थायलंड, मलेशिया आणि मग शेवटचा टप्पा सिंगापूर. खूप छान चालली होती आमची सहल. आम्ही पंचवीस जण अगदी एकसंघ झालो होतो, पण घरून प्रस्थान करून आठवडाभर झाला होता आणि हॉटेलचं अन्न खाऊन विटलेल्या मनाला आता साध्यासुध्या ‘वरण-भाताची’ प्रचंड ओढ लागली होती.
हॉटेलमधली न्याहारी ‘कॉन्टिनेंटल’ पद्धतीची असायची. अमाप आणि असंख्य पदार्थ, पण आपल्या पारंपरिक रसनेला मानवेल, असं काहीच नसायचं. काही वेळा इडली, पोहे किंवा उपमा असायचा, पण त्यांना म्हणावी तशी चवच नसायची. त्यामुळे हिरमोड व्हायचा, पण शेवटी तेच घशाखाली उतरवायला लागायचं… दुसरा काहीच पर्याय नसायचा.
दुपारचं आणि रात्रीचं भोजन भारतीय हॉटेलमध्ये व्हायचं. हल्ली भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण हेच समीकरण सगळीकडे रूढ झालंय, त्यामुळे पनीर, रोटी, दाल तडका, फिरनी, खीर, वेज मखनी, दाल मखनी वगैरे… ‘तेच ते आणि तेच ते’ खाऊन, जीव नुसता गांजला होता.
एके ठिकाणी गोड पदार्थ म्हणून हलवा होता. तो पाहून मी अगदीच हळवा झालो आणि खुशीची गाजरं मनात खात, चांगला वाडगा भरून तो लाल गुलाबी रंगाचा हलवा घेतला.
“गाजर का हलवा है बेटे, मैंने तेरे लिये अपने हाँथो से बनाया है…” म्हणणारी निरुपा रॉय किंवा तत्सम फिल्मी आई नजरेसमोर झळकून गेली, पण पहिला घास तोंडात जाताच, प्रचंड म्हणजे प्रचंड भ्रमनिरास झाला.
मी गाजराचा समजून घेतलेला हलवा काहीतरी वेगळाच लागत होता. थोडंसं उत्खनन करताच कळलं की, तो गाजराचा नसून पावाचा हलवा होता म्हणे. मी कपाळावर हात मारून घेतला आणि तरीही, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत तो कसातरी घशाखाली उतरवला. नंतर कुठेही हलवा बघितला की, मी त्यापासून चार योजने दूरच राहायचा पण केला आणि तो तंतोतंत अंमलात आणला!
हेही वाचा – बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…
नाही म्हणायला, एके ठिकाणी डोसे होते आणि मग त्या डोसेवाल्यावर असं काही आक्रमण झालं सगळ्यांचं की, तो डोसे घालून घालून पार मेटाकुटीला आला. किती ओढ असते माणसाला, आपल्या मातीतल्या अन्नाची, हे तेव्हा सगळ्यांनाच जाणवलं.
तरीही, काहीतरी ‘आपलं’ असं हवं होतं. त्याची ओढ होती आणि मग ते अगदी ध्यानीमनी नसताना सामोरं आलं. मन हरखून गेलं अगदी. हॉटेल बघता क्षणीच काहीतरी छानसं, प्रसन्न वाटलं आणि आपला, ‘आपल्या अन्ना’चा शोध इथे संपणार याची खात्रीच पटली.
अगदी अगत्यानं स्वागत झालं तिथे आमचं आणि आणि एकंदर नूरच पालटून गेला आम्हा सगळ्यांचा. भिंतीवर असलेल्या प्रतिमा, मुख्य काऊंटरच्या मागे असलेल्या तसबिरी पाहून आम्ही योग्य ठिकाणी आलो, हे जाणवले.
