“अरे वरुण, आई कुठेच दिसत नाहीये! कुठे गेली सकाळी सकाळी? खोलीत नाहीये… आणि इकडे पण दिसत नाहीये…” महेंद्र विचारत होता.
तेवढ्यात वरुण पण चिडक्या स्वरात म्हणतो, “ओ डॅड, मला वाटलं तुम्हाला तरी माहिती असेल. म्हणून तुम्ही खोलीतून बाहेर यायची वाट बघत होतो. जाऊदे. तुम्ही नाश्ता घ्या करून. मी आत्ताच गरम करून खाऊन घेतला.”
यावर महेंद्र डोळे वटारून विचारतो, “बापरे! तू केलास नाश्ता? नको मग मला.”
तेवढ्यात अंगणातली फुलं गोळा करून कमलाबाई आल्या. त्याही त्यांच्या तार स्वरात म्हणाल्या, “अरे नाही रे, त्याने नाही, मी बनवला आहे नाश्ता. आपल्याकडे पुरुष माणसं कुठे जातात स्वयंपाकघरात. तो तरी कसा जाईल. मला रात्री उशिरापर्यंत झोपच नव्हती. पण नंतर जरा डोळा लागला. तरी या वयात कुठे जास्त झोप यायला. लवकर जाग आली. म्हणून उठले तर सूनबाई घरात नाहीत. म्हणून थोडा वेळ वाट बघून मीच बनवला चहा, नाश्ता. कुठे गेली कुठे, ही भटकी उंडारायला सकाळी सकाळी कोण जाणे!”
महेंद्र शिर्के आणि मानिनी शिर्के यांच्या तथाकथित सुखी संसारात आज काहीतरी वेगळं घडलं होतं. मानिनी घरात कुठेच नव्हती. 24 वर्षांपूर्वी मानिनी लग्न करून या घरात आली आणि सगळं घर तिने आपलं करून टाकलं. मानिनी खरंतर संगीत विषय घेऊन एम्. ए. झाली होती. शाळेत नोकरी करत होती. पण लग्न झालं आणि वर्षभरात वरुणसाठी दिवस राहिले तेव्हाच सासूबाईंनी ठणकावून सांगून टाकलं. “तुम्ही तुमचं कुटुंब वाढवत आहात, ते उत्तमच आहे. पण मला काही बाळाला सांभाळायला जमणार नाही. तुझे सासरे पार्किन्सनच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि मला त्यांच्यामुळे खूप अडकून पडायला होतंय. त्यामुळे त्यात भरीस भर म्हणून मी तुमचं बाळ नाही सांभाळणार. शिवाय, बाळाला पाळणाघरात ठेवलेलं महेंद्रला अजिबात चालणार नाही.”
हे ऐकल्यावर मानिनीला आश्चर्य वाटलं. यांना काय करायला लागतंय. सगळ्या कामांसाठी तर वेगवेगळ्या बाई येतात. यांना करायला नको होतं म्हणून अण्णांसाठी चोवीस तासासाठी बारा-बारा ताशी अशी ब्युरोची माणसं तितकीशी परवडत नसतानाही ठेवली आहेत. तसंही लग्न झालं, तेव्हा यांना मी नोकरी केलेली नकोच होती. विद्यादान हेच माझ्यासाठी श्रेष्ठ दान आहे. मी उगीच का विशारद शिकले आहे. त्यात संगीत म्हणजे आत्माच! मुलांना गाणं शिकवणं मला खूप आवडतं. पण छ्या. मी घरी बसावं हेच तर यांना हवं होतं. तेव्हा तब्येत चांगली होती म्हणून अण्णा माझ्या पाठीशी भक्कम उभे होते. नाहीतर, या मायलेकाने मला नोकरी सोड, असाच सल्ला दिला होता. महेंद्र पण इतक्या पुरातन विचारांचे आहेत माहिती असतं तर…
हेही वाचा – गुलकंद
तरीही कालांतराने मानिनीने नोकरीवर स्वतःच्या मुलासाठी पाणी सोडलंच. काय करणार आईच ती शेवटी! शिवाय, कमलाबाई स्वतःच्या मुलाचा पुरुषी अहंकार पाळणाऱ्या आणि मानिनी काहीही न बोलणारी अबोल कळी. पण तिने मात्र नोकरी सोडल्यावर आनंदाने घरासाठी झोकून दिलं. वरुण, सासूबाई आणि अण्णांसाठी खूप केलं. अण्णांना याची पूर्ण कल्पना होती. त्यांना मानिनीसाठी खूप वाईट वाटायचं. पण कमलाबाईंच्या हेकेखोर स्वभावापुढे ते काहीच करू शकले नाहीत. त्यांना मानिनीचा खूप लळा होता. इतका की, शेवटी अण्णा तिच्याच हातून पाणी पिऊन कैलासवासी झाले.
सर्वांचं काय कमी केलं आपण! स्वतःसाठी काहीही केलं नाही, कायम यांच्यासाठी झटलो. सासूबाईंना सदैव त्यांचे सीनिअर सिटिझन कट्टा, पेन्शनर कट्टा सगळीकडचे कार्यक्रम पार पडू दिले. एवढं असूनही परवा वरुणने तर मोठाच धक्का दिला… हे सगळे विचार मानिनी भर दुपारी करत असतानाच रिक्षावाल्याने हाक दिली, “ताई तुमची बिल्डिंग आली. इथेच जायचं होतं ना तुम्हाला?”
मनिनीला उतरताना सासूबाईंनी खिडकीतून बघितलं आणि त्यांचं पित्त खवळलं. तिने घरात पाऊल टाकताच कमलाबाईंनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. पण आज ती शांत होती. एरवी तिला जरा जरी मार्केटमधून यायला उशीर झाला आणि सासूबाई वगैरे कुणी तिला बोललं, तर ती भांबावून जात होती. पण आज ती निश्चल होती…
“मानिनी, अगं मी तुझ्याशी बोलतेय. दुपार झाली आत्ता उगवतेयस. दोघेही डबा न घेता तसेच गेले बिचारे.”
मानिनी काहीही न बोलता तिथून गेली. कमलाबाईंना काही कळेचना… पण आज मानिनीचा नूर काहीतरी वेगळाच आहे, असं वाटून त्या गप्पच बसल्या. संध्याकाळी मानिनीने सगळा स्वयंपाक केला आणि ती महेंद्रची येण्याची वाट बघत बसली. रात्री सगळ्यांची जेवणं झाली आणि तिने सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलावलं. वरुण तसा चिडचिड करतच बसला.
मानिनी शांतपणे सगळ्यांच्या समोर येऊन सोफ्यावर बसली.
“मम्मा, बोल पटापट. मला ऑफिसचं काम आहे, ते पूर्ण करून लवकर झोपायचं आहे…”
त्यावर मानिनी वरुणवर एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली, “मी फक्त सगळ्यांची पाच मिनिटं मागितली आहेत. आईला देण्यासाठी तुझ्याकडे आता तीही नसतील तर तू जाऊ शकतोस. पण नंतर पुन्हा मला याविषयी चर्चा करायची नाहीये. मी काही निर्णय घेतलेत, ते मला सांगायचे आहेत. तुला नसतील ऐकायचे तर, तुझी इच्छा! तसंही तुला कधी फरक पडत होता माझ्या काही बोलण्याचा… इतकंच काय माझ्या असण्यानसण्याची तरी कधी दखल घेतलीस तू?”
आता मात्र सगळे एकमेकांकडे बघून गपगार झाले. महेंद्र तिच्याकडे बघून म्हणाला, “काय झालं आहे मानिनी. अशी का वागते, बोलते आहेस आज? आईचा तरी विचार करून सकाळी सगळं करून जायचं ना, तुला कुठे जायचं तिथे!”
मानिनी थोडं स्मित करत म्हणाली, “महेंद्र मी इतकी वर्ष तेच करतेय. पण जे मी आज केलं ते मी केव्हाच करायला हवं होतं. खूप वर्षांनी सुचलं हेच नवल आहे… आणि सासूबाईंचं, तुमचं ऐकण्यातच माझी सगळी हयात गेली. तरीही मी गप्प राहिले. पण परवा मात्र डोक्यावरून पाणी गेलं. ज्या मुलाला मी कळा सोसून जन्म दिला, तो लहान असताना सारखा आजारी असायचा, तेव्हा दिवस-रात्र त्याच्या उशाशी बसून राहिले, इतकंच काय अहो मी माझी नोकरी सोडून दिली, या माझ्या पोटच्या गोळ्यासाठी… बाकी कशाचा तर हिशोब कुठलीच आई करत नाही, तसा मीही करणार नाही. कारण तो माझ्या आईपणाचा अपमान होईल. आता त्या माझ्या पोटच्या गोळ्याला ‘आई’ या शब्दाशी काही देणं-घेणं नाहीये. त्यामुळे आईची आता ‘मम्मा’ झाली आहे. पण परवा त्याने सरळ सांगून टाकलं की, ‘मी माझं लग्न ठरवलं आहे. आमचं शिक्षण झालं की, आम्ही लग्न करणार आहोत.’ तरीही माझी हरकत नाहीये. प्रेमविवाह करण्यात काहीच गैर नाही. पण त्यानंतरचे शब्द माझ्या मनावर कोरले गेलेत. तो म्हणाला की, त्यासाठी त्याला तुमची म्हणजे त्याच्या ‘डॅड’च्या अनुमतीची गरज आहे, ‘माझ्या’ नाही. मी त्याला विचारलं की, “मलाही बघायची आहे माझी सून. ती माझ्या ‘सून’ या संकल्पनेत बसते की नाही, ते मलाही बघूदे. माझी सून कशी असावी, याबाबतीत माझीपण काही स्वप्न आहेत.” तर चक्क वरुण मला म्हणाला, “तू बघून काय होणार? असंही तुला कोण विचारतंय की, तुला कशी वाटली. आपल्याकडे सगळं बाबा आणि आजीच तर ठरवतात!” असं म्हणून मनिनीच्या डोळ्यात पाणी आलं.
त्यावर वरुण म्हणाला, “ओके. सॉरी तुला काही विचित्र वाटलं असेल तर. पण जे आहे ते आहेच ना.”
मानिनी डोळे पुसून म्हणाली, “हो तुझं बरोबर आहे. यासाठीच मी तुला धन्यवाद देते, की तू माझे डोळे उघडलेस. मला माझी या घरातली किंमत कळली. इतकी वर्ष मी या घरासाठी राबले. अण्णा होते तेव्हा जरा तरी उमेद असायची. नाहीतर, कधीही कुणाचा प्रेमाचा साधा शब्द नाही. मी नोकरी करणारी मुलगी होते, स्वतः च्या पायावर उभी होते. पण तीही या घरातल्या पुरुषी मनोवृत्तीमुळे मी सोडली. खरंतर, सासूबाईंनी मला एक स्त्री म्हणून त्यावेळी पाठिंबा द्यायला हवा होता, पण त्याही जमवून घ्यायला त्यावेळी आणि आत्ताही तयार नाहीत. साधं त्यांनी मला ‘आई’ म्हणू नकोस ‘सासू’ आहे तर ‘सासूबाई’च म्हण म्हणून सांगितलं. कितीही काहीही केलं तरी, त्यांचं मन कधी द्रवलंच नाही. लग्नाला 25 वर्षं होत आली तरी, त्यांनी मला आपलंसं केलं नाही… आणि मी मात्र सारखं माझं घर, माझी माणसं म्हणून करत राहिले.”
