साईनाथ नाट्यमंडळाने संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटक सादर केलं. नाट्यमंडळाचा दिग्दर्शक सुदर्शन याने देवव्रत भूमिका साकारली. तर, ज्योतीने सत्यववती, अरुणने चंडोलच, मनोजने पराशरची भूमिका केली. विशेष म्हणजे, स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा या नाट्यमंडळाचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा ‘मत्स्यगंधा’ हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते. आधी साईनाथ नाट्यमंडळाचे नाटक झाले आणि नंतर नटराज ग्रुपचे होणार होते. प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूष नव्हता.
नटराज नाट्य ग्रुपचा ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग होणार होता, त्याला जायचे ठरले होते. त्यानुसार ही मंडळी पुन्हा जमा झाली एक ट्रॅव्हलर घेऊन तिथे गेली. सुदर्शन आणि बाकी ग्रुपमधील इतर मंडळी आत गेली, नटराजच्या ग्रुपला भेटायला. अनिल जो नाटकात देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता, तो मेकअप करून तयार होता. त्याने सुदर्शन, ज्योती यांना पाहिले आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मारली.
सुदर्शन – अन्या, जाडा झालास की रे, व्यायाम करत नाहीस काय?
अनिल – नाही रे, वेळच मिळत नाही, चालणं पण होत नाही.
ज्योती – अनिल, तुझी तब्येत बरी नाही की काय, धापा टाकतोस..
अनिल – हो ग, आज थकवा आलाय, प्रयोग झाला की उद्या डॉक्टरला तब्येत दाखवतो.
सुदर्शन – हो बाबा, रोज चालणं महत्वाचे आहेच आणि तपासून घे बऱ्या डॉक्टरकडून.
सर्वाना प्रयोगासाठी शुभेच्छा देऊन सुदर्शन आणि ग्रुपची लोकं बाहेर आली. तोपर्यंत नाटकाची पहिली घंटा झाली होती. दुसरी घंटा वाजली आणि सुदर्शन, ज्योती, मनोज, अरुणा आत जाऊन आपापल्या खुर्चीवर बसली. परीक्षक स्थानापन्न झाले, संगीत साथ करणारे, प्रकाश योजना करणारा आपआपल्या जागेवर बसले आणि तिसरी घंटा दिली गेली, मग पात्रपरिचय आणि नाटक सुरू झाले.
हेही वाचा – रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!
संगीत नाट्यस्पर्धेतील आठवा दिवस… आज आठव्या दिवशी नटराज ग्रुपचे नाटक ‘संगीत मत्स्यगंधा’ सुरू झाले. तिसऱ्या दिवशी एवढी गर्दी नव्हती, कारण स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती, जसजशी स्पर्धा पुढे सरकत होती, तसतशी गर्दी वाढत होती आणि आज शनिवार असल्यामुळे असेल, नाटकाला सातशेहून जास्त प्रेक्षक हजर होते. एवढे प्रेक्षक तिकीट घेऊन नाटकाला आले म्हणून नटराज ग्रुपची सदस्य खूश होते.
नाटक सुरू झाले… सत्यवती झालेली तन्वी आणि भिवर यांचा प्रवेश सुरू झाला, मग पराशर आणि सत्यवती यांची सदाबहार गाणी, त्या गाण्यांनी प्रेक्षक खूश झाले, ‘वन्स मोअर’ मिळत गेले.
दुसऱ्या प्रवेशात राजा शंतनू आणि सत्यवती यांची भेट, शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडणं, तिच्यासाठी झुरणं, आणि मग प्रवेश झाला देवव्रताचा… सुदर्शन आणि ग्रुप सरसावून बसला. देवव्रत स्टेजवर किती आत्मविश्वासाने बोलतो, यावर नाटकाचा कस लागणार होता… कारण, वाचिक अभिनयाची, मोठ्या दर्जाची, तिथे गरज होती.
देवव्रताच्या भूमिकेत अनिलने प्रवेश केला, त्याचे पहिलेच वाक्य –
“भिवरा, तुझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजासाठी मागणी घालायला आलो आहे.”
खरेतर, ते देवव्रतासाठी महत्त्वाचे वाक्य. पण अनिलने मुळमुळीत म्हटले. संवाद सुरू होते, सत्यवती आणि देवव्रत यांची संवादाची आतषबाजी व्हायला हवी होती, पण अनिलची तब्येत बरी नसावी कदाचित, तो फिका पडत होता आणि तन्वी प्रभावी होत होती…
प्रेक्षकात बसलेली अरुणा सुदर्शनाच्या कानात म्हणाली “आज अन्या मूडमध्ये नाही, कमी पडतोय. तुझा देवव्रत किती तरी श्रेष्ठ होता.”
