नीता चंद्रकांत कुलकर्णी
हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं. तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून डोळे मिटून गतजीवनातल्या घडामोडी आठवत राहायची. आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्युपत्राची आठवण आली. तो दिवस आठवला…
चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागदं फाडायच असं सुरू होत. तिने विचारलं,
“काय करताय?”
“महत्त्वाचं काम करतोय… मृत्युपत्र लिहितोय! विचार करून ते लिहायचं असतं…”
“काय मृत्युपत्र? आत्ता…? कशासाठी?”
“आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे मुलांना काळजी नको.”
“म्हणजे वाटणी का?”
यावर तो जरा रागवलाच…
“नुसती वाटणी नसते ती…! बरं ते जाऊ दे… उगीच काहीतरी विचारत बसू नको… तुला काय त्यातल समजणार? एक वाजायला आलाय जेवायला वाढ.”
ती गप्प बसली.
खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा काही सांगितलं तरी, त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं! त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं.
नेहमीचच होतं ते… त्याचं बोलणं तिने मनावर घेतलं नाही. तरी आत कुठेतरी वाईट वाटलच…
का कोण जाणे… पण गेले काही दिवस मृत्युपत्र हेच तिच्या डोक्यात होतं… आज लेक भेटायला येणार होती. ती आल्यावर तिच्याजवळ हा विषय काढायचा, असं तिने ठरवले.
लेक आली. थोड्यावेळाने तिने तिला जवळ बोलावले आणि म्हणाली, “माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगायची आहे.”
“सांग ना…”
“मला मृत्युपत्र करायचं आहे…”
आईचं बोलणं ऐकून लेकीला आश्चर्यच वाटले.
“तुला मृत्युपत्र करायचंय? कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात?”
मुलीने जरा हसत विचारलं.
हेही वाचा – हा खेळ कागदांचा…
आईचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच नादात होती. पुढे म्हणाली,
“अगं एक महत्त्वाच विचारायचं होतं, मृत्युपत्र लिहिले की, त्याप्रमाणे वागावं लागतं का? ते बदलता येत नाही ना?”
आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं… आई गंभीरपणे काही सांगते आहे. ती म्हणाली…
“हो नाही बदलता येत… त्याप्रमाणेच करावं लागतं. पण आई आज असं का विचारते आहेस?”
“मला पण करायचे आहे मृत्युपत्र. आण कागद… पेन… घे लिहून…”
“अगं कशाची वाटणी करणार आहेस? काय आहे तुझ्याजवळ?”
लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं… ती तंद्रितच बोलत होती…
“भावांनी बहिणीला वर्षातून एकदा माहेरपण करायचं… राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं. त्याला ओवाळायचं… तबकात अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील… ते महत्त्वाचं नाही! भावाला घरी बोलवायचं. गौरीला माहेरची सवाष्ण हवी… नाही जमलं तर एखाद्या श्रावणी शुक्रवारी तिला घरी बोलवायचं… तिची ओटी भरायची. बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं… त्याला मदत करायची. वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं तिच्यावर माया करायची… आपापसात सगळ्यांनी प्रेमाने, आनंदाने आपुलकीने राहायचं… आत्या, काकू, मामा, मामी सगळी नाती जपायची… एकोप्याने रहायचं. पुढच्या पिढीने पण हे असंच सुरू ठेवायचं…”
एवढं बोलल्याने ती दमली, मग श्वास घेण्यासाठी थोडा वेळ थांबली.
लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती… आई मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती…
“तू विचारलंस ना, माझ्याकडे काय आहे वाटणी करायला? खरंच, काही नाही गं… मला वाटणी नाहीच करायची तर, तुमची जोडणी करायची आहे. तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे… आलं गेलं तरच ती टिकून राहील! हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा.”
हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!
लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली. तिने आईचा हात हातात घेतला… त्यावर थोपटलं… आश्वासन दिल्यासारखं! आपल्या मुलाबाळांचं पुढचं आयुष्य सुखात जावं म्हणून लाखमोलाचं सद्विचारांचं धन आईनी आज वाटलं होतं…
दारात भाऊ भावजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते. ते आत आले त्यांनीही आईचा हात हातात घेतला.
चौघांचे डोळे भरून वाहत होते.
आता ती निश्चिंत झाली होती. खूप दिवसांनी ती समाधानाने हसली. मनात म्हणाली…
‘रामराया आता कधीही येरे न्यायला मी तयार आहे!’
मोबाइल – 9763631255


