अध्याय तेरावा
अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा । न वचेचि कां जैसा । अगाध डोहां ॥738॥ कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दिठी न घाली । गळु न पाहतां गिळिली । उंडी मीनें ॥739॥ दीपाचिया झगमगा । जाळील हें पतंगा । नेणवेचि पैं गा । जयापरी ॥740॥ गव्हारु निद्रासुखें । घर जळत असे तें न देखे । नेणतां जेंवी विखें । रांधिलें अन्न ॥741॥ तैसा जीविताचेनि मिषें । हा मृत्युचि आला असे । हें नेणेचि राजसें । सुखें जो गा ॥742॥ शरीरींचीं वाढी । अहोरात्रांची जोडी । विषयसुखप्रौढी । साचचि मानी ॥743॥ परि बापुडा ऐसें नेणे । जें वेश्येचें सर्वस्व देणें । तेंचि नागवणें । रूप एथ ॥744॥ संवचोराचें साजणें । तेंचि तें प्राण घेणें । लेपा स्नपन करणें । तेंचि मरण ॥745॥ पांडुरोगें आंग सुटलें । तें तयाचि नांवे खुंटलें । तैसें नेणें भुललें । आहारनिद्रा ॥746॥ सन्मुख शूला । धांवतया पायें चपळा । प्रतिपदीं ये जवळा । मृत्यु जेवीं ॥747॥ तेवीं देहा जंव जंव वाढु । जंव जंव दिवसांचा पवाडु । जंव जंव सुरवाडु । भोगांचा या ॥748॥ तंव तंव अधिकाधिकें । मरण आयुष्यातें जिंके । मीठ जेवीं उदकें । घांसिजत असे ॥749॥ तैसें जीवित जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥750॥ किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नीच नवा । न देखे जो मावा। विषयांचिया ॥751॥ तो अज्ञानदेशींचा रावो । या बोला महाबाहो। न पडे गा वाटावो । आणिकांचा ॥752॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु
अर्थ
डबक्यातला मासा, हे पाणी आटणार नाही, अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही ॥738॥ अथवा पारध्याच्या गाण्याने भुलून हरिणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पाहता, गळास लावलेले आमिष माशाने गिळावे ॥739॥ दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील, हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही. ॥740॥ जसा एखादा मूर्ख, आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे, घर जळत असले, तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख, खादाड मनुष्य, विष घालून शिजविलेले अन्न असले, तरी तिकडे लक्ष न देता खातो ॥741॥ त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे, हे जो रजोगुणापासून होणार्या सुखामुळे जाणतच नाही. ॥742॥ शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा (आयुष्याचा) लाभ, विषयसुखाचे महत्व, ह्या सर्व गोष्टी जो खर्याच मानतो. ॥743॥ वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे, हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय (त्याप्रमाणे राजससुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे). पण त्या बिचार्याच्या हे काहीच लक्षात येत नाही की ॥744॥ आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री, ती मैत्री नव्हे, तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रास स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे होय. ॥745॥ पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली, तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे, मग त्यातच पंडुरोग्याचे आयुष्य संपले आहे, असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने (मोहित झालेले) मूर्ख लोक विषयवृद्धीतच खरी वृद्धी नसून खराखरा नाशच आहे, हे जाणत नाहीत ॥746॥ समोर असलेल्या शूळाकडे, जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यु जवळ येतो; ॥747॥ त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल, जसजशी दिवसाची वाढ होते, (म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात) आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल, ॥748॥ तसतसे आयुष्याला मरण अधिक अधिक जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसे घासले जाईल (तसतसे विरघळत जाते) ॥749॥ त्याप्रमाणे (वरील मिठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते (म्हणजे मरण जवळ येते). ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही ॥750॥ अर्जुना, फार काय सांगावे! हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही ॥751॥ हे महाबाहो अर्जुना, तो (पुरुष) अज्ञानदेशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही ॥752॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं


