सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
नामाचिया सहस्रवरी। नावा इया अवधारीं। सजूनियां संसारीं। तारू जाहलों ॥90॥ सडे जे देखिले। ते ध्यानकासे लाविले। परीग्रहीं घातले। तरियावरी ॥91॥ प्रेमाची पेटी। बांधली एकाचां पोटीं। मग आणिले तटीं। सायुज्याचां ॥92॥ परी भक्तांचेनि नांवें। चतुष्पदादि आघवे। वैकुंठींचिये राणिवे। योग्य केले ॥93॥ म्हणोनि गा भक्तां। नाहीं एकही चिंता। तयांतें समुद्धर्ता। आथि मी सदा ॥94॥ आणि जेव्हांचि का भक्तीं। दिधली चित्तवृत्ती। तेव्हांचि मज सूति। तयांचिये नाटीं ॥95॥ याकारणें गा भक्तराया। हा मंत्र तुवां धनंजया। कीजे जे यया। मार्गा भजिजे ॥96॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय। निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः॥8॥
अगा मानस हें एक। माझां स्वरूपीं सवृत्तिक। करूनि घालीं निष्टंक। बुद्धिनिश्चयेंसीं ॥97॥ इयें दोनीं सरिसीं। मजमाजीं प्रेमेंसीं। रिगालीं तरी पावसी। मातें तूं गा ॥98॥ जे मन बुद्धि इहीं। घर केलें माझां ठायीं। तरी सांगें मग काई। मी तूं ऐसें उरे॥99॥ म्हणोनि दिवा पालवे। सवेंचि तेज मालवे। कां रविबिंबासवें। प्रकाशु जाय ॥100॥ उचललेया प्राणासरिसीं। इंद्रियेंही निगती जैसीं। तैसा मनोबुद्धिपाशीं। अहंकारु ये॥101॥ म्हणोनि माझां स्वरूपीं| मनबुद्धि इयें निक्षेपीं। येतुलेनि सर्वव्यापी। मीचि होसी ॥102॥ यया बोला कांहीं। अनारिसें नाहीं। आपली आण पाहीं। वाहतु असें गा॥103॥
हेही वाचा – Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी
अर्थ
माझी हजारों नांवें, ह्याच कोणी नावा, त्या तयार करून संसारसागरांतून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज ॥90॥ जे भक्त सडे (अंतर्बाह्य परिग्रहरहित) आहेत असे मी पाहिले त्यांस (माझ्या) ध्यानरूपी कांसेला लाविलें व परिग्रही होते त्यांना नामरूपी नावेवर बसवलें ॥91॥ एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या कांठावर आणलें ॥92॥ परंतु जे माझे भक्त असे (माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत) मग ते (गजेंद्रासारखे) चार पायांची जनावरें वगैरे कां असेनात, पण त्या सर्वांस वैकुंठाच्या राज्यास योग्य केलें ॥93॥ म्हणून माझ्या भक्तांना एकहि चिंता नाही. कारण मी त्यांचा उद्धार करणारा मी नेहमी तयार आहे ॥94॥ आणि जेव्हा भक्तांनी (आपली) चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले ॥95॥ या करता, हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, या भक्तिमार्गाचे आचरण करावे, हा विचार पक्का लक्षात ठेव ॥96॥
माझ्याच ठिकाणीं मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणीं बुद्धि स्थिर कर. (म्हणजे) त्यानंतर तूं माझ्या ठिकाणीं निवास करशील (मद्रूप होशील) यांत शंका नाही ॥8॥
अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपलें मन फक्त माझ्या स्वरूपीं अखंड वतनदार करून ठेव ॥97॥ बा अर्जुना, या दोघांनी (बुद्धि व मन यांनी) जर माझ्यामध्यें बरोबर प्रवेश केला तर तूं मला पावशील ॥98॥ कारण कीं मन व बुद्धि हीं माझ्या ठिकाणीं कायमची राहिलीं तर मग मी, तूं असें द्वैत उरेल काय? सांग ॥99॥ म्हणून पदराच्या वार्यानें दिवा मालवला असतां त्या दिव्याचें तेज (जसें) लागलीच नाहीसें होतें, अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर (जसा) प्रकाश जातो ॥100॥ शरीरांतून प्राण निघाल्याबरोबर इंद्रियें जशीं त्याच्या बरोबर निघतात, त्याप्रमाणें जिकडे मन व बुद्धि जातील तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो ॥101॥ म्हणून माझ्या स्वरूपीं मन व बुद्धि ही दोन्ही ठेव. एवढ्यानें सर्वव्यापी जो मी तोच तूं होशील॥102॥ अर्जुना हें जें मी बोललों यांत कांही अन्यथा नाही असें मी आपली शपथ घेऊन तुला सांगतों ॥103॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता


