मुंबई हे शहर एखाद्या जुन्या, ढगांनी झाकलेल्या दीपस्तंभासारखे वाटते. दूरुन तेजस्वी, जवळ गेल्यावर गूढ, आणि स्पर्श केल्यावर कठोर! त्याच्या कुशीत एकाच वेळेस स्वप्नांचे झगमगते कण आणि निसटणाऱ्या आशांचे सावट मिसळलेले. त्याच्या गल्ल्यांतून चालताना माणूस जणू स्वतःच्या आकांक्षांवरच आदळतो; आणि त्या आदळण्याचा आवाजच इथे जीवनाचा नाद बनतो.
घरौंदा चित्रपटात मुंबई शहराचे दृश्य जेव्हा सुरू होते तेव्हा ते जणू एका अशरीरी दांडगटाची छाया वाटावी, तसे अंगावर येते. गिरण्यांच्या धुराड्यांतून उसळणारी राख, फूटपाथांवर झोपलेल्या कुटुंबांची स्वप्ने, समुद्रावर लोंबणाऱ्या कॅफेच्या दिव्यांचे प्रतिबिंब… या साऱ्यांतून मुंबईच्या क्रूर वास्तवाचा नाद कानात निनादत राहतो.
अशा या शहराच्या वाऱ्यात, 1977 साली ‘घरौंदा’ची ही कथा आकार घेते. माणसाच्या मनातील घराच्या आकांक्षेचा, नैतिकतेच्या सूक्ष्म ताणांचा आणि विफलतेच्या अनिवार्य ओघाचा हा एक न थांबवता येणारा, असहाय प्रवास आहे. सुदीपच्या साध्यासुध्या नजरेत एक आतूर, शांतपणे ओघळणारी कोमलता आहे; तर छायाच्या डोळ्यांत एखाद्या चंचल तरीही शांत सरितेची पारदर्शक लय सामावलेली आहे. झरीना वहाबचे निर्मळ डोळे आणि अमोल पालेकर यांचे संकोचलेले, पण निश्चयी व्यक्तिमत्त्व, या दोन सौम्य प्रवाहांना भीमसेन खुराणा (दिग्दर्शक) शहराच्या त्या विशाल विस्तारात अलगद सोडून देतात, आणि ते जिथे एकमेकांना अलगद मिळतात, तिथून सुरू होते एक दुर्दैवी प्रेमकहाणी, ‘घरोंदा’.
मुंबई शहराच्या अनाम गर्दीत, जिथे प्रत्येक चेहरा एखाद्या अपूर्ण स्वप्नाचा आराखडा मनातल्या मनात आरेखत, वरवर निश्चिंतपणाचा मुखवटा घालून फिरत असतो, तिथे सुदीप आणि छाया नावाचे हे दोन शांत जीव हलकेच थांबतात. जणू काही विश्वाच्या, काळाच्या, अतिशय वेगाने धावणाऱ्या घड्याळात क्षणभरासाठी कुणीतरी एक शांत श्वास घ्यावा. त्या ओझरत्या क्षणात जणू काही सतत धावणारा काळ स्वतःच जरासा विसावा शोधतो.
सुदीप आणि छायेची पहिली भेट, म्हणजे दोन अनामिक प्रवाहांचे शांत मिलन. दोघेही साधे, बऱ्याच बाबतीत दोघेही बरेचसे अपूर्ण, पण एकमेकांच्या सहवासात पूर्ण वाटू लागतात. या प्रसन्न शांततेत उमलतं ‘दो दीवाने शहर में…’
हे गाणे जणू त्या क्षणाची फुलपाखरी सावली आहे. मुंबई शहराच्या, वास्तवाच्या भिंती क्षणभर मोडून पडतात आणि हातात फक्त आकाश भरून राहते. प्रेम हा इथे फक्त नात्यांचा एक आवाज नाही; ते एक मंद, स्निग्ध, शुभ्र असे प्रकाशपुंज आहे, जे वास्तवाच्या करड्या दगडांवरून घसरत, ओघळत त्यांच्या दिशेने येते.
हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!
गुलजार यांच्या काव्यातून जन्मलेलं ते निर्मळ प्रेम, ज्याला कुठल्याही अभिव्यक्तीची गरज नाहीये. फक्त एकमेकांत मिसळलेल्या दोन नजरा आणि एकमेकांबरोबर टाकलेल्या दोन पावलांचा मंद ताल, एकमेकांत गुंतलेले दोन हात आणि परस्परांवरती असलेले प्रेम, विश्वास…
गिरण्यांच्या, मिलच्या धुराड्यांनी काळोखलेल्या आकाशाखाली, कॅमेऱ्याच्या नजरेतून शहर उलगडत असताना हे दोघे भेटतात ते एका कार्यालयातील दोन सामान्य कर्मचारी म्हणून. पण प्रेमाला परिचयाची गरज नसते; ते अचानक होतं, सहज येतं आणि येताना मनाच्या आत साचलेल्या निःशब्द पाण्यावर हलकंसं चांदणं पसरवून टाकतं.
भीमसेन खुराणा आणि जयदेव हे दोघेही अतिशय प्रतिभाशाली कलावंत. भीमसेन अतिशय साध्या साध्या घटना आणि गोष्टीतून सुदीप आणि छायाची ही आगळीवेगळी प्रेमकथा साकारत नेतात. त्यांचं प्रेम कुठल्याही ब्रेकिंग न्यूजप्रमाणे येणाऱ्या मोठ्या घटनांमधून जन्मत नाही. ते लहान, लहान तुकड्यांतून, शेवटी आठवणीतही न राहणाऱ्या अंतराळांतून पसरत जातं. वाटेतल्या एका वळणावर तिने सहज केलेलं लाजरं स्मित, पावसात भिजू नये म्हणून एकमेकांच्या जवळ आलेली दोन छत्रींची सावली, ऑफिसच्या गोंधळात एक जरा जास्त क्षण थांबलेली नजर… हे क्षण बहुतेकांना नगण्य वाटतील, पण ज्यांच्यावर ते येऊन थांबतात, त्यांच्यासाठी ते आयुष्याच्या उष्ण ग्रीष्मानंतर अलवार पडणाऱ्या पावसाच्या पहिल्या थेंबासारखे असतात… या मनोहर, मधुर शांततेचं संगीत देणारं गाणं म्हणजे ‘दो दीवाने शहर में…’
शहराच्या कठोर लोखंडी वास्तवात उमलणाऱ्या एका नाजूक स्वप्नाचं स्वरूप. परंतु प्रेमाच्या या प्रकाशात क्रूर वास्तवाच्या, निर्दय शहराच्या, परिस्थितीच्या, आणि काळाच्या सावल्या आपल्याला जागोजागी भेटत राहतात. या प्रेमावर पहिली क्रूर छाया पडते, ती त्यांच्या बॉसच्या, मोदींच्या नजरेतून! पण तरीही इथे मोदी हे खलनायक नाहीयेत. डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा म्हणजे माणसाच्या एकटेपणाची एक थकलेली, किंचित विकृत अशी छाया आहे. छायाच्या (झरीना वहाब) चेहऱ्यात मोदींच्या मृत पत्नीशी साधर्म्य आहे आणि या साधर्म्यातून जन्माला येते एक स्वार्थी, पण मानवी, वेदनादायी ओढ. त्याच्या दृष्टीने छाया ही फक्त कर्मचारी नाहीये. ती त्याच्या रिकामेपणाच्या भावनेत, एकटेपणाच्या खोल दरीत अचानक उमटलेली जणू काही विस्मृतीत गेलेली एक ओळखीची प्रतिमा आहे.
याच दरम्यान, सुदीप आणि छाया आपल्या छोट्याशा घराचं स्वप्न पाहू लागतात. त्यांच्यासाठी घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत तर, त्यांच्या सोबत चालणाऱ्या भविष्याचं सुरक्षित, आश्वासक कवच आहे. पण स्वप्नांच्या पंखाखालची हवा जास्त काळ टिकत नाही. कितीही प्रेम असलं तरी घर शोधताना माणूस स्वतःलाही हरवून बसतो. बिल्डरकडून फसवणूक, वाढते कर्ज, आणि जगण्याचा सापळा… हे सारे हळूहळू प्रेमाच्या निरागसतेवर धुळीसारखे साचू लागते. मुंबई हे शहर स्वप्नांना आकार देण्याआधी त्यांना कसोटीवर घासून पाहतं.
