अस्मिताची आज खूप धावपळ होत होती. सध्या तिला नोकरी आणि हॉस्पिटल अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. सोबत सासूबाई होत्या, पण वयानुसार त्यांच्या पण बारीक सारीक कुरबुरी चालूच होत्या. “अगं अस्मिता, तू जा बघू आंघोळीला. मी टाकते ती भाजी फोडणीला. अगं घाबरू नकोस नाही करत झणझणीत… अमोलला नाही सांगितली आहे ना डॉक्टरांनी… तू नको काळजी करू, जा तू…” अस्मिता लगेचच आंघोळीला पळाली आणि नंतर अमोलसाठी डबा घेऊन हॉस्पिटलला गेलीसुद्धा! थोड्या वेळाने सारंग त्याच्या क्लासला गेल्यावर सरोज वहिनी अस्मिताने बनवलेल्या चहाचा कप घेऊन गॅलरीमध्ये लावलेल्या झोपाळ्यावर येऊन बसल्या.
सरोज वहिनी म्हणजे श्रीमती सरोज अरुण ताकभाते. त्यांना एकुलता एक मुलगा अमोल, सून अस्मिता आणि नातू सारंग. सरोज वहिनींचे मिस्टर काही वर्षांपूर्वी कार अपघातात गेले आणि सगळ्या घराची जबाबदारी सरोज वहिनी सांभाळायला लागल्या. अमोलचं आईवर नितांत प्रेम होतं. त्या होत्याच तशा प्रेमळ. अमोल जसजसा मोठा झाला, त्याला जबाबदारीची जाणीव झाली आणि शिक्षण पूर्ण करता करता त्याने लगेचच नोकरी धरली. खरंतर, त्याला ‘फाइन आर्ट’मध्ये डिग्री घ्यायची होती. त्याला कलेची आवड होती पण खिसा आणि घर सांभाळण्यासाठी त्याने सीए केलं आणि स्वतःला बैलागत घाण्याला जुंपून टाकलं.
आता तर मोठ्या तीन बेडरूमच्या घरात सगळे आनंदाने रहात असतानाच 7-8 दिवसांपूर्वी अचानक त्याला ऑफिसमध्ये छातीत दुखायला लागलं. ऑफिसमधले त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि अस्मिता ज्या शाळेत नोकरी करते, तिथे फोन करून तिला बोलवून घेतलं. तेव्हापासून सगळ्यांची ओढाताण सुरू होती. जास्तकरून अस्मिताची. शाळेत तर तिने 15 दिवसांची रजा टाकली होती. अमोलला माइल्ड हार्टअटॅक आला होता. पण ‘थोडक्यात निभावलं’ असं डॉक्टर म्हणत होते.
हेही वाचा – कौटुंबिक कथा… ‘सुखस्वप्न’
“आजी येतेस ना जेवायला,” विचार करता करता दुपारच्या जेवणासाठी सारंग घरी कधी आला ते सरोज वहिनींना कळलंच नाही. “अग्गोबाई, तू आलास पण घरी? काय बाई मी विचारात गढून गेले. आपल्यासाठी थांब जेवण गरम करते,” असं म्हणून त्या उठताना गुडघ्यात बारीकशी कळ गेली, चेहरा कसनुसा झाला. नेमकं ते सारंगने बघितलं. “आजी मी जेवण गरम केलं आहे. तुला इकडे आणून दिलं असतं मी. तसे पण इतकी वर्ष आपणच तर जेवतो दोघे. बाबा तर कधीच नसतात दुपारी जेवायला आणि मी शाळेतून घरी येईपर्यंत आई आधीच नोकरीवर गेलेली असते. तशी माझी काहीच तक्रार नाहीये. पण आज जास्तच एकटं वाटत होतं गं… म्हणून म्हटलं निदान तू तरी ये…”
सरोज वहिनींना चेहरा बघावला नाही नातवाचा. बाबा आजारी बघून 14 वर्षांचं पोर अगदी भांबावलं आहे. त्यानंतर दोघे निमूट जेवले. अस्मिता संध्याकाळी जरा खूश होती. उद्या अमोलला घरी सोडणार आहेत, त्यामुळे तिची ओढाताण थोडीफार तरी थांबणार होती. आता घरीच काळजी घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सगळे घरी आले. अमोलचा चेहरा बघून सरोज वहिनी आनंदल्या. आठ दिवसांत मुलाचा चेहरा फक्त दोनदा दिसला होता त्यांना! गुडघेदुखीमुळे त्या आता कुठे बाहेर जात नव्हत्या.
दोन-तीन दिवसांनी सगळं बस्तान बसल्यावर रविवारी सगळे घरी असताना सरोज वहिनींनी सकाळीच फर्मान सोडलं, “आज संध्याकाळचा चहा आपण सगळ्यांनी एकत्र घ्यायचा आहे. मी बनवणार आहे. अस्मिताला आराम तेवढाच. आपल्याकडे वसू आहे तशी वरकामाला. पण तरीही घरच्या बाईची कामं काही कमी नाहीत. सारखी कष्ट करून दमत असेल. त्यात माझी काही साथ नाही. त्यामुळे आज मी करते चहा.”
