उत्तरार्ध
शहरातल्या दहा मजली हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर वर्दे आजोबा ॲडमिट होते. त्यांना कुणीच भेटायला येत नव्हते, म्हणून हॉस्पिटलमधील स्टाफला आश्चर्यच वाटत होते. रसिका नर्सला त्या 80 वर्षांच्या वर्दे आजोबांबद्दल आत्मीयता होती आणि कुतूहलही. रसिकाने एकदा त्यांच्या बेडखालील छोटी बँग उघडली. त्या बॅगेत आजोबांचे दोन-तीन कपडे आणि काही वर्तमानपत्रांतील कात्रणे होती. एका कात्रणात वर्दे आजोबांच्या सत्काराचा फोटो होता. तिने चटकन मोबाइल काढला आणि त्याचा फोटो घेतला आणि वर्दे आजोबांचाही. नंतर हे दोन्ही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी पोस्ट पाहिली होती आणि अनेकांनी मेसेज टाकले होते.
वर्दे आजोबा हे पेशाने शिक्षक होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे माजी विद्यार्थी आणि माजी सहकाऱ्यांची हॉस्पिटलमध्ये झुंबड उडाली. वर्दे सरांचे सहकारी शिक्षक म्हणत होते, जवळजवळ चाळीस वर्षे सर बेपत्ता होते… 85 साली सरांना शेवटचे पाहिले होते, त्यानंतर सर आज दिसत आहेत…
रात्री त्त्यांचे 80च्या बॅचचे विद्यार्थी आले. सर्वजण सरांच्या पायाकडे बसले. आता ते सर्व साठीच्या पुढे होते.
“सर म्हणजे आमचे हीरो होते. नेहेमी सायकलवरून शाळेत यायचे, गणित अप्रतिम शिकवायचे, कबड्डी आणि खोखो खेळायचे. सरांची एक आठवण म्हणजे एकदा केमिस्ट्री लॅबला आग लागलेली, आत नववीची मुले होती… सर दहावीचा वर्ग घेत होते. सरांना कळताच ते त्या आगीत घुसले आणि आपल्या जिवाची काळजी न करता त्यानी एकेका मुलाला सुखरूप बाहेर काढले…”
“हो हो… माझ्या पण ते लक्षात आहे. तेव्हा मी आठवीत होतो. सर्व मुलांना आणि साठेबाईंना पण… त्यावेळी त्या मुलांचं प्रॅक्टिकल घेत होत्या.” एक माजी विद्यार्थी म्हणाला.
“साठेबाई?”
त्यावेळी त्या लॅबमध्ये अडकलेल्या मुला-मुलीतील गुलाब पण तिथे होती.
“मी वाचले त्या दिवशी… याचे श्रेय वर्दे सरांबरोबर साठेबाईंना पण होतं… आग सर्वत्र पसरली होती. वर्दे सरांनी बऱ्याच मुलांना बाहेर काढलं होत. पण मी आणि साठेबाई शेवटी होतो… आणि वर्दे सरांना आमच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं.. त्यावेळी साठेबाईंनी मला पोटाशी धरत खिडकीतून बाहेर उडी घेतली होती.”
अनेकांना साठेबाईंची पण आठवण आली. दोन वर्षांनी साठेबाईंचे लग्न झाले आणि त्या इंदूरला गेल्या.
वर्दे सरांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या आठवणी काढत होते. पण सर कुणाशी बोलत नव्हते किंवा ओळखत नव्हते.
आता रोज संध्याकाळी वर्दे सरांसाठी फुले, पुष्पगुच्छ येत होती… त्या वार्डमधील इतर कुणाही पेशन्टला कधीही आली नसतील एवढी! रसिका ते पहात होती आणि आनंदित होत होती.