भूक लागली होतीच सपाट्याची आणि मग नेहमीच्या सूप ऐवजी पन्हं पाहून जीव सुखावला. पेलाभर पन्हं प्राशन केलं आणि शांत झालो. अगदी आपल्यासारखी नव्हती चव, पण त्यावेळी ती अमृता समानच भासली. पन्हं संपवलं आणि इतर पदार्थ धुंडाळायला लागलो. एका बाजूला मस्त ओली भेळ होती, ‘पुणेरी भेळ’ या नावाने! क्या बात, ‘भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है’ या उक्तीवर अगदीच विश्वास बसला माझा आणि ती आंबटगोड भेळ मी मिटक्या मारत संपवली. स्वादाचा आणि चवीचा शोध जणू तिथे येऊन थबकला होता.
नंतर मग मटकीची गूळ घातलेली फक्कड उसळ, उकडून बटाट्याची, खोबरं, कोथिंबीर पेरलेली भाजी, रसरशीत आमटी, खमंग काकडी, रोट्या मोडून मोडून थकलेल्या जीवासाठी घडीच्या पोळ्या, दही, पापड आणि पुऱ्या असा भरभक्कम जामानिमा होता…
कुठेही जा, भाजीतला गूळ काही माझी पाठ सोडत नाही, हे त्रिवार सत्य मी स्वीकारलंय आता. बायको म्हणालीसुद्धा, ‘भित्या पाठी ब्रह्मराक्षस, तसा तुझ्या पाठी गूळ लागलाय जन्माचा’… जाशील कुठे? पण खरं सांगतो, गूळ खरंच हवाहवासा वाटला मला, त्या क्षणी!
जेवण होतंय, तोवर गरमागरम जिलब्यांचा घाणा आला आणि सोबत परमप्रिय मठ्ठा. अक्षरश: जीव ओवाळून टाकावा असंच वाटत होतं. एकंदरीत, ‘आनंदाचे डोही आनंदतरंग, आनंदचि अंग आनंदाचे’ असं काहीतरी होत होतं अगदी!
हे असं काही घडलं की, ते घडवणाऱ्याचा शोध घेतल्याशिवाय माझ्या मनाला शांतता लाभत नाही. इथेही तसंच झालं. हात धुवून आमचे सगळे सहप्रवासी निघाले आणि मी आपला रेंगाळलो. पार सिंगापूरमध्ये हे असं काहीतरी अचाट करणारा माणूस आहे तरी कोण? हे जाणून घ्यायचं होतंच मला आणि मग मला भेटले ‘कर्ते करविते’ यतीन दातार! एकदम हसतमुख व्यक्तिमत्व. मी कौतुक केलं जेवणाचं आणि बोलतच बसलो त्यांच्याशी.
पक्का पुणेरी माणूस, तुळशीबागेतला. एसपी मधून BSc Chemistry करून मग मुंबईच्या आयसीटीमधून त्यांनी BSc Tech Paints & Polymers केलं आणि 1995 साली नोकरी निमित्ताने Kansai Nerolac या कंपनीतर्फे ते सिंगापूरला आले आणि मग सिंगापूर हीच त्यांची कर्मभूमी बनली!
नोकरीत असतानाच, 1997 साली ‘पेशवाई’ नावाचं दुकान सुरू केलं त्यांनी आणि पुण्याचे खाद्यपदार्थ सिंगापूरमध्ये आणून त्यांची विक्री सुरू केली. चितळे, सकस, साने, लक्ष्मीनारायण आणि इतर सगळे नामवंत ब्रॅंडस त्यांनी सिंगापूरमध्ये रुजवले आणि जोपासले.
एवढंच नाही, तर दातारांनी सिंगापूरमध्ये मराठी संस्कृतीची पताका फडकत ठेवण्याचा विडा उचलला आणि मग सुरू झालं मराठी माणसांचं एकत्र येणं. मराठी माणूस कुठेही गेला तरी, आपली भाषा आणि आपली संस्कृती सहसा सोडत नाही. संक्रांत, दिवाळी, गणपतीउत्सव आणि इतर सगळेच सण अगदी धडाक्याने साजरे होतात सिंगापूरमध्ये!
गणपतीत तब्बल चारशे शाडूच्या मूर्तींची दातार विक्री करतात, हे ऐकून तर मी तोंडात बोटं घातली. मूर्तीसोबत ते पूजेचं संपूर्ण साहित्य देतात, जेणेकरून परक्या देशात विधिवत पूजा करण्यात कोणतीही अडचण भासू नये.
