नीलिमा कदम जांगडा
आपल्या मराठी ‘गाण्यांच्या भेंड्यां’ना हिंदीत ‘अंताक्षरी’ म्हणतात, हे खूप उशिरा म्हणजे, टीव्हीवर ‘अंताक्षरी’ कार्यक्रम सुरू झाला तेव्हा कळलं. पण आमच्या लहानपणी गाण्यांच्या भेंड्या खेळणं हा मोठा आनंदाचा भाग होता. खूप मुलामुलींचं कोंडाळं असायचं. मैदानी खेळ खेळण्याची एकतर वेळ नसायची किंवा मूड नसायचा, अशा वेळेस गाण्यांच्या भेंड्या रंगायच्या. दोन गट पाडले जायचे. कधी मुलं विरुद्ध मुली तर कधी गटांत अर्धी मुलं, अर्ध्या मुली अशी विभागणी असायची.
गाण्याच्या भेंड्या खेळण्यासाठी आवाज गोड असण्याची अट नसायची. सुरुवातीला पट्कन गाणी सुचायची. तासभर झाला की स्मरणशक्तीला ताण द्यायला लागायचा. काही काही गाणी तर नेहमीचेच यशस्वी कलाकार या पद्धतीची म्हणजे ‘न’ आला की ‘नाना करते प्यार…’ आणि ‘नैना बरसे…’ ही गाणी आपसूकच ओठावर यायची. ‘छ’ आला की ‘छलिया मेरा नाम…’, ‘ड’वरून ‘डम डम डिगा डिगा…’, ‘ठ’वरून ‘ठंडे ठंडे पानी से…’ ही गाणी ठरलेली!
ख झ ठ भ अक्षरं आली की, मग खूप विचार करायला लागायचा. मी ‘ख’वरून ‘खिलौना जानकर तुम तो मेरा दिल तोड जाते हो…’, ‘झ’वरून ‘झिलमिल सितारों का आंगन होगा…’ ही गाणी अगदी लक्षात ठेवायची. पण तीच अक्षरं परत आली की मग काय? पण आपल्या गटात खूप हुशार मुलं, मुली असायची त्यांना काही ना काही सुचायचंच.
सहलीला गेल्यावर, एन.सी.सी. कॅम्पच्या वेळेस गाण्यांच्या भेंड्या खेळणं कम्पल्सरी असायचं. तेव्हा शिक्षकही सामिल व्हायचे. वेगळीच मजा यायची. मी आठवीत असताना आमची आर.एम. भट शाळेची सहल गेली होती. आमच्या ग्रुपवर ‘ठ’ आला… कोणालाच काही सुचत नव्हतं. (तेव्हा ‘ठंडे ठंडे पानी से…’ हे गाणं आलं नव्हतं.) तेव्हा आमच्या वर्गशिक्षिका सोलाय मॅडम यांनी ‘ठुमक ठुमक मत चलो…’ हे जुनं गाणं म्हटलं आणि आमच्या गटाला भेंडी चढण्यापासून वाचवलं. लगेचच मी माझ्या सवयीप्रमाणे ‘ठ’वरचं हे गाणं मुद्दाम लक्षात ठेवलं.
हेही वाचा – स्मृतीगंध… गाण्यांची वही
भेंड्या खेळताना काही गाण्यांवरून भांडणंही व्हायची. जसं कोणी ‘थ’ आला की, ‘थंडे थंडे पानी से…’ सुरू करायचा. मग ते गाणं ‘थ’वरून आहे की, ‘ठ’वरून यावर दोन्ही गट हिरीरीने वाद घालायचे. तसंच काही गाण्यांची सुरवात आ आ… किंवा ला ला… अशी व्हायची आणि मग मुख्य गाण्याचे बोल यायचे! अशावेळेस तर मोठा वाद व्हायचा. ‘अ’ किंवा ‘ल’ अक्षर ग्राह्य धरायचं की, गाण्याच्या बोलाचं पहिलं अक्षरं! तुंबळ युद्ध सुरू व्हायचं. अशा वेळेस सगळ्यातला जो कोणी मोठा मुलगा किंवा मुलगी असेल तो किंवा ती फैसला करायचे.
