भाग – 40
त्या क्षणी व्हिलाच्या शांततेत एक निर्धार उमटलेला होता — एक संघर्ष उडण्याच्या आधीची निश्चिंती, आणि दोन मनांची एकवटलेली ताकद उद्दिपीत झाली होती.
प्रोजेक्ट क्षितिज 9 आता केवळ एक फाइल नव्हती — ती दोघांच्या एकत्र लढाईची सुरुवात ठरली होती. शर्वायला आनंद वाटतं होता, पहिल्यांदा भेटलेली आराध्या आणि आताची आराध्या वेगळी जाणवत होती. इथे पहिली आराध्या असती तर, आपल्या नशिबाला कोसत बसली असती, हार मानून घेतली असती. आता मात्र तिला लढताना पाहून त्याला बरं वाटलं.
ती नुसती लढायला तयार नव्हती तर तिने कल्पकतेने, एकटीने स्वतः पुढे होऊन अगदी बारीकसारीक सगळे तपशील जाणून घेऊन ते जसेच्या तसे शर्वायसमोर मांडले होते.
शर्वाय आणि आराध्या एकमेकांत गुंतून गंभीर बोलण्यात मग्न असतानाच व्हिलाच्या इन्टरकॉमवर हलकी बीप झाली. शर्वाय क्षणभर थांबला. तोच दत्ताचा मेसेज स्क्रीनवर झळकला —
“सर, दिवाकर सर गेटवर पोहोचले आहेत.”
शर्वायच्या चेहऱ्यावर काही क्षण गूढ शांतता पसरली. त्याने फोन हातात घेतला, आराध्याकडे पाहिलं, आणि एक हलकंसं स्मित करत म्हणाला —
“बाबा आलेत… आणि यावेळी ते काहीसं ठरवूनच आले असावेत.”
आराध्याचं मन क्षणभर गडबडलं.
“आपण काय सांगणार त्यांना?”
शर्वाय थोडा शांत झाला, मग म्हणाला,
“सत्य. जे काही आपल्याला माहीत आहे, जे आपण उलगडत आहोत… ते सगळं.”
“बाबा फक्त माझे वडील नाहीत, ते या सगळ्या माझ्या साम्राज्याचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विश्वासावाचून आपण पुढे जाऊ शकणार नाही.”
तो उभा राहिला. आराध्या देखील त्याच्या मागे शांतपणे चालू लागली.
व्हिलाच्या हॉलमध्ये आता दिवाकर उभे होते — नेहमीसारखे शांत, संयमी, पण जाणकार नजर.
त्यांनी शर्वायकडे पाहिलं…
“काही बोलायचं आहे का शर्वाय?”
शर्वाय थेट त्यांच्यासमोर गेला, आणि थोड्याशा थरथरत्या आवाजात म्हणाला —
“हो बाबा, ‘क्षितिज 9’बद्दल आणि माधवबद्दल… आता वेळ आहे सर्व उलगडण्याची.”
हेही वाचा – आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!
दिवाकर क्षणभर काहीच बोलला नाही. त्यांनी केवळ एक खोल श्वास घेतला, आणि खुर्चीत बसताना म्हटलं —
“ठीक आहे. मग ऐकव.”
आता एक नवा अध्याय सुरू होणार होता — जिथे केवळ संशय नव्हता, तर निर्णय, विश्वास आणि संघर्ष यांचं खरंखुरं रूप समोर उभं राहणार होतं… शर्वाय, आराध्या, आणि आता दिवाकर — या तिघांचं एक नवं युतीबंध तयार होणार होता… क्षण आता मोकळ्या संवादाचा होता, पण त्याचबरोबर सावधपणा आणि संयम सोबत असणं गरजेचं होतं.
शर्वाय आणि आराध्या दोघंही आता पूर्ण गंभीर झाले होते. व्हिलाच्या त्या शांत, नीटनेटक्या हॉलमध्ये वातावरण जरा दाट वाटू लागलं होतं.
दिवाकर आपला नेहमीचा सौम्य भाव चेहऱ्यावर ठेवून समोर बसले होते. त्यांची नजर शर्वायवर स्थिर होती — जणू प्रत्येक हालचालीमागे लपलेला हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.
शर्वायने सुरुवात केली….
“बाबा, क्षितिज 9 प्रोजेक्ट आपल्यासाठी केवळ बिझनेस नाही. तो आपल्या कंपनीच्या भवितव्याचा केंद्रबिंदू आहे. पण, काही गोष्टी बिनसलेल्या आहेत.”
दिवाकरच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता. त्यांनी केवळ हलकेच मान डोलावली.
आराध्या पुढे आली आणि म्हणाली,
“प्रोजेक्टचे काही इन्टर्नल डॉक्युमेंट्स माधवच्या लॉगिनमधून बाहेर गेले आहेत आणि ती माहिती बाहेर एका प्रतिस्पर्धी कंपनीकडे पोहोचलीय. आम्ही अजून पुरावे मिळवत आहोत… पण यात मोठं नुकसान होऊ शकतं.”
शर्वायने आणखी स्पष्ट करताना सांगितले —
“मी मुद्दाम काही गोष्टी माधवपासून लपवल्या, आणि त्याला विचित्र सिग्नल्स दिले… आणि खरं सांगतो, माझा अंदाज खरा ठरला. काही सिस्टीम ट्रॅसेस, काही बाह्य नेटवर्क ट्रॅफिक… आणि आतून मिळालेली गुप्त माहिती — हे सगळं एकत्र केलंय.”
दिवाकर काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी संथ स्वरात विचारलं —
“तुम्हाला खात्री आहे का, की यात केवळ माधवच सामील आहे?”