गूळपोळ्या, पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, दिवाळीचा संपूर्ण फराळ, पाडव्याचं श्रीखंड हे सगळं ते सिंगापूरमध्ये उपलब्ध करून देतात, हे ऐकल्यावर फार अचंबा वाटला. नोकरीच्या चक्रात गुरफटलेला एक मराठी माणूस, ते चक्र भेदत नवं काहीतरी करतोय, याचं अप्रूप वाटत राहिलं खूप. संपूर्ण सिंगापूरमध्ये त्यांचे पदार्थ पोहोचतात आणि ते पोहोचवण्यासाठी एक स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उभी केलीये त्यांनी, हे विशेष!
हे कमी की काय, म्हणून 2005मध्ये त्यांनी मराठी पदार्थांची तब्बल तीन उपहारगृहं सुरू केली आणि साधारण 2019पर्यंत ती अगदी यशस्वीपणे चालवली. ही उपहारगृहे म्हणजे सिंगापूरच्या खाद्य संस्कृतीमधला मैलाचा दगड म्हणायला हरकत नाही. चवीची परिमाणंच बदलली त्यांनी! जगभरात कोविडने थैमान घालायच्या सहा महिने आधी, त्यांनी काही कारणास्तव ही अत्यंत यशस्वी अशी उपहारगृहे बंद करायचा निर्णय घेतला आणि ‘पेशवाई’च्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं.
पेशवाईची भरभराट होत असतानाच, केसरी, वीणा आणि इतर प्रथितयश प्रवास कंपन्यांच्या आग्रहाखातर त्यांनी Little India या सिंगापूरच्या भारतीय संस्कृतीच्या प्रभावक्षेत्रात, ‘सायली’ म्हणजे आपल्या पत्नीच्या नावाने परत एकदा उपहारगृह सुरू केलं आणि आमच्यासारख्या, परक्या देशात आपलं जेवण हवंहवंसं वाटणाऱ्या लोकांची फार मोठी सोय केली.
एवढे सिंगापूरला जाऊन मटकीची उसळ आणि बटाट्याच्या भाजीचं कसलं कौतुक करताय? असे प्रश्न आले बऱ्याच जणांकडून, पण सदोदित पनीर आणि पनीर खाऊन विटलेल्या जिभेला, सायली उपहारगृहाने काय दिलं, हे शब्दांत कसं सांगणार? करा म्हटलं चेष्टा, शेवटी ‘जावे आमटी भाताच्या वंशा तेव्हा कळे’, हेच खरं!
या उद्योगांव्यतिरिक्त, यतीन दातार सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते आहेत. सिंगापूरमध्ये मराठी कलाकारांचे विविध कार्यक्रम घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या सगळ्या रामरगाडयात, वेळात वेळ काढून ते माझ्याशी दोन शब्द बोलले आणि त्यांच्या कर्तृत्वाची गाथा माझ्यासमोर उलगडत गेली. नेमक्या त्यावेळी सायली दातार नव्हत्या, आणि त्यांची भेट राहून गेली, याची चुटपूट लागली.
हेही वाचा – अब्रह्मण्यम्… गुळचट ते झणझणीत!
परक्या देशात जाऊन, तिथे पाय रोवून एखादा व्यवसाय यशस्वी करून दाखवणं, ही काही साधीसुधी गोष्ट नाही. यतीन आणि सायली दातार या जोडगोळीने हे आव्हान पेलून ते यशस्वी करून दाखवलं, याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे.
चितळे, पेठे, गाडगीळ, मराठे, लागू बंधू, धनंजय दातार या नावांसोबत यतीन आणि सायली दातार ही दोन नावं पण अशीच झळकत रहावीत, याच माझ्या मनापासून शुभेच्छा त्यांना! कधी गेलात सिंगापूरला फिरायला, तर दातारांच्या ‘सायली’ उपहारगृहाला मात्र अगदी आवर्जून भेट द्या, एवढाच आग्रह करेन मी जाता जाता…
जय हो…


