“…तर बरंका महाराजा, हा असा दरबार भरलेला आहे. बादशहाचे सरदार, दरकदार असे हात जोडून, आदराने, खालमानेने आपापल्या जागी उभे आहेत. बादशहाचाच दरबार तो! संपन्नता कशी मान तुकवून उभी आहे. सर्वत्र रेशमी किनखापं लावलेली. गाद्या-गिरद्या, लोड, तक्के अंथरलेले आहेत. एका ऊंच कट्टयावर हिरेजडीत, सुवर्णमंडित सिंहासनावर दस्तुरखुद्द बादशाह महम्मदशहा बिराजमान झालेले आहे. चाकर चवऱ्या ढाळताहेत. समोर एक सेवक खाली मान घालून उभा आहे. बादशहा अतिशय संतप्त झालेले आहेत…
“दामाजीपंत की ये जुर्रत? उसकी बहादूरी देखकर हमने उन्हें खजांची क्या बनाया, वह अपने आप को इस दौलत के मालिक समझने लगे? हमारा खजाना भिखमंगो, लुच्चो लफंगों में बटवा दिया? सिपहसालार, जाओ दामाजी को बेड़ियां डालकर हमारे सामने पेश करो. हम खुद उसे उसकी औकात बतायेंगे!”
आणि बादशहाचा सेनापती रवाना झालेला आहे मंगळवेढ्याकड़े दामाजीपंताना कैद करायला…
बोला, पुंडलिक वरदे हssरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम…”
नेहमीप्रमाणे बुवांचे प्रवचन आजही जमून आले होते. त्यात सध्या भागवत सप्ताह सुरू असल्याने गर्दीही भरपूर जमे. पुढच्या थाळीतही बऱ्यापैकी दक्षिणा जमा होत असे. त्यात बुवा प्रवचनात अगदी एकजीव होऊन जात. विशेषतः, दामाजीपंतांची कथा सांगताना त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागायची. पण आज बुवांचा रंग काही जमत नव्हता. ऐकणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने सर्व काही नेहमीप्रमाणे चालू होते. कारण, त्यांच्या डोळ्यांसमोर दामाजीपंत उभे राहिलेले होते. पण दस्तुरखुद्द बुवा मात्र आजच्या प्रवचनात मानसिकदृष्ट्या पूर्णतः एकजीव होऊ शकत नव्हते. डोळ्यांसमोर सारखी सारखी छोटी गोदावरी उभी राहात होती…
हेही वाचा – सावळ्याची सावली!
“आजोबा, माझा गणवेश खूप फाटलाय हो! रफू करून करून त्याचा मूळ कपडाच दिसेनासा होइल आता. वर्गातली मुले हसतात हो, माझे फाटके कपडे बघून. आज आई-बाबा असते तर…?”
बुवांचा मुलगा-सून एका एसटी अपघातात ही एकुलती एक पोर बुवांच्या पदरात टाकून देवाघरी गेलेले. आता बुवाच गोदावरीचे सर्वकाही. पण त्यांचंही वय झालेलं. बिचारे प्रवचने करून त्यातून मिळालेल्या पैश्यांतून गोदावरीला वाढवत होते. आजच्या दक्षिणेतून गोदीचा गणवेश घ्यायलाच हवा. उद्याच दुकानात घेऊन जातो पोरीला… हरखून जाईल लेकरू. चष्मा काय अजून काही दिवस दोरी बांधून अडकवता येईल कानाला. बुवांनी मनाशी पक्कं केलं आणि पुन्हा गजर केला…
“जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी…”
“बादशहाचे सैनिक दामाजीपंतांना पकडायला त्यांच्या घरी पोहोचले आहेत, महाराजा. घरात हाहाकार उडालेला आहे. घरासमोर ही गर्दी जमलेली. पंत पूजेला बसले आहेत. तो यवनी फौजदार पंतांना अटक करायला पुढे सरसावलाय आणि महाराजा…
