माया / भाग – 1
एकदा शांतपणे या चराचर सृष्टीकडे पाहा! अगम्य आहे ही सृष्टी! इथे आपल्याला नानाविध रूपे रंग आणि विविध आकार दिसतील. परंतु या प्रचंड विविधतेच्या मागे एकच सत्य दडलेले आहे, हे सांगण्यासाठी साक्षात भगवान शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण भारतवर्षाची पदयात्रा केली. जी गस्त म्हणून प्रसिद्ध आहे.
शंकराचार्यांनी सुप्तावस्थेत असलेल्या मानवी चेतनेला जागे करण्याची ती एक फार फार मोठी आध्यात्मिक जागरणाची धडपड केली होती. आज सर्व धर्मांमध्ये त्यांचे तत्त्वज्ञान अंतिम मानले जाते. अनेक संत त्यांनी जन्माला घातले. अगदी शम्स, रूमी सारखे परधर्मातील संतदेखील आचार्य शंकराचार्य यांच्या तत्वज्ञानातून संतपदाला पोहोचले. अशी किती उदाहरणे द्यावीत?
कदाचित, आपल्याला शंकराचार्य जर समजले ना, तर आपल्याला पूर्ण अध्यात्म समजले, हे ठामपणाने आपण सांगू शकतो आणि शंकराचार्यांचे सगळे ज्ञान हे उपनिषदांच्या आधारे आहे. पण उपनिषदे कोणी वाचलीच नव्हती. खऱ्या अर्थाने जेवढे मला समजते त्यावरून मी सांगू शकतो की, शंकराचार्यांनी आपल्या हिंदू धर्माला आकार दिला. त्याआधी अद्वैत तत्वज्ञान आपले ऋषीमुनी वगळता कोणालाही ठाऊक नव्हते. शंकराचार्यांनी अज्ञानाचा पडदा दूर केला. त्यासाठी प्रसंगी वादविवाद केले. संपूर्ण भारताचे भ्रमण केले. अनेक विद्वानांशी चर्चा केल्या.
आचार्यांनी पाहिले की, लोक फक्त बाह्य अवडंबरात अडकलेत. भगवी वस्त्रे घातली म्हणजे कोणी कधी साधू होत नसते, तरीही असेच साधूसंत फार वाढले आहेत. आचार्य शंकराचार्यांनी स्पष्ट केले की –
“ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे तोच खरा साधक असतो.” हाच विचार तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी आणि अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञान दिले.
यथा दीपेन दृश्यन्ते
रूपाणि विविधानि च।
विना विचारं तद्वद्धि
ज्ञानं नैव प्रजायते॥
– गीताव्रत
आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत गेलो, तर तिथे असलेल्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत. तिथे एखादा सोन्याचा दागिना असेल तर, तोही दिसणार नाही किंवा एखादा विषारी साप असेल तरी, जोपर्यंत तिथे प्रकाश पडत नाही, तोपर्यंत आपल्याला तो सापही दिसणार नाही. म्हणजे प्रकाशाशिवाय सत्याचे ज्ञान होत नाही. अंधारामध्ये कधी दोरीला साप समजूनही मनुष्य घाबरून जातो आणि जिवाच्या आकांताने पळत सुटतो. त्याच्या मनात निर्माण झालेली भीती तर, अगदी खरी असते आणि त्या भीतीमुळे त्याच्या शरीराला दरदरून घामही फुटतो. पण जेव्हा कोणीतरी तिथे दिवा घेऊन येतो आणि लख्ख प्रकाश पडतो, तेव्हा त्या माणसाला समजते की, तिथे साप कधीच नव्हता, ती तर केवळ एक दोरीच होती. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, दिव्याच्या प्रकाशाने सापाला घालवले, मारलेले नाही! तर, प्रकाशाने केवळ अज्ञान दूर केले आहे आणि जे सत्य होते, ते उजेडात आणले.
अगदी त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीवर अज्ञानाचा, जो अपुऱ्या ज्ञानामुळे किंवा ज्ञानग्रहण न करण्याच्या आपल्या प्रयत्नामुळे अंध:कार पसरलेला असतो. हा अंधकार दूर करायचा असेल आणि प्रकाश ज्याला संत मुक्ताई, “उजेडी राहीन उजेड होऊन…” असं ‘उजेड’ असे संबोधतात, तो जर हवा असेल तर विवेकाचा दिवा चेतवावा लागतो. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.