एक बिल्डर त्यांची फसवणूक करतो. दिलेली रक्कम बुडते. भविष्यातील सुखस्वप्नांचा मिणमिणता दिवा त्या एका क्षणात विझून जातो आणि या निराशेच्या काळोखात सुदीपच्या मनात एक क्रूर, पण या शहराच्या वास्तवातूनच जन्मलेला विचार उमटतो. छायाने मोदींशी लग्न करावं. ते वृद्ध आहे, आजारी आहे; असे किती दिवस जगतील? आणि एकदा का ते…, की मग ते दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतील.
जगातील सर्वात पवित्र भावना मानलं गेलेलं प्रेम कधी कधी इतक्या कठोर रूपात का बरं आणि कशामुळे बदलत असेल बरं?
कारण… जगण्याची चिंता जेव्हा छातीवर एखाद्या वजनदार दगडासारखी येऊन बसते ना, तेव्हा मनातील नाजूक भावना देखील स्वतःच्या रक्षणासाठी कधी कधी अतिशय निर्दयी बनून जातात.
प्रेम की जबाबदारी, प्रेम की कर्तव्य या द्वंद्वात अडकलेली छाया, तिच्या भावाच्या शिक्षणासाठी, त्याच्या भविष्यासाठी आणि कदाचित या शहराने, इथल्या क्रूर अनुभवांनी दिलेल्या वास्तववादी शिकवणीमुळे आतून कठोर होत, मोदीशी लग्न करण्याचा निर्णय घेते.
झरीना वहाब ही इतकी गुणी अभिनेत्री, पण तिच्या गुणांचे इथे हवे तितके चीज झाले नाही, असे मला वारंवार वाटत असते आणि चितचोर, घरौंदा, अगदी सुरुवातीचा तिचा दस्तक हे चित्रपट पाहताना तर ही जाणीव फार प्रखरतेने होत राहते. सुदीपची प्रिया असलेली छाया आणि मोदींची पत्नी बनण्याचा निर्णय घेतल्यानंतरची छाया, या दोन सर्वस्वी भिन्न स्त्रिया वाटाव्यात इतका सहज सुंदर आणि ताकदीचा अभिनय इथे झरीनाने केलेला आहे. तिच्या डोळ्यांत आता आधीचा नदीचा नितळपणा दिसत नाही. त्या उलट तिथे समुद्राची खोल निःशब्दता आढळते. शेवटी मोदींची पत्नी म्हणून स्वतःला स्वीकारलेली छाया सुदीपला सांगते, “मैंने तुम्हें छोडा, क्योंकी तुम पहले से ही टूट चुके थे, तुम मेरे वो सुदीप नहीं हो, जिससे मैंने कभी खुद से भी ज्यादा चाहा था!”
हे शब्द उच्चारताना तिच्या चेहऱ्यावरची वेदना आपल्याला हलवून जाते, पण ते उच्चारण्याशिवाय तिच्याकडे दुसरा मार्गच शिल्लक नाहीये. ज्याच्या भरवशावर ती या क्रूर, कठोर विश्वाचा सामना करायला निघाली होती, तो तिचा जोडीदार अगदीच तकलादू, दुर्बल निघालेला आहे. नियतीच्या एका छोट्याशा फटक्याने तो कोलमडून पडलेला आहे… आणि या वेळी उमटतं ‘एक अकेला इस शहर में…’
पूर्वी दोघे ज्या ओव्हरब्रिजवर स्वप्नांचे इमले उभे करायचे, तोच आता त्यांच्यातल्या दुराव्याचं प्रतीक बनून जातो. दोन पावले, जी एकेकाळी एकमेकांच्या तालात चालायची, ती आता दोन विरुद्ध दिशांनी निघून जातात. प्रेमाचा गुलाबीसर, आश्वासक प्रकाश विरळ होत जाऊन क्रूर वास्तवाच्या, त्या निर्दयी शहराच्या असह्य राखाडीपणात हरवत जातो.
