Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आंधळा मागतो एक डोळा…

    June 2, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
    अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    Team AvaantarBy Team AvaantarJune 2, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, संस्कार, गर्भसंस्कार, मातीच्या गोळ्याला आकार, संस्कार म्हणजे काय, संस्काराचा अर्थ, चुका सुधारण्याची संधी, गुणांचे वर्धापन, दोषांचे निर्मूलन करणे , दुर्गुणांचे निर्मूलन करणे, नवं ते हवं
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुरेखा मोंडकर

    ‘लहान मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा; आकार द्यावा तसा देता येतो,’ एका प्रतिभावान लेखकाने आपल्या सुप्रसिद्ध नाटकातील व्यक्तिरेखेच्या तोंडी दिलेलं हे वाक्य एखाद्या शिलालेखाप्रमाणे सर्वमान्य झालं. बरंचसं तथ्य आहे यात. पण प्रत्येक मातीच्या गोळ्याचा गणपती नाही घडवता येत. गणपती तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची, काही खास गुणधर्म असणारीच माती लागते. पण म्हणून काही त्या व्यतिरिक्त असणारी माती बिनकामाची असते; वाया जाते असं नाही. रांजण, पणती, वीट असे कितीतरी आकर्षक मनोवेधक प्रकार घडवता येतील… बगिचा फुलवता येईल. फक्त त्या घडविणाऱ्या हातांमध्ये कला हवी, बुद्धीमध्ये कल्पकता आणि हृदयात हवं प्रेम, अपार विश्वास त्या ओल्या मातीच्या गोळ्याबद्दल! गणपतीच झाला पाहिजे, हा हव्यास फक्त नातं बिघडवेल!

    संस्कार या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे, अर्थ व्यापक आहे. आपण रूढार्थाने व्यवहारात जो शब्द वापरतो त्यानुसार साधारणपणे असं म्हणता येईल की, ‘योग्य अयोग्य काय आहे, ते सांगणे, चुकल्यास दुरुस्त करणे – कृतीने किंवा संवादाने! चुका सुधारण्याची संधी देणे, गुणांचे वर्धापन आणि दोषांचे, दुर्गुणांचे निर्मूलन करणे, निदान त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे संस्कारांचा मुक्काम गाठण्याची मार्गक्रमणा आहे. या रस्त्याने चालताना हे लक्षात ठेवायला हवं की, त्या विशिष्ट दुर्गुणाचा आपल्याला तिटकारा आहे; त्या संपूर्ण व्यक्तीचा नाही.

    संपूर्ण पांढरा कागद म्हणजे चित्र होत नाही. त्यावर विविध रंग लिंपल्यावर चित्र तयार होतं. माणसाचं पण तसंच आहे. संपूर्ण गुणांनी भारलेला माणूस नसतो. प्रत्येक माणसात गुण दोषांचं अनाकलनीय असं मिश्रण असतं. त्यात गुण जास्त असावेत आणि दुर्गुण कमी असावेत ही सुसंस्कारांकडून अपेक्षा. सर्वगुणसंपन्न व्यक्ती अशक्यप्राय आहे. मुल अनुकरणशील असतं, टिपकागदासारखं असतं; त्याच्या आजूबाजूला जे घडत असतं त्याला जीवनात जे अनुभवायला मिळतं किंवा भोगावं लागतं त्यातून ते व्यक्ती म्हणून घडत जातं. म्हणूनच ज्येष्ठ पांडव, सूर्यपुत्र असूनही महारथी कर्ण इतर पांडवांपेक्षा वेगळा.

