तृप्ती देव
“आई, आज पण वरण-भात?” – चिडून मी विचारलं. कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूत भात आणि बाजूला साधं वरण त्यात हिंग, चिमूटभर साखर आणि वर एक चमचा साजूक तूप…
माझा चेहरा बघून आई थोडं हसली, म्हणाली, “झणझणीत पावभाजी हवी होती ना? किंवा मसालेदार रस्सा भाजी. पण आज पीठ नव्हतं रे, म्हणून वाटलं वरण-भात करावा.”
माझा मूड अजूनच खराब झाला. माझ्यासाठी साधं वरण-भात म्हणजे कंटाळवाणं जेवण.
कॉलेजमधले मित्र सांगायचे – “आमच्याकडे पिझ्झा, पास्ता, बर्गर!”
आणि मी? रोज एकतर पोळी-भाजी, नाहीतर वरण-भात.
त्या दिवशी मी चिडून खाल्लंही नाही. बॅग घेतली आणि बाहेर पडलो.
वर्षं उलटली… मी आता पुण्यात मोठ्या कंपनीत कामाला होतो. रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं, झणझणीत चव, परदेशी पदार्थ… पण मन काही भरत नव्हतं.
हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”
एकदा खूप दमून घरी आलो. भाड्याचं घर… ओव्हरटाइम संपवून आलेलो. पोटात कावळे ओरडत होते. मेसवाल्याने आज डबा दिला नव्हता. फ्रीजमध्ये पाहिलं – काहीच नव्हतं. शेवटी थोडे तांदूळ आणि तुरीची डाळ डब्यात दिसली. मग काय! डाळ तांदूळ धुऊन घेतले आणि कुकरला लावलं… तेच शिजवलं…
एका छोट्या बाऊलमध्ये वरण गरम केलं, भात गरम होता. वर साजूक तूप नव्हतं… पण आठवण मात्र होती.
पहिला घास तोंडात गेला… आणि अचानक डोळे भरून आले. त्या साध्या वरण-भातात मला आईचा पदर दिसला… स्वयंपाकघरात उभी असलेली तिची आकृती सुद्धा…
तिचं ते “खाल्लंस ना नीट?” असं विचारणं, आणि माझं “हे काय, पुन्हा वरण-भात?” असं उत्तर!
आज तोच वरण-भात ‘राजभोगा’सारखा वाटत होता.
आई गेली दोन वर्षांपूर्वी… तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं कोमेजली होती… पण आठवणी ताज्या होत्या.
त्या दिवशी ठरवलं – रविवारी जेवायला मी वरण-भात करणार. घरचं साजूक तूप कढवून!
आईची आठवण म्हणून नाही तर, स्वतःला आठवण करून देण्यासाठी –
“सुख हे वरण-भातासारखं असतं – घरगुती, साधं, पण प्रेमानं भरलेलं!”
मी आजही पिझ्झा, बर्गर, इटालियन, पास्ता, थाई करी, चायनीज घरी खातो… हॉटेलमध्येही खातो… परदेशात राहिलो, पाश्चात्य चविष्ट पदार्थ खाल्ले, पण घरच्या वरण-भाताच्या घमघमाटानेच मन खरंच परत घरी येतं… पोट भरलं तरी मन वरण-भात शोधतं!
फ्युजन फूडने जिभेला आनंद दिला, पण वरण-भाताने मनाला निवांत केलं. ‘मॉडर्न स्वयंपाकघरात स्पेशल डिशेस शिजतात, पण वरण-भात अजूनही घरपणाची ओळख करून देतो… काय जादू आहे ना वरण-भातात आणि आईच्या हातात!
जग फिरलो, पदार्थ बदलले, थाळी वाढली, पण मनाचा घास तोच राहिला – वरण-भात.
जेव्हा आयुष्याच्या गर्दीत दम लागतो, तेव्हा रेस्टॉरंटमधले सगळे मेन्यूज डोळ्यांसमोर नुसते फिरतात, पण मन मात्र शोधतं एक साधासा वरण – भात आणि आईचा हात!
आईच्या हातात जादू असते का?
कदाचित नाही – ती फक्त भात शिजवते, वरण फोडते, तुपाची धार टाकते… आणि एक प्रेमळ नजर देते – ही नजरच असेल ती जादू… सगळ्या मसाल्यांच्या, चविष्ट पदार्थांच्या गर्दीत वरण-भात गप्प असतो – साधा, शांत, पण मनावर राज्य करणारा.
आईनं भरवलेला पहिला घास म्हणजे जगातली पहिली safe space.
तोंडात वरणभात आणि कानात – “हळू खा, गिळू नको, तोंड पुस…” या वाक्यांमध्ये जादू आहे का?
हो… कारण त्यामागे मायेचा हात आहे.
आज स्वतः आई-बाबा झालो, स्वतः मुलांसाठी बर्गर-पास्ता बनवतो, पण जेव्हा स्वयंपाकघरात वरणाचा वास येतो, तेव्हा अचानक मन परत भूतकाळात मागं जातं – आईच्या हाताखाली.
हेही वाचा – ट्युबलाइट… एलसी
आई कुठं गेली?
ती आजही आहे – आठवणीत, चवीत आणि त्या वरणभातात! मनातलं दुःख, डोळ्यांतलं पाणी, आणि ओठांवरचं हास्य – सगळं सावरण्याची ताकद जर कोणाच्या हातात असेल, तर ती केवळ आईच्या हातात असते… आणि तिच्या वरण-भातातही.
जिवाला हवा असतो आपुलकीचा घास, टेबलवरच्या मेन्यूचा फोटो नाही!
आई जेवण तयार करताना म्हणते,
“आज काही नाही रे, फक्त वरण-भात.”
पण तो “फक्त”मध्ये तिचं प्रेम, काळजी, थकवा विसरणारी ऊब असते.
हा वरण-भात सांगतो –
“जेवण हे पोटासाठी फक्त नसतं, ते माणसांमध्ये जोडणारा एक धागा असतो.” जेव्हा आपण खूप मोठं जग पाहतो, तेव्हा परत याच वरण-भातासारखं घरटं आठवतं – शांत, मृदू, आणि आपलंसं.
तो शिकवतो – “सर्वसाधारण गोष्टी कधी-कधी सर्वात खास असतात!”
प्रत्येकाच्या घरातला हा वरण-भात… पण मनात शिरतो तो आपुलकीनं!” अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत!