वर म्हटल्याप्रमाणे या प्रेमकथेत कुणीच खलनायक नाहीये. ना मोदी, ना परिस्थिती. इथे खलनायक म्हणजे मुंबई, ते क्रूर शहर जिथे जगण्यासाठी तडजोडींचा कर लावला जातो आणि कधी कधी त्या तडजोडीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुदीप शहर सोडण्याचा विचार करतो, पण पुन्हा परत देखील येतो. कारण या शहरातून पळून जाणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नांपासून पलायन करणं. तो परततो, पण विजयाच्या गर्वाने किंवा अति आत्मविश्वासाने नाही, तर “पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करू” या नम्र धैर्याने.
शेवटी आपल्याला दिसते एक आकृती. उंच इमारतींच्या सावल्यांमध्ये उभा असलेला सुदीप… जणू त्या कठोर शहराला न जुमानता पुन्हा उभं राहण्याची प्रतिज्ञा करत! त्याच्या या शांत उभारीतच मुंबईचे खरे ‘स्पिरिट’ दडलेले आहे. ही भावना विजयाची नाहीये, तर पुन्हा पुन्हा पडून, धडपडूनही पुन्हा आशेने उठण्याची, संघर्षरत राहण्याची ती जिद्द, जगण्याची ती आशा आहे.
जयदेव हे हिंदी चित्रपटसृष्टीतील शांत, कमालीचे सूक्ष्म मुद्देही आपल्या संगीतातून समर्थपणे मांडणारे, नोंदवणारे संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे संगीत कधीच मोठ्याने बोलत नाही; ते जाणकाराच्या कानात हळूच कुजबुजते. या चित्रपटाच्या संगीतातही त्यांनी शहरी जीवनाच्या कोरडेपणाला मधुरतेचा हलका ओघ देत आशावादाचे संगीत उभे केले आहे. हलके उतार, मधुर आरोह-अवरोह आणि शब्दांशी जुळणाऱ्या सुरांची कोमलता, हे सर्व मिळून घरौंदाच्या संगीतातून एक अतिशय सजीव, जवळजवळ लोकसंगीतासारखे मऊ वातावरण जयदेवांनी उभे केलेले आहे.
हेही वाचा – सलग 131 डॉट बॉल्स…
जाता जाता, भीमसेन खुराणा यांचे अतिशय सहज सुंदर, उगाच भव्यतेच्या मोहात न पडणारे, साध्या साध्या गोष्टीतून, छोट्या छोट्या प्रसंगांतून सगळ्या चित्रपटाचा आलेख मांडणारे प्रभावी आणि ताकदीचे दिग्दर्शन आणि अर्थातच ‘द गुलजार’ यांच्या लेखणीतून उमटलेले कधी प्रेमाची सार्थकता तर कधी विफलता, कधी वास्तवाची आश्वासकता तर कधी त्याची क्रूरता स्पष्ट करणारे कधी कमालीचे स्निग्ध तरी कधी अतिशय टोकदार शब्द हा या चित्रपटाच्या सामर्थ्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
घरौंदा ही कथा फक्त प्रेमाची नाही, तर स्वप्नांची आहे, जी कधी कधी इतकी नाजूक असतात की, शहराच्या दगडी वास्तवात तुटून, कोलमडून जातात आणि कधी कधी ती इतकी जिद्दी असतात की, पुन्हा स्वतःला उभं करतात. घरोंदाची ही कथा सांगते की, घर शोधताना आपण स्वतःलाच शोधत असतो आणि हरवतही असतो, पुन्हा पुन्हा शोधतही असतो. हा निरंतर शोध घराचा नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा, आत्मबोधाचा आहे.
चित्रपट परिचय
चित्रपट : घरोंदा
दिग्दर्शक : भीमसेन खुराणा
संगीतकार : जयदेव
गीतकार : गुलजार
कलावंत : अमोल पालेकर, झरीना वहाब, श्रीराम लागू आणि मुंबई!


