पूर्वार्ध
शिरीष जसा घरात शिरला, तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली,
“अहो, जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत!”
“हो. फ्रेश झालो की, लगेच बघतो.”
बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठीक दिसत नव्हतं.
“काय झालं अण्णा? काय होतंय?” स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला,
“काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा…”
“म… ला… दे… वा… क… डे… जा… य… चं… य…” परत हात वर करून ते म्हणाले.
शिरीषच्या डोळ्यांत पाणी आलं. तरी स्वतःला सावरत तो म्हणाला,
“मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचं तेव्हा नेईल आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”
अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले…
“बरं बरं तुम्ही पडा. काही दुखतंय का?”
त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय, असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरून आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं,
“डॉक्टरांना बोलावू?”
त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला,
“बरं बरं. मी रोहनचं जेवण झालं की, त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला.”
अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला.
“काय झालं? काय होतंय त्यांना?” नेहाने विचारलं.
“काही होत नाहीये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत! कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच…” शिरीष गहिवरून म्हणाला.
शिरीष योग्यच म्हणतोय, हे नेहाच्या लक्षात आलं. गेली सात वर्षं अण्णा पॅरेलिसीस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे… पण ते तेवढंच. खरंतर, शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे सुरू राहील, असं त्यांना वाटलं. सुरुवातीचं एक वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही मोठे भाऊ निर्मल आणि गुणवंत तसंच त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत, घरी आलो की चहापाणी, स्वयंपाक करून वाढणं, नंतर सगळं आवरणं केलं पाहिजे, असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कामावरून कटकटी वाढल्या आणि बायकांची भांडणं होऊ लागली… तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या अरेरावीला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं.
हेही वाचा – आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…
अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यांत दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करून टाकलं. नेहा आणि शिरीष असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुद्धा कुणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पॅरेलिसीसचा अटॅक आला. आता तर निर्मल, गुणवंतची पंचाईत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती, पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार? माणूस ठेवला तर त्याचे पैसे कोण देणार? शिवाय, त्यानं घरात चोऱ्यामाऱ्या केल्या तर? घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून सोडलं. शिरीषची संमती घ्यायचीही त्यांना गरज वाटली नाही.
अर्थात, शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्यांच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत, यावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा. अतिशय कामात असताना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा. रात्री जेवण झालं की, अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि शहरातून फिरवून आणायचा.
तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली. मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमी कमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.
0000
झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला, “आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत.”
मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला, “अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला.”
अण्णांनी मान डोलावली.
रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं. पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरू होता.
सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते. त्याला हायसं वाटलं.
“कसं वाटतंय?” त्याने विचारलं.
त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.
“अण्णा मी येतो आंघोळ करून. मग तुमचा चहा झाला की, तुम्हाला आंघोळ घालेन.”
अण्णांनी मान डोलावली. शिरीष रूमच्या बाहेर आला तर, नेहा उठलेली दिसली. शिरीषने अण्णांना बरं वाटतंय, असं सांगितल्यावर तिलाही हायसं वाटलं.
शिरीष आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला, तशी नेहा त्याला म्हणाली,
“अहो, अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.”
शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाहीत. त्यांच्या रूममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरून नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला,
“डॉक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा…” पुढे त्याला काही बोलता येईना.
डॉक्टर आले, अण्णा गेल्याचं निदान करून गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली, तसा शिरीष भानावर आला. सगळ्यांना कळवणं भाग होतं. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला, निर्मलला फोन लावला.
“दादा अण्णा गेले…” तो रडतरडत म्हणाला.
“काय? असे कसे गेले? मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”
“सकाळपर्यंत चांगले होते. अचानक काय झालं माहीत नाही. बरं तू लवकर ये, मग सांगेन तुला सविस्तर…”
“अरे बापरे, शिरीष, आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे. आता निघणारच होतो. आता कॅन्सल करावं लागणार!”
तेवढ्यात शोभा वहिनीने फोन घेतला…
“शिरीष भाऊजी, अण्णांना बरं वाटत नव्हतं तर, आम्हाला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये. तिचे पैसे आता कोण देणार?”
शिरीषला संताप आला, पण तो शांत राहिला. वाद घालायची ही वेळ नव्हती. त्याने फोन बंद करून मधला भाऊ, गुणवंतला फोन लावला आणि अण्णांची बातमी सांगितली.
“ओ माय गॉड! शिरीष मी आता जालन्यात आहे. मला यायला उशीर लागेल. पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस?”
“अरे, असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. तू लवकर ये, मग मी तुला सगळं सांगतो…”
“मी निघतोय आता इथून. अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की, मला कळव…”
शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली. वडील वारल्याचं कोणतंच दुःख त्याच्या बोलण्यातून जाणवत नव्हतं. पण आता ते बोलून दाखवण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता.
निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी, गुणवंतचा पत्ता नव्हता. शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला,
“अरे, मी दोन तासांपूर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली तयारी? बरं आलोच…” जसा वडिलांच्या अंत्यविधीला येऊन तो शिरीषवर उपकारच करणार होता.
सगळेजण त्याची वाट पहात बसले. अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला.
तेराव्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले. आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुद्धा खर्च केला नव्हता. तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला. चौदाव्या दिवशी सगळे बसले असताना निर्मलने विषय काढलाच…
“अरे शिरीष, अण्णांनी काही मृत्युपत्र करून ठेवलं होतं का? नाही म्हणजे, आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटेहिस्से नको का व्हायला?”
“दादा मला तरी मृत्युपत्राबद्दल काही माहीत नाही… आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लॅट आणि आपली एजन्सी याव्यतिरिक्त दुसरं काही असेल, असं मला वाटत नाही.”
हेही वाचा – जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक…
“असं कसं म्हणता भावजी? त्यांची काही फिक्स्ड डिपॉझिट्स असतील किंवा एखादा प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?” शोभा वहिनी मधेच बोलली.
“हो शिरीष,” गुणवंत म्हणाला, “मरण्यापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर, आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलावून घे.”
वडिलांच्या मरणाचं दुःख नसणाऱ्यांना त्यांच्या प्रॉपर्टीची मात्र खूप काळजी होती, हे स्पष्ट दिसत होतं.
“रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते. ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं…” शिरीष आठवून म्हणाला.
“अरे, मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब,” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.
शिरीषने डायरीतून वकिलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, “ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे!”