दुसरा अंक संपला आणि पडदा पडला. इकडे देवव्रत झालेला अनिल आत गेला तो घामाघूम झाला. त्याच्या पाठीतून कळा यायला लागल्या. डावा हात दुखू लागला. छाती जड झाली. छाती धरून अनिल टेबलावर झोपला आणि कण्हू लागला. त्याच्याकडे सर्व मंडळी धावली. अजितच्या लक्षात आले, बहुतेक हार्ट अटॅक येतो आहे… तो धावत स्टेजवर गेला आणि प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब आत येण्याची विनंती केली.
संगीत नाटक म्हणून डॉ. विभुते बायकोसह आले होते. त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते त्वरित आत आले. त्यांनी टेबलावर विव्हळणाऱ्या अनिलला पाहिले, त्याची नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात आले, हार्ट अटॅक आला आहे, याला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहें.
डॉक्टरनी त्यांच्या पाकिटातील सोरबिट्रेटची गोळी अनिलच्या जिभेखाली ठेवली आणि धावत आपली गाडी आणायला गेले. तोपर्यंत बाकी नाटक मंडळी त्याला वारा घालत होती. घाम पुसत होती. छातीवर बुक्के मारून प्रथमोपचार करत होती.
सुदर्शनने बाहेर स्टेजवरील डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि तो पण आत आला. अनिलची परिस्थिती त्याने पाहिली, त्याला आठवले, नाटक सुरू व्हायच्या आधी आपल्या आणि ज्योतीच्या लक्षात आले होते, आज अन्याची तब्येत बरी दिसत नाही, त्याला श्वास लागत होता, म्हणून!
डॉ. विभुते यांनी सोरबिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवली असेल म्हणून कदाचित, अनिलच्या छातीत दुखणे थोडे कमी झाले, घाम थांबला. डॉक्टरांनी दोघांच्या मदतीने अन्याला गाडीत घेतले आणि ते अजितला म्हणाले “आता काळजी करू नका, मी डॉ. भागवत हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करतोय. हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरू ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्यासोबत राहतील.”
डॉक्टरांची गाडी अनिलला घेऊन गेली, आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका केलेल्या नटाला हार्टअटॅक आला, ही बातमी समजली, ते पण स्पर्धक काय पुढे सांगतात, हे पहाण्यासाठी थांबले.
प्रेक्षकांना पण हळूहळू हे कळले, काही प्रेक्षक आत भेटायला आले… काही म्हणाले, “आता त्यांची तब्येत बरी होईल म्हणाले ना डॉक्टर, मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरू करा, आम्हाला नाटक पाहायचे आहे, पुढील अंकातील गाणी ऐकायची आहेत.”
काही प्रेक्षक बोंबाबोंब करत म्हणाले “आम्ही तिकीट काढलंय की राव, आमास्नी नाटक बघायचं हाय.”
काय करावे अजितला सुचेना. आता आयत्यावेळी देवव्रतासारखी महत्त्वाची भूमिका कोण करेल? एवढ्यात सत्यवती झालेली तन्वी अजितकडे आली “अजित, सुदर्शन आलेला आहे ना, त्याने यावर्षी देवव्रताची भूमिका केली आहें, त्याला गळ घाल, तो नाही म्हणणार नाही.”
अजितच्या लक्षात आले, “होय, सुदर्शन देवव्रत करू शकेल, तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की! नाटक पुढे चालू राहील, प्रेक्षक नाराज होणार नाहीत.” तेथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला, “सुदर्शन, नाटक रद्द करावे लागता कामा नये. कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल.”
“होय खरे आहे, पण आता काय करणार?”
“तूच करू शकतोस सुदर्शन, तूच करू शकतोस, तू येथून पुढील देवव्रताचा रोल करायचा, नाही म्हणू नकोस दोस्ता, स्पर्धेत पहिला-दुसरा नंबर मिळवायचा म्हणून नव्हे, हे मायबाप प्रेक्षक तिकीट काढून आलेत, त्यांना पुढील नाटक पाहायचे आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी…”
सुदर्शन भांबावला, असे कधी या आधी झाले नसेल, आपण ते करावे काय?
हेही वाचा – पाप आणि पुण्य
तो आपल्या सोबत्याकडे धावला. त्यांना पण अजितचा प्रस्ताव आश्चर्यकारक वाटला आणि नटराज ग्रुप त्यांचा प्रतिस्पर्धीही होता, गेल्या कित्येक वर्षांचा. ज्योती म्हणाली “सुदर्शन, तू आत्ता काम करावंसं, नाटक थांबता कामा नये, नटराज ग्रुप आपला प्रतिस्पर्धी असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत. तू हो म्हण.”
मग सर्वच सोबती नाटक करावं असं म्हणू लागले आणि सुदर्शन भूमिका करायला तयार झाला.
सुदर्शन देवव्रत म्हणजेच भीष्माचा पुढचा भाग करणार, हे निश्चित झाल्यावर अजितने परीक्षकांना त्याची कल्पना दिली. ते म्हणाले “नाटक थांबवू नका, आम्ही सरकारला या नाटकादरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालत कळविणार आहोत… स्पर्धेसाठी नाटक पूर्ण होणे चांगले”.
