सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥53॥ जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥54॥ आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥55॥ एऱ्हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥56॥ हें युगचि आघवें बुडावें । वरि आकाशहि तुटोनि पडावें । परी झुंजणें न घडावें । गोत्रेंशीं मज ॥57॥ ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी । चांगचि तूं एऱ्हवीं काढी । कवणु मातें ॥58॥ नाथिलें आपणपें एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्हीं ॥59॥ मागां जळत काढिलों जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥60॥ दुराग्रहें हिरण्याक्षें । माझी बुद्धिवसुंधरा सूदली काखे । मग मोहार्णवगवाक्षे । रिघोनि ठेला ॥61॥ तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥62॥ ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परि पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥63॥ तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥64॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…
अर्थ
देवा, गंधर्वनगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. ॥53॥ महाराज, सर्प कापडाचाच होता, (पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन) विषाच्या लहरी मात्र खर्या येत होत्या. याप्रमाणे आपण मरतो, असे भ्रमाने वाटणार्या जीवाला (मला) वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले. ॥54॥ विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया आहे, हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार, इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे, याप्रमाणे हे अनंता, आपण माझे रक्षण केलेत. ॥55॥ ऐका, एरवी माझा तर येथे इतका निश्चय झाला होता की, आताच जरी सातही समुद्र एकवट झाले, ॥56॥ हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले (तरी चालेल), पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. ॥57॥ अशा अहंकाराच्या वाढीने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती. (प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही, असा माझा कृतनिश्चय होता). पण आपण चांगले (जवळ) होता म्हणून ठीक झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते? ॥58॥ वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी (अर्जुन) आहे, असे मानले, आणि वास्तविक काही नाहीत, असे जे कौरव, त्यांस नातलग असे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेड लागले होते. पण तुम्ही माझे रक्षण केलेत. ॥59॥ ऐका, मागे (पूर्वी एकदा) जेव्हा आम्ही अग्नीत (लाक्षागृहात) जळण्याच्या बेतात होतो, तेव्हा तू आम्हाला बाहेर कढलेस. तेव्हा काय ते एका स्थूल देहासच भय होते, पण आता या (मोहरूपी) दुसर्या अग्नीच्या पीडेपासून चैतन्यासकट देहाला भय होते, ॥60॥ दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने, माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली आणि मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. ॥61॥ देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एकवेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसर्यांदा वराह अवतार घ्यावा लागला. ॥62॥ याप्रमाणे तुझी अनंत उपकारांची कृत्ये आहेत. त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू? परंतु (एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की) तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. ॥63॥ देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही. हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. कारण की, माझे अज्ञान साद्यंत नाहीसे झाले. ॥64॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…


