पूर्वार्ध
सौरभ अक्काच्या गावी पोहोचेपर्यंत संध्याकाळ होतं आली होती. घामाने आणि गर्मीने अंग चिकट झाले होते. बऱ्याच दिवसांनी तो लाल एसटीने प्रवास करून आला होता. अंगही दुखत होते. कारने पाच-सहा तासात आरामात पोहोचला असता, पण प्रतिभाने खोडा घातला. कारने जाल तर, उगाच अक्काला वाटेल आपला भाऊ पैसेवाला आहे आणि ती जास्तीचे काही मागेल. अगोदरच सीमा आणि रीमा यांनी हक्कसोडपत्रावर सह्या करताना नाकीनऊ आणले होते. खरेतर, दोघेही श्रीमंत घरी दिलेल्या पण तरी वडिलांची इस्टेट भावाच्या नावावर करण्यासाठी सह्या करायला त्यांनी खूप नखरे केले. अवाच्यासवा पैसे मागितले. अखेर मोठ्या काकांना मधे टाकून एक आकडा फिक्स केला आणि दादापुता करून त्यांच्या सह्या घेतल्या. सख्या बहिणींनी इतका त्रास दिल्यावर अक्का तर सावत्र बहीण! ती कितपत राजी होईल याची सौरभला कल्पना नव्हती. शिवाय, आता मोठ्या काकांची तब्येत बरी नसल्याने तेही सोबत आले नव्हते. त्यांचेही वय झाले होते. भरीसभर म्हणून अक्काने त्यालाच सहीसाठी तिच्या गावी बोलावले. स्वतःच्या घरी माणूस थोडा रिलॅक्स असतो. इथे तिच्याच घरी तिने जर ऐकलेच नाही आणि हक्कसोडपत्रावर सही करण्यासाठी मोठी रक्कम मागितली आणि त्यावर अडून राहिली, तर तो काय करणार होता?
त्याचे वडील अण्णा अकस्मात वारले. त्यांची तब्येत अगदी खणखणीत होती. पण एकाच मासिव्ह हार्ट अटॅकने ते गेले. अर्थात त्यांनी मृत्युपत्र केले नव्हते, हे सौरभला बरेच उशिरा कळाले. खासकरून गावी असलेली शेती आणि वाडा या दोन गोष्टी होत्या. सोने नाणे त्यांनी सगळ्या बहिणींना आणि सुनेला आधीच दिले होते.
सौरभ स्टॅण्डवर उतरला. आजूबाजूला नजर टाकली. पाच वर्षांत फारसे काहीच बदलले नव्हते. तोच जुना स्टॅण्ड, तीच गडबड, तेच अतिक्रमण असलेली दुकाने, आरडाओरडा, अस्वच्छता… तो पाच वर्षांपूर्वी आला होता. जेव्हा दाजी वारले होते. तेव्हा तो दोन-तीन दिवस राहून लगेच परत गेला होता आणि बाराव्या-तेराव्याला आला होता. त्यावेळी अक्का दुःखात होती. तसेही, अक्काशी त्याचा खूप संबंध राहिला नव्हता. अक्का ही अण्णांच्या पाहिल्या बायकोची मुलगी. अक्का झाल्याझाल्या तिची आई वारली. त्यांनंतर अण्णांनी बऱ्याच उशिराने दुसरे लग्न केले. मग सीमा, रीमा आणि शेवटी सौरभ झाला. त्यामुळे अक्काच्या आणि त्याच्या वयात भरपूर अंतर. त्याच्या लहानपणी अक्का त्याला कडेवर घेऊन फिरायची, असे त्याला सगळे सांगायचे.
तो शाळेत असतानाच अक्काचे लग्न झाले… तसे थोडे लवकरच. पुढे अजून दोन मुली आहेत, त्यामुळे खातेपिते घर बघून अक्काला अण्णांनी देऊन टाकली. त्यानंतर तो दोनचारदा अक्काच्या घरी गेला असेल. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने जाणे जमलेच नाही. अक्कालाही नंतर माहेरी येणे जमेना. शेतीवाडी… एकत्र कुटुंब. अक्काला दोन मुले – रवी आणि वासू. तेही लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झाले. एक मात्र त्याला स्पष्ट आठवते. अक्का सावत्र असूनही त्याच्या आईचे आणि अक्काचे संबंध खूप प्रेमाचे राहिले. अगदी अक्का सासरी जायला निघाली की, आई आणि अक्का एकमेकांना मिठी मारून रडायचे. आई गेली तेव्हा तर, दहा दिवस अक्काच्या डोळ्याची धार थांबत नव्हती.
हेही वाचा – सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ!
