आपल्या आत्मिक आनंदासाठी ‘हनुमान चालीसा’ गायन ही खरोखरच एक अद्भुत पर्वणी असते. गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली हनुमान चालीसा ही रोज पठण करण्याची प्रार्थना आहे. आपण ही हनुमानभक्ती हृदयातून एक-एक मोती वेचून चिंतन करूया.
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनउँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि॥
श्रीगुरूंच्या चरण कमलांच्या धुळीने आपल्या मनाच्या आरशाला स्वच्छ करून, आपण आता श्री रघुनाथांच्या, प्रभू श्रीरामांच्या त्या पवित्र आणि शौर्यसंपन्न विजयाचे चिंतन, मनन वर्णन करूया, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थाचे फळ देणारे आहे.
हनुमान चालीसा वाचताना तुलसीदासांच्या रचनेतील अफाट मानसशास्त्रीय खोली आपल्या लक्षात येईल. हनुमान चालीसाची सुरुवात ‘श्री हनुमंताच्या’ नावाने होत नाही किंवा ‘श्रीरामांच्या’ नावानेही होत नाही. ती सुरुवात होते ‘श्रीगुरूंच्या’ चरणांपासून! असे का? कारण, जोपर्यंत आपल्या जीवनात श्रीगुरूंचे मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ना प्रभू श्रीरामांची ओळख पटेल, ना श्रीहनुमंताची शक्ती समजेल! गुरू हेच ते तत्त्व आहे, जे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल.
‘निज मनु मुकुरु’ इथे तुलसीदासांनी मानवी मनाला एका ‘आरशाची’ उपमा दिली आहे. आपण आरशात पाहू, तेव्हाच आपले रूप आपल्याला दिसते. पण जर त्या आरशावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांची जाड धूळ साचली असेल, तर त्यात कोणतेही प्रतिबिंब स्पष्ट दिसणार नाही. आपले मनही अगदी असेच असते. या जगाच्या कोलाहलात आणि अनेक जन्मोजन्मीच्या प्रवासात आपल्या मनावर अहंकाराची आणि वासनांची प्रचंड धूळ साचलेली असते. हा आरसा स्वच्छ करण्यासाठी तुलसीदास कोणते रसायन वापरतात? तर ते म्हणतात, ‘श्रीगुरूंच्या चरणकमलांची धूळ!’
इथे ‘धूळ’ हा शब्द अत्यंत सूचक आहे. अध्यात्मात धूळ आणि दास हे लीनतेचे, नम्रतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून, अतिशय नम्र भावाने गुरूंच्या चरणी लीन होतो, तेव्हा ती नम्रताच आपल्या मनावरची अहंकाराची सगळी धूळ पुसून टाकते आणि मग मनाचा आरसा लख्ख स्वच्छ झाला की, त्यात साक्षात परमात्म्याचे, प्रभू श्रीरामांचे अतिशय स्पष्ट आणि विलोभनीय रूप दिसू लागेल!
हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण
एकदा मन स्वच्छ झाले आणि रामाचे कर्तव्य, विजय आणि यश आपण गाऊ लागलो, की जीवनात ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ हे चारही पुरुषार्थ अगदी सहज प्राप्त होतात. म्हणजेच, माणूस केवळ आध्यात्मिक पातळीवरच, मोक्षाची प्रगती करत नाही, तर तो व्यावहारिक जीवनातही अर्थ आणि काम या धर्माच्या मार्गाने चालत अत्यंत यशस्वी आणि तृप्त होतो.
श्रीगुरोश्चरणाम्भोज
रजोभिः शुद्धमानसः ।
वर्णयामि यशः शुभ्रं
रामस्य फलदायकम् ॥
– गीताव्रत
श्रीसद्गुरूंच्या चरण कमलांच्या धुळीने ज्याचे मन पूर्णपणे शुद्ध झाले आहे, असा मी आणि आपण सर्व, त्या फळ देणाऱ्या, चार पुरुषार्थ देणाऱ्या श्रीरामाच्या शुभ्र आणि निर्मळ यशाचे वर्णन करीत आहोत.
पहा, श्रीगुरूंच्या चरणकमलांच्या धुळीने आपण आपल्या मनाचा आरसा लख्ख स्वच्छ केला. मूर्तीच्या पायाला हात लावून पायधूळ कपाळी लावली. आणि याचक्षणी मनावरची अहंकाराची आणि वासनांची धूळ पूर्णपणे निघून गेली याची खात्री केली. आता या अत्यंत स्वच्छ आणि पवित्र झालेल्या मनाच्या आरशात आपल्याला जे पहिले आणि सर्वात विलोभनीय दर्शन घडते, ते साक्षात मारोतीरायांचे आहे.
