बाहेर विजा कडाडत आहेत… वातावरण कुंद… पाऊस भरून आलेला… शकुताई त्यांच्या रूममध्ये होत्या. शाल पांघरून पडल्या होत्या. आज त्यांचा मुलगा कुणाल आणि सून रितू घरीच होते. दुपारचे साधारण चार वाजले असावेत. अचानक त्यांना रितूचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी कान टवकारले.
“कुणाल, तू जातो की नाही नाश्ता घ्यायला? किती दिवस झाले, पण तू ऐकतच नाहीस.”
“अगं, बाहेर तर बघशील? किती भरून आलं आहे. रस्त्यात मीच पावसात सापडेन!”
“असू दे. भिजलास तरी चालेल. पण आज जाच.”
शकुताई आश्चर्यचकित झाल्या. एवढ्या पावसाळी वातावरणात कुणालला नाश्ता आणायला पाठवते आहे रितू? त्यांनी पुन्हा कान टवकारले.
“उद्या आणला तर नाही चालणार का?”
“नाही. आजच आणायचा आहे. उद्या आपण दोघेही ऑफिसला असू. उद्या वेळ मिळणार नाही.”
“मग अधेमधे सुटीच्या दिवशी?”
“पण त्या दिवशी पाऊस असेल का? पाऊस पडत असतानाच नाश्ता खाण्यात मजा असते.”
शकुताईंना वाटले बाहेर जावे आणि सांगावे सुनेला की, कशाला एवढ्या पावसात माझ्या मुलाला बाहेर पाठवते? पण त्यांनी विचार केला कशाला त्या दोघांच्या मधे पडावे? लग्नाला जेमतेम सहा-सात महिने झालेत. तिला खावेसे वाटतं असेल नाश्ता?
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
पण दुसऱ्या क्षणी त्यांना वाटले की, इतकंही का ऐकून घ्यावे कुणालने? स्पष्टपणे नाही सांगता येत नाही का? तेवढ्यात पुन्हा रितूचा आवाज ऐकू आला…
“निघ आता. उगाच टाइमपास करू नकोस. कार घेऊन जा आणि खेतेश्वर स्वीट्सकडून नाश्ता घेऊन ये. तो मस्त गरम काढून देतो आपल्यासमोरं.. आणि पॅकही करून देतो.”
पुढच्या क्षणी दार उघडल्याचा आणि नंतर कार चालू केल्याचा आवाज आला… शकुताईंनी डोळे मिटून झोप घेण्याचा प्रयत्न केला. पण कशी झोप येणार? सहा-सात महिन्यांत आपला मुलगा इतका सुनबाईच्या आहारी गेला की, कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण असताना बायकोचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेर पडला. छे! त्यांना अचानक आठवले त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या बाळूला सगळे ‘बायकोचा बैल’ म्हणतात. तिला विचारल्याशिवाय तो काहीच करत नाही. आपल्या कुणालचीही ती अवस्था होईल का? त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अजूनपर्यंत तर रितू त्यांच्याशी चांगली वागत होती. पण पुढे जाऊन कुणाल तिच्या कह्यात गेला तर? आपली घरात तरी किंमत राहील का? आधीच हे वारलेले. माझी बाजू घेणारे कोणीच नाही. त्यांना घाम फुटला.
नाही, नाही… माझा कुणाल तसा नाही. किती काळजी घेतो तो आपली. अगदी जेवायला बसायच्या अगोदर आईचं जेवण झाले का, हे विचारतो मगच जेवतो… त्या उठल्या. टी-पॉयवर ठेवलेल्या तांब्यातील पाणी प्यायल्या.
बाहेर पाऊस सुरू झाला आणि त्यांना पुन्हा कुणालची काळजी वाटू लागली. एवढ्या पावसाचा पोरगा गेलाय बाहेर…
काही वेळाने कार घराजवळ आल्याचा आवाज आला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. बरे झाले पावसाचा जोर वाढण्याआधी पोरगा आला घरी! आजकालच्या पोरींना काही समजतच नाही. नवरा म्हणजे नोकर वाटतो त्यांना… आणि कसला नाश्ता मागवलाय काय माहीत?
त्या पुन्हा पलंगावर झोपल्या. तेवढ्यात कुणाल त्यांच्या रूममध्ये आला.
“आई, गरम नाश्ता आणला आहे, खाऊन घे.”
त्यांचे मन अगदी भरून आले… ‘पोराला काळजी आहे आपली.’ तरीही त्या म्हणाल्या, “नको रे, तुम्ही खा… तरुण पोरं… मला कशाला?”
“चल आई, रितू तुझी वाट पाहत आहे. तुला माहीत आहे ना? तू काही खाल्याशिवाय आम्ही काही खात नाही.”
शकुताई नाईलाजाने उठल्या आणि डायनिंग हॉलमध्ये आल्या. तिथे एका डिशमध्ये त्यांच्या आवडीचा ढोकळा आणि भलीमोठी कांदा-कचोरी ठेवलेली होती. त्यांना येताना बघून रितू म्हणाली,
“या आई पटकन. गरम आहे तोवर खाऊन घ्या. तुम्हाला आवडतात ना कचोऱ्या आणि ढोकळा म्हणून मुद्दाम मागवले आहे?”
हेही वाचा – सासू, सून अन् लेक…
“काय?” शकुताईंनी काहीसे आश्चर्याने रितूकडे पाहिले.
“हो ना, काल-परवाच फोनवर तुम्ही नणंदबाईंना सांगत होत्या ना की, असा अवकाळी पाऊस पडला की मामंजी तुमच्यासाठी ढोकळा आणि कांदा-कचोरी आणायचे म्हणून… कारण अशा पडत्या पावसात खायला तुम्हाला ते फार आवडायचे. मग मी कुणालला मुद्दाम पाठवले आज. एकतर इतर दिवशी आम्ही घरी नसतो. आज अनयसा रविवार आहे… पाऊसही पडतो आहे… मामंजी नसले तरी काय झाले, आम्ही आहोत ना?”
शकुताई आपल्या सुनेकडे बघतच राहिल्या. बघता बघताच त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. रितू पटकन त्यांच्याजवळ आली.
“काय झाले आई? मामंजींची आठवण आली का?”
आपले डोळे पुसत शकुताई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या,
“नाही गं. माझी सून किती छान आहे, हे आज समजले मला!”
शकुताईंनी पटकन कांदा-कचोरीचा एक तुकडा तोडला आणि रितूला भरवला… आता रितूचेही डोळे पाण्याने भरले होते.


