एक 45च्या आसपासची टिपिकल भारतीय गृहिणी ओपीडीत आली होती. चेहरा उतरलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसांची घनता कमी झालेली, खांदे झुकलेले, त्वचा निस्तेज आणि हातात नेहमीची फाईल…
बिचारीची तक्रारही तिच्यासारखी साधीच होती, ”डॉक्टर, पोट काही केल्या नीट होत नाही. सारखं जुलाब, पोटात मुरडा, कधी उलटी, कधी अॅसिडिटी, कधी गॅसेस तर कधी नुसताच गच्चपणा…”
नेहमीप्रमाणं कारणमीमांसा सुरू झाली – औषधं, पाणी, ताणतणाव, इतर आजारांचा इतिहास… पण सगळं ठीक! मग सहज विचारलं, ”जेवणाचं काय? तुम्हीच बनवता?”
उत्तर आलं, अगदी अभिमानानं… “हो डॉक्टर, मीच बनवते.”
हेही वाचा – त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’
“…आणि काहीच वाया घालवत नाही?” – मी.
“हो. अन्न वाया कसं घालवायचं? फ्रीजमध्ये ठेवते… खाल्ल्याशिवाय समाधानच नाही…”
इथंच केसचा खरा खलनायक समोर आला. किंबहुना, शाकाहारी, मांसाहारी, मिश्रहारी प्राण्यांच्या यादीसोबत अजून एक श्रेणी जोडायला हवी, ती म्हणजे उष्टाहारी प्राणी आणि तो म्हणजे भारतीय मध्यमवर्गीय गृहिणी!
त्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो…
शिळं म्हणजे फक्त थंड झालेलं नव्हे! बर्याच जणांचा गैरसमज असतो की, अन्न शिळं झालं म्हणजे फक्त चव बदलते; पण वैद्यकशास्त्र सांगतं, शिळं अन्न म्हणजे जंतूंसाठी खुलं आमंत्रण!!
शिजवलेलं अन्न थंड होताच, त्यात बॅक्टेरिया,फंगस वाढायला सुरुवात होते. विशेषतः, भात, मटकी, रस्साभाजी, दही आणि मांसाहार हे पदार्थ शिळे राहिले की, त्यात साल्मोनेला, इ. कोलाय (Escherichia coli), स्टॅफिलोकोकस यासारखे जंतू मौज करायला लागतात.
‘उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे सुरक्षित होतं!’ हा अजून एक मोठा गैरसमज. फ्रीज जंतूंची वाढ फक्त मंद करतो, पण पूर्ण थांबवत नाही. शिवाय, अन्न वारंवार फ्रीजमधून बाहेर काढणं… पुन्हा गरम करणं… अर्धवट गरम अन्न… हे सगळं मिळून पोटासाठी एक टाइम-बॉम्ब तयार करतात.
या गृहिणीच्या पोटात नक्की काय चाललंय, ते तपासणीअंती कळेलच जसं गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आतड्यांची सूज, पचनसंस्थेची बिघडलेली नैसर्गिक जंतूसंरचना अर्थात गट फ्लोरा…
हेही वाचा – स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!
थोडक्यात, दररोज थोडं-थोडं विष… आणि हळूहळू पोट हार मानतं! शिळं अन्न खाल्ल्याचे संभाव्य दुष्परिणाम म्हणजे सतत जुलाब, पोटदुखी आणि मुरडा, उलटी, मळमळ, आम्लपित्त, अशक्तपणा आणि दीर्घकाळात कुपोषण…
शिळं कधी चालेल? तर कधीतरीच! लगेच फ्रीजमध्ये ठेवलेलं, 24 तासांच्या आतलं, नीट गरम केलेलं, ज्याचा वास, चव, रंग बदललेला नाही ते! फ्रीजबाहेर ठेवलेलं दोन-तीन वेळा गरम केलेलं, आंबट वास येणारं, रंग बदललेलं, फसफसणारं हे तर सरळ डस्टबिन योग्य!
हे पेशंट औषधांमुळं बरे होतीलच, पण खरं औषधंय ‘शिळं अन्न टाळणं’!
मी तर नेहमी म्हणतो पोटासारखा सहनशील अवयव नाही, पण ते एकदा बिघडलं तर काही म्हणजे काहीच उमजू देत नाही!