कर्मकांड करून मन एकाग्र होईल, समाधान वाटेल, पण खरे ज्ञान मिळत नाही. त्यासाठी विचारांची नितांत आवश्यकता असते. विचार म्हणजे तर्क नव्हे, तर मी कोण आहे? हे जग काय आहे? आणि माझे या जगातील अस्तित्व काय आणि कसे आहे? आणि माझ्या जन्म घेण्याचा उद्देश काय? या प्रश्नांचा अत्यंत खोलवर शोध घेणे म्हणजे ज्ञान, म्हणजे उजेड होय!
हेही वाचा – रामरक्षेचे चिलखत
असे म्हणतात, समुद्रात जसजसे खोल जावे, तसतसे मौल्यवान मोती सापडतात. तसे विचारांच्या मंथनातूनच ज्ञानाचे नवनीत बाहेर पडते. जसा दिवा अंधारातील वस्तूंना प्रकाशित करतो, तसा विचार आपल्या अंतर्यामी लपलेल्या खऱ्या स्वरूपाला प्रकाशित करतो. जोपर्यंत आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत उत्तरे मिळण्याची प्रक्रिया सुरूच होत नाही. म्हणून शंकराचार्यांनी विचाराला आणि चिंतनाला ज्ञानाचे एकमेव साधन मानले आहे.
अज्ञाननिर्मितं सर्वं
ज्ञानेन प्रविलीयते।
स्वच्छे मनसि संशुद्धे
ब्रह्मज्ञानं प्रकाशते॥
– गीताव्रत
आपल्याला जीवनात जे काही दुःख भीती किंवा आसक्ती वाटते आहे, त्याचे मूळ केवळ आणि केवळ अज्ञानात आहे. आपण वर दोरी आणि सापाचे उदाहरण पाहिले. हे अध्यात्मातले सर्वश्रेष्ठ उदाहरण असल्यामुळे ते वारंवार आपण विचारात घेतले पाहिजे. तो साप कुठून आला? तो साप बाहेरून नाही आला, तर तो आपल्या अज्ञानातून निर्माण झाला होता. जसा तिथे प्रकाश येतो तसा तो साप विरून जातो; कारण तो मुळात तिथे नव्हताच. हे संपूर्ण जग आणि त्यातील मी आणि तू हे जे द्वैत आपल्याला दिसते, ते सर्वस्वी अज्ञाननिर्मित आहे. जेव्हा खऱ्या ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा हे द्वैत विरून जाते आणि सर्वत्र एकच चैतन्य भरून राहिलेले आहे, याची प्रचिती येते. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की, हे ज्ञान कोठे प्रकट होते? त्यासाठी आपले मन अगदी आरशासारखे स्पष्ट दिसणारे प्रकाशाचे परिवर्तन करणारे, जे जसे स्पष्ट आहे, ते ते तसेच्या तसे दाखवणारे स्वच्छ हवे असते. आरसा जर धुळीने माखलेला असेल तर त्यात आपले प्रतिबिंब कधीच स्पष्ट दिसत नाही. आपण दररोज अंघोळ करून बाह्य शरीराची स्वच्छता अत्यंत काळजीपूर्वक राखतो पण आपल्या मनावर साचलेली वासना, क्रोध आणि मत्सर यांची धूळ झटकणे आपण सोयीस्करपणे विसरतो.
एका जुन्या कथेनुसार, एका राजाने दोन चित्रकारांना समोरासमोर भिंतीवर चित्र काढायला सांगितले. मधे एक पडदा होता. एका चित्रकाराने अतिशय सुंदर चित्र काढले. दुसऱ्या चित्रकाराने मात्र चित्र काढण्याऐवजी ती भिंत घासून घासून इतकी लख्ख केली की, ती आरशासारखी चमकू लागली. जेव्हा मधला पडदा काढला तेव्हा पहिल्या चित्रकाराचे सुंदर चित्र दुसऱ्या भिंतीवर जसेच्या तसे प्रतिबिंबित झाले आणि ते अधिकच जिवंत वाटू लागले. आपले मनही त्या दुसऱ्या भिंतीसारखे आहे. जेव्हा ते विचारांच्या, अभ्यासाच्या आणि वैराग्याच्या साधनेने पूर्णपणे शुद्ध होते, तेव्हा त्यात परमज्ञान आपोआप प्रकट होते.