रोज संध्याकाळी इतकी माणसे येत होती म्हणून किंवा वर्दे सराबंद्दल चर्चा सुरू होती म्हणून किंवा हॉस्पिटलमधील उपचारामुळे असेल… पण वर्दे सर थोडे थोडे विद्यार्थ्यांना ओळखू लागले होते. ओळखीचे वाटले तर हात वर करत होते, ओठावर हसू आणत होते. एक दिवस हॉस्पिटलबाहेर एक गाडी थांबली. त्यातून एक वृद्ध आणि एक तरुण स्त्री खाली उतरली. त्या दोघी वर्दे सर ॲडमिट होते, त्या वॉर्डमध्ये आल्या. त्या दोघी विचारत विचारत वर्दे सरांच्या बेडपाशी आल्या. त्या वृद्ध स्त्रीने गुलाबांची फुले आणली होती. तिने फुले बेडशेजारील टेबलावर ठेवली आणि ती वाकून सरांच्या चेहेऱ्याकडे पाहू लागली…
“ओळखले का सर मला?”
इतर सारेजण सरांच्या चेहेऱ्याकडे पहात होते… सर थोडे हसले असे सर्वाना वाटले…
“नाही ओळखले? मी पण आता म्हातारी झाले. मी निर्मला साठे नाही का! मी होते शाळेत शिक्षिका तुमच्या वेळेस. मग माझे लग्न झाले आणि मी इंदूरला गेले… गेली पंचवीस वर्षे इंदूरला होते. माझ्या नवऱ्याच्या मृत्यनंतर या माझ्या मुलीकडे आले. माझ्या मुलीचे आणि जावयाचे हॉस्पिटल आहे या भागात.”
हेही वाचा – वर्दे सर 40 वर्षं अज्ञातवासात का होते?
तिथे बाजूला उभी असलेले सर्व वर्दे सरांचे तसेच साठेबाईंचेही विद्यार्थी होते.
‘साठेबाई तुम्ही? आम्ही सर्व तुमचेच विद्यार्थी… आता ज्येष्ठ नागरिक झालोय! किती वर्षांनी?”
‘होय का? मला आता आठवत नाही… पण एक गुलाब आठवते…”
गुलाब चटकन पुढे झाली… साठेबाईंना कडकडून भेटली.
“बाई तुम्ही? तुम्हाला मी कशी विसरेन. तुम्ही त्या आगीतून मला वाचवलेत.. नाहीतर माझा कोळसा झाला असता.”
‘होय… ते मला पक्कं आठवतंय… पण या वर्देंनी किती मुलांना वाचवलं… माझ्या आठवणीप्रमाणे पंचवीस मुलांना! आता वर्दे या बेडवर आहेत…”
“पण बाई तुमचे लग्न झाले आणि त्यानंतर दोन महिन्यांत वर्दे सर शाळा आणि नोकरी सोडून गेले… आज कित्येक वर्षांनंतर सर आणि आता तुम्ही भेटलात!”
“यासाठी चाळीस वर्षं मागे जावे लागेल. माझ्या मुलीसमोरच मी हे सांगते… माझे आणि वर्दे सरांचे एकमेकांवर प्रेम होते…”
“काय?” सारे ओरडले.
“प्रयोगशाळेत आग लागली आणि दुसऱ्या वर्गावर असलेल्या वर्देंनी आपला जीव धोक्यात घालून मुलांना वाचवले. या प्रसंगामुळे मला ते आवडू लागले. मी त्यांना चिठ्ठी लिहिली… प्रेमाची… प्रेमपत्र… सरांनी पण मला चिठ्ठी लिहिली. त्यांना पण मी आवडत होते. एका वर्षानंतर लग्न करायचे आणि त्यानंतर ही नोकरी सोडून कुठल्यातरी आदिवासी भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे वर्देसर हेमलकासा भाग पण पाहून आले होते… त्या भागातील आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे त्त्यांचे म्हणणे होते, पण..”
“पण काय बाई?”
“माझ्या आई-वडिलांना ही बातमी समजली. त्यांनी मला कोंडून ठेवले आणि एकदिवस गुपचूप इंदूरला नेऊन माझे लग्न करून दिले.”
“अरेरे…”
“शेवटी माझे जबरदस्तीने का होईना लग्न झालेच. माझ्या अंदाजाने त्यामुळेच व्यथित होऊन सरांनी राजीनामा दिला असणार आणि बहुतेक ते इतकी वर्षे त्याच आदिवासी भागात मुलांना शिक्षण देत असणार. त्यामुळे त्त्यांचा संसार नाही… कुणी आप्तेष्ट नाही…”
“पण त्यांना या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले कुणी?”