मोबाईल वाजला तसा सौरभ भानावर आला. रवीचा फोन होता.
“हॅलो, मामा तू पोहचला का?”
“हो आत्ताच.”
“अरे, शेतात काम निघाले म्हणून मला यायला उशीर झाला. तू तिथेच थांब. मी आलोच पाच मिनिटात मोटरसायकल वर.”
“अरे, राहू दे. पाच-सात मिनिटांचा रस्ता. जातो मी पायी. सामानही नाही फारसे…”
“नको रे बाबा. आई रागवेल मला. थांब. आलोच.”
पाच मिनिटांत रवी आला. खरेतर, दिसायला चांगला होता. पण उन्हात फिरून रापला होता. त्यात शेतावर जायचे म्हणून साधेच कपडे… कष्टाळू होता. थोडीफार शेती सांभाळून त्याने खते बी-बियाण्याचे दुकानही टाकले होते. वडील गेल्यावर त्याने घराची जबाबदारी समर्थपणे पेलली होती.
आल्या आल्या त्याने गाडी लावून सौरभच्या पायाला हात लावून वाकून नमस्कार केला आणि त्याच्या हातातली बॅग घेतली. आपल्या मुलांनी एवढ्या भररस्त्यात वाकून कोणाला नमस्कार केला असता का, असा प्रश्न सौरभला पडला.
“मामा कसा झाला प्रवास?”
“बरा झाला… ऊन फार आहे रे.”
“अरे, मग रात्री निघायचे ना?”
सौरभ बोलला नाही. अक्काला द्यायला पैसे आणले होते. ते घेऊन रात्री कसा प्रवास करायचा?
घरी पोहचताच अक्का बाहेर आली. त्याने वाकून नमस्कार करताच तिने उठवून त्याला प्रेमाने जवळ घेतले.
“वाळलास रे फार. जास्त दगदग नको करत जाऊ आता.”
सौरभला हसूच आले. “अक्का, डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलंय. वाळतो कुठला.”
अक्काने माठातले वाळ्याचे थंडगार पाणी दिले, तसा सौरभचा थकवा पळाला. चहा पिता पिता मग अक्काने प्रतिभा आणि मुलांची चौकशी केली. थोडया गप्पा झाल्या तशी अक्का म्हणाली
“तू हातपाय धुऊन पड आता जरा. प्रवासाने थकला असशील.”
सौरभची रूम वरच्या मजल्यावर वेगळी होती. खाली एक मोठी मोरी होती. तिथे बादलीत पाणी आणि तांब्या ठेवला होता. अक्काच्या घरातले अजून काहीच बदलले नव्हते. जुने घर, फरश्या, मोठ्या मोऱ्या, संडास घराच्या मागच्या बाजूला घरापासून 50 फूट दूर. आपले शहरातले घर तर किती चकचकित. चमकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र टाइल्स, एसी, अटॅच बाथरूम, महागडे नळ शॉवर… अक्का एकदोनदा आली जेमतेम पण तिच्या नजरेत कधी असुया दिसली नाही.
रात्री जेवणात अक्काने त्याला आवडेल ती भाजी केली. खाली पाटावर बसून तो बऱ्याच दिवसांनी जेवला… अगदी पोटभर. जेवण झाल्यावर सगळे अवरेपर्यंत बरीच रात्र झाली. त्याने विषय काढायचे ठरवले. त्याला उगाचच धडधडल्यासारखे झाले.
“अक्का, उद्या जायचे ना ऑफिसला? तुझी सही पाहिजे हक्कसोडपत्रावर?”
“जाऊ ना. सकाळी नाश्ता करू आणि जाऊ. तिथे वेळ लागेल का?”
“मला माहित नाही. मला तर ऑफिस कुठे तेही माहीत नाही.”
“रवीला माहीत आहे. तो सकाळी शेतावर चक्कर टाकून येईल. मग जाऊ.”
सौरभने रवीला हाक मारली.
“काय मामा?”
“अरे, सकाळी ऑफिसाला जायचे आहे ना?”
“जाऊ ना मामा. सकाळी अकरा सव्वाअकराला जाऊ. तासाभरात येऊ.”
“गर्दी असते का रे?”
“माहीत नाही. पण एक ओळखीचा क्लार्क आहे, त्याला सांगून ठेवले आहे.”
“आधारकार्ड वगैरे?”
“आहे सगळे.”