गोस्वामी तुलसीदासजींच्या सिद्ध वाणीतून प्रकट झालेली हनुमान चालीसाची पहिली चौपाई याच मंगलमय दर्शनाने सुरू होते.
जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर…
यात हनुमंताच्या अफाट व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या अथांग सामर्थ्याचे संपूर्ण सार सामावलेले आहे. सर्वांत पहिला शब्द येतो तो ‘जय’! आपण जय हनुमान असे म्हणू, तेव्हा ती साद आणि ते स्पंदनं आपल्या आत असलेल्या एका सर्वोच्च आणि विजयी चैतन्यमयी तत्वाला जाणवतात.
हनुमंताच्या नावातच एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. हन म्हणजे नष्ट करणे आणि मान म्हणजे अहंकार. ज्याने आपला अहंकार समूळ नष्ट केला आहे, ज्याच्या ठायी ‘मी’पणाचा लवलेशही उरलेला नाही, तो महापुरुष म्हणजे हनुमान!
आपण अनेक गोष्टींचा नकळत अभिमान बाळगतो. मग तो आपल्या संपत्तीचा, आपल्या शिक्षणाचा, किंवा आपल्या अधिकाराचा, पदाचा आपल्याला सतत अहंकार वाटत असतो. पण मारोतीराया आपल्याला हेच शिकवतात की, जिथे ‘अहंकार संपतो’, तिथे खऱ्या, विजयाला आणि परमार्थाला सुरुवात होते. म्हणून जय हनुमान असे म्हणताना आपण स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवण्याचा एक अत्यंत प्रामाणिक संकल्प करत असतो.
पुढे तुलसीदासजी हनुमंताला “ज्ञान गुन सागर” असे म्हणतात. मारोतीराया हे ज्ञानाचा झरा, आणि साक्षात एक अथांग सागर आहेत. ज्ञान आणि गुण हे दोन्ही शब्द दिसायला सोपे वाटले, तरी त्यांचा अर्थ खूप व्यापक आहे. ज्ञान म्हणजे, आत्मतत्वाची खरी ओळख! शाश्वत काय आणि नश्वर काय याचा विवेक म्हणजे ज्ञान!
हनुमंताकडे हे सर्वोच्च ज्ञान आहे, कारण ते साक्षात ज्ञानभास्कर सूर्याचे शिष्य आहेत. पण अनेकदा असे होते की, एखाद्या व्यक्तीकडे खूप ज्ञान असते, पण त्याच्यात सौजन्य, नम्रता, करुणा यासारखे गुण नसतात. कोरडे ज्ञान माणसाला अत्यंत अहंकारी बनवू शकते. याउलट काही लोकांकडे खूप चांगले गुण असतात, ते स्वभावाने खूप गोड असतात, पण त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य याचा निर्णय घेण्याचे ज्ञान किंवा प्रगल्भता नसते.
हनुमंताचे व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टींचा एक अत्यंत परिपूर्ण संगम आहे. त्यांच्याकडे वेदोपनिषदांचे आणि शास्त्रांचे अफाट ज्ञान आहे आणि त्याच वेळी त्यांच्याकडे सेवा, भक्ती, नम्रता आणि शौर्य यांसारखे सर्वोच्च गुणही आहेत. ते खऱ्या अर्थाने ज्ञानाचे आणि गुणांचे सागर आहेत. सागराची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असतात. वीर हनुमंत सागरासारखे बाहेरून कितीही खवळलेले आणि रौद्र दिसत असले तरी आतून ते अत्यंत शांत, संयमी आणि गंभीर असतात. तसेच, ते स्वतःची मर्यादा कधीही ओलांडत नाहीत. हनुमंताची बुद्धी, शक्ती त्यांचे चारित्र्य आणि मन अगदी याच सागरासारखे अथांग, खोल आणि अत्यंत मर्यादाशील आहे. त्यांच्या अफाट सामर्थ्याला भक्तीची अत्यंत सुंदर किनार लाभलेली आहे.