“मी केले…” तेथे असलेला एक माणूस म्हणाला.
“बाई म्हणाल्या ते खरे आहे… हे सर हेमलकसा भागात शिक्षणाचे कार्य करत होते. त्या भागातील मी.. त्यांचा विद्यार्थी. मी या गावात पोलीस आहे. सरांची तब्येत ढासळू लागली, तेव्हा मी त्यांना माझ्या घरी आणले. माझी बायको पण त्यांचीच विदयार्थिनी! आमच्यावर आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी प्रेम केलं. त्यांना श्वास लागायचा… रात्र रात्र खोकला यायचा… मी गावी गेलो, तेव्हा त्यांची ही अवस्था पाहिली आणि त्यांना माझ्यासोबत आणून या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.”
साठेबाई पुढे झाल्या आणि त्यांनी त्या पोलिसांची पाठ थोपटली…
“फार चांगले काम केलेत तुम्ही पोलीसदादा… तुमच्यामुळे हे वर्दे मला आणि या त्यांच्या विद्यार्थ्यांना दिसले, भेटले… अर्थात, या हॉस्पिटलमधील नर्स रसिका हिचेही कौतुक… आणि तिचेही आभार मानायला हवेत. तिने सोशल मीडियावर सरांचा फोटो आणि वर्तमानपत्रातील कात्रणे टाकली, त्यामुळे हेच वर्देसर हे लक्षात आले.”
“होय होय, खरे आहे… या हॉस्पिटलमधील नर्स रसिका हिचे मोठे श्रेय आहे.”
कुणीतरी रसिकाला साठेबाईंसमोर आणले… बाईंनी तिला जवळ घेतले. त्या म्हणाल्या,
“तुम्ही सर्व माझे आणि वर्दे सरांचे विद्यार्थी… मी तुम्हाला आताच सांगितले होते की, सरांना आणि मला लग्न करायचे होते… पण ते झाले नाही… झाले ते झाले… आता माझी एक इच्छा आहे, मी सरांचा डिस्चार्ज घेऊन माझ्या मुलीच्या घरी त्यांना नेत आहे. माझी मुलगी आणि जावई दोघेही फिजिशियन आहेत… त्यामुळे दोघेही त्यांची काळजी घेतील आणि सरांचे जे काय शेवटचे दिवस असतील, त्या काळात मी त्यांची सुश्रुषा करीन. अर्थात, तुम्ही सारे सरांना भेटायला येत चला. हे पोलीसदादा नेहेमी येतीलच. ही आपली रसिका पण येईलच…”
हेही वाचा – एका शाळेचा अंत
सर्वजण स्तिमीत झाले.. एक अंदाजे ऐशी वर्षांची स्त्री, आपले जुने प्रेम अजून मनात जपून ठेवते आणि या वयात आपल्या जुन्या प्रियकराची सुश्रूषा करू इच्छिते…
सर्व लोकांची मान्यता होतीच. थोड्या वेळाने साठेबाईंच्या मुलीने वर्देसरांचा डिस्चार्ज घेतला आणि ॲम्ब्युलन्समधून त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये आणले.
वर्दे सर पुढे सहा महिने जगले. या सहा महिन्यांत त्त्यांचे आणि साठेबाईंचे विद्यार्थी त्यांना भेटत राहिले. पोलीसदादा आपल्या पत्नीसोबत येत राहिला आणि दर रविवारी रसिका गुलाबांची फुले घेऊन येत होती. या सहा महिन्यांत साठेबाईंनी वर्देसरांना भरवले… त्यांचे तोंड धुतले… त्यांचे अंग स्वच्छ केले.
हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस ज्या वर्दे सरांना कित्येक दिवस कुणीपण भेटायला येत नव्हते… त्याच वर्दे सरांच्या अंत्ययात्रेत पाचशेपेक्षा जास्त लोक सामील झाले होते… त्यात पोलीसदादा होते आणि रसिका पण अश्रू ढाळत होती.