सौरभला वाटले तो पैशासंबंधी काही बोलेल. पण रवी काही बोलला नाही. उलट तो बोलला,
” मामा आता आराम कर. ”
0000
सकाळी सौरभ तसा उशिराच उठला. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली त्याले कळलेच नाही. चहा घेऊन त्याने आन्हीक आटपलं. अक्का पोहे करत होती. तो एक पाट घेऊन तिथेच स्वयंपाकघरात बसला. खरेतर अक्काला सून यायला पाहिजे होती एव्हाना. तशी ती मागे बोललीही होती. पण सौरभच्या ओळखीचे सगळे शहरातले! गावात मुलगी द्यायला कोणी तयार नाही. आपण रवीसाठी पुरेसे प्रयत्न केले नाही, असे त्याला वाटले. थोडीशी अपराधी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. तरी सहज विचारतो, असे दाखवत तो म्हणाला –
“अक्का, रवीचे काही जमले का कुठे?”
“नाही रे. इकडे गावाकडे यायला कोणी आपल्यातली मुलगी तयारच नाही. वयही वाढत चालले आहे त्याचे.”
“वासूचे कसे?”
“त्याचे लास्ट ईयर. त्याची फिकीर नाही रे. त्याचे कॉम्प्युटर इंजिनीरिंग झाले की, जॉब लगेच मिळेल त्याला. यावर्षी ते डिसिटिन्शन का काय म्हणतात, ते मिळाले त्याला.”
“हो का… छानच मग!”
अक्काने पोह्याची प्लेट त्याच्या हातात ठेवली. आणि त्याच्या शेजारीच बसली. पहिला घास सौरभने तोंडात टाकला. किंचित तिखट चव जीभ जाळत गेली, पण पोहे अप्रतिम झाले होते.
“वा अक्का मस्त.”
“पोटभर खा. ऑफिसात किती वेळ लागेल कोणास ठाऊक?”
“अक्का, तूही घे ना.”
“घेते ना. रवी आला की, सोबत घेते त्याच्या.”
अक्का आणि तोच आहे, हे बघून रवीने पुन्हा विषय काढला…
“अक्का, हक्कसोडपत्रावर सही करणार आहेस आज. तुला काय पाहिजे ते सांग.”
“काय पाहिजे म्हणजे?”
“म्हणजे पैसे वगैरे?”
“वेडा झाला का? कसले पैसे?”
“अक्का अगं….”
“मी सावत्र. तरी आईने सख्या आईसारखे प्रेम दिले. तू भाऊ म्हणून सतत येतं जात राहिला. कधी तुम्ही लोक कर्तव्याला चुकले नाही… आणि या किरकोळ गोष्टीचे पैसे मागायचे?”
हेही वाचा – कॉफीशॉप
सौरभच्या डोळ्यात पाणीच आले. अक्काचा हात धरत ती म्हणाला,
“सावत्र हा शब्दही उच्चारायचा नाही अक्का. माझी शपथ आहे तुला. अगं, जसे सीमा, रीमा तशीच तू मला.”
“सावत्र नाही म्हणतो आणि पैसे द्यायची गोष्ट करतो?”
सौरभ अक्काचे नवीनच रूप पाहत होता. खरेतर, सीमा-रिमा यांनी अक्काला पैसे घेतल्याचे कळवले नसेल अशी शक्यताच नव्हती. किमान तेवढी रक्कम तरी अक्का घेईल, असे त्याला वाटले होते. कदाचित, त्या दोघींपेक्षा अक्काची परिस्थिती थोडी कमीच असल्याने ती थोडी जास्तच आकडा सांगेल, असेच त्याला वाटत होते. पण इथे तर पूर्णपणे वेगळीच गोष्ट घडत होती. सख्या बहिणी… ज्यांची परिस्थिती सौरभपेक्षा कितीतरी चांगली होती, त्यांनाही पैशाचा मोह झालाच आणि अक्का…
सौरभने अक्काचे डोळे पुसले. “अक्का, सीमा आणि रीमा यांनीही पैसे घेतले. तुला त्यांनी फोन केलाच असेल.”
“केला ना! त्यांना कदाचित जरूरी असेल पैशाची! कदाचित, त्या मोठ्या शहरात राहत असल्याने खर्च जास्त होत असेल. आम्ही खाऊनपिऊन सुखी आहोत. शेतीत चांगले मिळते, दुकानही छान चालत त्याचे.”
“अक्का, पण त्या पैशात तू चांगले घर बांधू शकशील. वासूसाठी शहरात फ्लॅट घ्यायचा असेल, तर या पैशाने थोडा आधार मिळेल.”
“नको. जे आहे त्यात आम्ही सुखी आहोत. आणि गावातली घरं अशीच असतात. शेतीचा पसारा असतोच.”
आपले अश्रू पुसत सौरभ म्हणाला, “अक्का… खूप मोठे मन आहे तुझे.”
“तरी आपल्या आईसारखे नाहीच…” अक्का डोळे पुसत म्हणाली.


