खूप वर्षांनी कोकणात आलो. बारा वर्षांपूर्वी कोकण सोडले आणि मराठवाड्यातील वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून रुजू झालो. अर्थात, कोकणातील घडामोडींवर सुद्धा लक्ष होतेच, पण जास्त भर मराठवाडा. या भागातील अनेक पत्रकार, संपादक मित्र होतेच, शिवाय, अनेक सर्वसामान्य लोक सुद्धा अजून संपर्कात होते. अधूनमधून पत्रकारांच्या मीटिंग्स व्हायच्या. त्यावेळी पण मित्रमंडळी भेटायची.
यावर्षी मुद्दाम वेळ काढून आंबे खायला म्हणून कोकणात आलो. रत्नागिरी भागात बरीच मित्रमंडळी होती, म्हणून मुक्काम रत्नागिरीत ठेवला. मी येणार हे कळताच मिलिंदने मला फोन लावला…
“पम्या, सरळ पावसमध्ये यायचं. माझं मोठ्ठं घर आहे… माझी घरची पन्नास आंबा कलमे आहेत… हवे तितके आंबे खा. माझी चारचाकी आहे, तेव्हा तुला वाटेल तिथे फिरू.”
“होय बाबा, तुझ्याचकडे येणार… भरपूर आंबे, गरे खाणार, माशांचे जेवण जेवणार आणि रात्री…”
“रात्रीची बेगमी असते रे माझ्याकडे… गोव्याला जातो तेव्हा सगळे ब्रँड आणतो… तुला काय प्यायचे ते ठरव.”
कोल्हापूरमार्गे मी रत्नागिरीत आलो तेव्हा मिलिंद मला घ्यायला साळवी स्टॉपला हजर होता. मग थोडावेळ रत्नागिरीत ज्या पेपरमध्ये नोकरीला होतो. तेथे दोघे गेलो… प्रेसमध्ये अजून जुनी मंडळी होतीच, त्याना भेटलो; शिवाय काही जुने वार्ताहर, नवीन वार्ताहर यांना भेटलो आणि सायंकाळी सहाच्या सुमारास पावसकडे निघालो. माझी गाडी मी माझ्या एका मित्राच्या घरी ठेवली आणि मिलिंदच्या गाडीत बसलो.
हेही वाचा – वर्दे सर 40 वर्षं अज्ञातवासात का होते?
रत्नागिरीहून पावसकडे जाताना दिसणारा समुद्र, बुडणारा सूर्य… त्याच्या लाल नारिंगी छटा… किती तरी दिवसांनी असे सौंदर्य पाहात होतो. वाटेत अनेक लोकांच्या आंब्याच्या बागा, आंबे उतरवणारे कामगार, त्यांची धावपळ… आंबे भरलेले टेम्पो पाहात आमचा प्रवास आणि गप्पा सुरू होत्या.
पावसला स्वरूपानंद मठाच्या पुढील गल्लीत मिलिंदचे घर… त्याच्या घरी पोचलो. खूप वर्षांनी वहिनी भेटल्या, त्यांची कन्या जुईली… आता दहावीत गेलेली. माझी लाडकी… तिला खाऊ दिला आणि मिल्याने वरच्या मजल्यावरची गेस्ट रूम माझ्यासाठी उघडून दिली. मस्त आंघोळ केली आणि मग आमचा श्रमपरिहार सुरू झाला…
मिल्याने ब्लॅकलेबल उघडली. त्यात सोडा मिक्स केला… सोबत खारेकाजू तोंडात घालायला घेतले आणि माझ्या हातात ग्लास दिला. तसाच एक पेग आपल्या ग्लासात घेतला. मग मला म्हणाला,
“चिअर्स रे पम्या… किती दिवसांनी तुझ्यासोबत प्यायला बसलोय… सांग आता तुझ्या पेपरचं…”
“काय सांगणार? तुला माहीत आहेच सर्व! नोकरी करणे कठीण झालंय आणि इतकी वर्षे नोकरी करून पगार किती कमी? सध्या शिक्षकमंडळी एवढ्या रजा घेऊन आमच्या दुप्पट पगार घेतात… आम्हाला जरा गडबड झाली की, बांबू ठरलेला.. मालकाचे ऐकायचे की, संपादकचे हेच कळत नाही. मराठवड्यात मजा नाही रे… उगाचच मी कोकण सोडलं… इकडे नवीन काय बातमी?”