यानंतरची ओळ, ‘जय कपीस तिहुँ लोक उजागर’ कपीस म्हणजे वानरांचा स्वामी किंवा वानरांचा राजा! हनुमंताला इथे वानरांचा स्वामी म्हटले आहे. यामागे अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर अर्थ दडलेला आहे. आपल्या अध्यात्माने मानवी मनाला एका चंचल वानराची उपमा दिलेली आहे. आपले मन एका विचारावरून दुसऱ्या विचारावर सतत उड्या मारत असते. ते क्षणभरही एका जागी शांत बसत नाही. अशा या अत्यंत चंचल आणि अस्थिर मनावर जो पूर्णपणे नियंत्रण मिळवतो, तोच खरा कपीस असतो. हनुमंताने आपल्या सर्व इंद्रियांवर आणि आपल्या चंचल मनावर पूर्ण विजय मिळवला आहे. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कपीस आहेत. आपण जेव्हा त्यांना शरण जातो, तेव्हा आपणही आपल्या या वानरासारख्या चंचल मनाला शांत करण्यासाठी आणि त्याला एका उदात्त ध्येयाकडे वळवण्यासाठी त्यांच्याकडे शक्ती मागत असतो.
तिहुँ लोक उजागर म्हणजे तिन्ही लोकांना प्रकाशित करणारे असे हनुमंत! स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे ते तीन लोक! आपले शारीरिक जीवन, मानसिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे मानव धर्मासाठीचे तीन लोक! जेव्हा आपण महावीर हनुमंतांची खऱ्या मनाने भक्ती करू, तेव्हा आपल्या या तिन्ही लोकांमध्ये एक अत्यंत मंगलमय प्रकाश पडतो. शारीरिक पातळीवर आपल्याला संकटांशी लढण्याचे बळ मिळते आणि आपले आरोग्य उत्तम राहते. मानसिक पातळीवर आपल्या मनातील सर्व भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर होऊन तिथे अढळ आत्मविश्वास निर्माण होतो आणि आध्यात्मिक पातळीवर आपल्याला आपल्यातल्या खऱ्या भक्तीमय, श्रद्धासंपन्न स्वरूपाची ओळख होऊन परमेश्वराची प्राप्ती होते.
मारोतीरायांचे चरित्र इतके तेजस्वी, तपस्वी आहे की, त्यांच्या केवळ नामस्मरणाने आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा आणि दुःखाचा अंधार कायमचा नाहीसा होतो आणि तिथे ज्ञानाचा, गुणांचा आणि भक्तीचा अत्यंत लख्ख प्रकाश पडतो. आपण अनेकदा खूप गोंधळून जातो. काय करावे आणि काय करू नये, हे अनेकदा समजत नाही. अशा वेळी ‘ज्ञान गुन सागर’ असलेला हा कपीस आपल्याला अचूक रस्ता दाखवेल.
हेही वाचा – सगुण साकार उपासना
बाह्य जगात मिळवलेले यश हे कौतुकास्पद असेलही पण अंतरंगात आपले गुण विकसित करणे आणि ज्ञानाची उपासना करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी, नि:स्वार्थपणे सेवा करण्यासाठी आपल्याला ज्या उर्जेची आणि ज्या प्रेरणेची गरज असते, ती सर्व प्रेरणा या एकाच चौपाईमध्ये सामावलेली आहे. आपण आपले प्रत्येक काम करताना जर या सागराचे स्मरण केले, तर आपल्याही कामात एक प्रकारची अथांगता आणि पूर्णता, शक्तीचा अनुभव नक्कीच येईल.
आपण चिंतन, ज्ञान, गुण आणि प्रकाशाची प्रार्थना करावी.
ज्ञानस्य सद्गुणानां च
सागरं मारुतात्मजम् ।
त्रैलोक्यं भासते येन
तं नमामः कपीश्वरम् ॥
– गीताव्रत
जो ज्ञानाचा आणि सद्गुणांचा अथांग सागर आहे, अशा त्या पवनपुत्राला आपण सर्वजण अत्यंत विनम्र होऊन वंदन करूया! ज्यांच्या अत्यंत प्रखर तेजाने आणि दिव्य सामर्थ्याने हे तिन्ही लोक नेहमी प्रकाशित आणि मंगलमय होतात, अशा त्या वानरांच्या स्वामीला, कपीश्वराला आपण अत्यंत भावपूर्ण नमस्कार करूया!
खरोखरच या एकाच चौपाईमध्ये साक्षात हनुमंत आपल्यासमोर उभे राहतात आणि त्यांच्या त्या प्रसन्न दर्शनाने आपले संपूर्ण जीवन एका वेगळ्याच आणि अत्यंत सुंदर प्रकाशाने उजळून निघते. आपण सर्वांनी या प्रकाशाचे पाईक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू!


