पूर्वार्ध
जेवणाचे ताट बाजूला सारून तो गुडघ्यात मान घालून तसाच बसून राहिला. कोपऱ्यात पडलेल्या बारावीच्या मार्कलिस्टकडे अपराधी नजरेने पाहू लागला. कातर आवाजात वैशाली पुन्हा म्हणाली, “पोटभर खा आणि आता डोक्यातून सगळं काढून टाक. आम्ही तुला काय बोललो का? कशाला उगाच डोक्यात राख घालून घ्यायची?”
तो आईकडे विमनस्क होऊन पाहात राहिला. सकाळपासून तिने अंघोळही केली नव्हती. चुरगळलेली साडी नेसून तिने निमूटपणे चार भाकरी थापल्या होत्या. सौरभच्या बारावीच्या निकालानंतर तिची सगळी हालचाल कोरडी आणि यांत्रिक झाली होती. घरात तर कोण कुणाशी बोलत नव्हतं. सगळं घर चार भिंतीत थंड, निर्जीव होऊन गेलं होतं. बारावीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत आई, बाबाचे उत्साहाने ओसंडून वाहणारे बोलणे त्याला आठवू लागले…
“मेडिकलला प्रवेश मिळवणारा आपल्या खानदानात ‘सौरभ’ पहिला आहे लक्षात ठेव. तेही सरकारी कोट्यातून. कालच माझ्या ऑफिसमधल्या मित्रांनी मला जंगी पार्टी मागितली आहे. मी त्यांना म्हणालो, ‘निकाल लागल्यावर संपूर्ण गावाला पार्टी देणार आहे.’”
ऑफिसच्या कागदपत्रांची फाइल आणि दुपारच्या जेवणाचा डबा माणिकरावांच्या हातात देता देता वैशाली म्हणाली, “बारावीला गेल्यापासून मी सुद्धा त्याच्याबरोबर जागरणं केली आहेत. परीक्षेच्या काळात रात्री दोन दोन वाजता चहा करून दिला आहे. त्याला मेडिकलला प्रवेश मिळणार यात शंकाच नाही. मला माझ्या ‘सौरभचा’ खूप अभिमान वाटतोय.”
“आज लवकरच परत येतो. निकाल घेऊन सौरभ सुद्धा दुपारपर्यंत येईल…” चार चाकी गाडी सुरू करता करता माणिकराव म्हणाले आणि त्यांनी गाडी रस्त्याला लावली.
दार बंद करून वैशाली पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली. आज नेमकी कामवाली आली नव्हती. त्यामुळे दुपारची विश्रांतीही मिळणार नव्हती. कंटाळा बाजूला सारून तिने भांडी मोरीत न्यायला सुरुवात केली. भांडी झाल्यावर सगळं घर झाडून काढायचं होतं.
चार वाजले होते. दारावर टकटक वाजली. झाडू तिथेच टाकून वैशालीने दार उघडलं. दारात सौरभला घेऊन त्याचा मित्र संदीप उभा होता. वैशालीने सौरभकडे पाहिलं. तो भेलकांडत होता. रडून रडून डोळे लाल झाले होते. पार चोळामोळा झाल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. वैशालीला थोडा धक्का बसला. तिने संदीपला विचारले, “अरे काय झालं? दवाखान्यात तर न्यायचं नाही का?”
हेही वाचा – सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!
“त्याने त्याचा बारावीचा निकाल पाहिला आणि त्याला चक्कर आल्यासारखं झालंय. बाकी काही झालेलं नाही.” सौरभचा हात आईच्या हातात देता देता संदीप म्हणाला आणि आल्या पावली तो निघून गेला.
कॉटवर झोपलेल्या सौरभला पांघरूण घालून वैशालीने राहिलेलं घर झाडून काढलं. गॅसवर चहा ठेवला. माणिकराव ऑफिसमधून यायची वेळ झाली होती. आज ते लवकर म्हणजे साडेचार वाजता येणार होते. एरवी रात्री आठ वाजलेले समजत नसत.
दारात गाडीचा हॉर्न वाजताच वैशालीने दार उघडलं आणि ती पुन्हा स्वयंपाक घरात गेली.
“आला का सौरभ? रिझल्ट मिळाला का? किती टक्के मार्क मिळाले?” कागदपत्रांची फाइल आणि जेवणाचा रिकामा डबा हातात घेऊन माणिकराव जणू पळतच आत आले. वैशाली पटकन पुढे झाली आणि तिने तोंडावर बोट ठेवत, डोळे मोठे करून माणिकरावांना गप्प बसण्याची सूचना केली. हळू आवाजात त्या म्हणाल्या, “थोडं शांत व्हा. सौरभ आत झोपला आहे. निकालाचं मी सांगते नंतर तुम्हाला.”