“नवीन बातमी म्हणजे पुन्हा कोकणात तीन अणूभटट्या उभ्या रहातायत. तीन उद्योगपतींना सरकारने परवानगी दिली आहे म्हणे…”
“हो रे, मी वाचलं ते. मागे पण कोकणात अशा अणूभट्ट्या उभ्या रहात होत्या. त्याला जोरदार विरोध झालेला ना! कोण तो त्या भागातील तरुण नेता होता? आपण दोघे गेलो होतो ना… एका देवळात मीटिंग झालेली अणूभट्टी विरोधकांची…”
“होय पम्या, त्यावेळी आपण दोघे गेलो होतो, ती मीटिंग कव्हर करायला…. पंधरा वर्षांपूर्वी…”
पंधरा वर्षांपूर्वी… स्थळ राजापूर तालुक्यातील एक मंदिर…
“कोकणात अणूभट्टया उभ्या रहात होत्या. त्याच्याविरुद्ध लोकांत कुजबूज होती. सत्ताधारी प्रकल्पाच्या बाजूने होते आणि विरोधक विरोध करत होते. दिल्लीपासून मुंबईपर्यत पर्यावरणवाले ‘असा प्रकल्प नको’ असे म्हणत होते. तर, काही बुद्धीवादी असे प्रकल्प परदेशात अनेक ठिकाणी आहेत आणि त्यांनी कुठेही पर्यावरणाची हानी केलेली नाही, असे पुरावे देऊन सांगत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक वर्तमानपत्रांत लोक आपली मते मांडत होते… आणि अशा वातावरणात चमकले एक युवा नेतृत्व… कीर्ती देसाई!
कीर्ती त्याच भागातला आंबा बागायतदार. दापोलीच्या कृषी विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला. नवीन नवीन आंबा जाती आपल्या बागेत लावणारा. या कीर्तीने या अणूभट्ट्यांना कडाडून विरोध केला. आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन लोकांना सावध केले. वाडीवाडीवर मीटिंगा घेतल्या.
‘लोकहक्क सेवा संघ’ या नावाने एक ग्रुप तयार केला. जिल्ह्यातील आणि राज्यातील, देशातील प्रकल्पविरोधकांना एकत्र केले. त्याच लोकहक्क सेवा संघाने एका मंदिरात मेळावा आयोजित केला होता… त्याच देवळात आपण दोघे ती सभा कव्हर करायला गेलो होतो…”
हातातल्या ग्लासमधील एक मोठ्ठा सिप घेत प्रमोद म्हणाला, “पण मिल्या… माझ्या डोळ्यांसमोर अजून तो कीर्ती जात नाही. असेल पंचवीस वर्षांचा! पण घसा फोडून फोडून… नसा उडवत… तो प्रकल्पाला विरोध करत होता…”
“आणि पम्या, त्याने बांद्यापासून रत्नागिरीपर्यंतचे असंख्य कार्यकर्ते जमवले होते. बरेच शेतकरी, बागायतदार जमवले होते. मुंबई, पुण्यापासूनचे अनेक पत्रकार, टीव्ही चॅनल्स प्रतिनिधी आले होते. एवढ्या मोठ्या लोकांसमोर त्याने सरकारला धारेवर धरले होते. सरकारला आव्हान दिले होते… प्रकल्पाला विरोध करण्यासाठी त्याने पुढील कार्यक्रम जाहीर केला होता –
कलेक्टरकडे मोर्चा घेऊन जायचे आणि प्रकल्पाला विरोध करणारे, हजारो शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन त्यांना दयायचे… जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांना घेराव घालायचे… मग बागायतदारंचा मोर्चा सचिवालयावर न्यायचा वगैरे…
मला वाटते त्याने आपला शब्द खरा केला होता. त्या देवळात इतक्या जनसमुदायासमोर जो ठराव झाला, त्याप्रमाणे कलेक्टर कचेरीवर विराट मोर्चा गेला. पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या…”
एक मोठ्ठा सिप घेत मिलिंद बोलू लागला…
“होय, कीर्तीचे डोके फुटले होते. माझ्याकडे अजून ते फोटो असतील… पण तशा परिस्थितीत त्याने कलेक्टरना निवेदन दिले.”
“मग एका दिवसात कीर्ती देशभर प्रसिद्ध झाला ना?”
“विरोधी पक्षनेता त्याला भेटायला आला. पर्यावरणवादी लोक त्याच्या संपर्कात आले… अनेक चर्चा, मीटिंग्स झाल्या. बहुतेक संपादकांचा त्याला पाठिंबा होता. अधिवेशन सुरू असताना कोकणातील शेतकरी, बागायतदार यांनी भलामोठ्ठा मोर्चा काढला… त्याचे नेतृत्व कीर्ती देसाईनेच केले…”
“मग पुढे?”
“पुढे काहीच नाही. सरकारने सहाशे एकर जमीन ताब्यात घेतली आहे. ती सरकारच्याच ताब्यात आहे. त्या ठिकाणी अणूभट्टीचा भला मोठा बोर्ड लागलेला आहे… पण काम सुरू झाले नाहीच!”
