श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत, यशोदा वगैरे गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. कोकणच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्या असल्याने त्यांची प्रादेशिक कादंबरीकार अशी ओळख आहे. रथचक्र ही कादंबरी सुद्धा लोकप्रिय झाली. यावर आधारित टीव्हीवर मालिकाही आली होती.
कादंबरी वाचायला घेतल्यावर मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. निळ्या रंगांच्या छटात जमिनीत अर्ध्याहून अधिक रुतलेले रथाचे चाक दाखवले आहे. रुतलेल्या रथचक्राशी संबंधित दोन कथा आठवतात – एक रामायणातल्या कैकयीची आणि दुसरी कर्णाची. यापैकी एकाचे हे चाक आहे का? की संसाराच्या रथाचे चक्र आहे? संसाराचा रथ दोन चाकांचा असतो – एक पतीचे आणि दुसरे पत्नीचे… की हे कालचक्र आहे? ‘चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च।’ ही उक्ती सार्थ करणारे कालचक्र? लेखकाने यापैकी कुठले चक्र कथनासाठी निवडले आहे, याची उत्सुकता मनात दाटून आली.
कादंबरीच्या कथनात एकाही पात्राला नाव नाही. नायिकेचा उल्लेख ‘ती’ असाच होत राहतो. तिचे नाव लक्षुमबाई असा उल्लेख एकदाच मिळतो, जो सहज नजरेतून सुटू शकतो. ती, थोरली, मधली, धाकटी, लखनौवाला, काका, थोरला मुलगा असेच उल्लेख येत राहतात. कोकणातल्या एका लहानशा खेडेगावात असलेल्या पाच भावांच्या एकत्र कुटुंबाची ही कथा आहे. ‘ती’ ही मुख्य नायिका आणि तिचा पती मौनीबाबा. ही अत्यंत परस्परविरोधी पात्रे आहेत. पती संसाराचा मोह सोडून परमेश्वर प्राप्तीसाठी संन्यस्त वृत्तीने राहणारा, तरी पत्नी आणि मुले असलेला. ती शिक्षणाचे मोल जाणणारी बुद्धिवादी पुरोगामी विचारांची स्त्री. निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊ पाहणारा आणि तरीही जाऊ न शकणारा तिचा पती तिला दांभिक वाटतो. संसाराच्या जबाबदाऱ्या झटकून टाकणारा ढोंगी वाटतो.
मौनीबाबा चार मुले झाल्यावर घर सोडून निघून जातो आणि मुलांची जबाबदारी तिच्यावर येते. कोकणातल्या त्या काळातल्या कर्मठ घरात सांसारिक मोहमाया नसलेल्या पतीचे कौतुक असते, आदर असतो, जो तिच्यासाठी अनाकलनीय असतो. पूर्ण कादंबरीवर मौनीबाबाचा अंतःप्रवाह आहे. ती सोडून सर्वांना तो वंदनीय आहे. त्याच्या येण्याची चातकासारखी वाट पहिली जाते. तिच्यासाठी मात्र त्याचे पुन्हा तिच्या आयुष्यात येणे अत्यंत भीतीदायक आहे.
स्त्रियांचे स्वयंपाकघरातले राजकारण एकत्र कुटुंबाचा अपरिहार्य भाग असते. घरातली मोठी स्त्री जिला लेखक ‘थोरली’ म्हणतात, तिच्या शब्दाला मान आहे. ती विचारी, संयमी आहे. ‘मधली’ आणि ‘धाकटी’ या दोघींचे नवरे कमावते असल्याने त्यांचा तोरा आहे. नायिकेला कुठलाही निर्णय घेण्याची परवानगी नाही. तिचा नवरा कमवत नाही, त्यामुळे घरात तिला आणि मुलांना अपमानास्पद वागणूक मिळते. पण ती हार मानत नाही. शिक्षणाची कास धरते… काबाडकष्ट करते, पण तिला श्रेय मिळत नाहीच, उलट प्रखर निंदा सहन करावी लागते. तिची सगळे जण अवहेलना करतात. तिच्यामुळे मुलगा शिकतो तरी, त्याचे श्रेय पतीच्या पुण्याईला जाते, हे पाहून ती विषण्ण होते.
