नीता चंद्रकांत कुलकर्णी
माझ्या लहानपणीची गोष्ट. एप्रिल महिन्यात आमच्या वार्षिक परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या साठवणींच्या उन्हाळी कामांना… वाळवणाला सुरुवात करायची. प्रथम फळीवरचे मोठे पत्र्याचे आणि ॲल्युमिनियमचे डबे खाली काढले जायचे. डबे धुऊन उन्हात वाळवले जायचे. ऊन कडक आहे… याचा आईला आनंद व्हायचा. त्यात घडी करून ठेवलेले प्लास्टिकचे मोठे कागद असायचे. ते स्वच्छ धुऊन ऊन्हात वाळवायचे. तेव्हा ते सहजासहजी मिळत नसत म्हणून आई ते नीट सांभाळून ठेवायची.
आदल्या दिवशी गच्ची झाडून घ्यायची. संध्याकाळी बादलीने पाणी वर न्यायचे आणि गच्ची धुऊन काढायची. सगळ्यात प्रथम मान सांडग्यांचा असायचा. लाकडी पाट धुवून वाळवून ठेवलेला असायचा. रात्री हरभरा डाळ, मूग, उडीद डाळ भिजत घालायची. सकाळी पाट्यावर मिरची आले मीठ घालून जाडसर वाटायची.
पाटावर मध्यभागी सुपारी ठेवली जायची. त्यावर हळदीकुंकू वाहून आई मनोभावे नमस्कार करायची. वर्षभराचे पदार्थ चांगले व्हावेत म्हणून गणपतीची प्रार्थना करायची… अन् कामांचा ‘श्री गणेशा’ व्हायचा…
हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!
त्या सुपारीभोवती गोल गोल सांडगे घालायचे. पाट उचलून वर गच्चीत ठेवायचे काम आमचे असायचे. बाकीच्या पिठाचे सांडगे वर गच्चीत प्लास्टिकवर घातले जायचे. त्यांचा आकार जराही कमी जास्त झालेला आईला चालायचा नाही. एकसारखे सांडगे सुरेख दिसायचे. ते जरासे वाळले की, आमची खायला सुरुवात व्हायची. वरून कडक आणि आतून ओलसर सांडगे खाऊनच निम्मे संपायचे. साठवणीसाठी आई परत एकदा करायची.
हे सांडगे तळून भाजलेल्या दाण्याबरोबर खाल्ले जायचे. भाजी नसेल त्या दिवशी खोबरं, कांदा, लसूण यांचं वाटण करून त्यात सांडगे घालून आई त्याची भाजी करायची. हे सांडगे तळून कढीत टाकले की, गरम भाताबरोबर खाताना भाताची चव मस्त लागायची.
नंतर पापडाचा नंबर लागायचा. उडीद आणि मूग डाळ गिरणीत समोर उभं राहून आई दळून आणायची. सकाळीच पापडखार, काळीमिरी, घालून उडदाचे पीठ घट्ट भिजवले जायचे. अगदी ‘दगडासारखे’ हा शब्द आईचाच… ते कुटून द्यायचे काम भावाचे असायचे. वरवंट्याने दणादण तो पीठ कुठून द्यायचा. आई तेलाचा हात लावून बोट्या करून ठेवायची. त्याची चव अप्रतीम लागायची. येता जाता आम्ही त्या खात होतो.
शेजारच्या दोन-तीन काकू त्यांचे जेवण झाले की, पोळपाट लाटणे घेऊन यायच्या. गोल बसून घरात गप्पा मारत पापड लाटणे सुरू व्हायचे. लाटलेले पापड हातावर घेऊन आम्ही वर उन्हात नेऊन घालत असू. हे पापड सारखे हलवायला लागायचे नाही तर, कडक होऊन त्यांचा आकार बदलायचा. आई खालूनच सांगायची…
“पापडाचा द्रोण होऊ देऊ नका रे…”
वर एकदा येऊन आई नजर टाकून जायची. रात्री मुगाची खिचडी व्हायची. त्याच्याबरोबर ताजा तळलेला पापड असायचा…
सगळ्यात जास्त व्याप असायचा, तो गव्हाच्या कुरडयांचा! त्यासाठी आई तीन दिवस गहू भिजत घालायची. नंतर ते पाट्यावर वरवंट्याने चांगले वाटायचे. भरपूर पाण्यात कालवायचे. चोथा आणि सत्व वेगळे करायचे. त्याला गव्हाचा चीक म्हणतात. आई लवकर उठून तो चीक शिजवायची. तो गरम असतानाच कुरडया घालायला लागायच्या. पात्र भरून द्यायचं काम बहिणीचे आणि माझे असायचे.
