सन 1977 सालचा स्वामी हा वरवर पाहता एक साधी, सरळ कौटुंबिक प्रेमकथा वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रेक्षकांना मानवी मनाच्या अतिशय सूक्ष्म अशा विविध स्तरांवर घेऊन जाणारा चित्रपट आहे. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘स्वामी’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित बासुदांचा हा अत्यंत सुंदर चित्रपट.
काही योग जुळूनच यावे लागतात. शरतचंद्रांची भावनिक खोली, बासुदांसारखा संवेदनशील दिग्दर्शक आणि गिरीश कर्नाड, शबाना आझमी, उत्पल दत्त यांच्यासारखी ताकदवान कलाकारांची फळी. त्यावर राजेश रोशन यांचे संगीत आणि किशोरदा, लतादिदी, आशाताई, येसुदास यासारख्या दिग्गजांचे स्वर. परिणाम अर्थातच विलक्षणच होणार होता! त्या वर्षी उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट कथा अशी तीन मानाची फिल्मफेअर पारितोषिके या चित्रपटाला मिळाली.
कर्नाड आणि उत्पल दत्त यांनी आपापली पात्रे समर्थपणे उभी केली आहेतच, पण तरीही हा चित्रपट मुख्यतः शबानाचा आहे, असेच मला वाटते. ‘सौदामिनी’ हे पात्र तिने ज्या ताकदीने आणि संयमाने साकारले आहे, त्याला खरेच तोड नाही. खरेतर, शबाना माझी फारशी आवडती अभिनेत्री नाही, मी अधिक स्मिताप्रेमी आहे, हे मान्य. पण काही चित्रपट असे आहेत, जिथे शबानाच्या जागी दुसऱ्या कुणाची कल्पनाही मला करता येत नाही. अर्थ, स्पर्श, मासूम, मंडी आणि स्वामी हे त्यातलेच! स्वामी तर पूर्णपणे शबानाने आपल्या अभिनयाने उचलून धरलेला चित्रपट आहे.
शरतचंद्र यांच्या मूळ कादंबरीतच मानवी भावनांचे, नातेसंबंधांचे आणि अंतर्मनातील द्वंद्वाचे अतिशय सूक्ष्म पदर आहेत. त्यामुळे बासुदांनी सौदामिनीसाठी शबानाची निवड करताना नक्कीच खूप विचार करून निर्णय घेतला असावा, आणि शबानाने ती निवड सार्थ ठरवली. मानवी मनात घडणाऱ्या एका क्षणिक, पण निर्णायक बदलाचा, त्या सूक्ष्मतेचा सर्वात कोमल आणि परिणामकारक आविष्कार म्हणजे ‘पल भर में ये क्या हो गया’ हे गाणे. हे गाणे सौदामिनीच्या एककेंद्री आयुष्याला एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवणाऱ्या, तिच्या मनातल्या आवेगाला एक वेगळी दिशा देणाऱ्या एका निसटत्या, बेसावध क्षणाचे भावनिक रूपांतर आहे.
हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!
घन:श्यामशी लग्न होण्यापूर्वीचे सौदामिनीचे आयुष्य वेगळे आहे. आपण आणि आपली पुस्तके यात रममाण असलेली मिनी. एका क्षणी त्या पुस्तकांच्याच माध्यमातून तिच्या आयुष्यात नरेन येतो. यथावकाश ती आणि नरेन प्रेमात पडतात. साधे, शांत, कोवळे प्रेम, कोवळ्या भावना. पण त्यांच्या प्रेमी जीवनात एका बेसावध क्षणी नरेन अगदी नकळत, क्षणिक आवेगात सौदामिनीचे चुंबन घेतो. बाहेरून पाहता तो एक अत्यंत लहान, क्षणभराचा प्रसंग आहे. पण त्यामुळे मिनी अंतर्बाह्य बदलून जाते…
आपल्या पुस्तकांमध्ये रममाण असलेली मिनी त्या एका क्षणांमुळे वयात येते, आपल्या तारुण्याची तिला जाणीव होते. त्या एका ‘पल भर’ क्षणात तिच्या मनात जागी झालेली प्रेमाची जाणीव फक्त एक भावना म्हणून रहात नाही, तर ती तिच्या स्वतःच्या अस्तित्वाला एक सुखद, वेड लावणारी, तिच्या रोजच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणणारी अनुभूती बनते. आजवरच्या तिच्या संस्कारांत, तिच्या अंतर्मुख स्वभावात आणि तिच्या मनातल्या नैतिक चौकटींमध्ये या भावनेला जागाच नसते. त्या क्षणासाठी ती मुळीच तयार नसते आणि म्हणूनच तो क्षण तिच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरतो.