ते ज्ञान कुठे बाहेरून येत नाही. हे ज्ञान केवळ अनुभवाने आणि अनुभूतीने मिळते, असे अध्यात्म सांगते. कारण आपण माहिती तर गोळा करू शकतो, थेरॉटिकल ज्ञान घेऊ शकतो, पण प्रयत्न करून ते ज्ञान आपले आपल्यालाच मिळवावे लागते. कारण ते अनुभवाने मिळते. कारण ते आपण केलेल्या ध्यानातून आणि मिळालेल्या दृष्टांतातून मिळते. जे ज्ञान आपल्याला प्राप्त करायचे आहे, ते तर आपल्या चिंतनातूनच मिळणार असते. ते आपल्यातच असते, पण फक्त ते आपल्याच अज्ञानाच्या धुळीने झाकलेले असते.
आत्मा न गृह्यते केन
नापि त्याज्यः कथंचन।
स्वीकारं वा निराकारं
न करोति स तत्त्वतः॥
– गीताव्रत
खरे ज्ञान म्हणजे नेमके काय, हे समजून घेताना आत्मानुभवाकडे वळले पाहिजे. आपला आत्मा हा असा आहे की, त्याला कोणीही स्वीकारू शकत नाही आणि त्याला कोणीही नाकारूही शकत नाही. या जगात शरीर येते आणि जाते, अनेक प्रकारचे विचार येतात आणि जातात, सुखदुःखाच्या लाटा येतात आणि विरून जातात; पण जो या सर्वांचा केवळ साक्षीदार आहे, तो आत्मा अचल आणि स्थिर आहे. आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा स्वीकार करू, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ती गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी होती आणि आता आपण तिला जवळ करत आहोत. पण आत्मा तर सर्वव्यापी आहे, तोच मुळात सगळीकडे भरून राहिलेला आहे. मग तो कशाला स्वीकारणार आणि कशाला नाकारणार? तो स्वतःलाही नाकारू शकत नाही, कारण नाकारणारा सुद्धा तोच असतो.
जसे एखाद्या माठामध्ये आकाश दिसत असते. आपण तो माठ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, पण आपण त्या आकाशाला नाकारू शकत नाही. माठ हलवू शकतो. अगदी माठ फुटला तरी आकाशाला धक्का पोहोचत नाही, आकाशावर काहीच फरक पडत नाही.
आपला आत्मा हा त्या आकाशासारखा आहे. हे जे निर्विकार अस्तित्व आहे, तेच खरे ज्ञान आहे. जगातील इतर सर्व भौतिक गोष्टी आपण स्वीकारू किंवा नाकारू शकू, पण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाशी आपण काहीही तडजोड करू शकत नाही. हे तत्व एकदा का नीट समजले की, माणसाचे अर्ध्याहून अधिक कष्ट आणि दुःख तिथेच संपतात, कारण मग तो बदलणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून पडत नाही. तर, न बदलणाऱ्या सत्यावर आपली निष्ठा ठेवतो.
न सत्यात् पावकं किञ्चिद्
गुह्यं वेदेषु गीयते।
असंयताय नो देयं
दातव्यं शुचये सदा॥
– गीताव्रत
सत्यज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काहीही नाही. ते ज्ञान सर्व वेदांचे अंतिम सार आहे आणि देवांचेही ते परम रहस्य आहे. पण हे अत्यंत मौल्यवान ज्ञान सर्वांना अगदी सहजपणे दिले जात नाही. देऊ नये हे सुद्धा बरोबर आहे. पण स्वतःहून आपण ते ज्ञान घ्यावं, अशी बुद्धी आपल्याला होत नाही. अमृताचा एक कण जिभेवर कोणी ठेवल्यानंतर ती गोडी आपल्याला समजू शकते आणि ती गोडी पुढे लागूही शकते. आपल्यापर्यंत पोहोचणारे ज्ञान हे एक थेंब अमृतासारखे ठरू शकते.
