आजकाल शुगर हा विषय इतका कॉमन झाला आहे की, चार लोक जमले की त्यात एक तरी शुगरचा पेशंट नक्की असतो. मग चर्चा सुरू होते…
“हे खायचं नाही…”
“ते खाणं बंद…”
“गोड तर अजिबात नाही…”
“पोळ्या कमी करा…”
ऐकून असं वाटतं की आता खायला काहीच उरलं नाही!
खरंतर, आजार कोणाला व्हावा किंवा होऊ नये, हे आपल्या हातात नसतं. पण तो झाल्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची, हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं.
माझ्या एका मैत्रिणीच्या मिस्टरांना डायबिटिसचं निदान झालं, तेव्हा डॉक्टरांनी एक वेगळाच सल्ला दिला… गव्हाच्या पोळ्या कमी करा किंवा बाद करा आणि आहारात ज्वारी, बाजरी, नाचणीबरोबर जवाची पोळी / भाकरी सुरू करा!
हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”
ज्वारी, बाजरी, नाचणी आपण कधी ना कधी खातोच. पण जव? आपल्या स्वयंपाकघरात त्याचं नावही फारसं घेतलं जात नाही. म्हणून मलाही उत्सुकता वाटली आणि मी स्वतः जवाची पोळी खायला सुरुवात केली.
सुरुवातीला थोडी वेगळी वाटली, पण आता सवय झाली आहे… आणि एक गोष्ट लक्षात आली, आपल्या आहारात एकच गोष्ट कायमची असण्याची गरज नाही. बदलही तितकाच महत्त्वाचा असतो! आपण रोज एकच गव्हाची पोळी खाण्यापेक्षा कधी ज्वारी, कधी बाजरी, कधी नाचणी, तर कधी जवाची पोळी खाल्ली तर आपल्या शरीरालाही वेगवेगळे पोषक घटक मिळतात.
हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!
शुगर झाली म्हणजे आयुष्य संपलं किंवा सगळं आवडतं खाणं बंद झालं, असं नाही. फक्त ताटात थोडी शहाणपणाची भर घालायची असते.
आणि हो… पथ्य म्हणजे शिक्षा नाही. ती आपल्या शरीराची काळजी घेण्याची एक सवय आहे.
आजकाल आपण मोबाइल बदलतो, गाडी बदलतो, फॅशन बदलतो… मग आपल्या ताटात थोडा बदल करायला काय हरकत आहे? कारण शेवटी… “औषधापेक्षा योग्य आहार रोज काम करतो, आणि छोटासा बदलही मोठा फरक घडवू शकतो.”
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