या अंतर्गत सुखद धक्क्यानंतर हे गाणे येते. हा कुणाशी केलेला संवाद नाही, तर स्वतःशीच सुरू असलेली एक शांत, पण किंचित अस्वस्थ, पण हवी हवीशी वाटणारी प्रक्रिया आहे. मिनी त्या भावनेत, स्वतःतच गुरफटत जाते. तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत, चेहऱ्यावर स्वतःबद्दलचं वाटणारे आश्चर्य आहे, थोडीशी लाज आहे आणि त्याच वेळी स्वतःलाच न उमगणारी ओढही आहे. ‘पल भर में’ म्हणजे अक्षरशः काही क्षणांत घडलेला बदल, ज्याची ती स्वतःही उकल करू शकत नाही. हे नेमके काय झाले, का झाले, कसे झाले याची तिला स्पष्ट जाणीव नाही. पण काहीतरी कायमचे बदलून गेले आहे, हे मात्र तिच्या लक्षात येते.
इथे ‘पल भर में’ हा शब्द त्या क्षणिक, पण निर्णायक बदलाचे प्रतीक आहे. आयुष्यात असे काही क्षण असतात, जे येण्याआधी त्यांची कसलीही चाहूल लागत नाही, आपण त्यांची अपेक्षाही केलेली नसते. पण ते हळूवारपणे, पाऊल न वाजवता येतात आणि सगळे आसमंत, सगळे आयुष्यच बदलून टाकतात. माणसाची जीवनशैली, जीवनाकडे बघण्याची पद्धतच बदलून टाकतात.
मिनीला ही जाणीव होतेय की, ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. बाहेरून ती ‘ती’च आहे, पण आत काहीतरी बदललेले, ढवळलेले आहे. तिला माहितीय की, ती ‘ती’च आहे, पण तरीही ती ‘ती’ राहिलेली नाहीये. ‘वो मैं गई, वो मन गया’ असे म्हणताना, तिचे अस्तित्वच जणू दोन भागांत विभागले जाते. एक भाग वास्तवात वावरतो आहे, आणि दुसरा भाग त्या एका सुखद क्षणात, त्या भावनिक क्षणात कुठेतरी अडकून राहिला आहे.
या अंतर्गत द्वंद्वाला अमित खन्ना यांनी अतिशय साध्या पण अचूक शब्दांत मांडले आहे. कुठलाही शब्दबंबाळपणा नाही, नाटकीपणा नाही. ‘चुनरी’, ‘पवन’, ‘सावन’ या प्रतिमा फक्त निसर्गवर्णनासाठी नाहीत, तर नायिकेच्या मनःस्थितीचे सूचक आहेत. ‘चुनरी’ ही संकोच, स्त्रीत्व आणि अंतर्मुखतेचे प्रतीक आहे. ‘पवन’ म्हणजे अचानक आलेली जाणीव, मनाला लागलेली हलकीशी धक्का देणारी सुखाची चाहूल. ‘सावन’ म्हणजे भावनांचा ऋतू, जिथे आत दडलेले सगळे काही वर येते.
राजेश रोशन यांचे संगीत या भावनांना आणखी खोल नेते. कुठलाही भपका नाही, मोठे ऑर्केस्ट्रेशन नाही. संगीत मुद्दाम संयत, सौम्य ठेवलेले आहे. चाल हळूवार आहे, गती मध्यम आहे. त्यामुळे गाणे नाट्यमय न वाटता अधिक आतले, अधिक वैयक्तिक वाटते. ते जसे सौदामिनीच्या मनात घडते, तसेच आपल्यापर्यंत पोहोचते.
शास्त्रीय संगीताचे मला फारसे ज्ञान नाही, पण या गाण्यावर मांड रागाचा किंवा मांडसदृश लोकशैलीचा प्रभाव जाणवतो. गुजरात, राजस्थानच्या लोकजीवनात खुललेला, फुललेला हा राग सामान्य लोकजीवनाशी जोडलेला आहे. त्यामुळे तो थोडासा मुक्त आहे. कुठल्या घराण्याच्या चौकटीत बांधला गेलेला नाहीये. हा एक हलका, चंचल आणि भावनांनी भरलेला राग आहे, जो शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या सीमारेषा पुसून टाकत त्यांना एकत्र आणतो. त्यामुळे गाण्यातील भावना देखील बांधलेल्या नसून, हळूवारपणे वाहणाऱ्या वाटतात. ‘केसरीया बालमा…’ सारखी अनेक लोकप्रिय गीते मांड रागाचे प्रतिनिधित्व करतात.