अमोल आणि अस्मिता आई असं का म्हणाली असेल याचा विचार करत एकमेकांकडे बघत होते. संध्याकाळी सरोज वहिनींनी सगळ्यांसाठी आलं घालून चहा केला. अमोलसाठी थोडाच केला. त्यावर अमोल म्हणाला, ” हे काय मला घोटभरच चहा? आणि तुम्हाला हवा तेवढा? हे काय गं आई!” त्यावर सरोज वहिनी काही न बोलता अमोल शेजारी येऊन बसल्या. “आमू बाळा, अरे सध्या इतकाच घे. डॉक्टरांनी कमी चहा सांगितला आहे ना! काही दिवसांनी परत करेन आणि तेव्हा तुला जास्त देईन हो…” असं म्हणून त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.
अमोल तर बघतच बसला त्याच्या डोळ्यांत एकदम अश्रू दाटून आले. “आई, तू कित्ती वर्षांनी मला आमू बाळा म्हणालीस. कान आसुसले होते गं आणि हा तुझा कापरा हात कित्ती दिवसांनी हातात घेतोय…”
आता मात्र सरोज वहिनींचे डोळे भरले. “आमू एक सांगू का? सोन्या कित्ती वर्षं नुसता धावतोच आहेस रे. तुझे अप्पा गेले आणि तू जे स्वतःला कामात गुरफटून घेतलं की, तुला कशाचा पत्ताच नाही. अरे, तुम्ही सगळे धावताय रे, पण मी मेली दुखऱ्या पायांनी नाही धावू शकत आहे. मी मागेच राहिले. थोडं मागे वळून पहा की रे! मी काय म्हणते थोडा वेळ स्वतःसाठी तरी देत जा. तुला ती चित्रकला का काय ते, त्याची आवड होती, मला माहिती आहे. पण माझ्यासाठी आणि आता आमच्यासाठी तू तुझी आवड बाजूला ठेवलीस. ती आवड परत जोपास ना. अरे, धावता धावता तू तुझ्यासाठी, घरच्यांसाठी जगायला विसरत चालला आहेस. मी काय रे आज आहे उद्या नाही. पण तू इतका ही पळू नकोस की, स्वतःची तब्येत ढासळेल. तरुणपण आहे, तोच जगून घे. अस्मिताचे एन्जॉय करण्याचे दिवस आहेत. तिला वेळ दे. फिरायला जा. तिलाही शाळेतून सुट्टी मिळत नसली तरी, ती आवर्जून काढा. इतकाही व्यग्र होऊ नकोस की, सारंग अकाली मोठा होईल तुझ्यासारखा! त्यांनाच कशाला मलाही तू हवा आहेस. आता पुरे झालं पैसा पैसा करणं थोडं जगून घे रे… म्हातारं झाल्यावर मग पश्चात्ताप करत बसशील, तेव्हा काही उपयोग नाही. हीच वेळ आहे स्वतःला आनंदी ठेवण्याची आणि दुसऱ्याला आनंद देत जगण्याची… आणि अस्मिता हीच गोष्ट तुला पण लागू होते, काय कळतंय का काही?”
हेही वाचा – दृष्टिकोन…
आईच्या या शब्दांनी अमोल आणि अस्मिता दोघांना कळून चुकलं की, आपलं गणित नक्की कुठे गंडलं आहे. दोन मिनिटं शांततेत गेल्यावर अमोलच म्हणाला, “हो आई, तू बरोबर बोलत आहेस. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला भानावर आल्यासारखं झालं. मी इतका कसा वहावत गेलो. सगळ्यांना ऐहिक आनंद देण्याच्या प्रयत्नात मी जगण्यातला आनंदच विसरून गेलो. पण खरं सांगू आई? मी लहानपणी म्हणायचो ना, तेच खरं आहे… U ARE THE BEST! आता मी नक्की कुठे थांबायचं, हे स्वतःला रोज आवर्जून सांगेन आणि त्याप्रमाणे थांबेन… आणि हो, एक गोष्ट मला आजही मान्य आहे की, तू कान ओढल्याशिवाय मी काही ताळ्यावर येत नाही. शेवटी काय, ‘तू है तो सबकुछ है माँ, वरना कुछ भी नहीं…” असं त्याने म्हणताच सगळे मनमोकळे हसले.
सरोज वहिनींना आभाळ मोकळं झाल्यासारखं वाटलं. त्यांनी परत अमोलच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. निसटत चाललेला लेकाचा हात हातात परत गवसल्याचा आनंद संध्याकाळच्या संधीप्रकाशातही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.


