पराग गोडबोले
माझं लग्न आंतरजातीय. म्हणजे, मी अगदी 96 कुळी मराठा आणि माझा नवरा कोकणस्थ ब्राह्मण, चित्पावन. कॉलेजात असताना, नकळत्या वयात अचानकच प्रेमात पडले आणि ‘मी मराठा, तो ब्राह्मण, कसं होईल आपलं…’ वगैरे विचार कधी शिवलेच नाहीत मनाला. प्रेम तसंच तर असतं, आंधळं!
दोघांच्या घरी कळल्यावर, सुरुवातीला थोडा विरोध झाला, पण नव्या युगात हे सगळं होतच असतं हे समजून आणि आम्ही ऐकणार नाही हे उमजून, तो मावळलाही पटकन्. भाषा, खाणंपिणं, आचारविचार, सगळंच वेगळं… पण एक मात्र होतं, दोन्ही घरं सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या तोलामोलाची. राहणीमान साधारण सारखंच असणारी, त्यामुळे जमून गेलं सगळं!
आता मी लहानपणापासून ‘ते’ सगळं खाणारी, अगदी आवडीने… आईच्या सोबतीने बाजारात जाऊन ओळखीच्या कोळणीकडून, घासाघीस करून मासे आणणं, ते साफ करणं, तुकड्या तळणं आणि झणझणीत कालवण करणं हे सगळं थोडंफार शिकलेली. बांगडा, सुरमई, पापलेट म्हणजे अगदी जीव की प्राण माझे…
हेही वाचा – नाक दाबलं की, तोंड उघडतं
एखाद्या रविवारी मासे नसतील, तर चिकन, अंडी किंवा मटण ठरलेलं. घरचे सगळे, म्हणजे माझे आईबाबा, आजी आजोबा आणि माझा दादा, पट्टीचे खवय्ये. कोळंबी आणल्यावर ती सोलणं, धागा काढणं जमू लागलं होतं हळूहळू. आई पण शिकवायची सगळं जमेल तसं, सासरी पोरीला अडचण येऊ नये, असं सगळ्याच आयांना वाटतं… त्यातलीच ती एक. तिला कुठे ठाऊक होतं तेव्हा की, पोरगी भलत्याच घरात पडणारे ते!
आमच्या घरी हे असं, तर त्याच्या घरचं वातावरण अगदी विरुद्ध! मासे, मटण म्हणजे अब्रह्मण्यम्. अगदी अंडंही निषिद्ध. त्याची आई मला म्हणाली सुद्धा, “पोरी, तुमचं ते तसलं काही चालणार नाही हो इथे, सवय करून घ्यावी लागेल तुला.“
प्रेमाच्या धुंदीत, मी हो म्हणून गेले. मला कुठे अंदाज होता, माझ्यासमोर काय वाढून ठेवलंय त्याचा. चपाती विरुद्ध पोळीचा घोळ म्हणजे अगदी किरकोळ, असे अनुभव मग नंतर मला आले, मजेशीर.
लग्न झालं, आम्ही फिरून आलो, नव्याच्या नवलाईत स्थिरावत होते मी चुकतमाकत, नव्या वातावरणात. ब्राह्मणी गोतावळ्यात… एकदा अशीच गंमत झाली. जेवायची वेळ झाली आणि सासूबाई म्हणाल्या, “चल पानं घे पटकन.” मला कळेच ना!! पानं कुठून आणू आता? उभी राहिले तशीच शुंभासारखी. तेवढ्यात सासऱ्यांना कळली माझी अडचण आणि ते म्हणाले, अगं म्हणजे ताटं मांड. मग माझ्या टाळक्यात उजेड पडला आणि मी हलले. पुढे मग, ‘पानावर बसा’, ‘पानं पुसून घ्या’ हे ही कळायला लागलं.
गूळ घातलेल्या भाज्या, म्हणजे एक वेगळंच बिकट संकट. न अनुभवलेलं, कधीच. तिखटावर आणि वाटणाच्या भाज्यांवर पोसलेला माझा पिंड. कंटाळले गोडगिट्ट भाज्या खात. एवढा फरक नव्हता बाई अपेक्षित मला… ज्यात त्यात गूळ? अशक्य कोटीतली गोष्ट… सासरच्या नातेवाईकांकडे कौतुकाने जेवायला बोलवायचे आम्हाला. माझ्या तर बाई काटाच यायचा अंगावर. मुगाची उसळ, चवळीची उसळ, मटकी, टोमॅटो बटाटा रस्सा, सगळ्यात गूळ. गूळ या पदार्थाचीच शिसारी यायला लागली होती मला… गोड भाज्या, गोड आमट्या कमी की काय, म्हणून श्रीखंड, गुलाबजाम वगैरे असायचेच जोडीला! कहर झाला होता. नवरा म्हणायचा, XXXला गुळाची चव काय? आणि मी भयंकर चिडायचे.