‘पल भर में ये क्या हो गया’ हे गाणे मूलत: शृंगार रसात बांधलेले आहे. मात्र हा शृंगार उघड किंवा भौतिक नसून अंतर्मुख आणि मानसिक स्वरूपाचा आहे. नायिकेच्या मनात प्रेमाची जाणीव अचानक जागी झाली आहे, पण ती अजून निश्चित, स्थिर नाही. त्यामुळे हा शृंगार पूर्वराग अवस्थेतील आहे, जिथे आकर्षण, उत्सुकता आणि संकोच एकत्र नांदतात. चुनरी, पवन, सावन या प्रतिमा शृंगाराला अधोरेखित करतात, तर ‘वो मैं गई, वो मन गया’ या ओळीत आत्मभान हरपल्याची जाणीव दिसते. म्हणूनच, या शृंगारात विरहाची सौम्य छायाही मिसळलेली आहे. आनंद आहे, पण त्यावर संभ्रमाची किनार आहे. इथे रती हा स्थायी भाव असून त्याभोवती चंचलता आणि अस्वस्थता गुंफलेली जाणवते.
हेही वाचा – घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध
लतादिदींचा आवाज हा या गाण्याचा आत्मा आहे. त्यांच्या स्वरातली शालीन पारदर्शकता, प्रत्येक शब्दाच्या उच्चारात उतरलेली मिनीच्या मनातली अस्थिरता, चंचलता दर्शवणारी सूक्ष्म थरथर, कुठेही अतिरेक न करता नेमके आणि नेटके भाव पोहोचवण्याची दिदींच्या आवाजाच्या, सुरांच्या क्षमतेने या गाण्याला अमर करून टाकले आहे. हे गाणे गाताना लतादिदी लता मंगेशकर राहत नाही, त्या जणू स्वतःच सौदामिनी होऊन जातात. लतादीदींच्या आवाजातून आणि शबानाच्या चेहऱ्यावरील नितांतसुंदर, निरागस अशा हावभावामुळे हे गाणे ऐकताना, पाहताना जाणवत राहते की, इथे फक्त गाण्यातून भावना व्यक्त केल्या जात नाहीयेत, तर खरोखर अनुभवलेल्या जात आहेत. यात मनस्वी आनंद आहे, पण उच्छृंखलता नाही, अति उन्मुक्तता नाही. या नवीन जन्माला आलेल्या भावनेबद्दल मनात उत्सुकता आहे, पण त्याचबरोबर थोडीशी भीती आणि संभ्रमही आहे.
हे गाणे सौदामिनीच्या मानसिक अवस्थेशी थेट जोडलेले आहे. नरेनबरोबर घडलेल्या त्या एका क्षणानंतर तिचे आयुष्य बदलून जाणार आहे, याची तिला पूर्ण जाणीव नसली तरी एक अस्फुट चाहूल, एक अस्वस्थता मात्र आहे. त्या क्षणाने तिच्या मनात प्रश्नांची मालिकाच सुरू होते. गंमत म्हणजे, या गाण्यात त्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. उलट प्रश्न अधिक ठळक होतात. ‘ये क्या हो गया’ हा प्रश्न तिच्या मनात सतत घुमत राहतो.
या गाण्याचे खरे सौंदर्य त्याच्या अनिश्चिततेत आहे. कुठलाही ठाम निर्णय नाही, कुठलेही अंतिम विधान नाही. फक्त एक क्षण, जो आयुष्याची दिशा बदलतो. म्हणूनच ‘पल भर में ये क्या हो गया’ हे गाणे ऐकताना आपण फक्त एक गाणे ऐकत नाही. आपण एका संवेदनशील स्त्रीच्या मनात घडलेल्या त्या निर्णायक बदलाचे साक्षीदार होतो. कदाचित म्हणूनच इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही हे गाणे तितकेच जिवंत, तितकेच आपले वाटते. कारण, ते फक्त एका क्षणामुळे निर्माण झालेल्या बदलाची नव्हे, तर शाश्वत मानवी भावनांची गोष्ट सांगते.


