भाग – 31
“मी माधवला म्हणाले खरी की, मी शर्वायशी बोलेन… पण अजूनपर्यंत मला त्याच्याशी बोलायला जमलं नाही… आणि तुम्हीही टूरवर गेला होता…”
आनंदीला शर्वायच्या लग्नाची कल्पनाच सुखावणारी वाटली. ती कल्पनेत हरवली — आपली सून, घरात लगबग, आनंदी क्षण… तिच्या डोळ्यांत चमक दिसू लागली… दिवाकर ते शांतपणे पाहात होते…
मात्र आनंदीचे समर्थन मिळवणाऱ्या माधवचा आत्मविश्वास वाढला होता. तो स्वतःशीच म्हणाला… “आराध्या आणि शर्वायच्या नात्यात फूट पाडण्यासाठी पहिली चाल यशस्वी ठरतेय. आता फक्त शर्वायचं मन वळवायचं आहे!”
आनंदीचं बोलणं ऐकून दिवाकर थोडे गोंधळले. पण आनंदीच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्सुकता दिसून येत होती. ती आराध्याबाबत फारसे काही म्हणत नाही, उलट माधवने दाखवलेल्या दुसऱ्या स्थळाच्या फोटोंकडे तिचं अधिक लक्ष आहे.
आनंदी म्हणाली, “हो आराध्या गोड आहे, पण आपल्या घरासाठी, आपल्या शर्वायसाठी थोडं ‘सामाजिकदृष्ट्या’ साजेसं स्थळ असायला हवं ना?”
दिवाकर थोडं चिडूनच म्हणाले, “काय म्हणतेस तू? ती अतिशय सुसंस्कृत आहे. आईलाही ती पसंत आहे. दादांनी ही तिला आशीर्वाद दिला आहे…”
हेही वाचा – शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…
आनंदी थोडं टाळून… “ठीक आहे, मी फक्त म्हणतेय… तुम्ही शांत व्हा… पण माधवने दाखवलेली ती मुलगी पाहिलीत का? खरंच खूप उच्चभ्रू कुटुंबातून आहे.”
हे ऐकत असलेला माधव आतल्या आत खूश होत होता. आनंदीच्या मनात शंका आणि तुलना याचं बीज त्याने पेरलं आणि ते रुजायला सुरुवात झाली होती.
माधव हसत म्हणाला, “मी काय फक्त पर्याय सांगतोय, शेवटी निर्णय तर तुमचाच! पण घरासाठी, प्रतिष्ठेसाठी काय योग्य हे बघावंच लागतं ना?”
आनंदी गंभीर होत म्हणाली, “अगदी बरोबर म्हणतोस. आणि शर्वायने काही फार पुढे नको जायला आराध्याबाबत, मग आपल्यालाच विचार करावा लागेल.”
दिवाकर स्वतःशीच… ‘माधवचे डावपेच काहीतरी वेगळंच सुचवतायत. मला आईशी बोलायलाच हवं…’
सुमित्रा आजीही सर्व जाणून होत्या. त्या आनंदीच्या शब्दांमागचे हलकेसे टोमणे ओळखतात. काही निर्णय घेण्यापूर्वी त्या आराध्याला अजून जवळून समजून घेण्याचा आग्रह धरतात. शर्वायला आपल्या आई आणि वडिलांच्यात झालेल्या चर्चेची माहिती समजते…
शर्वाय ही शांत स्वभाव असलेली एक अत्यंत सावध, योजनाबद्ध आणि पुढची तीन पावलं आधीचा विचार करणारी व्यक्ती आहे. त्याने आपल्या विश्वासू माणसांपैकी लक्ष्मणला लक्ष ठेवून राहायला सांगितलं होतं…. अगदी घरातील नोकरांच्या किंवा नातेवाईकांपैकी कुणाच्याही माध्यमातून बारीक-सारीक माहिती काढून घेण्याचं काम तो करत होता.
0000
संध्याकाळी, ऑफिसमध्ये एकांतात असताना शर्वायच्या खास मोबाइलवर मेसेज आला…
“दिवाकर आणि आनंदीच्या बोलण्यात आराध्या सोडून, दुसरं स्थळ आणि माधवचा हस्तक्षेप सुरू आहे.”