जणू वीज चमकावी तशी पंतांची कारभारीण यवनाच्या समोर उभी ठाकलेली आहे. जोपर्यंत त्यांची पूजा होणार नाही, तोवर मी तुला त्यांना अटक करू देणार नाही. त्या दुर्गेच्या तेजापुढे यवनानेही नांगी टाकली महाराजा. तो वरमलेला आहे. बोला संत श्री दामाजीपंत महाराज की जय… पुंडलिक वरदे…”
“बाई, सध्या आजोबांकडे पैसे नाहीयेत. पण ते लवकरात लवकर पैसे जमवून नवा गणवेश घेऊ म्हणालेत. तोवर मला वर्गात बसू द्या ना, प्लीज…” छोटी गोदी हात जोडून विनवत होती…
बाईंनी तिच्या खांद्यावर हलकेच थोपटले…
“हे बघ गोदे, मी काही लगेच तुला वर्गाच्या बाहेर काढत नाहीये. इतके दिवस तुला सांभाळून घेतलंच ना आम्ही सगळ्यांनी. पण हे असं किती दिवस चालणार बाळा? बरं, प्रश्न फक्त गणवेशाचा नाहीये. गेल्या सहा महिन्यांपासून शाळेची फी भरलेली नाहीयेस तू. अगदी तुझी शालेय फी जरी माफ केली असली तरी, बाकीच्या गोष्टी आहेतच ना? मी मागेच बुवांना म्हणाले होते की, तुला एखाद्या सरकारी शाळेत घाला. पण तेही हट्ट सोडायला तयार नाहीयेत. प्रत्येक वेळी बुवांकडे पाहून सगळे गप्प आहेत. पण कुठेतरी सगळ्यांनाच मर्यादा येतात गं गोदे… शेवटी आम्हीही पगारी नोकरच!”
“बाई, मी सांगते तुमचा निरोप आजोबांना आणि नसेलच जमत तर, मीच हट्ट करते, मला एखाद्या सरकारी शाळेत घाला म्हणून!”
गोदी रडवेली झालेली बघून बाईंनी तिला जवळ घेतले.
“एकदा व्यवस्थापकांशी बोलायलाच हवे. गोदीसाठी एखादी शिष्यवृत्ती किंवा कुणा दानशूर व्यक्तीची मदत मिळते का ते पाहण्यासाठी… एवढ्या हुशार विद्यार्थिनीचे नुकसान व्हायला नको.” बाईंनी मनाशीच एक निर्णय घेतला.
“विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल…
विठोबा रुख्माई, विठोब्बा रुख्माई, ज्ञानबा तुकाराम!”
प्रवचन रंगात आलेलं होतं. बुवासुद्धा काही काळापुरते आता गोदीला विसरले होते.
“काय सांगू महाराजा. काय ते तेज… काय ते सावळे सुंदर रूप… अंगात एक फाटकी बंडी, कंबरेला गुडघ्यापर्यंत येणारे फाटके धोतर… खांद्यावर कांबळ, हातात काठी, पायात चामड्याच्या वहाणा आणि कपाळावर गोपी चंदनाचा टीळा… एवढा श्रीमंत बादशहा, पण तो सुद्धा त्या रूपाने मंत्रमुग्ध झालाय बघा!
“जी हुजूर, म्या इठू चांभार. दामाजीपंतांचा चाकर हाय म्या. ज्ये धान त्यांनी लोकास्नी वाटलं त्याची किंमत चुकवाया आलोय. तेवडी तुमची रोकड घ्या, आन मस्नी पावती द्या बरं रोकड़ पोच झाल्याची…”
बोला ज्ञानेश्वर महाराज की जय…
बुवांचे लक्ष समोरच्या ताटावर होते. लोकांनी टाकलेली दक्षिणा, तिने ताट गच्च भरलेलं. बुवांचे मनही समाधानाने भरलेले. आज गोदीचा ड्रेस येणार. लेकरू खूश होणार…
“चमत्कार झालेला आहे महाराजा… महम्मदशहा वेडावून गेलाय. विठू चांभाराच्या कंबरेचा तो एवढासा कसा. पण त्यातून मोहरांचा जणू पाऊस पडतोय. ढिग लागलेयत मोहरांचे. जेवढ्या किमतीचे धान्य होते, त्याच्या शंभरपट रक्कम समोर पडलीय. बादशहाने पावती दिली. ती घेऊन बादशहाचा चाकर दामाजीपंतांना आणणाऱ्या सेनापतीकडे पोचलाय.
