“आई, अहो येताय ना खाली. सगळे आलेत. आपल्या मनूच्या लग्नाच्या साड्या खरेदीचा कार्यक्रम आहे. बस्ता घेऊन बोलावलं आहे, आपल्या नेहमीच्या पद्धतीने… आणि सोनाराला पण दोन तासांनी बोलावलं आहे. ती खरेदी पण करून घेऊ. नेहमीप्रमाणे सगळं कसं तुमच्या शिस्तीत होऊदे…” सुमेधा आपल्या सासूबाईंना म्हणजेच श्रीमती शकुंतला विष्णूपंत तोरणे यांना सांगत होती.
“सुमेधा, काय गं तू अशी? तुम्ही बायकांनी ना नुसती नोकरी केलीत. तू काय आणि तुझी ती सून कियारा काय… ती पण तशीच! आता तर काय ती परदेशात स्थायिक झाली आहे. त्यामुळे काही बोलायलाच नको. तिकडे काय करते कोण जाणे? तुम्ही नोकऱ्या सोडून बाकीचं काही एक केलं नाहीत. सगळं माझ्यावर टाकलं कायम… एवढी दोन मुलं तुला, पण अभिजित आणि मनस्वी दोघांची बरीच जबाबदारी मीच उचलली. मी आपली खमकी म्हणून झाला हो तुझा संसार,” असं म्हणतच शकुंतलाबाई चौसोपी वाड्याच्या पायऱ्या उतरत्या झाल्या आणि सुमेधाने या सगळ्याला हसतच होकार भरला.
शकुंतला तोरणे यांचे सांगलीमध्ये भारीच प्रस्थ. विष्णूपंत म्हणजे सांगलीतले नामवंत वकील. पिढ्यान् पिढ्यांचा वकिलीचा व्यवसाय आणि त्यातून मिळालेला मान-मरातब… तशा शकुंतलाबाई खूप काही शिकलेल्या नव्हत्या, पण अनुभवातून सिद्ध होत गेल्या होत्या आणि आता परत एकदा आजेसासूबाई होणार होत्या… तेही वयाच्या फक्त 83व्या वर्षी! नातजावई येणार होता आता. ‘फक्त 83’ अशासाठी की, त्या कधीही कुठल्याही कामाला वाघिणीसारख्या कायम पदर खोचून उभ्या! अगदी विष्णूपंत गेल्यानंतरही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि घराला सावरलं. मनस्वी झाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला खरा, पण मोठा नातू अभिजीत झाल्यावर त्यांच्या डोळ्यात जे आनंदाने अश्रूच तरळले होते, तितका अत्यानंद त्यांना झाला नाही. दोघांनाही खूप माया लावली त्यांनी. पण अभिजीतचे लाड जास्तच केले! ते ही अगदी उघडउघड…
हेही वाचा – दृष्टिकोन…
सुमेधाच्या पाठीशी पण आधारवड बनून उभ्या होत्या कायमच. तिला मुलगी न मानता कायमच सूनेचाच मान देत असल्या तरी जाच, त्रास कधीच कसलाच नाही. शकुंतलाबाईंना मुलींचं तसं पाहिलं तर थोडं वावडंच. त्यांना एकुलता एक मुलगा श्रीधर. एकंदर घराण्यातच मुलांचं गुणोत्तर जास्त मुलींपेक्षा! अगदी खूप कहर नसला तरी, उन्नीस-बीस व्हायचंच त्यांच्याकडून.. हे घरात सगळ्यांनाच माहिती होतं. पण तरीही मनस्वी त्यांच्यावर खूप प्रेम करायची. अभिजीत म्हणजे त्यांना म्हातारपणाची काठी वाटायचा. त्याच्या लग्नात खूप हौस करून घेतली. नातसून कियारा तशी बरी होती, पण अप्पलपोटी होती, हे थोड्या दिवसांच्या सहवासात त्यांच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. तिच्याच तर सततच्या भुणभूण करण्याने शकुंतलाबाईंचा विरोध असतानाही मागच्या वर्षी अभिजीत अमेरिकेला गेला होता. कारण काय तर, त्याला म्हणे पिढीजात वकिलीचा व्यवसाय करायचा नव्हता.
शकुंतलाबाईंना अजूनही आठवत होता तो दिवस. त्याने जाऊ नये म्हणून त्या समजवायला गेल्या, “अरे अभी, तू चांगला वकील झाला आहेस आणि इथे आपला चांगला घरंदाज वंशपरंपरागत चाललेला व्यवसाय आहे. आता तो तू नाही बघणार तर, कोण बघणार? श्रीधरच्या हाताखाली छान तयार हो आणि मग तुलाच तर बघायचं आहे सगळं. मनू काय शेवटी मुलगीच. लग्न झालं की, जाईल निघून… तुझ्या बापाने तुझ्या जोरावर तर मुंबईत व्यवसाय वाढवला आणि तुला म्हणे बिझनेस करायचा आहे, तोही त्या परदेशात जाऊन! नको रे जाऊस..”