शर्वाय क्षणभर थांबला. मोबाइलच्या स्क्रीनकडे बघत. मग खुर्चीतच सरळ होत त्याने अंग ताणलं. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही संताप दिसत नव्हता – पण डोक्यात डावपेच सुरू आहेत, हे त्याच्या नजरेतून जाणवत होतं.
“माझा अंदाज चुकीचा नव्हता… माधव काही तरी मोठा खेळ खेळतोय आणि आईला त्यात खेचतोय. पण आराध्या… ती सगळ्यांच्या नजरेतून वेगळी आहे. तिला असं मधेच गमावणं मला मंजूर नाही. जर तिच्या मनात काही संकोच असेल, तर तो नाहीसा करणं हे माझं कर्तव्य आहे.”
तो दत्ताला बोलावतो आणि सखोल माहिती गोळा करण्याचा आदेश देतो –
“माधवने नेमकं कोणतं स्थळ दाखवलं? आईचं मन कुणी कसं वळवलं? आणि आराध्याचा सध्याची मानसिक अवस्था कशी आहे?”
तो ऑफिसमध्ये आराध्यासोबत अधिक वेळ घालवू लागतो — फॉर्मल निमित्तं तयार करून तो तिला केबिनमध्ये बोलवून घेऊ लागला. तिच्यावर दबाव न येता, तिचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तिचा आत्मविश्वास ढळू नये म्हणून तिच्या कामाचं सार्वजनिक कौतुकही करू लागला.
शर्वाय एका खासगी हॉलमध्ये एकटाच उभा होता… खिडकीबाहेरचा शहराचा रात्रीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर येत होता… त्याच्या हातात आराध्याचा ट्रेनिंग रिपोर्ट होता.
तो अलगद हसतो…
“आराध्या, तू मला समजतेयस का? माझ्या शब्दांशिवायही?”
मग तो फोन उचलतो आणि फक्त एक वाक्य लिहितो,
“मी स्वतः पुढे सरकणार आहे; या खेळात मी मागे राहणार नाही.”
शर्वाय आराध्याच्या जवळ हळूवारपणे, विश्वासाच्या एक एक पायऱ्या चढत पुढे सरकू लागला.
ऑफिसमध्ये दिवसाच्या शेवटी सगळे कर्मचारी निघून गेलेले असताना आराध्या काही कागदपत्रं नीट लावत होती. शर्वाय थोडा वेळ लांबूनच तिच्या कामाकडे बघत होता… न राहून शेवटी तो पुढे आला.
शर्वाय : तू फार बारकाईने काम करतेस… कधी थकत नाहीस का?
आराध्या हसत : थकते ना… पण काहीतरी सिद्ध करायचंय आहे. मग मन लावून काम करायलाच हवं.
शर्वाय : स्वतःसाठी की, कुणाला दाखवण्यासाठी?
ती काहीच बोलली नाही. पण त्याचा प्रश्न तिच्या मनाला स्पर्शून गेला…
ऑफिसमधून निघताना पाऊस अचानक सुरू होतो. पावसाचे दिवस नसल्याने आराध्याकडे छत्री नव्हती… त्यामुळे ती स्टील्टमध्ये उभी राहून पाऊस कमी होण्याची वाट पाहात होती. गेट बाहेर पडल्याशिवाय ऑटो मिळणं कठीण होतं. तितक्यात तिच्या शेजारी शर्वाय येऊन उभा राहिला. आपल्या हातातल्या छत्रीकडे खुणावत आपल्या छत्रीतून यायला तिला सुचवतो… दोघंही स्टील्टमधून बाहेर पडले होते, तोच त्याच्या हातातल्या मोबाइलची ट्यून वाजली…
“गाडी पंक्चर झाली… दुसरी कार घेऊन ड्रायव्हर येत आहे,” असा मेसेज त्याच्या मोबाइलवर झळकला.
मनातून नाराज झालेला तो आपली नाराजी लपवत तिला म्हणाला… “हे पाणी… फारसं बरं वाटत नाही ना तुला?”
आराध्या हसली, म्हणाली… “हो, भिजल्यावर सर्दी लगेच होते मला.”
