दिवाळीला मी दरवर्षी घरीच शेव तयार करते आणि ती तयार करत असताना मला नेहमी ग्रामीण भागातील आठवडी बाजार आठवतो. नोकरीच्या निमित्ताने बहुतांश लोकांचे ग्रामीण भागात वास्तव्य असतं, त्याप्रमाणे आमचेही विदर्भातील चंद्रपूर, अहेरी, वर्धा जिल्ह्यांतील देवळी, आर्वी, वर्धा शहर, अमरावती, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरस्ती झालेली आहे. त्यामुळे अहेरी, आर्वी, देवळी या छोट्या गावांत भरणारे आठवडी बाजार कायम लक्षात राहिले आहेत. या आठवडी बाजारांमध्ये शेतकरी त्यांच्या शेतातील ताज्या भाज्यांसोबत प्रत्येक ऋतुनुसार शेतीत उपलब्ध असणारी पपई, पेरू, बोर यासारखी फळे विक्रीसाठी ठेवतात. हा आठवडी बाजार म्हणजे प्रत्येक गावातील लोकांचे आकर्षण बिंदू आहे.
या बाजारात भाजीपाला आणि फळे तर विक्रीस असतात, परंतु सोबत फुगेवाले, रंगीबेरंगी बांगड्या अन् रिबिन्स, टिकल्यांची पाकिटे, सेफ्टीपिन्स, हेयर क्लिप्स विक्रेते, शुगर कॅण्डी विक्रेते (ज्याला गावामध्ये ‘बुढ्ढी के बाल’ म्हटले जाते), बूट पॅालिशवाले, पायातील तोरड्या; तांब्या-पितळीच्या, पंचधातूंच्या, रंगीबेरंगी खड्यांच्या अंगठ्या, कानातले, गळ्यातले, त्यासोबतच तांब्याचे कान कोरणे, स्टिल आणि तांब्याची कडी, लाल आणि काळे कडदोरे विकणारे… दुसरीकडे हे विकत घेणारे… असे अनेक हवसे, नवसे आणि गवसे लोक या आठवडी बाजारात येतात. मिरची, मसाल्यापासून कपडे, चपला, भांडी, वेताच्या टोपल्या, लोखंडी बादल्या, ॲल्युमिनियमची तसेच लोखंडाची टोपले, कढया, तवे, सुया, बिबे, सुपं, झाडण्या, शेतीचे सामान आणि औजारे, दोरखंड असे सर्व सामान या आठवडी बाजारात विक्रीस उपलब्ध असतं. खेडेगावातील हा बाजार आठवड्यातून एकदा ठरलेल्या दिवसावर भरतो आणि त्या दिवशी मोठी उलाढाल होते.
या बाजारात येणारे लोक आपल्या मनासारखी खरेदी झाली की, सर्वात शेवटी भातकाच्या म्हणजेच खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानात जातात आणि तिथे शेव, चिवडा, पापडी, जिलेबी, फुटाणे, मुरमुरे यासारखे खाऊ किंवा भातकं घेऊन आपापल्या घराकडे रवाना होतात. आमच्याकडे आठवडी बाजारातील या खाद्यपदार्थांना ‘भातकं’ अस म्हणतात. यामध्ये जाड्या पोह्यांचा लसूण घातलेला चिवडा, शेव हे खास चवीचे असतात. यासोबतच तळलेले तिखटमीठाचे शेंगदाणे, डाळ्या, हिरव्या मसाल्यातील फुटाणे, सुकी भेळ, कच्चा चिवडा, बॅाबी (ज्यांना आमच्याकडे ‘पोंगा पंडित’ म्हणतात) असे अनेक पदार्थ त्या दुकानांमध्ये मिळतात. परंतु ग्राहकवर्ग हा शेव-चिवड्याच्या जास्त पसंती देतो. त्यामुळे या आठवडी बाजारात मिळणाऱ्या शेव-चिवड्याला खूप मागणी असते. या शेवेचेही जाड, बारीक, मसाल्याची शेव असे अनेक प्रकार दिसतात, परंतु साध्या नमकीन शेवेचा उठाव जास्त असतो; कारण ही शेव कशातही घालून खाता येते… चिवडा, भेळ, उसळ यांची लज्जत ही साधी शेव वाढवते. नुसती खायलाही छान वाटते.
