|| श्री स्वामी समर्थ ||
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना तर्क लावला तर, गणिते लवकर सुटतात. पत्रिकेत 6 8 12 या भावांना त्रिक भाव म्हटले आहे आणि त्यातून आपल्याला मनस्ताप, कटकटी, आजार, कर्ज, दवाखाना, तुरुंग अशा अनेक गोष्टींची शृंखला पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात तसे नाही. जे दिसते, तसे नेमके आहे का? हे पाहताना खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू होतो. जर हे भाव इतके वाईट फलादेश देणारे असते, तर ऋषीमुनींनी ते मुळात पत्रिकेत ठेवलेच नसते. असो.
चित्रात सगळे रंग पाहिजेत, तसे आयुष्यात सगळी माणसेही हवीत. अगदी त्याचप्रमाणे पत्रिकेत प्रत्येक ग्रह, नक्षत्र, भाव, राशी आणि दशा या प्रत्येकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. एक दुसऱ्यापेक्षा वेगळा असला तरी, महत्त्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यात सगळ्यांचेच योगदान आहे. या सर्वाचा सखोल अभ्यास अध्ययन आवश्यक आहे.
अष्टम भाव विचारात घेताना आपण मृत्यूसम पीडा, वारसाहक्काने मिळणारे धन, मन:स्ताप अशा अनेक गोष्टी विचारात घेतो; कारण ते मृत्यूसम पीडा देणारे आहे, पण मृत्यू नाही, हे लक्षात घ्यायला हवे. अष्टम भाव म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीतील ‘अष्टम’, जे वृश्चिक राशी दर्शवते. इथे मिट्ट काळोख आहे आणि गूढ भाव आहे. आपल्या आयुष्यातील सगळ्या गूढ गोष्टींचा हा भाव आहे. गूढ म्हणून जर या भावाची दशा लागली, तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करावा; कारण हा सुद्धा गूढतेकडे नेणारा विषय आहे. ज्याला जे भावते ते केले, तर नकारात्मक फळ मिळणार नाही. त्यामुळे अष्टम भाव किंवा त्याची दशा वाईट आहे, असे नाही तर, त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी केल्यास तो भाव तितकाच खुलेल आणि दशा सकारात्मक फळ देईल.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश
एकदा एक सत्यनारायण व्रताची पूजा, मंगळागौर पूजन सांगणारे गुरुजी कर्जबाजारी झाले होते. उत्पन्न शून्य आणि डोक्यावर कर्जाचा भार, असे त्यांचे आयुष्य चालले होते. दशा अष्टम भावाची त्यांनी अंतेष्टी करायला सुरवात केली, तसे अष्टम जागृत झाले आणि पैसा यायला लागला. अष्टम भावाने दर्शवलेल्या गोष्टी करायला सुरुवात केली, तसे अष्टम फळ द्यायला लागले.
एका मुलाला अष्टम लागले, त्याने विमा एजंट म्हणून नोकरी आणि व्यवसाय करायला सुरुवात केली, त्याचे भोग संपले. प्रत्येक भाव हा काहीतरी देत असतो आणि त्यामागे असलेला एक ठराविक विचारही असतो, तो आपल्याला कळणे म्हणजे ज्योतिष.
तर्क लावता आला पाहिजे. कुठलाही भाव निष्फळ नाही. उत्तम ग्रहाच्या दशा लागूनही त्या वाईट जातात, कारण आपण भ्रमात राहतो आणि हातावर हात ठेवून बसतो. असेच कुणी तुम्हाला काहीच आणून देत नाही त्यासाठी कष्ट करावेच लागतात त्याला पर्याय नाही.
अष्टम भाव लागला आहे ना, मग एखाद्याने अंतेष्टीसाठी लागणाऱ्या सामानाचे दुकान काढले तर ते चालणार नाही का? उत्तम चालेल कारण अष्टम भाव बोलायला लागला.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मालमत्ता, परदेशवारी, अध्यात्म
एखाद्या व्यक्तीचा षष्ठ भाव दशेत जागृत झाला तर, त्याला आजार होईल, तो कर्जबाजारी होईल असा अर्थ का घ्यायचा? त्याने घरी तयार केलेले खाद्यपदार्थ विकले, तर धंदा जोरात चालेल नाही का? कारण षष्ठ भावावरून आपले पोट पहिले जाते आणि पोटाला भूक लागते म्हणूनच आयुष्यभर मनुष्य वणवण करत असतो.
ज्योतिष हे साधे सोपे आहे, पण ते फक्त पुस्तके वाचून येणार नाही; त्यातून शास्त्राचा पाया समजेल, शास्त्राचे नियम समजतील, पण ते प्रत्यक्ष जीवनात कसे लावायचे, यासाठी स्वतः त्यात जीव ओतावा लागतो. अभ्यासाला पर्याय नाही. प्रत्यक्ष पत्रिका सोडवाव्यात म्हणजे त्यातून तर्कशास्त्र विकसित होत जाते.