सगळी घटना ऐकल्यावर दामाजीनी विचारले…
‘कोण आलं होतं म्हणालात रोकड घेऊन?’
‘कोणीतरी काळाकुट्ट माणूस होता, इठू चांभार म्हणून… एवढासा कसा त्याचा, पण त्यातून पैशांचा पाऊस पाडला त्याने…’
दामाजीपंतांच्या डोळ्यातून कृतज्ञतेने, भक्तीने भरलेल्या आसवांच्या धारा लागलेल्या आहेत महाराजा. पंत तसेच दिसेल त्या मंदिरात शिरले. समोर तो काळ्या हासत उभाय…
माऊली… म्हणत पंतांनी त्या मूर्तीच्या पायाशी स्वतःला झोकून दिलेलं आहे…
बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय…”
बुवा रंगात आले होते. गोदीचा, कदाचित सगळ्याच विवंचनाचा त्यांना त्या क्षणापुरता का होईना विसर पडलेला होता. आता ते नेहमीचे बुवा होते. मागच्या गाभाऱ्यातला पांडुरंग जणू त्यांना समोर जमलेल्या जनमानसात दिसत होता. त्यांनी उजव्या हातातली वीणा उंचावली आणि बेभान होऊन जागच्या जागी गिरक्या घ्यायला सुरुवात केली. मुखाने अविरत विठूनामाचा गजर चालू होता. समोर बसलेला श्रोतृसमुदायही त्या मनस्वी नामस्मरणात तल्लीन होऊन गेला. साऱ्या आसमंतात फक्त विठू, विठू आणि विठूच सामावला होता जणू! सभामंडपाच्या भिंतीही जणूकाही पांडुरंग, पांडुरंग असा गजर करत होत्या. भाविकातले काही जण उठून बुवांबरोबर नाचायला लागले. टाळ-चिपळ्यांच्या गजरात दाही दिशा विठूमय होऊन गेल्या होत्या. सगळीकडे तोच भरून राहिला होता… आणि तितक्यात कोणीतरी ओरडले…
“सांभाळा, बुवांना धरा. बुवा पडले.”
तसा एक घोळका बुवांकडे धावला. बुवा आपली छाती दाबत खाली कोसळले. तोंड वेडेवाकडे झाले होते. वेदनेने साकळलेल्या चेहऱ्यावर तरीही एक अस्फुट हासू होते बुवांच्या…
“बुवांना अटॅक आलाय भौतेक. डाक्टरला बोलवा कोनीतरी…”
हेही वाचा – विठ्ठल दर्शनाची आस, वारी आणि मी
“आरं डाक्टर नंतर, आदी गाडी आना. बुवांना दावखान्यात नेयाला पायजे…” कुणीतरी बुवांची छाती हाताने चोळत म्हणाले.
“परबत आबा, आमची वेळ संपली. त्याचं बोलावणं आलं. तेवढं दक्षिणेचं ताट गोदीला द्या. तिला गणवेश घ्यायचाय. शाळेची फी भरायचीय. तेवढं सांभाळा माझ्या लेकराला. आम्ही जातो आमच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा…” बुवा निर्वाणीचे बोलत होते.
बुवांचा एक हात अजूनही दक्षिणेच्या थाळीवरच होता. जणूकाही कुणी ती थाळी घेणार तर नाही, अशी भीती वाटत होती.
“बुवा गोदीची काळजी करू नका. तिला म्या सांबाळंन. पर तुमी गप रावा बरं… आपून दावखान्यात जाऊ आदी…”
परबत आबांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते. त्यांचा दोस्त साथ सोडून चालला होता. पण बुवा खरोखरच गप्प झाले. कायमचेच…
कुणीतरी म्हणालं, “लै पुण्येवंत माणूस वते बुवा. देवाच्या दारात, देवाचं नाव घेताना मरान आलं. लैच पुण्येवंत!”
परबत आबांच्या डोळ्यांसमोर राहून राहून गोदी येत होती. डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या होत्या आणि मंदिरात जमलेल्या भाविकांनी पुन्हा गजर चालू केला, बुवांना निरोप देण्यासाठी…
जय जय रामकृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…