त्यांचं बोलणं झिडकारत अभिजीत म्हणाला, “कशाला? बाबांची लाडकी तर मनू आहे आणि ती करतेय की, वकिलीची प्रॅक्टिस! ती नेईल वारसा पुढे. तसंही मला इथे सांगलीत आणि मुंबईत राहण्यात काहीच स्वारस्य नाहीये आणि तूच तर नेहमी म्हणतेस तुला जे हवं ते कर. मला जाऊदे गं… उगीच दोन आसवं वगैरे गाळून मला थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करू नकोस. मी नाही थांबणार आता तुमच्या या भावनिक बंधनांनी…” त्यावेळी शकुंतलाबाईंचे डोळे उघडले. आपलेच नको तेवढे लाड आहेत हे. याला आपल्याबद्दल जराही वाटत नाही. त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला!
तसं अजून एक कारण पण नुकतंच घडलं होतं. दोन महिन्यांपूर्वी श्रीधर आणि सुमेधा दोन दिवस देवदर्शन करायला आणि पत्रिका ठेवायला कोकणात गेले, तेव्हा अचानकच दुपारी शकुंतलाबाईंना छातीत दुखायला लागलं. घरकामाला असलेल्या अक्कूने घाबरून लगेचच मनूला फोन लावला. मनस्वी हातात असलेली सगळी कामं त्वरित बाजूला टाकून घरी आली आणि स्वतः गाडी चालवत आपल्या आजीला हॉस्पिटलला घेऊन गेली. तिची वकिलीमुळे बरीच ओळख निर्माण झाली होती आणि तोरणे नाव सोबतीला होतंच. तिने दोन दिवस सुट्टी घेऊन आजीची सगळी काळजी घेतली.
“गॅसचा जबरदस्त त्रास झाला आहे. काळजी करण्यासारखं काही झालेलं नाही.” असं डॉक्टरांनी सांगितल्यावर आईबाबांना त्रास नको म्हणून तिने आजीची सगळी काळजी स्वतःच घेतली. त्यासाठी फर्ममध्ये पण तिने येणार नाहीये, असं सांगून टाकलं आणि अगदीच अशक्य कामं फोनवर करायचा प्रयत्न केला. शकुंतलाबाई या तिच्या ममतेने अपार आनंदित झाल्या. या पोरीचा तसा पहिल्यापासूनच आपल्यावर खूप जीव. आपणच डोळे मिटून बसलो होतो. याची त्यांना जाणीव झाली. आत्ताही त्या हे सगळं आठवून क्षणभर खंतावल्या.
“आजी, अगं ये ना. मला सांग कुठली साडी नेसू मी लग्नात. प्रशांतच्याच घरच्यांनी आपली आपली खरेदी करायची सांगितली, ते बरं झालं. माझ्या आजीचा चॉईस सगळ्यात बेस्ट आहे हे कुठे त्यांना माहितेय…” असं म्हणतच मनू आजीच्या गळ्यात पडली आणि शकुंतलाबाई भानावर आल्या. “हो! आली मोठी शहाणी. किती लोणी लावशील गं आजीला! ढमाली कुठली… बघुदे चल,” असं म्हणून त्या अगदी सहज एकेक साडी खरेदी करत होत्या. सगळ्यात अगदी हिरीरीने वयाचा विचार न करता भाग घेत होत्या. सगळं कसं आलबेल चालू होतं…
बघता बघता दोनच दिवसांवर लग्न येऊन ठेपलं. घराचं अगदी गोकुळ झालं होतं. सगळी मंडळी आली होती, अगदी अभिजीतसुद्धा आला होता बायकोसोबत आपल्या बहिणीच्या लग्नाला. दुपारची जेवणं आटोपल्यावर पुरुषमंडळी वामकुक्षी घेत जरा पडले होते, तेव्हाच शकुंतलाबाईंनी आपल्या नातीला, सुनेला आणि नातसुनेला बोलावून घेतलं. सगळ्या ‘कशाला बोलावलं असेल’ या धाकधुकीतच खोलीत आल्या. पाहतात तो काय सगळे दागिने पलंगावर मांडून ठेवले होते. त्यातले कित्येक दागिने तर, कधीही कुणालाही घालायला सोडाच, अगदी बघायलासुद्धा मिळाले नव्हते! सगळ्या एकमेकींकडे बघत होत्या…
नातसूनेने आनंदाने एक दागिना हातात घेऊन आजेसासूला विचारलं, “आजी एवढे दागिने! वा! कित्ती सुंदर आहेत हे. हा हार तर अगदीच मस्त आहे.” त्यावर सुमेधा थोड्या रागातच म्हणाली, “अगं काय हे कियारा? धीर धरा सूनबाई. कित्ती तो उतावळेपणा.” हे ऐकून न ऐकल्यासारखं करत थोडं हसतच शकुंतलाबाई म्हणाल्या, “अगो सुमेधा, जाऊदे गं तिचं! खरंतर, दागिने म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातली ठेव असते. सासर माहेरची आठवण एकत्र करून बांधलेली गुंफण असते. प्रत्येक स्त्री ही तिचे दागिने मरणोत्तर आपल्या वारसांना देत असते. कारण एकच, आपली आठवण रहावी. आपले आशीर्वाद त्यांना मिळावेत आणि आपल्यासारखीच पै-पै साठवत संसार फुलवत रहायची आवड निर्माण व्हावी. तसं पाहिलं तर, कुठल्याही स्त्रीला दागिन्यांचा सोस खूप. आपण आहोत तोपर्यंत ते जपून ठेवायचे आणि आपल्यानंतर योग्य हातात सुपूर्द करायचे. आज हे सगळे योग्य हात माझ्याकडे आहेत आणि म्हणूनच मी माझ्या हयातीत हे सर्व वाटून टाकणार आहे.”