“महेंद्र तुम्हीसुद्धा मला फक्त एक मोलकरीण, उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं. कधी प्रेमाने वागवलं नाही, कधी साडी वगैरे तर सोडाच पण साधा गजराही नाही हो आणलात! मग जिथे मला बायको म्हणून किंमत नाही, तिथे मुलगा आई म्हणून काय किंमत देणार? आणि म्हणूनच मी आज सकाळी सकाळीच माझ्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीकडे शिवानीकडे गेले होते. ती मला परवाच म्हणाली की, ती एका सहलीला जाणार आहे, जी फक्त बायकांचीच आहे. तिने मलाही बोलावलं आणि मी आज जाऊन तिला हो म्हणालेही! एवढंच काय आज तिच्यासोबत 10.30 वाजता त्या टूर कंपनीत गेले होते आणि तिथे लेडीज स्पेशल आठ दिवसांच्या टूरसाठी पैसे भरूनही आले आहे. पुढच्या महिन्यात ती टूर आहे…”
हेही वाचा – बेटर हाफ
“मी आजपर्यंत सगळं मनापासून केलं आहे. मला काहीही म्हणायचं नाही, इतर कुठलीही तक्रार नाही. मी एक दिवस नव्हे, फक्त अर्धा दिवस घरात नव्हते, तर तुमची चिडचिड झाली. मग विचार करा, तुम्ही मला जे वागवता, जे अपमान करता, त्यामुळे माझी किती चिडचिड झाली पाहिजे. पण कधी केली का धुसफूस. या पुढेही करणार नाही. फक्त इतकंच म्हणणं आहे की, निदान कधीतरी चार कौतुकाचे शब्द म्हणा. ते चार शब्द चार हत्तींच बळ देतात…”
“आई, मी अण्णांचं सगळं केलं. तसंच तुमचंही करेन. फक्त मला थोडी माझी स्पेस द्या. मला कधी कुठे जावं वाटलं, तर निदान आतातरी मला मोकळीक द्या… आणि वरुण तुला माझ्यावर विश्वास नसला तरी माझा तुझ्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे. तुझी बायको आली की, सगळा कारभार तिच्याकडे देणार आणि पूर्णतः मोकळी होणार. आता कुठल्याही पाशात अडकायचं नाही, असं ठरवलं आहे. मी एका महिलाश्रमात जाऊन तिथल्या महिलांना गाणं, पेटी वाजवणं शिकवणार आहे. अनाथाश्रमात पण विचारलं आहे शिकवण्यासंदर्भात… तिथेही जाईन. आता त्यांना आनंद देणार आणि स्वतःही त्यातूनच आनंद घेणार… पण सध्या तरी सगळ्यात पहिले माझी ट्रीप!”
मानिनी आता ठामपणे सांगत होती. तिच्या नावाप्रमाणे मानाने जगायला ती तत्पर होती आणि घरातले सगळे मात्र अवाक् होऊन बघत होते. सगळ्यांना खरंतर आपली चूक कळत होती. पण कुणीच ती मान्य करायला तयार नव्हते आणि आता तर मानिनीनेच त्यांच्या मताला तेवढी किंमत दिली नव्हती. त्यांना काय वाटतंय, याचा ती सध्या तरी विचार करणार नव्हती. ती सगळे तिचे निर्णय घेऊन मोकळी झाली होती. ‘लेडीज स्पेशल’ ट्रीपची तयारी करायला तत्पर होती. या ट्रिपमधूनच नव्या आणि वेगवेगळ्या मैत्रिणी जोडायला ती उत्सुक होती. एक वेगळं आणि मोकळं आयुष्य जगायला सज्ज झाली होती. आयुष्यातल्या येणाऱ्या नव्या वळणाला प्रचंड उमेदीने सामोरी जाणार होती.
आता तिच्या मनात एकच होतं,
“तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, पर्वा बी कुनाची…”