हेही वाचा – भारतीय तत्वज्ञानाची झलक… पवनाकांठचा धोंडी!
कथा वाचताना कमी शब्दांत संवाद लिहिण्याची लेखकाची शैली प्रभाव टाकते. कथेत येणारे कितीतरी शब्द प्रादेशिक असल्यामुळे सर्वांना कळतीलच असं नाही. संदर्भाने अर्थ लागतो. कथेला प्रचंड वेग आहे. घटना भराभर घडत जातात. समस्या आणि समाधान येत राहते. मौनीबाबा म्हटला तर खलनायक आहे, पण तसा नाहीही. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो; पण तिच्यासाठी तो खलनायकच आहे. ती बंडखोर स्त्री आहे. स्वतंत्र विचारांची, उच्च मनोबल, आत्मविश्वास असलेली, ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणारी, मेहनती बुद्धिमान स्त्री आहे. पण तिच्यात दुर्गुण सुद्धा आहेत. लेखकाने तिचे महिमामंडन केलेले नाही. तिला तिच्या दुर्गुणांची जाणीव आहे.
कुटुंबाची कथा वाचताना एक गोष्ट जाणवते, खटकते – नात्यांतला व्यवहारीपणा आणि कोरडेपणा. धर्म, अर्थ आणि काम या तिघांभोवती विणलेली कथा आहे. ती वास्तविक आहे. यात कुठलाही भाग अवास्तव, अविश्वसनीय, अतिरंजित वाटत नाही. मनुष्य स्वभावाचे नमुने, कंगोरे पटतात… अशी माणसे आपण आसपास पाहतो.
नायिका सून, पत्नी, जाऊ, आई आहे; पण एकाही नात्यात ती यशस्वी होत नाही. तिच्या नशिबाचे भोग, असे सोयीस्कर उत्तर देता येईल… पण त्यापेक्षा प्रवाहाच्या विरुद्ध चालायचे ठरवले की, प्रतिकार होणारच, प्रवाहाशी लढावे लागणारच! त्यावेळी नाकातोंडात पाणी जाणारच, कधी जीव गुदमरेल, कधी जीव गमवावा लागेल. हे उत्तर अधिक पटते. ती काळाच्या पुढची आहे.
हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!
अवघी दोनशे पानांची कादंबरी आहे आणि उत्सुकता ताणून धरणारे कथानक आहे. वाचताना आपण गुंतत जातो, पण कुठेच न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. चूक, बरोबरचा न्यायनिवाडा करू शकत नाही; कारण प्रत्येक पात्राच्या वागण्यापाठी स्वतःचे कारण आहे. ही कादंबरी वाचून झाल्यावर एक प्रसिद्ध उक्ती आठवते – जेव्हा समस्येचे दोनच पर्याय असतील, तेव्हा तिसरा पर्याय शोधावा! थोडक्यात तिसरा पर्याय असतो, पण जो दिसत नाही.
हे रथचक्र कुठले? दशरथ आणि कैकयीचे वाटत नाही. ‘तिने’ संसाराचे रुतलेले चक्र बाहेर काढायचा प्रयत्न केल्यावर तिला साधे श्रेय मिळत नाही, वर कुठून मिळणार? कर्णाचे आणि श्रीकृष्णाचे म्हणावे तर ‘ती’ सांसारिक युद्ध एकटी लढते आहे, सर्व कुटुंबीय ‘शल्य’ आहेत, पण तिने कुठलाही अपराध केलेला नाही. तिने धर्माची कास सोडलेली नाही. हे कालचक्र नाही कारण ते निरंतर फिरत असते, ते कधीही थांबत नाही, रुतून बसू शकत नाही. हे संसार रथाचे चक्र असावे. रथाचे एक चक्र (पती) निरुपयोगी आहे, रथ जमिनीवर ठेवायला सुद्धा उपयोग नसलेले आहे आणि दुसरे चक्र तिचे… ती आटोकाट प्रयत्न करून रथ ओढते आहे, जमिनीवर ठेवते आहे, पण तरीही ते धसत जाते आहे. शेवटी ते पूर्णतः रुतून बसेल की बाहेर निघेल? दुसरे चक्र कार्यक्षम होईल का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कादंबरी वाचावी लागेल.