अनेकदा विरुद्ध गटात मुलाला आवडणारी एखादी मुलगी असेल की, भेंड्या जरा जास्तच रंगायच्या! कारण इतक्या उघडपणे आपल्या भावना व्यक्त करायची ही संधी असायची… इतर कोणाला जरी हे कळलं नाही, तरी जिच्यासाठी हे गाणं म्हटलं गेलंय तिला इशारों इशारों में हे लगेच समजायचं. गाण्यांच्या भेंड्यांचं हे ‘द्विभाषिक सूत्र’ होतं. मराठी, हिंदी दोन्ही भाषांतील गाणी गायली जायची. आपल्याकडे गाण्यांचा न संपणारा खजिना आहे… फक्त ती वेळेवर आठवणं हेच मोठं कौशल्य!
गाण्यांच्या भेंड्याची एक आठवण आहे. 2005 सालचा जुलै महिना. त्या दिवशी मुंबईत झालेला प्रलय कोणीही मुंबईकर विसरू शकणार नाही. मी ‘लोकमत’च्या चिंचपोकळी इथल्या ऑफिसमध्ये कामात व्यग्र होते. कामाच्या नादात काही समजलं नव्हतं. बाहेर फिल्डवर असलेल्या पत्रकारांमुळे आणि टीव्हीवरच्या बातम्यांमुळे गांभीर्य लक्षात आलं. तेव्हा लॅण्डलाइन फोन वापरले जात होते. माझी तिघं लहान मुलं शेजाऱ्यांच्या घरी बसली होती. सुरक्षित होती. मी ऑफिसमध्ये आणि ‘अहो’ पण सकाळीच कामासाठी बाहेर पडलेले. घरी परतण्याची शक्यता मावळलेली. थोडी चिंता वाटत असतानाच फोन बंद पडले. अवघी मुंबई ठप्प झाली…
हेही वाचा – Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!
पेपर छापून येण्याची शक्यताही नव्हती. रात्री बारा वाजता ऑफिसच्या रिसेप्शन समोरच्या मोकळ्या जागेत जिथे व्हिजिटरना बसायच्या खुर्च्या होत्या. तिथे सगळे जमलो. मी आणि मेघना ढोके आम्ही दोघीच महिला आणि इतर पुरुष स्टाफ होता. वरिष्ठांपैकी नंदकुमार टेणी सर (आता हयात नाहीत) होते. संपूर्ण रात्र काढायची होती. मग काय गाण्यांच्या भेंड्यानी आमचं टेन्शन कमी केलं. दोन गट केले आणि भेंड्या सुरू झाल्या. पहाटे पाच-सहा वाजेपर्यंत आम्ही भेंड्या खेळलो. मला वाटतं हा विक्रमच असावा!
एरव्ही आम्हाला कडक वाटणाऱ्या आमच्या टेणी सरांनी खूप चांगली चांगली गाणी म्हटली. शेवटी आम्हाला माहीत असलेली गाणीचं संपत आली. टेणी सर माझ्याविरुद्ध गटात होते. ‘ल’ अक्षर आलं होतं. जवळ जवळ सगळी लोकप्रिय गाणी म्हणून झाली होती. कोणालाच गाणं सुचत नव्हतं. अचानक टेणी सरांनी ‘लवथवती विक्राळा…’ ही आरती सुरू केली. सर्वांनी आरडाओरडा केला, पण आमच्या गटातल्यांनाही कोणाला गाणं येत नसल्याने आम्ही भेंड्यामध्ये आरतीला मान्यता दिली आणि उभयपक्षी तह होऊन भेंड्यांचा कार्यक्रम संपवला…
गाण्यांच्या भेंड्यांच्या खूप छान छान आठवणी आहेत. आता आश्चर्य वाटतं, किती गाणी आपल्या लक्षात रहात होती. आता तर ‘गूगल बाबा’ आल्याने नुसतं अक्षर टाइप करायची खोटी की, त्या अक्षराच्या गाण्यांची यादीच समोर येते. लक्षात ठेवायची, मेंदूला ताण द्यायची गरजच नाही.
आताची मुलं, मुली गाण्यांच्या भेंड्या खेळतात का माहिती नाही!


