“डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम बोललं जातं; ‘भूक लागत नाहीये’ म्हणजे काय? जेवावसं वाटत नाही? खाल्लं की पोट गच्च होतं? थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं? इच्छा होते, पण जात नाही की भावनाच उडाली? संकल्पनात्मक पातळीवर हे वाटतं तितकं सहज साधं प्रकरण नाही…
आपल्याला भूक लागत नाही म्हणजे नेमकं काय होतं? कधीपासून सुरू झालं? त्याचे शरीरावर काय परिणाम झाले? याची ढोबळ का होईना कारणमीमांसा गरजेची असते. पेशंट जेव्हा म्हणतो, “भूक लागत नाही” तेव्हा डॉक्टरच्या डोळ्यांसमोर फक्त रिकामं ताट नसतं, तर तो मेंदू-पोट-संप्रेरके-भावना यांचा गुंतागुंतीचा खेळ उलगडत असतो.
भूक न लागणं म्हणजे फक्त जेवायची इच्छा नसणे नव्हे; तो आपल्या शरीरातील जैविक, मानसिक आणि रासायनिक यंत्रणांचा समन्वय बिघडल्याचा इशारा असतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूक ही पोटात नाही, तर मेंदूत जन्म घेते! यातला मुख्य सूत्रधार असतो ‘मोगॅम्बो’ म्हणजे मेंदूतील ‘भूक केंद्र’ अर्थात ‘हायपोथॅलॅमस’ आणि त्याचे तीन साथीदार डागा-राका-तेजा अर्थात भूक वाढवणारं संप्रेरक घर्लिन, “आता पुरे” सांगणारं संप्रेरक लेप्टिन आणि पोट तसेच मेंदू यांच्यातील खबरी अर्थात व्हॅगस नर्व्ह…
पोट रिकामं झालं की, घर्लिन कामाला लागतो आणि मेंदूला संदेश जातो, “चल, आता जेवायला बस.” पण जेव्हा या साखळीत कुठंही बिघाड होतो, तेव्हा पोट म्हणतं “रिकामं आहे” आणि मेंदू उत्तर देतो, “मला भूक नाही.”
भूक न लागण्याची शास्त्रोक्त कारणं म्हणजे जंतूसंसर्ग जसं ताप, टायफॉइड, लघवीत संसर्ग, क्षयरोग इत्यादी. संसर्ग शरीर जगण्यासाठी ऊर्जा वळवतं, त्यामुळं जेवण बाजूला रहातं… सायटोकाइन्स नामक दाहकारी रसायनं भूक केंद्र दाबून ठेवतात.
काही औषधांमुळंही भूक जाते; जसं प्रतिजैवकं, वेदनाशामक, केमोथेरपी यामुळं पोटात जळजळ, मळमळ होऊन मेंदूला ‘खाणं धोकादायक’ असा संदेश जातो.
हेही वाचा – मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!
मानसिक कारणांमुळंही भूक हरवते जसं तणाव, चिंता, नैराश्य यात मेंदू सतत सर्व्हायवल मोडमध्ये असतो; सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिम सक्रिय होते, यामुळं पचन थांबतं आणि भूक गायब होते.
पचनसंस्थेचे काही आजार – जसे जठरदाह, आम्लपित्त, यकृताला सूज, अग्न्याशयाला सूज असल्यास पोट म्हणतं, “आधी यांचं दुखणं बघ, मगच जेव.”
हायपोथायरॅाडीजम, मधुमेह आणि काही आजारात संप्रेरकीय गोंधळ उडतो, संप्रेरक म्हणजे शरीराचा वाद्यसंचालक. त्याची एक चुकीची नोट किंवा हालचाल सगळं रागरंग बिघडवून टाकते.
भूक न लागण्याचं हल्ली सापडणारं मुख्य कारण म्हणजे बिघडलेली मानसिकता! जसं वजन वाढण्याची तीव्र भीती, शरीराच्या प्रतिमेबद्दल चुकीची धारणा, परिणामी उपासमार; मग अशक्तपणा… यातून जीवघेणा धोका निर्माण होतो. इथं “फक्त खा” असा सल्ला पुरेसा नसतो.
“तुम्हाला भूक लागत नाहीये,” हा तुमच्या शरीराचा संदेश कसा ओळखाल? तर प्रारंभी हे दोन-तीन दिवस चालेल, मग दोन-तीन आठवडे अशावेळी तपासणी आवश्यक ठरते. त्यानंतर वजनात घट, अशक्तपणा, चक्कर म्हणजे रेड सिग्नल अर्थात धोक्याचा इशारा!
हेही वाचा – पोट सहनशील, पण…
भूक न लागणं म्हणजे बहाणा, आळस किंवा हट्ट नाही, तो शरीराचा SOS कॉल असतो. अशावेळी पेशंट म्हणतात, “टॅानिक द्या.” पण फक्त टॉनिक देऊन भागत नाही, मूळ कारण शोधणं महत्त्वाचं असतं. कारणानुसार उपचाराची दिशा ठरवणं, त्या अनुषंगानं औषधयोजना करणं, सोबत मानसिक समुपदेशन, पचन सुधारणारे उपाय, तसेच वेळेवर, हलकं आणि आवडीचं अन्न खाण्याचा सल्ला देणे वगैरे करावं लागतं. थोडक्यात, भूक जबरदस्तीनं नाही, तर नीट समजून उमजून घेतल्यावरच परत येते.
बाकी भूक ही फक्त पोटाची गरज नाही तर ती शरीर आणि मन यांच्यातील संवाद आहे. तो संवाद तुटला की, शरीर शांतपणे म्हणतं, “आधी मला ऐक, मगच मला खायला दे.”