हे आध्यात्मिक ज्ञान सहजपणाने देऊ नये, असे का असावे? याचे उत्तर शोधताना आपल्याला मानवी स्वभावाचा विचार करावा लागतो. कारण ज्याच्याकडे संयम नाही, ज्याचे स्वतःच्या इंद्रियांवर आणि मनावर अजिबात नियंत्रण नाही, अशा व्यक्तीला जर हे ज्ञान दिले तर, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो किंवा त्याला त्याचे महत्त्वच कधी कळणार नाही.
ज्याप्रमाणे आपण एखाद्या लहान मुलाच्या हातात अतिशय मौल्यवान असा हिरा देत नाहीत, देणारही नाहीत. कारण त्याला त्याची किंमत अजून कळत नाही. कदाचित, तो त्या हिऱ्याला एखादा दगड समजून फेकूनही देईल. आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत नेहमी असे होते, असे बहुतेक सगळे संत मानतात. या परमोच्च आध्यात्मिक ज्ञानाचे हेच एकमात्र दुःख आहे. याची उदाहरण देताना अध्यात्मामध्ये, एखाद्या मूर्ख माणसाच्या हाती धारदार तलवार दिली, तर तो स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवू शकतो, असे स्पष्टीकरण दिलेले आहे.
हेही वाचा – हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन
आध्यात्मिक ज्ञान केवळ अशाच शिष्यांना, व्यक्तींना द्यावे जे वासनाशून्य आहेत, ज्यांच्या मनात आता जगातील आणखी कशाचीही हाव उरलेली नाही आणि जे पूर्णपणे आज्ञाधारक आहेत. पूर्वीच्या काळी गुरू आपल्या शिष्याची अनेक वर्षे परीक्षा पाहात असत आणि जेव्हा त्याची पात्रता सिद्ध होई, तेव्हाच त्याला केवळ उपदेश करत असत. ज्याचे चित्त पूर्णपणे शुद्ध झाले आहे आणि ज्याच्या मनात अहंकाराचा लवलेशही उरलेला नाही, त्यालाच या परम गुह्य ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आणि ते ज्ञान त्याच्या जीवनात फळाला येते.
अहमेव परं ब्रह्म
सच्चिदानंदविग्रहः।
देहोऽहं नैव चानित्यं
सत्यज्ञानमिदं विदुः॥
– गीताव्रत
ज्ञानी लोक ज्याला सत्यज्ञान म्हणतात, ती म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होय. आपण नेहमी व्यवहारात बोलताना म्हणतो “हा माझा देह आहे.” पण जर, हा माझा देह आहे, असे आपण म्हणत असू तर हा देह ‘माझा’ म्हणजे नक्की कोणाचा आहे? आपण म्हणतो “हे माझे हात आहेत, हे माझे डोळे आहेत.” हे माझे हात, डोळे आहेत, म्हणजे नक्की कोणाचे आहेत? जेव्हा आपण एखादी ‘गाडी माझी आहे’ असे म्हणू, तेव्हा आपण ती गाडी नसतो आपण त्या गाडीचे मालक असतो आणि गाडी आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. याचाच अर्थ असा की, “मी या देहापेक्षा नक्कीच वेगळा आहे. तरीही आपण आयुष्यभर या देहालाच मी मानून जगत असतो. हेच तर मानवी जीवनातील सर्वात मोठे अज्ञान आहे.”
मी वास्तवतः आहे कारण मी सम आहे, मी नेहमी शांत आहे आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे. हे शरीर तर आज आहे आणि उद्या नाही, ते पूर्णपणे असत्य आणि अनित्य आहे. जो जन्माला येतो तो केवळ देह असतो आणि जो मरतो तोही केवळ देहच असतो, पण जो या जन्माचा आणि मृत्यूचा साक्षीदार आहे, तो मी आहे. मी कधीच जन्माला येत नाही आणि मी कधीच मरत नाही. मी हा जड देह मुळीच नाही, तर मी तो शुद्ध आणि प्रकाशमान चैतन्य आहे. या भावनेवर जेव्हा आपली घट्ट पकड बसते आणि ही केवळ माहिती न राहता जेव्हा ती आपली प्रत्यक्ष अनुभूती बनते तेव्हा त्यालाच वेदान्तामध्ये खरे ज्ञान म्हटले जाते.
हे ज्ञान माणसाला मृत्यूच्या भयापासून कायमचे, अगदी कायमचे मुक्त करते.