आराध्याने लगेच उत्तर दिलं —
“सध्या पुरावा त्याच दिशेने जातोय. पण… आम्ही कोणावरही पूर्ण शिक्कामोर्तब केलं नाही. कारण हे फक्त बिझनेसचं प्रकरण नाही… इथं नात्यांची गुंतागुंत आहे.”
शर्वायने हे वाक्य ऐकल्यावर थोडं शांतपणे डोळे मिटले.
दिवाकर थोडं पुढे झुकले, दोघांकडे बघत म्हणाले —
“खूप दिवसांनंतर मला जाणवतंय की, शर्वाय फक्त एक CEO नाही, तर एक लढवय्या झाला आहे आणि आराध्या… तुझं हे धाडस, ही निष्ठा — आमच्या कंपनीचं खरं बळ बनू शकतं.”
मग त्यांनी दोघांच्याही हातावर हात ठेवला.
“हे युद्ध आहे. पण सुज्ञपणे खेळायचं. पुरावा हवा, नीटनेटकी योजना हवी, आणि योग्य वेळी योग्य घाव! मी तुमच्यासोबत आहे — पण अजून कुणालाही काहीही कळता कामा नये.”
शर्वाय आणि आराध्या एकमेकांकडे पाहतात — दोघांच्याही डोळ्यांत आता एकच ठाम भावना असते — विश्वास.
आता ही केवळ लढाई नव्हती — हे एक युद्ध होतं, जिथे आपल्या माणसांपासूनच धोका होता… आणि हे युद्ध जिंकण्यासाठी प्रेम, संयम आणि बुद्धीचं भांडार पुन्हा उघडायला लागणार होतं.
पडद्याआड सुरू झालेल्या या रणनीतीनं, क्षितिज 9चं भविष्य बदलणार होतं… आणि त्याचसह, अनेक मुखवटे उघड होणार होते.
सर्व ऐकून झाल्यावर दिवाकर म्हणाले, “कालच घरी माधव आला होता. शर्वाय तुझ्यासाठी त्याने अन्वीचं स्थळं सुचवलं. मी तर एकदम शॉक झालो. पण माधव आनंदीला घोळात घेतोय…”
‘अन्वी’ नाव ऐकून आराध्याच्या हातातला ग्लास निसटला. जमिनीवर आदळताच चांगलाच आवाज झाला. बराच वेळ बोलत असल्याने तिचा घसा कोरडा पडला होता म्हणून पाणी पीत होती… पाणी पिता पिता पुन्हा घशाला कोरड पडेल असं काही ऐकू गेलं होतं…
ग्लास फुटण्याचा खळकन आवाज झाल्याने शर्वाय आणि दिवाकर यांचं लक्ष वेधलं… शर्वाय पाहतच राहिला, कारण आराध्या एका जागी स्तब्ध उभी होती…
काही क्षणापूर्वी बाबा काय बोलून गेले आणि त्याचा आराध्यावर काय परिणाम झालाय, तो ते पाहात होता… “काय वाटलं असेल तिला?” एक क्षण त्याला वाटून गेलं.
हेही वाचा – माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार
क्षणाचाही विलंब न करता तो जणू पळतच तिच्याजवळ गेला, कारण तिने पाऊल पुढे टाकले असते तर पायात काचा गेल्या असत्या…
“दिनू काकाss या काचा उचलून घ्या जरा…” म्हणत त्याने आराध्याला बाजूला घेतलं… तिला पुन्हा सोफ्यावर बसवत तो आपल्या बाबांकडे पाहात म्हणाला…
“बाबा ही अन्वी आराध्याची चुलत बहीण… ती आणि हिची आई माधवसोबत मिळून आराध्याच्या विरोधात सतत कटकारस्थान करत असतात.”
“आराध्या बाळा, माधवने असं स्थळं सुचवलं आहे, अस म्हणालो… मी शर्वायचं लग्न नाही लावलं. खरंतर, आईने ऐकताच विरोध केलाच… तू शांत हो… आपण बोलू यावर…” म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
आराध्या शांत राहिली. ती फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली — शर्वायच्या डोळ्यांतील तडफड आणि आतली अस्वस्थता तिला स्पष्ट जाणवत होती.
शर्वायने डोळे मिटले. मनात विचारांची गर्दी झाली होती.
“माझ्यासाठी काय योग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकार माधवला कुणी दिला?” त्याचा आवाज आता थोडा कडवट होता.
दिवाकर हलकेसे हसले…
“म्हणूनच हे मी तुला सांगितलं — निर्णय तुझाच. पण या गोष्टीमागे काय विचारधारा आहे, हे समजणं तितकंच गरजेचं आहे. माधव काय खेळी खेळतोय, याचा थांग लागणं सुरू झालंय.”
आराध्या शांतपणे उठून उभी राहिली. ती समोरच्या खिडकीजवळ गेली. मनात नवनवीन गुंतागुंतीचं काहूर होतं…
शर्वाय तिच्याजवळ येत हलक्या स्वरात म्हणाला,
“माझ्या आयुष्यात जर कोणाला मी माझ्या पत्नीचा दर्जा देईन, तर ती फक्त एकच व्यक्ती आहे — आणि ती माझ्या समोर उभी आहे.”
दिवाकर त्या दोघांसमोर आले… दोघांनाही जवळ घेत ते म्हणाले,
“तुमचा पुढचा काळ युद्धाचा आहे. या रणभूमीवर दोघांनी एकमेकांच्या साथीने लढायचं आहे. एकमेकांच्या वरचा विश्वास कधी कुठे डळमळला, तर सावरून घ्यायचं आणि पुढे जात रहायचं आहे…”
त्यांनी त्या दोघांसमोर एक योजना मांडली…