हा ..हा म्हणता.. पांढऱ्या शुभ्र कुरडयांनी प्लास्टिक भरून जायचे. त्यावर्षी घरात काही मंगल कार्य असेल तर, रंगीत कुरडया घातल्या जायच्या. ‘सूर्यदेव’ वर यायच्या आत कुरडया घालून झाल्या पाहिजेत, असे आईने ठरवलेले असायचे.
नंतर आई आम्हाला खाण्यासाठी चिक शिजवून द्यायची. त्यात तूप, मीठ घालून किंवा दूध साखर किंवा हिंग,, जिऱ्याची कडकडीत फोडणी करून खाल्ला तरी तो छान लागायचा. सत्व काढून उरलेला जो गव्हाचा चौथा असेल त्यात मिरची, लसूण घालून त्याच्या भूस पापड्या घातल्या जायच्या. त्या तळल्या की, कुरकुरीत लागायच्या.
सुट्टीच्या दिवशी वडील सकाळीच सायकलवरून मोठ्या मंडईत जायचे. भरपूर बटाटे आणायचे. बटाटे किसायची मोठ्या भोकाची किसणी वर्षातून एकदाच माळ्यावरून खाली यायची. पहाटे उठून बटाटे उकडायचे, सोलायचे आणि थेट प्लास्टिकवर खिसायचे. उन्हाने सायंकाळी चार-पाच वाजेपर्यंत किस कडकडीत वाळून जायचा. त्यात दाणे, तिखट, मीठ, साखर घालून चिवडा केला जायचा. कधी त्यात नायलॉन साबुदाणा तळून घातला जायचा. गावाला जाताना गाडीत खायला आई हा चिवडा करून घ्यायची.
साबुदाणा दळून आणून त्या पीठात उकडलेला बटाटा घालून उपवासाचे पापड केले जायचे. त्यातही मिरचीचे तसेच तिखटाचे असे दोन प्रकार होते. उपासाची चकली पण आई करायची. बटाट्याचे चिप्स लहानपणी खूप आवडायचे. जाळीचे आणि प्लेन असे वेफर्स करणारी चपटी किसणी होती. त्या वेफर्सची ट्रायल घेण्यातच बरेचसे बटाटे खर्ची व्हायचे. कितीही प्रयत्न केला तरी तीन-चार फक्त पातळ व्हायचे बाकी जाडच! तरीसुद्धा ते जाडे जुडे वेफर्स आम्ही आवडीने खात होतो. त्याची दरवर्षी काहीतरी निराळी पद्धत आईला कोणीतरी सांगे. तरी बटाटा पातळ कापला जायचा नाही. कंटाळून आई विळीवर पातळ काप करून घ्यायची. विकतचे वेफर्स हा फार महाग पदार्थ समजला जायचा त्यामुळे तो आणला जायचा नाही.
साबुदाण्याच्या पापड्या घातल्या जायच्या. मधे जरा ओलसर असलेल्या त्या ओल्या कच्च्या पापड्या सुद्धा छान लागायच्या. थोडीशी खारट साबुदाण्याची आणि जिऱ्याची चव यांचा मस्त मेळ जमायचा… या पापडाच्या पिठात शिजवताना बटाटा किसून घालायचा आणि मिरची वाटून लावायची, त्या जरा वेगळ्या पापड्या तळल्यावर सुंदर दिसायच्या.
मसाल्याच्या भरलेल्या मिरच्या, साबुदाणा भरलेल्या उपासाच्या मिरच्या, कुटाच्या मिरच्या असे मिरच्यांचे प्रकार व्हायचे. दहीभाताला किंवा दही पोह्याला हीच मिरची लागायची.
शेवयांसाठी खास दोन-तीन दिवस राखून ठेवलेले असायचे. त्याचे पीठ जमले, शेवयांची बारीक तार निघालेली पाहिली की, आई खूश व्हायची. हातावर शेवया करायच्या. लांब करून त्या न तुटतील इतक्या ताणायच्या. लाकडी काठीवर वाळवायच्या. केशर, बदाम आणि आटिव दुधातल्या त्या खिरीची चव अजून जिभेवर आहे… त्या शेवयांचे जे तुकडे खाली पडायचे त्याचा कांदा, कोथिंबीर, भाज्या घालून उपमा केला जायचा. तो फारच चवदार लागायचा. पण शेवया खूप मेहनत घेऊन केलेल्या असल्यामुळे त्या खिरीसाठीच वापरल्या जायच्या.
