दवाखान्यातून बाहेर पडताना कवीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी तो तिथून निघाला. हातातल्या फाइलमधील कागदावर उमटलेल्या ‘ॲनोस्मिया’ या शब्दाभोवतीच त्याच्या विचारांचे चक्र गरगरत होते… हे सारे घरी जाऊन स्नेहाला कधी सांगतो, असे त्याला झाले होते. त्याने बाजारात एका कोपऱ्यावर गाडी थांबवली आणि स्नेहासाठी तिच्या आवडीचे पेरू विकत घेतले. सवयीप्रमाणे तो पेरू नाकाला लावून बघितला, पण या पेरूचा वास त्याला आला नाही; मात्र त्याला लहानपणी त्याच्या शेतात असलेल्या पेरूंचा तो परिचित सुगंध आठवला. त्याच्या आयुष्यात आता फक्त या ‘गंध-स्मृतीच’ दरवळणार होत्या!
तो घरी पोहोचला, तेव्हा स्नेहाने हसतमुखाने दार उघडले. कवीशने आणलेले पेरू बघून तिला खूप आनंद झाला. या मुंबई शहरात तिचे डोहाळे पुरवणारे दुसरे होते तरी कोण? कवीशचे लक्ष सोफ्याकडे गेले, तर स्नेहा लोकरीची प्राजक्ताची फुले विणत होती. ती फुले अतिशय सुंदर आणि नाजूक दिसत होती. क्षणभर ती फुले हातात घेऊन त्यांचा वास घ्यावा, असे त्याला वाटले आणि पुन्हा त्याला आपल्या आजाराची आणि फुलांच्या निर्जीवपणाची जाणीव झाली. त्याला स्वतःच्या गावच्या घरच्या परसबागेल्या प्राजक्ताच्या झाडाची आठवण झाली. प्राजक्ताचे फुलं अंगावर पडताना होणारा स्पर्श आणि त्याचा सुगंध याची उपमा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला देता येणार नाही, असे त्याला वाटले.
हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!
स्नेहाला सुद्धा फुलांची खूप आवड होती. ‘टू बीएचके’ फ्लॅटमध्ये झाडांची हौस कुठे पूर्ण होणार, म्हणून स्नेहाने बाल्कनीत चार-पाच कुंड्या लावल्या होत्या. ती त्यांची मनापासून काळजी घ्यायची. परंतु, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये, “त्या कुंड्यांचे पाणी खाली गळते आणि त्यामुळे खालच्या फ्लॅटधारकाला त्रास होतो,” अशी तक्रार केली होती. त्यामुळे त्या कुंड्या तिथून काढून टाकण्यात आल्या. तसेही कवीशला सोसायटीच्या मीटिंगमध्ये काडीमात्र रस नव्हता. तिथे होणारी भांडणे— कधी पार्किंगमध्ये मुलांच्या खेळण्यावरून, लोकांच्या कुंड्यांवरून, घरात पाळलेल्या प्राण्यांवरून, इतकंच काय तर भाडेकरूंकडे येणाऱ्या पाहुण्यांवरून — अशा कुठल्याही क्षुल्लक गोष्टींवरून तिथे वाद व्हायचे. सोसायटीच्या या अनेक यांत्रिक नियमांमुळे त्याचे मन गुदमरत होते…
त्याला दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काकांचे शब्द आठवले. काकांच्या अतिशय शांत असलेल्या कुत्र्याविरोधात तक्रार केल्यानंतर काका हताश होऊन म्हणाले होते, “कवीश, आता नॉन-व्हेज खाणे लोकं सहज स्वीकारतील, परंतु सजीव प्राण्यांवर असणारे प्रेम कुणाला मान्य नाही.”
एकमेकांशी संबंध नसलेल्या या सगळ्या गोष्टींची आणि विचारांची साखळी का तयार होत होती, हे त्याला कळत नव्हते.
“काय म्हणाले डॉक्टर?” स्नेहाच्या या प्रश्नाने कवीशची विचारांची साखळी तुटली.
