सखूबरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखूने लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून तुळशीची पूजा केली. हार घातला. भक्तीभावाने नमस्कार केला…
बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!
असा गजर करून सखूने तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलं आणि म्हणाली,
“तुळशीबाई चला निघूया वारीला…”
हा सोहळा इतर झाडं कौतुकाने बघत होती.
“किती गं भाग्यवान दरवर्षी तुला वारी घडते.”
“ये गं बाई जाऊन…”
“विठुरायाला, रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग…” असं म्हणून झाडांनी तिला हात जोडले.
“मी कुठली जाते! सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते, म्हणून घडतं बघा. येते हं जाऊन…” असं म्हणत, झाडांचा निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला…
हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!
खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा. ती या दिवसाची वाट पाहत असायची. दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा… अभंग, गौळणी, हरीपाठ, ओव्या कानी पडायच्या… फुगड्या खेळणाऱ्या साध्याभोळ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं. आनंदाने ती हरखून जायची.
वरूणराजा बरसायचा… पावसाच पाणी अंगावर पडलं की, तिला कृतार्थ झालो, असं वाटायचं. रिंगणाचा सोहळा सुरू झाला की, पळणाऱ्या आश्वाकडे ती आश्चर्याने बघायची. दिंडीत चालताना एकदा शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग-रुक्मिणी होते; तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या! त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती .
सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याच ओझं सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तुळशीकडे बघायची. तुळशीबाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची…
“किती प्रेम करतेस गं” म्हणून सखूची आलाबला घ्यावी, असं तिला वाटायचं.
मुक्कामी पोहोचल्यावर खाली ठेवलं तरी, येता जाता वारकरी श्रद्धेने वाकून नमस्कार करायचे. सखू तुळशी, मंजिऱ्या पालखीतल्या पादुकांना अर्पण करायची, तेव्हा तर तुळशीबाईला अपार आनंद व्हायचा. देवाच्या पायी जाऊन आपला जीव सार्थकी लागला, असं तिला वाटायचं…
वारकऱ्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.
लांबवर पालखी दिसायची… तो अनुपम सोहळा किती बघू आणि किती नको, असं तिला होऊन जायचं… आपल्या भाग्याचा तिला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं…
“तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला
कसा बाई तिनी गोविंद वश केला…”
तेव्हा डोळ्यासमोर श्रीकृष्णाचं मोहक रूप दिसायचं…
वारी पंढरपूरला पोहोचल्यावर सखू चंद्रभागेच्या पाण्याने तिला स्नान घालायची… त्यावेळी तिचे पान न् पान थरथरायचे…
एक मनातलं सांगू का?
मला वाटतं वारीला निघालेल्या प्रत्येक तुळशीबाईची हीच भावना असेल… तिला शब्दांत व्यक्त करता येत नाही म्हणून मी शब्द रूप दिलेले आहे…
वारी पंढरपूरला चालली आहे… तुळशीबाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या ताई, माईंचे मला अपार कौतुक वाटतं. अगदी सहजपणे डोक्यावर वृंदावन घेऊन या बायका लगबगीने चालत असतात. त्यांना बघायला मी वारीत जात असते… त्यांच्यातला साधा, निरागस भाव, गोडवा बघण्यासारखा असतो…
हेही वाचा – आठवण आषाढी वारीची
आपण काही विशेष करत आहोत, हे या बायकांच्या गावी पण नसतं! पायात साध्या चपला, नाहीतर स्लीपर असतात… आनंदाने भराभर चालत असतात. त्यांच्या तुळसप्रेमाचे मला फार अप्रूप वाटते. त्यांना माझा साष्टांग दंडवत.
त्यांच्यासाठी हात जोडून देवाला विनवते…
वारीत वाहता तुम्ही डोक्यावर तुळस…
म्हणूनच दिसतो तुम्हा विठुरायाचा कळस…
रुक्मिणी मातेला करते नवस…
सुखी ठेव माझ्या या आया बहिणीस…