आणखी एक. घरी जेवायला बसताना, नवरा आणि सासरे ताटाभोवती पाणी फिरवायचे, थोडं अन्न काढून बाहेर ठेवायचे, उजव्या हाताला आणि मग नमस्कार करून जेवायला सुरुवात करायचे. हे पण नवीन मला. छान पद्धत. नवरा म्हणाला, ‘चित्राहुती म्हणतात त्याला. सांगेन त्याचं शास्त्र नंतर कधीतरी…’
नव्या पद्धती, नवे संस्कार अंगवळणी पडत होते. वशाट खावसं वाटलं की, बुधवारी किंवा रविवारी आईकडे जायचे जेवायला. अर्थात, सासूला सांगून. नवरा काही यायचा नाही. मला खाली सोडून निघून जायचा. असेच चालले होते दिवस, गुळचट…
हेही वाचा – कुणीतरी आहे तिथे!
एकदा सासरे आजारी पडले. खूप अशक्तपणा आला त्यांना. डॉक्टर म्हणाले, ‘शक्ती येण्यासाठी रोज एक उकडलेलं अंडं द्या त्यांना!’
बापरे, धर्मसंकट! हो, नाही करता करता, सगळ्यांनी मनाची तयारी केली आणि ही जबाबदारी आपसूकच माझ्यावर आली. अंडी आणली मी. उकडण्यासाठी वेगळं पातेलं आणि अंडी खाण्यासाठी वेगळी ताटली ठेवली गेली आणि त्या घरात पहिल्यांदाच अंडी उकडली गेली… ती सोलून, चिरून, वर मीठ आणि मिरपूड टाकून सासऱ्यांना दिलं एक. त्यांनी भीतभीतच एक तुकडा तोंडात टाकला आणि तो चक्क आवडला त्यांना! नवऱ्याने पण खाल्ला आणि तोही खूश जाहला. एक माची सर झाली होती…!
सासरे बरे झाले, पुन्हा पूर्ववत झाले… पण अधूनमधून अंडी घरी येत राहिली. घर सरावलं हळूहळू उकडलेल्या अंड्यांना. सोवळेपणा थोडा निवळला… नंतर काही दिवसांनी, सासूबाई त्यांच्या बहिणीकडे गेल्या राहायला चार दिवस आणि स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर आली.
रविवारी, मी भीतभीतच विचारलं सासऱ्यांना, ‘बाबा, आज अंडा करी करू का जेवायला? आवडेल तुम्हाला?’ थोडे विचारात पाडले आणि म्हणाले, ‘हो कर. बघू की ते पण खाऊन, त्यात काय मोठसं?’ नवरा काय, तयारच होता…
मग मस्तपैकी लालभडक, झणझणीत, अंडाकरी केली. नवऱ्याने तांदळाच्या भाकरी आणल्या… आणि ताट, नाही नाही, पान वाढून दोघांच्या समोर ठेवलं. खूश झाले स्वतःशीच या नव्या बदलाने, पण जेवायला सुरुवातच होई ना दोघांची! मी प्रश्नार्थक चेहेरा केला आणि नवरा म्हणाला, ‘या अंड्याच्या पानाला चित्राहुती घालू?’
अरे बापरे, हा विचार मी केलाच नव्हता वाढताना! पटकन, अंडाकरीच्या ताटल्या उचलल्या, पानात वरणभात वाढला, दोघांनी चित्राहुती घातली आणि मग मी त्या दोन ताटल्या परत पानात ठेवल्या. अशी गंमत… दोघांनी मग अंडाकरी चापली, माझ्या करण्याला दाद दिली आणि अशा प्रकारे, अंडाकरीचं भोजन पार पडलं. बरीच वर्षं झाली आता या गोष्टीला. सासरे गेले आणि चित्राहुती फक्त सणवारापुरती, प्रसंगापुरती उरली… आता घरी अंडा भुर्जी, ऑम्लेट वगैरे सर्रास होतं, आमची मुलंही खातात, पण अंडा करी केली की, मात्र तो जुना प्रसंग आठवून जाम हसू फुटतं मला आणि नवऱ्याला… अशा आठवणी, असे किस्से, विस्मृतीत न जाणारे!