    हेही वाचा – संस्कार आणि स्त्रिया

    मुल गर्भात असल्यापासून ते संस्कार टिपत असतं. म्हणूनच आपण गर्भवतीला आनंदी ठेवायला धडपडतो. तिने पौष्टिक खावं-प्यावं, दर्जेदार वाचावं, संगीत ऐकावं, विविध कलांचा आस्वाद घ्यावा… एकंदरीत प्रसन्न आणि अभिरुचीसंपन्न असावं हा प्रयत्न करतो. उत्तरेच्या पोटात असतानाच चक्रव्यूहात शिरण्याचं ज्ञान मिळवणारा अभिमन्यू आपल्या कायम लक्षात असतो. मुल लहान असताना सर्वात जास्त संस्कारक्षम असतं, हे खरं आहे; पण इच्छा असल्यास कोणत्याही वयात आपल्याला स्वप्रयत्नाने संस्कारित बनता येतं. शिकवून येत नाही, त्यासाठी आतून शिकायची एक तीव्र उर्मी लागते.

    लहान मुलांची ग्रहणशक्ती उत्तम असते म्हणून ते पटापट चांगलं वाईट, जे मिळेल ते टिपत जातं. त्याला नाविन्याचीपण हौस असते. ‘नवं ते हवं’ या वृत्तीतूनच ते शिव्या पण शिकतं. आता चाळीशीत असणारा माझा मुलगा कधीही, कितीही चिडलेला, रागावलेला असतानाही, अगदी गाडी चालवतानाही शिव्या देत नाही. त्याबद्दल त्याचं कौतुक करत होते. तेव्हा तो म्हणाला, “तुला आठवतंय मी लहान असताना एक खूप घाणेरडी शिवी द्यायचो. तेव्हा, हा वाईट शब्द आहे… याला शिवी म्हणतात आणि तो बोलताना वापरायचा नसतो, हे तू मला दोन-चारदा सांगितलं होतंस. पण मी ती शिवी द्यायचोच. एकदा मी शिवी दिल्यावर तू पण त्याच स्वरात, तेवढ्याच रागाने ती शिवी उच्चारलीस! मी सर्द झालो, तेव्हा मला कळलं ऐकणाऱ्याला शिवी किती भयानकरित्या खुपते आणि शिव्या देणारी व्यक्ती किती विद्रूप वाटते,  नजरेतून किती उतरते. तेव्हापासून मी कधीच शिव्या दिल्या नाहीत.”

    हा प्रसंग घडला तेव्हा मुलगा ज्युनिअर केजीला होता. त्यानंतर त्याला मी हे देखील सांगितलं होतं की, “शिव्या मला पण माहिती आहेत. पण त्या वापरायच्या नसतात हे देखील मला माहिती आहे.” मुलांना चांगल्या गोष्टी वाईट, क्रूर पद्धतीने सांगायला जाऊ नये, त्यांना मारून, बडवून, ओरडून चांगलं कसं सांगता येणार? तेव्हा ते मुल ऐकण्याच्या मन:स्थितीत नसणार, ना स्वबचाव करीत असणार! आपल्या धाकामुळे जबरदस्तीने ते ऐकेल सुद्धा पण ज्या वयाला तो आपल्या वर्चस्वातून बाहेर पडेल, तेव्हा हे सर्व लादलेले संस्कार झुगारून देईल.

    आणखीन एक मजा आहे, मुल कुठून काय शिकेल, ते सांगता येत नाही. अमेरिकेत जन्मलेल्या, मराठी बोलायला जरा अवघडणाऱ्या माझ्या अडीच वर्षांच्या नातवाने Washington DC  International airport वर दणदणीत स्वरात “आयचा घो!” असं म्हणून आम्हा सर्वांना आ वासायला लावला होता. आम्ही शोध घेतल्यावर लक्षात आलं की, तो भारतात असताना टीव्हीवर, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हा चित्रपट आम्ही पाहिला होता, तेव्हा तोही आजूबाजूलाच होता.

    व्यक्ती जरा चुकीचं वागली तर फटकन, प्रतिक्षिप्त क्रियेसारखं (Reflex Action) त्याला विचारलं जातं, “हेच शिकवलं का तुला आई बापाने?/ शाळेत हेच शिकवतात का?” लहान मुलांना असे विचारणारी मोठी माणसं कितपत संस्कारित मानायची?  किंवा असंही होतं की, मुल काही अयोग्य वागलं तर पालक स्वत:ला दोष देतात… आपल्या पालकत्वात कुठे कमतरता राहिली, पालक म्हणून आपण कुठे चुकलो, पालक म्हणून आपण नालायक आहोत… असा अपराधभाव बाळगतात. ‘हेचि फल काय मम तपाला’ असं म्हणून हताश होतात.