हे ऐकताच अभिजीतच्या बायकोला खूप आनंद झाला. “दागिने हे घरच्या सुनांना जास्त दिले जातात. शिवाय, आजींचा ओढा पहिल्यापासूनच अभिजीतकडे जास्त आहे. म्हणजे, आपल्याला मनूपेक्षा जास्त मिळणार.” असे खयाली पुलाव तिच्या मनात रुजवात करणार तोच शकुंतलाबाई पुढे झाल्या. त्यांनी नात, सून आणि नातसून यांना दागिन्यांची वाटणी करून दिली आणि मग ठेवणीतला पितळीचा डबा मनूच्या हातात ठेवत म्हणाल्या, “मनू हे खास तुला!” त्यांनी असं म्हणताच मनू अचंबित झाली. “आजी हे काय गं? अगं मला आधीच तू इतकं प्रेम आणि इतकं सगळं दिलं आहेस. मला खरंतर आता काहीच नकोय. तरी मी तू मगाशी वाटून दिलेले दागिने घेतले की! त्यात मी खूप खूश आहे. अजून हे काय आता? मला आता काही नको. फक्त एक कर मला तुझं प्रेम मी लग्न करून गेल्यानंतर पण हवं आहे. ते कधीच कमी होऊ देऊ नकोस. अभिजीत दादा इतकंच प्रेम माझ्यावर करत रहा म्हणजे झालं.” असं म्हणून मनूने शकुंतलाबाईंना मिठीच मारली. दोघीही घट्ट मिठी मारून डोळ्यातल्या आसवांना वाट मोकळी करून देत होत्या. समिधाने पण लेकीची पाठवणी होणार म्हणून डोळ्याला पदर लावला.
हेही वाचा – वेळ
आता मात्र शकुंतलाबाई पुढे बोलायला लागल्या… “मने, ये. बस इकडे. अगं लहानपणी ना तुला माझ्याकडूनच बेदाणे आणि काजू खायचे असायचे. बाकी कुणाकडे जायची नाहीस आणि मी तुझ्यासाठी मुद्दाम डब्यात वेगळे भरून ठेवत होते. तसेच आहे हे. अगं, ही माझ्याकडून तुला लग्नासाठी दिलेली जादाची प्रेमाची भेटच आहे. उद्या मी नसले तरी, या दागिन्यांच्या रूपात मी कायम तुझ्यासोबतच असेन. म्हणून तर परवा सोनाराला मी परत पाठवून दिलं. इतके दागिने आहेत अजून कशाला हवेत? आणि तुला सांगू का, हा डबा तर माझ्या विशेष प्रेमाचा आहे. यात माझ्या आईचे सगळे आणि सासूबाईंनी पहिल्या सणांना मला दिलेले, असे जुने आणि भरीव दागिने आहेत. मी हे खरंतर माझ्या स्वभावानुसार नातसूनेला देणार होते. असो. मला त्याबाबतीत काही बोलायचं नाहीये. पण आता माझे डोळे उघडले आहेत. वारसा काय फक्त मुलंच नाहीत तर लेकी सुद्धा चालवतात. मला मुलगी नाही, पण तू माझी लेक झालीस. तू माझ्या आजारपणात मला हे दाखवून दिलं की, लेकीच दोन्ही कुटुंब बांधून ठेवतात. आपण उगीच मुलं मुलं करत बसतो. ते तर आपला स्वार्थ संपला की निघून जातात. पण मुली मायेने एकच नव्हे तर, दोन्ही घरं बांधून ठेवतात. मनू माझ्या आईची आणि सासूबाईंची म्हणजेच तुझ्या पणजीची ही परंपरा आज मी तुला देतेय… आणि हाच वारसा तूही पुढे चालव. मला खात्री आहे तूच या दागिन्यांची खरी लक्ष्मी आहेस. खूप मोठी हो बाळा. या म्हाताऱ्या आजीला विसरू नकोस, असं मी अजिबात म्हणणार नाही; कारण तू तसं करणार नाहीस याची मला खात्री आहे.” असं म्हणून शकुंतलाबाईंनी मनूला कुशीत घेतलं आणि सगळ्यांनीच डोळ्यातल्या आसवांना वाट मोकळी करून दिली.
नातसून मात्र गप्पपणे सगळं ऐकत होती. आज शकुंतलाबाईंना खूप हायसं वाटत होतं. त्यांच्या मागच्या पिढीचा दागिन्यांचा वारसा त्यांनी अगदी सुयोग्य हातात सुपूर्द केला होता.


