. वाद्यवादन शिकण्यातून शरीराच्या विविध अवयवांचा संतुलित उपयोग उत्तमरित्या करता येतो. अवयवांमध्ये संतुलन राखणे, शिकता येते.
संगीत शिक्षणामुळे बुद्यांक वाढण्यास मदत होते. एकाग्रतेने ऐकण्याची क्षमता वाढते. एवढे सर्व महत्त्वाचे लाभ संगीताच्या शिक्षणामुळे होतात. या संशोधनाचा विचार केला तर शाळेत सर्व मुलामुलींसाठी संगीताचे प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण उत्तमरित्या देणे किती महत्त्वाचे आणि गरजेचे आहे हे आपल्या लक्षात येईल. दुर्दैवाने, सर्व मुलामुलींना संगीताचे शिक्षण देण्याची व्यवस्थाच बहुतांश शाळांत नसते. समूहगीत कधीतरी शिकविले जाते आणि ते स्वातंत्र्य दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी म्हटलेही जाते. पण खरेतर ते पुरेसे नाही. प्रयत्न केला तर, वर्षभरात साध्या सोप्या चालीची असंख्य समूहगीते आपण सर्व विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. प्रार्थनेच्या वेळात फक्त राष्ट्रगीत म्हणून प्रार्थना का संपावी? दर आठवड्यात सोप्या चालीतील एक गीत शिकविण्याचा प्रयत्न केल्यास वर्षभरात कितीतरी चांगली संस्कारक्षम गीते आपण सर्व विद्यार्थ्यांना शिकवू शकू. यामुळे संगीत शिकण्याचे फायदे सर्व विद्यार्थ्यांना मिळतील. तसा प्रयत्न आपण आवर्जुन केला पाहिजे.
हेही वाचा – Education : उत्तम संगीताचे संस्कार
ताल, सुरांचे ज्ञान ज्यांना संगीत येते त्यांना उपयोगात येईलच, पण ज्यांना याचे ज्ञान नाही त्यांनाही यानिमित्ताने ते ज्ञान होईल. सर्वच तानसेन होणार नाहीत किंवा होऊ शकणार नाहीत पण सर्वच जण कानसेन निश्चित होऊ शकतील… तशी संधी आपण सर्व विद्यार्थ्यांना दिलीच पाहिजे. संगीतापासून होणाऱ्या असंख्य लाभांपासून इतकी वर्षे या देशातील लक्षावधी विद्यार्थ्यांना वंचित ठेवले गेले आहे. तसे आपल्या शाळेत होऊ नये असा प्रयत्न आपण सर्व करूया.
अजून एक गोष्ट आपल्याला करता येणे शक्य आहे. प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला वर्गासमोर येऊन आवडेल ते गाणे म्हणण्यास संधी द्यायची ठरवली, तर वर्षभरात आपण चांगले गीतगायन करणारे असंख्य विद्यार्थी शोधू शकू. सर्व विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवडही विकसित करू शकतो. कोणीच विद्यार्थी, कोणालाच हसणार नाही, एवढे आपल्याला करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यामध्ये सांगितीक बुद्धिमत्ता आढळेल, त्यांना प्रोत्साहन देऊ शकू. तर, इतरांना कानसेन करण्याचा एक चांगला प्रयत्न करू शकू. तसे आपण करूया.