    हल्ली आई-वडील दोघेही नोकरी करीत असतील तर, मुल इतक्या विविध वातावरणात वाढत असतं की, सतत बदलत्या परिस्थितीला, वातावरणाला, समस्यांना, ताणतणावांना तोंड देता-देता, ते पण थकत असतं, गोंधळून जात असतं. पालकांनी आत्मपरीक्षण जरूर करावं, पण अपराधगंड बाळगून नैराश्याची वाट चालू नये. आपण जे आपल्या वागणुकीतून संस्कार देत असतो, ते सर्वार्थाने उचलायला प्रत्येक मुल सक्षम असेल असं नाही. प्रत्येकाची ग्रहणशक्ती, आकलनशक्ती, दृष्टिकोन वेगळा अन् त्यानुसारच ते स्वीकारणार. आपण आपली सहनशक्ती शाबूत ठेवून पेरत जायचं. कुठेना कुठे, कधीना कधी, काहीना काही उगवणारच! फुकट काही जात नाही, यावर विश्वास ठेवायचा.

    चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रात नेमका दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात, “लहानुल्याला उलट्या होत असल्या तर, ‘हा काय सगळं ओकूनच टाकणार आहे,’ म्हणून आई त्याला अन्न देतच नाही का? ती त्याला थोडं थोडं काहीना काही भरवतच राहते, कारण ओकेल पण पोटात काहीतरी लिप्ताळा राहीलच.” आपणही हेच धोरण ठेवायचं आहे. आपल्या वर्तणुकीतून आपण जे जे सांगू पाहतोय, त्याचा लिप्ताळा कुठेना कुठे राहीलच. निराश नाही व्हायचं…

    बाहेरून आल्यावर हातपाय धू… रोज आंघोळ कर… सकाळी आणि रात्री दात घास… हे सर्व शिकवत असताना, त्या मागचा मुलभूत उद्देश त्यांना समजावून सांगितला पाहिजे. म्हणजे शारीरिक स्वच्छता! संस्कार देताना मुलांना न आवडणारं अवडंबर, फाफटपसारा न करता त्यांना मूल्यं पटवून द्यायची आहेत. काळ कितीही बदलला तरी मूल्यं त्रिकालाबाधित आहेत. मानवता, प्रेम, औदार्य, संवेदनशीलता, कष्ट, अभ्यास, साधना, काटकसर, अनावश्यक खरेदी टाळणं, काही वाया न घालवणं, हार स्वीकारणं, नकार पचवायची तयारी ठेवणं, अपयशाचं रुपांतर निष्ठेने यशात करायचं… अशा अनेक अविचल गोष्टी सांगायच्या आहेत.

    मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करायचा, हे आमच्या पिढीने एक संस्कार म्हणून मान्य केलं. पण, दारू पिणाऱ्या, व्यसनं करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या, भ्रष्ट माणसाला नमस्कार का करायचा? केवळ तो वयाने मोठा आहे म्हणून? असं विचारतात. तेव्हा त्याला उर्मट, संस्कारहीन न मानता त्याच्या अभिव्यक्तीवर विचार करायला आपण शिकायला हवं किंवा त्याला पटेल असं तर्कशुद्ध उत्तर द्यायला हवं. कारण स्वयंनिर्णय, विचार करणं, पारखून घेणं हे सर्व आपणच त्यांना शिकवलेलं असतं नं! कोंबडं झाकून ठेवलं तरी उगवणारच आहे, हे आधी आपल्याला, मोठ्या माणसांना शिकायला हवं. खाण तशी माती असं म्हणतात, तसंच सूर्यापोटी शनैःश्वर पण म्हणतात. ‘हाथी चाले अपनी चाल…’ हेच सत्य मानून त्या खाणीतच हिरे मिळतात, त्या शनीला पण अफाट सामर्थ्य असतं हे लक्षात घेऊन मुलांना त्यांच्या संस्कारांच्या मिळकतीसाठी आत्मविश्वास द्यायचा.

