Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeललितकवी गोविंदाग्रज यांची कविता ‘एखाद्याचे नशीब’… एक रसग्रहण

कवी गोविंदाग्रज यांची कविता ‘एखाद्याचे नशीब’… एक रसग्रहण

संगीता भिडे (कमल महाबळ)

काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी

काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी

काही जाऊनि बैसती प्रभुपदी, पापापदा वारी ते

एखादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते।

कोणी पर्वत आपुल्या शिरी धरी हेमप्रभा शीतला

कोणाच्या उदरामधून निघती मोठ्या नद्या निर्मला

कोणाला वनदेवता वरितसे मोहात जी नाहते

एखाद्यामधुनि परंतु जळती ज्वाला नदी वाहते ।

झाडे जोडुनि पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती

स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवरी नाचती

सारी पालवती, फुले विहरती, शोभा वरी लोळते

एखाद्यावर मात्र वीज पडुनी तया जाळते पोळते!

चाले खेळ असा जगात, बहुदा सौख्यात सारे जरी

एखादा पडतो तसाच चुकुनी, दुःखार्णवी यापरी

पाही कोण अशा हताश ह्रदया, जो तो असे आपला

देवा, तू तरी टाकी अश्रू वरूनी, त्यासाठी तो तापला

– कवी गोविंदाग्रज

रसग्रहण

कवी गोविंदाग्रज म्हणजेच प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांची ‘एखाद्याचे नशीब’ ही कविता वाचल्यावर सर्वप्रथम जाणवते ते, आयुष्याचे अत्यंत प्रमुख सूत्र… हे सूत्र म्हणजे प्रत्येक जण आपले नशीब सोबत घेऊनच जगत असतो. परंतु जो दुःखसागरात डुंबलेला असतो, त्याच्यासाठी दोन अश्रू ढाळायलाही कोणाला सवड नसते.

ही कविता वाचल्यावर अजून एका कवितेची आठवण होते, ती म्हणजे ‘दोन फुलांची कथा’ ही. याही कवितेत एकाच वेलीवरची दोन फुले कशी वेगळे नशीब घेऊन जगतात याचे वर्णन केले आहे. एक फूल देवाच्या मस्तकी विराजमान होते तर, दुसरे प्रेतावर चढते. हाच भाव उपरोक्त कवितेतही आढळतो.

हेही वाचा – पोटभर आशीर्वाद

पहिल्याच कडव्यात गोविंदाग्रज म्हणतात, काही फुले स्वर्गातील देवतांच्या शिरी विराजमान होतात, तर काही रसिक आपल्या हृदय मंदिरात या फुलांना धारण करतात. जो परमेश्वरप्रभू पापक्षालन करतो, अशा प्रभूच्या पायाशी काही फुलांना स्थान मिळते. एखाद्या फुलाचे नशीब मात्र असे दुर्दैवी की, ते बिचारे प्रेताला शृंगारण्यातच खर्ची होते.

प्रत्येक पर्वताचे नशीब सुद्धा वेगळे. एखादा पर्वत आपल्या मस्तकावर शीतल अशा हिमाचे, बर्फाचे तेज धारण करतो तर, एखाद्याच्या पोटातून निर्मळ अशा मोठमोठ्या नद्या वाहतात. एखादी वनदेवता आनंदाने न्हाऊन निघते आणि त्या पर्वतालाच वरते. पण एखादा पर्वत असा की, त्याच्या उदरातून इतरांना जाळत जाणारी ज्वालानदी वाहते.

झाडे आपले दोन हात (म्हणजे जणू काही दोन पाने) जोडून मेघाला प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेचे फळ म्हणजे पानापानांवर स्वच्छंदपणे जलबिंदू नाचू लागतात. झाडांना नवीन पालवी फुटते. फुले त्यावर विलसू लागतात. झाडे पूर्णत: शोभायमान होतात. पण एखाद्या झाडाचे नशीब असे की, पाणी बरसणारा मेघ त्यावर वीज टाकून मोकळा होतो आणि ते झाड अंतरबाह्य जाळून पिळून निघते. सारे होत्याचे नव्हते होते.

असा हा एकूण सुखदु:खाचा खेळ या जगात अव्याहतपणे चालताना दिसतो. वरवर सारेच सुखात आहेत, असे भासते; पण एखाद्याचे नशीब असे की, तो अंतरबाह्य दुःखसागरात बुडलेला असतो. या जगात प्रत्येकजण एवढा आत्ममग्न असतो की, या हताश ह्रदयाकडे बघायला, त्याला धीर द्यायला, त्याचे सांत्वन करायलाही त्याच्याकडे सबड असत नाही.

अशी ही जगरहाटी पाहिल्यावर कवी देवाला प्रार्थना करतो की, ज्याने या संसारात अनंत ताप साहिले आहेत, त्याच्यासाठी तरी तू अश्रू ढाळ.

प्रस्तुत कवितेशी थोडे फार साधर्म्य साधणारी कवी गोविंदाग्रज यांची आणखी एक कविता आहे. त्यातील आठवतात तेवढ्या पंक्ती पुढे देते –

यावज्जीवही काय मी न कळले आप्तांप्रति नीटसे!

मित्रांतेही कळे न गुढ, न कळे, माझे मलाही तसे

अज्ञाता! मरणोत्तर प्रकट ते होईल तूते कसे!

कोठे आणि कधी तरी जगती मी होऊन गेलो असे ।।

परीक्षणार्थ दिलेली कविता कवीने शार्दूलविक्रिडित या वृत्तात. बांधली आहे. वरवर पाहता हे वृत्त फार सोपे वाटते, कारण मंगलाष्टकांना हेच वृत्त वापरले जाते (दुर्दैवाने त्यात शब्दांची वाट्टेल तशी ओढाताण होते!)

या कवितेत मात्र गण आणि मात्रा यांची लय अत्यंत उत्तमरित्या साधली आहे. कोणत्याही शब्दाची ओढाताण करावी लागत नाही, त्यामुळेच या कवितेला उत्तम नाट्यमाधुर्यही लाभले आहे.

हेही वाचा – अनोखा बंधूभाव

थोडक्यात प्रत्येकाचे जगणे ‘असणे आणि नसणे’ या दोन बिंदूतून कसे जात असते याचे उत्कृष्ट वर्णन कोठेही शब्दबंबाळ न होता वर्णिले तर आहेच, पण कवितेच्या शेवटच्या पंक्तित उत्कर्षबिंदू साधला आहे, जो तुमच्या आमच्या हृदयाला जाऊन भिडतो आणि प्रत्येकालाच अंतर्मुख करतो आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यास प्रवृत्त करतो.

इति अलम् !


(साधारण 1997 साली ‘नौपाडा हिंदू भगिनी मंडळ मंडळ’ ठाणे या संस्थेतर्फे आयत्या वेळी ‘काव्यरसग्रहण’ स्पर्धा घेण्यात आली आणि या रसग्रहणास प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!