चिंतातूर अवस्थेत माणिकरावांनी ऑफिसचा गणवेश काढून आतल्या खोलीत हॅंगरला अडकवला. नाइट ड्रेस घालून ते बाहेरच्या हॉलमध्ये कोचवर येऊन बसले. समोर टिपॉयवर चहाचा कप ठेवत वैशाली म्हणाली, “सौरभला केवळ बहात्तर टक्के मार्क मिळाले आहेत. त्याला धडपणे घरी येता येत नव्हतं. चक्कर आल्यामुळे संदीपने त्याला कसातरी घरी आणलाय. आता त्याला काही बोलू नका.”
माणिकरावांच्या चेहऱ्यावरची गुलाबी कांती नाहीशी झाली. रुबाबदार वाटणारे माणिकराव एकाएकी गळठून गेले. आपला मुलगा जणू नापास झाला आहे, अशा समजुतीने त्यांचं मन सैरभैर झालं. निराश होऊन ते कोचवर बसून राहिले.
बाहेर अंधार पसरू लागला म्हणून वैशालीने गेटवरच्या आणि घरातले लाइट लावले. सौरभच्या खोलीकडे जाऊन दाराला कान लावला. आत सर्व काही शांत होतं. फॅनची घरघर तेवढी जाणवत होती. म्हणजे सौरभ अजून झोपला होता.
माणिकरावांना जेवणाचे ताट वाढता वाढता तिच्या मनात विचार आला. सौरभ हुशार आहे… चुणचणीत आहे. शाळेत नेहमी डिस्टिंक्शनमध्ये असतो. त्यामुळे तो मेडिकलला जाणार, असं सर्वांनी परस्पर ठरवून टाकलं. अर्थात, तोही “हो”ला “हो” म्हणत गेला. नेमकं काय झालं कुणास ठाऊक पण बारावीमध्ये तो अभ्यासही करेना. त्याचे अभ्यासात मनच लागेना. वर्ष कुठे गेले समजले नाही. बघता बघता परीक्षा आली. यावर्षी गॅप घेण्याचा त्याचा विचार होता. पण यांनी ऐकलं नाही. सौरभचे बाबा म्हणाले, “तू शंभर टक्के डिस्टिंगशनमध्येच येणार. येणार म्हणजे येणारच. बस परीक्षेला. वर्ष वाया घालवू नकोस”. नाईलाजाने सौरभ परीक्षेला बसला.. आणि आज ही वेळ आली.
एकच चपाती खाऊन माणिकरावांनी वॉश बेसिनकडे जाऊन हात धुतला. नॅपकिनला हात पुसत पुसत वैशालीला म्हणाले, “रात्रीचे साडेआठ वाजलेत. आता उठव त्याला. जेवण करून पुन्हा झोपू दे. झालं ते झालं. उद्या बोलू त्यावर.”
जेवणाचे ताट घेऊन वैशाली आणि माणिकराव दोघेही सौरभच्या खोलीकडे गेले. दारावर टकटक करण्याअगोदरच खोलीतून खडखड आवाज येऊ लागला. माणिकराव एकदम दचकले. दार उघडून पाहतात तर सौरभ कसल्या तरी औषधी पुड्या सोडत होता. त्यांच्या चटकन लक्षात आलं. त्यांनी पळत जाऊन सर्व औषधे हिसकावून घेतली. हातात घेऊन पाहतात तर विषारी द्रव्यं. खाडकन ठेवून द्यावी, असा विचार आला. पण त्यांनी त्या क्षणी संयम बाळगला. माणिकराव त्यांच्या झोपण्याच्या रूमकडे वळले. सौरभला घेऊन रूममध्ये गेले. शांतपणे त्यांनी सौरभला आपल्याजवळ झोपायला सांगितले. थोड्या वेळाने सौरभ कसातरी झोपी गेला. त्याच्या जेवणाचं ताट टेबलवर तसंच पडलं होतं. वैशालीला आणि माणिकरावांना रात्रभर डोळा लागला नाही.