    प्रिया तेंडुलकर म्हणतात, ” बाबा, तुम्ही आम्हाला ज्या luxuries दिल्यात, त्या आता आमच्या गरजा झाल्या आहेत!” मुल पूर्ण व्यक्ती बनेपर्यंतच्या प्रवासात त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडणार आहे, या सत्याचा आपण मनापासून स्वीकार केला पाहिजे. व्यक्ती म्हणजे एक कॅलिडोस्कोप असतो, प्रत्येकाला, अनेकांना… प्रत्येक वेळी, अनेक वेळा एकाच व्यक्तीची अनेक रुपं दिसत असतात… अनुभवायला येत असतात. इथे पुन्हा चक्रधर स्वामींचा हत्तीचा दृष्टांत लागू पडतो. माणूस जसा दिसतो, कळतो त्याहून अनेक पट विशाल असतो. त्याच्या एखाद्या कृतीतून तो संस्कारी किंवा संस्कारहीन असा निष्कर्ष नाही काढता येणार.

    हेही वाचा – संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    काळ कसा आणि किती विकृतपणे बदलू शकतो, हे आज आपण अनुभवतो आहोत. हा आपल्याला वस्तुपाठ आहे. आपण सगळी मोठी माणसं खरंच संस्कारी आहोत का, की आपण गृहीत धरतो आहोत? आत्ता तीन-चार वर्षांत जन्माला आलेल्या मुलांना काळ कुठे कसा भिरकावणार आहे, आदळणार आहे, याची आपल्याला कल्पनापण करता येणार नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांची चतुर नीती आपल्याला शिकावी आणि शिकवावी लागणार आहे. ‘शीर सलामत तो पगडी पचास’ ‘बचेंगे तो और भी लढेंगे”… आपली मूल्यं सांभाळून विचारा-आचारांची लवचिकता, तडजोड, वेळप्रसंगी झुकायची, लव्हाळ्याची वृत्ती ठेवायची! कारण महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळीं वाचती! तारेवरची कसरत आहे ही सगळी… पण जमतं हे सगळं मुलांना. Survival of the fittest… निसर्ग सुद्धा त्यांना तगायला, जगायाला मदत करत असतो.

    मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा?

    कोई न जाने अपना फ्युचर क्या होगा?

    एक दिलासा आहेच,

    कोई न जाने कल क्या होगा?

    जो भी होगा अच्छा होगा!

    यावर अविचल भरवसा ठेवायचा…

    आपण वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांनी आपले संस्कार दाखवून द्यायची वेळ आता आली आहे. जेवढं आपल्या आवाक्यात आहे, तेवढं तरी आपण करू शकतो. निदान आपल्या मुलांना तरी त्यांच्या लढाईत ‘मी आहे तुझ्याबरोबर, तुझ्या पाठीशी, तुझ्या साथीला. तू एकटा नाहीस एवढा दिलासा देऊ शकतो!

    तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची

    पर्वाही कुणाची!”

    हा विश्वास देऊ शकतो.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026 अवांतर

    पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम

    May 22, 2026 अवांतर

    शहाण्यांनाही शहाणं करून सोडणारा ‘आनंद’यात्री

    May 15, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    By माधवी जोशी माहुलकरMay 30, 2026

    दरवर्षी 30 मे रोजी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक बटाटा दिवस’ (International Day of the Potato)…

    पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम

    May 22, 2026

    शहाण्यांनाही शहाणं करून सोडणारा ‘आनंद’यात्री

    May 15, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आंधळा मागतो एक डोळा…

    June 2, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026

    Dnyaneshwari : ऐसा संतोषु बहु चित्तें, घेइजत असे पांडुसुतें

    June 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 जून 2026

    June 2, 2026

    सेटवरची एनर्जी म्हणजे हरहुन्नरी साईराज!

    June 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 316
    • अवांतर 189
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 440
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 671
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आंधळा मागतो एक डोळा…

    June 2, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.