शर्वाय म्हणाला, “मग आपण उगाच धावपळ करायची नाही… गाडी थोड्या वेळात येईलच.”
तिच्या हातातली फाइल काढून घेत स्वतःकडे ठेवत तो म्हणतो, “आता भिजणं फक्त माझ्यावर असू दे.”
आराध्या त्याच्याकडे बघते… आपल्या हातातली छत्री त्याने पूर्णपणे तिच्यावर धरली होती आणि स्वतः मात्र फाइलचा आडोसा घेऊन उभा होता…
शर्वायला असं पाहून, मनातल्या मनात त्याच्या हळव्या संवेदना लक्षात घेता तिला आश्चर्य वाटते.
दुसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकमध्ये ऑफिसमधल्या गोंधळात आराध्या एकटीच बसलेली असते… आज निघायला उशीर झाल्याने ती टिफिनशिवायच ऑफिसला आली होती.
तिचं असं लंचशिवाय बसून राहणं पाहून शर्वाय आपल्या केबिनमधून बाहेर आला, तिला पाहिलं आणि काही न बोलता तिच्यासमोर तिची आवडती कॉफी ठेवली.
त्याने असं येऊन आपल्यासाठी कॉफी समोर ठेवल्याचं पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि मग हलकंसं हसू आलं. तेवढ्यात तिला त्याच्या डोळ्यात एक क्षणभर थांबलेली काळजी दिसून आली…
शर्वाय : कधी आधे मधे स्वतःसाठीही थांब. मी तुझ्या पाठीशी आहे.
त्याच्या अशा बोलण्याने ती काही न बोलता, केवळ नजरेनेच त्याचे आभार मानले.
शर्वायला आराध्याचं केवळ सौंदर्य नाही, तर तिचा संयम, संघर्ष, आणि स्वाभिमानही भावत होता… त्याला तिची चिंता वाटते, तिचं हास्य हवंहवंसं वाटतं आणि तिला कुणी त्रास देऊ नये, ही आतून जपणारी भावना त्याच्या वागण्यात दिसते. हे प्रेम नाही तर दुसरं काय…?
दत्ता आता बराच काळ शर्वायसोबत काम करत होता. पूर्वीचा तो कडक, कठोर आदेश देणारा शर्वाय आता काहीसा बदललेला वाटत होता. अलीकडे तो अधिक शांत, संयमित आणि विचारपूर्वक वागू लागला होता. विशेषतः, आराध्याशी वागताना त्याच्या स्वभावात एक वेगळीच सौम्यता जाणवत होती — जी पूर्वी कधीच दिसली नव्हती.
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याच्या प्रेमात माधवचा अडसर!
शर्वाय आराध्याची एक छोटीशी चूक अतिशय समजूतदारपणे हाताळतो, आणि त्याऐवजी तिचं मनोबल वाढवतो, तिचं कौतुकच करतो. हे सगळं पाहून दत्ताही थक्क झाला होता… आपल्या बॉसने असं कोणा मुली करता काही केलेलं, वागलेलं कधी पाहण्यात आलं नव्हतं… हे सर्व पाहून केबिनच्या बाहेर पडल्यावर तो हळूच पुटपुटतो,
“आपला बॉस खरंच बदलतोय…”
त्याच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणतो, “बदल नाही रे दत्ता… प्रेमाच्या झुळुकीने माणूसही फुलतो असं म्हणतात ना, अगदी तसंच काहीसं वाटतंय.”
दत्ता डोळे मिचकावतो, “म्हणजे हे सगळं आराध्या मॅडममुळे?”
तो फाइल हातात घेतो आणि स्वतःशीच हसतो —
“बॉस, तुम्ही कुणाचं ऐकत नाही म्हणता… पण यावेळी मनाचं ऐकायला लागलात असं दिसतंय!”
हळूहळू दत्ताच्या मनातही आदर निर्माण होतो — शर्वायच्या बदलासाठी आणि त्याच्या त्या शब्दात न मांडलेल्या, पण स्पष्ट उमटणाऱ्या भावना पाहून…
क्रमशः
शर्वाय तर बदलू लागला आता काय होईल पुढे, जेव्हा आनंदी मांडेल लग्नाचा प्रस्ताव…?