दारावरची बेल वाजली म्हणून माणिकराव बाहेर आले. दरवाज्यात सयाजी नाना उभे होते. सकाळचे आठ वाजले होते. चपचपीत ऊन पडलं होतं. सयाजी नानांनी माणिकरावकडे पाहिलं. काल झालेल्या प्रसंगामुळे ते निराश दिसत होते. चेहरा पार कोमेजून गेला होता. डोळेही तारवटले होते. सयाजी नाना म्हणाले, “तुझा फोन आला त्यावेळी मी प्रसादाचे पॅकिंग करण्याच्या कामांमध्ये होतो. दोन दिवसांनी सालाबादप्रमाणे पंढरपूरच्या वारीला अन्नदान करण्याचा कार्यक्रम आहे. सर्व पॅकिंग करायला रात्री अकरा वाजले. तरीही रात्रीच येणार होतो, परंतु खूप उशीर झाला म्हणून आलो नाही. कुठे आहे आमचा सौरभ?”
“आत्ताच बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलाय. थांब थोडा वेळ. येईल आता एवढ्यात. आत ये.”
टॉवेलने डोके पुसत पुसत सौरभ बाहेर आला. कालच्यापेक्षा तो थोडासा ताजातवाना दिसत होता. त्याने सयाजी नानांना वाकून नमस्कार केला. सयाजी नानांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. शेजारी बसवून घेतले. म्हणाले, “रात्री तुझ्या बाबांचा मला फोन आला होता. आता त्या कोणत्याच विषयावर काहीच बोलायला नको. तो विषय आता काही दिवस वर्ज्य करायचा.”
सौरभ खाली मान घालून बसला होता. तो फक्त ऐकून घेत होता. त्याच्या मनात विचार आला. पाचवीपासून सयाजी नानांनी आपल्याला जीव लावलाय. फोन केला की, हातातलं काम टाकून येतात.
चहा आणि बिस्किटांची प्लेट समोर ठेवून वैशाली नानांना म्हणाली, “आम्हाला वाटलं तुम्ही रात्रीच येणार.”
“येणार होतो. परंतु खूप वेळ झाला म्हणून आलो नाही.”
समोरच्या प्लेटमधले एक बिस्कीट आणि चहाचा कप हातात घेत सयाजी नाना सौरभला म्हणाले, “चल आपण वारीला जाऊ. विठ्ठलाला भेटू”.
हातातला टॉवेल बाजूला ठेवून सौरभ म्हणाला, “मी काय म्हातारा झालो नाही आणि माळ ही घातली नाही.”
“माळ घालायची आवश्यकता नसते सौरभ. तू येऊन तरी बघ एकदा वारीला”.
“का इतके लोक त्या गर्दीत जातात समजत नाही, नाना. उगाच टाळ कुटत वेळ वाया घालवतात. श्रमशक्ती आणि क्रयशक्ती वेस्ट घालवतात. वीस वीस दिवस चालत राहतात. काय मिळतं यातून? मानवी शक्ती वाया घालवण्याचा हा प्रघात आहे. मला नाही आवडत.” चिडचिड्या आवाजात सौरभ बोलला.
सयाजी नानांनी त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. सौरभचही बरोबरच होतं. या जनरेशनला सुखाची आणि समाधानाची संकल्पनाच नीट समजली नाही. ध्येय कोणतं ठेवायचं आणि कशासाठी ठेवायचं, हेही समजलं नाही. यातलाच सौरभ एक. तो तसाच विचार करणार. पण सयाजी नानांनी मात्र मनात ठरवलं. यावर्षी कसल्याही परिस्थितीत सौरभला वारीला घेऊन जायचंच.
हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!
बुधवारी सकाळी सयाजी नानांनी सौरभला पुन्हा फोन केला. “राहूदे वारीला. आपण वारकऱ्यांना अन्नदान तरी करून येऊया. तिथं जेवणं वाढायला, पाणी द्यायला कोणतरी हवं आहे. तू चल”
“तिथं जास्त वेळ थांबायचं नाही. लवकर परत फिरायचं. तर येतो,” सौरभने अट घातली.
सकाळी दहा वाजताच ईनोव्हाला स्टार्टर मारला. ड्रायव्हर शेजारच्या पुढच्या सीटवर सयाजी नाना. मधल्या सीटवर सौरभ, सयाजी नानांचे मित्र शामराव दादा, रघुनाथ बापू आणि मागच्या डिकीत अन्नदानाचे साहित्य.
मंगरूळपर्यंत रस्ता कच्चा होता. हायवेला लागल्यानंतर ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. वाखरीच्या दिशेने गाडी सुसाट धावू लागली. बरोबर दुपारी तीन वाजता गाडी बाजीरावच्या विहिरीजवळ पोहोचली. पण आता तेथे उड्डाणपूल झाले होते. तेथूनच दिंडीच्या पालख्या पुढे सरकत होत्या.