तोपर्यंत बऱ्याच प्रेक्षकांना दुसरा नट देवव्रताची भूमिका करणार हे कळले होते. जे नवखे होते, ते म्हणत होते, हा आयत्यावेळी काय करेल? प्रॉम्प्टिंगवर बोलेल, दहा मिनिटं बघू नाहीतर सटकू..
पण काही नेहमी स्पर्धेची नाटके पाहणारे त्या शहरातील सुज्ञ प्रेक्षक होते त्यांना, प्रतिस्पर्धी ग्रुपमधील कलाकार आयत्या वेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून, भूमिका पुढे न्यायला तयार झाला, याचे कौतुक वाटत होते. आता सुदर्शन या दुसऱ्या ग्रुपमध्ये कशी भूमिका करतो, याचे पण कुतूहल वाटत होते.
आतमध्ये सुदर्शन मेकअपला बसला. मनातल्या मनात देवव्रताचे संवाद आठवू लागला. या ग्रुपमधील इतर साथीदार डोळ्यांसमोर आणू लागला. आज आपली परीक्षा आहे, हे त्याने जाणले. त्याने मनातल्या मनात आई-वडिलांना नमस्कार केला, ‘आज मला यश द्या’, असं मनात म्हणत राहिला.
सुदर्शनने देवव्रताची वेशभूषा केली आणि तो स्टेजवरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला. त्याचे जास्त संवाद तन्वी म्हणजेच सत्यवतीसोबत आणि चंडोल झालेल्या मोहनसोबत होते. सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली गेली… पडदा उघडला.
तिसऱ्या अंकातले सत्यवती आणि भिवरामधील संवाद सुरू होते, तेव्हा पाठीमागच्या विंगेत सुदर्शन आपल्या एन्ट्रीसाठी श्वास रोखून तयार होता. त्याचा सेनापती सत्यवतीला “राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत, यावर भिवर काही म्हणणार एवढ्यात देवव्रत प्रवेश करत म्हणतो, “देवव्रताच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो.”
सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारदार वाक्य ऐकून शिरशिरी आली, अनिल या भूमिकेत असे वाक्य एवढ्या परिणामकरक कधीच म्हणत नसे… आणि मग सुरू झाली देवव्रतची पल्लेदार वाक्ये…. कानेटकरांनी एवढी जबरदस्त वाक्ये देवव्रतला लिहिली आहेत, ती उच्चारता येणे साध्या नटाचे काम नव्हे!
एकापाठोपाठ एक शब्दसरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक ओलेचिंब होत होते. स्टेजवरील आणि विंगेत राहून पाहाणारे इतर कलावंत सुदर्शनाच्या या अनोख्या भीष्मदर्शनाने आश्चर्यचकित झाले होते. आज स्वतः सुदर्शन खूश होता, त्या दिवशी तो मूडमध्ये आला नव्हता, पण मोठी जबाबदारी पडली. त्याने त्याच्यातल्या कलाकाराला चॅलेंज दिले होते. तो एका पाठोपाठ एक संवादाच्या फैरी झाडत होता…
शेवटी लावण्यवती अंबा, भीष्म तिचा स्वीकार करत नाही म्हणून धिक्कार करते, आणि त्याचे त्याच्या आप्तेष्टांसमोर सैरावैरा धावताना मरण येईल, असा शाप मागते आणि भीष्म तो देतो… पडदा पडला, प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत होते.
आज काहीतरी विलक्षण पाहिले, असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटले, आयत्या वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केला असताना, शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचीवर नेला, असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असेल.
नटराज नाट्यग्रुपचे सर्व कलाकार सुदर्शनला मिठी मारून रडत होते. आज शेवटी रंगभूमी जिकंली होती… Show must go on म्हणजे काय ते आज नाट्यरासिकांना कळलं.
सुदर्शनचे नेहमीचे साथीदार पण नाटक पाहात होते, आजची सुदर्शनची भीष्माची भूमिका पाहून ते पण भारावले होते. त्यांचे कंठ दाटून आले होते.
दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेत घडलेली घटना म्हणजे रंगभूमीवर पहिलीच, असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक ग्रुपमध्ये नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका फारच उच्च अभिनीत केली, म्हणून कौतुक झाले.
नाटक मधेच सोडून हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अनिलची एंजिओप्लास्टी झाली, हे सुदर्शनला समजले… आठ दिवसानंतर तो अनिलला भेटायला गेला, तेव्हा अनिल त्याचा हात पकडून सद्गदित स्वरात म्हणाला,
“दोस्ता, माझ्यासाठी जे केलंस ते अमूल्य आहे.”
त्याचा हात थोपटत सुदर्शन म्हणाला “दोस्ता, मी तुझ्यासाठी नाही केलं, केलं ते त्या रंगभूमीसाठी, ती आहे म्हणून आपण आहोत.”
“होय दोस्ता, रंगभूमी आहे म्हणूनच आपण आहोत.”