ज्या दिवशी जो पदार्थ केला असेल, त्या दिवशी रात्रीच्या जेवणात तो पदार्थ असे. वडील ऑफिसमधून आल्यावर आवर्जून चौकशी करायचे. जे केलेले असेल ते आई दाखवायची. वडील “वा वा” म्हणायचे. आई खूश होऊन हसायची.
एक एक पदार्थ तयार होऊन डब्यात भरला जायचा. त्या डब्यांवर कोहाळ्याचे सांडगे… उपवासाच्या पापड्या… लसणाचे पापड… असे खडू ओला करून लिहिले जायचे. वरची फळी गच्च भरून जायची.
आईला या महिन्यात आराम नसायचाच. कारण हे प्रकार करून संपेपर्यंत वडील मिरच्या, हळकुंड, शिकेकाई आणून द्यायचे. मिरच्यांची डेखे काढायची. मिरच्या, हळकुंड गच्चीत वाळवायचे. वडील ते मोठ्या गिरणीत जाऊन दळून आणायचे. वर्षभराचे तिखट, हळद होऊन जायचे.
आईने खूप दिवसांपासून लिंबाची साले साठवून, वाळवून ठेवलेली असायची. ‘गव्हला कचरा’ म्हणजे काय असायचे कोण जाणे? पण लांब असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी दुकानातून वडील तो आणून द्यायचे. आवळकाठी, रिठे गच्चीत वाळत घातलेले असायचे. हे सगळे एकत्र करून शिकेकाई दळून आणायची. रविवारी आई या शिकेकाईचे भरपूर पाणी गरम करून द्यायची. त्यानी केस धुवायचे, असा दंडक होता.
महिन्यातून एकदा आई स्वतः केस चोळून न्हाहू घालायची. आईच्या हातात केस होते, तोपर्यंत केस लांब आणि जाड होते. कॉलेजमध्ये गेल्यावर केसांना पहिला शिकेकाई साबण लावला, तेव्हा आई खूप चिडली होती.
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
मे महिना संपता संपता आईची लोणच्याची गडबड उडायची. कैरीचे तिखट, गोड लोणचे. तक्कु, किसाचे लोणचे, लवंगी मिरची लोणचे असे विविध प्रकार आई करायची. गुळांबा, साखरआंबा, मुरांबा हे पदार्थ व्हायचे. झाकणाला पांढरे स्वच्छ कापड म्हणजे दादरा लावून आई बरण्या बंद करायची. सेल्फमधला वरचा कप्पा या बरण्यांचा असायचा… हे सगळं नीट पार पडलं की, आईला आनंद व्हायचा.
शाळा सुरू झाल्यावर डब्यात पोळी-भाजी बरोबर लोणचे, गुळांबा असायचा. कितीतरी दिवस आईचा हा उद्योग चालायचा. आता विचार केला तर, आश्चर्य वाटते… पण तेव्हा ते सर्व लागायचे. वर्षभर बरोबर पुरायचे! सध्यासारखी शिबीरं, क्लास असे काही नसायचे; पण आम्हाला सुट्टीचा कधी कंटाळा यायचा नाही. आईला मदत करताना त्यातून खूप शिकायला मिळायचे. आजकाल एवढे प्रकार कोणी करत नाही आणि लागतही नाहीत. जे पाहिजे ते तयार मिळते. पाकिटे आणायची अन् खायचे… पण ती पूर्वीची मजा त्यात नाही एवढे खरे…
सुमारे दीड फूट उंचीची चिनीमातीची लोणच्याची बरणी, पत्र्याचे चौकोनी, गोल डबे बरेच वर्ष माझ्या माहेरी माळ्यावर पडून होते. दरवेळेस माळा साफ करताना त्याची अडचण वाटायला लागली… पण ते काढून परत वर ठेवले जायचे. एकेवर्षी वडिलांनी ती मोठी बरणी कोणाला तरी देऊन टाकली… किती तरी दिवस आम्ही बहीण-भाऊ त्या बरणीसाठी हळहळत होतो… उगीच दिली, असे अजूनही वाटते.
ती बरणी नुसती बरणी नव्हती. ते आमचे लहानपण होते. तो जपून ठेवावा असा ठेवा… आमच्या मनातल्या आनंदाची ती एक साठवण होती! ती बरणी म्हणजे आमच्या कष्टाळू आईची आठवण होती…
आजही साठवण लिहिताना आईच आठवली… आई गेली आणि सारे संपले…
(मोबाइल – 9763631255)