कवीश काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, “स्नेहा, खरं सांगू का? मला असं वाटतंय की, या जगात सगळेच आजारी आहेत. माझ्या आजूबाजूचे सगळे लोक ‘डेफिशिअन्सी ऑफ इमोशन’ (भावनेचा अभाव) या आजाराने ग्रस्त आहेत. अशा कोरड्या जगात आपण आपल्या बाळाला आणून खरंच चूक तर करत नाही आहोत ना? या विचाराने मी पुरता हादरून गेलो आहे.”
स्नेहा अवाक् होऊन त्याच्याकडे बघत राहिली. “हे काय बोलतोयस तू कवीश? अरे, तू तुझी सगळी स्वप्नं पूर्ण केलीस. लोकांचं स्वप्न असतं, असं आयुष्य तू जगतोयस. काय कमी आहे आपल्याला? सगळी भौतिक सुखं आहेत आणि आता आपलं बाळ या जगात येतंय… जरा आयुष्याची सकारात्मक बाजू बघ ना! अरे, गंध नाही तर नाही…”
कवीश गहिवरून म्हणाला, “स्नेहा, गोष्ट फक्त मला वास येत नाही इतकीच नाहीये. तुला सांगू का, मला लहानपणी सगळ्यात जास्त चीड कशाची होती? बाबांच्या मातीने भरलेल्या पायांची! मला ते पाय अजिबात आवडायचे नाहीत. त्याउलट किती स्वच्छ आणि गोरेपान पाय असायचे माझ्या काकाचे! सतत बूट-मोज्यांत असलेले त्यांचे पाय कारमधून उतरताना दिसायचे. मातीत राबणाऱ्या माझ्या बाबांच्या पायांत आणि त्यांच्या पायांत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी खूप आधीच ठरवलं होतं की, माझ्या पायाला कधी माती लागू देणार नाही. पण आज काय होतंय माहीत आहे? माझ्या स्वप्नात बाबांचे तेच माखलेले पाय येतात. त्यांच्या पायांतून मला मातीचा ओला सुगंध येतो. त्यांच्या कपड्यातून मला आमच्या घरच्या प्राजक्ताचा गंध येतो. हाताला आमच्या गौरी गायीच्या दुधाचा वास येतो.” या सगळ्या यांत्रिक जगात ते एकटेच मला सजीव वाटतात!
तो पुढे बोलू लागला, “प्रश्न फक्त वासाचा नाहीये स्नेहा… मला असं वाटतंय की मी अनेक निर्जीव वस्तूंमध्ये वावरतोय. मला माझ्या अवतीभवती सजीव गोष्टी हव्या आहेत, ज्यांना जीव असेल, भावना असतील आणि ज्यांना स्वतःचा असा वास असेल! त्यासाठी मी कितीही पैसा खर्च करायला तयार आहे.”
आणि कवीश एका लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला…
हेही वाचा – आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…
महक
जब मेरे बाबा मेरी उम्र के थे,
मैं उनके साथ खेतों की पगडंडियों पर जाता था।
उनके पैरों से सोंधी मिट्टी की वो आदिम खुशबू आती थी,
मानो वे खुद इस धरती का एक जीवंत हिस्सा हों।
जब वे खेत की मुंडेर पर खड़े,
उस हरसिंगार के पेड़ को दुलार से सहलाते थे,
तो उनके कपड़ों के रेशों से हरसिंगार की महक छनकर आती थी।
उनके हाथों से आती थी अमरूद की रसीली सुगंध,
जब भी वे वृक्षों का ‘फल-रूपी दान’ पाते,
तो बड़ी कृतज्ञता से उन दरख्तों को नमन करते थे।
वे सूरज के तेज को और बारिश की बूंदों को नमन करते थे,
सच मानिए, उनका पूरा व्यक्तित्व ही महकता था।
पर अब, जब मैं खुद को देखता हूँ,
तो सोचता हूँ कि मेरे बदन से कैसी खुशबू आती होगी?
क्योंकि इस मोबाइल, लैपटॉप और नींद भरी दोपहरों,
इस कार और महँगे फर्नीचर की अपनी कोई खुशबू नहीं होती।
इन कागजी रुपयों और मशीनों की कोई अपनी महक नहीं होती।