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात, त्यामध्ये मनस्वी आनंद देणारं हे शेव-चिवड्याचे भातकं आहे. वर्तमानपत्राच्या कागदामध्ये दोऱ्याने बांधलेले ही भातकाचे पुडके म्हणजे लहान मुलांचा अवर्णनीय आनंद असायचा. त्याच्या सुंगंधाने सारे घरदार हसरे व्हायचे. आमच्या लहानपणी कोणी गावाकडून आले तर आवर्जून हे शेव-चिवड्याचे भातकं आठवणीने खाऊ म्हणून घेऊन येत असत. हे भातकं आजही लहानपणीच्या अनेक आठवणी घेऊन मनामधे घर करून आहे. अनेक जणांच्या मायेच्या ओलाव्याचे क्षण या शेव-चिवड्याच्या भातकांमधे सामावलेले आहेत. दर आठवड्याला आई-बाबा बाजारातून हे भातकं घेऊन कधी घरी येतात, त्याची आतुरतेने लहान मुलं वाट पाहात असायची. त्या काळात शेव-चिवडा खायला मिळणे म्हणजे खूप मज्जा असायची!
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
थोड्या-थोडक्या गोष्टींमध्ये, साध्या साध्या वस्तूंमध्ये खूप मोठं सुख सामावलेले असायचे… मगे ते फुगेवाल्याकडे मिळणारे प्लास्टिकचे घड्याळ असो अथवा कागदाची विशिष्ट घडी मोडली की आरसा असणारा आणि वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र बदलवणारा कागद असो किंवा भिंगरी, लाडीलप्पा असो… यामध्ये मिळणारा आनंद काही वेगळाच असायचा. त्यात या आठवडी बाजारात जर ‘बाईस्कोप’ पहायला मिळाला तर, अजूनच बहार येत असे. हा बाईस्कोप पाहताना लहानपणी आम्ही अनेक शहरे त्या पंधरा मिनिटांत फिरून येत असू! तसेच आवडत्या फिल्मी कलाकारांचे फोटो त्या बाईस्कोपमधे पाहून त्या नट-नट्यांना जणू प्रत्यक्ष भेटल्याचा आविर्भाव जागृत व्हायचा.
या शेव-चिवड्याच्या भातकाशी कैक लोकांची नाळ जुळलेली असेल. वयाने कितीही मोठे झाले तरी हे लोक गावाकडे गेले की, त्यांना हा आठवडी बाजार आणि त्या बाजारात मिळणारी ही भातकं पाहिली की मनाने ते अगदी लहान मुलासारखे होऊन ही शेव-चिवड्याची भातकं आवर्जून खरेदी करत असतील…
आता काळानुसार ग्रामीण भागातील या आठवडी बाजारांचे स्वरूप थोडे बदलले असेल, परंतु कुठल्याही गावातल्या आठवडी बाजारांना तुम्ही भेट दिली तर, आजही ही शेव, चिवडा, जिलेबीची भातकं मिळणारी दुकान तुम्हाला तिथे दिसतात आणि त्या भातकांची खरेदी विक्रीदेखील पहिल्यासारखीच मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या दुकानांच्या आजूबाजूला कचोरी, समोसे, आलुवडे, तर्री पोहे, चहाच्या टपऱ्या असतीलही, परंतु या सर्वांमध्ये शेव-चिवड्याचे भातक बाजी मारते! खाऊंच्या नामावलीमध्ये भातकाने आपले एक वेगळे ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे.
आजही आम्ही जर कुठल्या ग्रामीण भागात गेलो आणि तिथे जर हे भातकाची दुकानं असतील तर आवर्जून हे शेव-चिवड्याचे भातकं घेऊन येतो. आठवडी बाजारातून विकत घेतलेल्या त्या भातकाची चव घरात तयार होणाऱ्या शेव-चिवड्याला येत नाही, याचं कारण काय असाव? हे आजपर्यंत लक्षात आलेले नाही. तरीही या भातक्यातील शेव घरी करण्याचा प्रयत्न चाललेला असतो. घरी तयार केलेली शेवही चवीला छानच होते, परंतु भातक्यामधील गावरान प्रेमाची सर या शेवेला येत नाही हे खरं!
हेही वाचा – विदर्भातील आठवीची पूजा!
कदाचित, याचे कारण एकच असावे की, गिऱ्हाईकाला देव मानून गावातील लोक आपले उद्याोग धंदे करत असतात… गिऱ्हाईकाचे समाधान झाले की, त्यांच्या वस्तूंची विक्री जोरदार होणार असते… हे ध्यानी ठेवून ते आपल्या पदार्थांची चव, क्वालिटी, ताजेपणा जपण्याचा अतोनात प्रयत्न करतात… त्यामुळेच त्यांच्या पदार्थांना एक वेगळी लज्जत येत असावी, नाही का? दिवाळीला मी दरवर्षी फराळासाठी इतर पदार्थ करते, तेव्हा शेवपण आवर्जून करते आणि दरवर्षी ही शेव करत असताना माझ्या डोळ्यासमोर ग्रामीण भागातील आठवडी बाजाराचे चित्र उभे राहते अन् त्या आठवणींमुळे मी घरी केलेली शेवही कुरकुरीत आणि चविष्ट होते, हे मात्र 100% खरं!