“मग आता कीर्ती देसाई कुठे असतो? त्याचे नाव फारसे ऐकू येत नाही?”
“ते तुला सांगतो पम्या… पण तुला ठसका लागेल म्हणून त्याआधी ते ग्लासातील द्रव्य पोटात घाल. मी पण माझा ग्लास संपवतो… मग बोलू…”
मिलिंदने एका दमात ग्लास तोंडाला लावला आणि रिकामा केला. त्याचे पाहून मी पण ग्लास रिकामा केला.
ग्लास खाली करून, ओठ पुसून मिलिंद बोलू लागला,
“पम्या, सध्या कीर्ती देसाई हा ज्या पक्षाची सत्ता राज्यावर आहे, त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे!”
“काय? म्हणजे तो राजकारणात आला?”
“होय. दहा वर्षांपूर्वीचे अणूभट्टीविरोधी आंदोलन थांबले. म्हणजे, सरकारने पुढे काहीच केले नाही. फक्त जमीन ताब्यात ठेवली आणि त्या ठिकाणी एक बोर्ड लावला. त्यामुळे हळूहळू त्या आंदोलनातील हवा गेली. ‘लोकहक्क सेवा समिती’ फक्त कागदावर राहिली. त्या आंदोलनातल्या काही ज्येष्ठ व्यक्ती काळाआड गेल्या. आता या जिल्ह्यातील लोक, बागायतदार ते प्रकरण विसरले.”
“मग कीर्ती देसाईचे काय?”
“मला वाटते, यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला सतत प्रकाशझोतात रहायची सवय… त्याचे नाव रोजच्या वर्तमानपत्रात असायचे, टीव्हीच्या बातम्यांत असायचे.. ते सर्व बंद झाले.”
“मग?”
“मग महारष्ट्रातील राजकारण बदलले… अनेक विरोधी पक्षातले लोक सत्ताधारी पक्षात गेले, त्यात कीर्ती देसाईचा मित्र आमदार झाला आणि मंत्री झाला.”
“मग?”
“त्या मंत्र्यावर या भागाची जबाबदारी आली. त्याला माहीत होते, कीर्ती जीव झोकून काम करणारा कार्यकर्ता आहे… त्या मंत्र्याने कीर्तीचे मन फिरवले आणि त्याला सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष केले. कीर्ती जिल्हाध्यक्ष झाला आणि काही महिन्यांत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने एकहाती विजय मिळविला. पाठोपाठ या भागात तीन उद्योगपती अनुभट्ट्या उभ्या करत असल्याची बातमी आली.”
“काय? पण कीर्ती देसाईने दहा वर्षांपूर्वी अशाच अणूभट्ट्यांना विरोध केला होता ना? आंदोलन केले होते? मोर्चे नेले होते? मग आता…”
“पम्या, म्हणून मघा तुला सांगितले, ते ग्लासातील द्रव्य संपव… ठसका लागेल तुला! कारण तोच कीर्ती देसाई या अणूभट्ट्यांचे समर्थन करत…. ते कसे देशासाठी महत्त्वाचे आहे, अणूऊर्जेतून कमीतकमी विषारी वायू बाहेर पडतो… त्यामुळे आंबा, नारळ बागायतीला अजिबात धोका नाही… हे सांगत फिरतोय..”
“म्हणजे देसाईने कोलांटी उडीच मारली की रे! विश्वासघात केला लोकांचा…”
हेही वाचा – वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…
“कोलांटी उडी कोण मारत नाही रे, प्रमोद? राजकारणी आज या पक्षात, उद्या त्या पक्षात. साहित्यिक आपल्याला सोयीस्कर तशी भूमिका घेत असतात. आपण पत्रकार, आपल्याला जो पाकीट देईल, त्याच्या बाजूने बातम्या देतो आणि आपले संपादक… पेपरला जी पार्टी मोठमोठ्या जाहिराती देते, त्यांना मोठे करते. असे हे कोलांटी उड्या मारणाऱ्यांचे जग आहे. अमेरिकेचे प्रेसिडेंट कशा उड्या मारतात, हे आपण पहातो… मग कीर्ती देसाईने मारली कोलांटी उडी, तर काय चुकले त्याचे?”
“पण तो राजकारणी नव्हता मिलिंद, कार्यकर्ता होता… हाडाचा, तळमळीचा कार्यकर्ता होता.”
“खरं सांगू प्रमोद… या राजकारण्यांनी कितीही कोलंट्या उडया मारल्या तरी कीर्ती देसाईने, ज्याने अणूभट्ट्याना कडाडून विरोध केला, त्याने त्याचे समर्थन करायला नको होते; कारण त्यामुळे समाजाचा अशा कार्यकर्त्यांवरचा आणि आंदोलनवरचा विश्वास नाहीसा होतो.”


