मुलाच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश झाला. एकीकडे काही मुलींच्या पालकांच्या अपेक्षा वाचून चकित झालो –
“CTC, वार्षिक मूलभूत पगार (Basic Pay) किमान 20 लाख असावा, स्वतःचं घर असावं, गाडी असावी, विदेश प्रवास केलेला असावा…”
माझ्या मनात प्रश्न उमटला – लग्नासाठी ‘वर’ शोधतोय की ‘इन्व्हेस्टमेंट प्लॅन’?
पण त्याच वेळेस काही पालक भेटले, ज्यांचं म्हणणं खूप साधं आणि मनाला स्पर्शून जाणारं होतं – “आम्हाला फक्त चांगला मुलगा हवा, जो आमच्या मुलीला समजून घेईल, तिला सुरक्षित ठेवेल, आणि खंबीर साथ देईल.”
त्यांच्या डोळ्यांत अपेक्षांपेक्षा विश्वास जास्त होता. मुलाच्या पगारापेक्षा त्याच्या स्वभावात त्यांना घरपण दिसलं.
पालकांची भीती समजते – ‘मुलीला सुख पाहिजे’. पण सुख म्हणजे फक्त गाडी, फ्लॅट, EMI फेडण्याचं जीवन नसतं ना! सुख म्हणजे – रडताना खांदा, हसताना साथी, आणि अडचणीत हात धरून चालणारा माणूस…
0000
“वार्षिक 15 ते 25 लाख पगार असलेला वर पाहिजे,” माधुरीबाईंनी ठामपणे सांगितलं, स्थळ बघायला आलेल्या स्वप्नीलच्या आईला.
स्वप्नीलच्या आईच्या चेहऱ्यावरचं सौम्य हास्य हळूहळू ओसरलं.
“माझा मुलगा इंजिनीअर आहे. सॉफ्टवेअर कंपनीत आहे. खूप मेहनती आहे. पगार 12 लाख आहे. तो खूप सुसंस्कृत, नम्र आहे. मुलीला मुलीसारखं ठेवेल…” तेवढ्यात माधुरीबाईंनी हातानं इशारा करत थांबवलं.
हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!
“पगार 15च्या खाली आहे म्हणजे नाहीच. क्षमा करा.”
त्यांच्या त्या एका वाक्यानं एक अस्वस्थ शांतता पसरली… आणि एक समजूतदार मुलगा, एक चांगलं घर, आणि एक माणूसपण – सगळंच एका आकड्याच्या खाली गडप झालं.
स्वप्नील काहीच बोलला नाही. फक्त नजर खाली…
तीन महिने गेले. स्वप्नीलने तो विषय मागे टाकला होता. एक दिवस त्याला कंपनीत एका टीम मीटिंगमध्ये अंजली भेटली. साधी, प्रामाणिक आणि निखळ हास्य असलेली मुलगी. ती त्या प्रोजेक्टवर नव्याने आली होती. दोघं एकत्र काम करत गेले, एकमेकांच्या विचारांत जुळत गेले.
एकेदिवशी अंजली म्हणाली, “माझं एक स्वप्न आहे – एक छोटंसं घर असावं, जिथं बाहेर पाऊस पडतोय आणि आत मी आणि माझा जोडीदार चहा घेत निवांत बसलोय… हेच माझं खरं ‘CTC’!”
स्वप्नील हसला, “स्वप्न तर अगदी 12 लाखांच्या आतलं आहे.”
त्या दोघांनी काही महिन्यांत लग्न केलं. फार मोठ्या थाटामाटात नाही, पण आपल्या माणसांमध्ये.
दुसरीकडे…
माधुरीबाईंच्या मुलीचं लग्न एका अमेरिकेतील मोठ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरबरोबर ठरलं.
25 लाख पगार!
त्याच्या प्रोफाइलवर फॅन्सी फोटो होते, घोड्यावरून निघालेली वरात, मोठा बंगल्याचा फोटो…
लग्न झालं. दोन महिन्यांनी मुलगी माहेरी आली —
“आई, तो खूप बिझी असतो. फोनवर वेळ नाही, माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही. सांभाळून घेत नाही. त्याच्या घरच्यांचं राज्य आहे. पैसे आहेत, पण माणसं नाहीयेत.”
माधुरीबाईंनी डोळे पुसले. त्यांना हे लग्न यशस्वी वाटायचं होतं — पण आतून काहीतरी मोडलं होतं.
दोन वर्षांनी…
स्वप्नील आणि अंजलीचं एक छोटंसं घर होतं. भिंतीवर त्यांच्या ट्रेकिंगच्या फोटो, फुलांची कुंडी, अंजलीचं पेंटिंग लावलेलं… एकत्र जेवण, दोघं मिळून EMI भरणं आणि आठवड्यातून एक दिवस फक्त फिरायला जाणं यात आनंद शोधत होते. ते पगाराच्या आकड्यांपेक्षा…
स्वप्नीलच्या आईने एकदा सहज विचारलं,
“बाबा रे, तुझ्या बायकोच्या घरच्यांनी पगार वगैरे काही विचारलं नव्हतं का?”
स्वप्नील हसला,
“तिच्या घरच्यांनी फक्त विचारलं होतं — ‘तू आमच्या मुलीला समजून घेशील ना?’ तेव्हा वाटलं… याचसाठी माझं आयुष्य वाट बघत होतं!”
0000
शेवटी पैसा महत्त्वाचा आहे, पण माणूसपण त्याहून महत्त्वाचं आहे. उत्पन्नाच्या आकड्यांमागे धावताना आपण अनेकदा हातातलं “प्रेम” हरवतो. कारण,
“पगार वाढतो, पण स्वभाव सुधारत नाही… बँकबॅलन्स जमतो, पण नातं फसतं.”
खऱ्या अर्थाने श्रीमंत तोच — जो कोणालाही हात पकडून म्हणू शकतो,
“आपण दोघं मिळून संसार घडवूया…”
माझ्या बायकोला मी काय देणार –
एक फ्लॅट की एक विश्वासाचं घर?
एक हिशोब की एक हक्काचं माणूस?
मी पगारात थोडा मागे असेन, पण माणूस म्हणून खूप पुढे आहे…
तेव्हा मला जाणवलं — आजकाल संसाराला संसार म्हणून कोण शोधतो? इथे तर इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न बघितलं जातं! मुलगा जर चांगला असेल, आईवडिलांचा मान राखणारा असेल, मुलीला खऱ्या अर्थाने जोपासणारा असेल, तर त्याला 15 लाख पगाराचं सर्टिफिकेट दाखवावं लागतं की, त्याचं माणूस म्हणून चांगलं असणं पुरेसं आहे?
या दोन्ही टोकांच्या अनुभवांनी मला एक शिकवण दिली. आपण सगळे ‘चांगलं स्थळ’ शोधतोय, पण त्या शोधात आपण माणूस हरवतोय का?
पगार महत्त्वाचा असतो?
हो. त्याने घर चालतं, स्वप्नं उभी राहतात, स्थैर्य मिळतं. पण फक्त उत्पन्नाचं प्रमाणच जर ‘जीवनसाथी’ ठरवणार असेल, तर मग प्रेम, समजूत, साथ, सुसंवाद यांचं काय?
लग्न ही संस्था ‘भावनिक भागीदारी’साठी आहे, CTC मॅचिंगसाठी नाही. घर, गाडी, पगार या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण नात्याच्या बाजूने पाहिलं, तर जिथे प्रेम आहे, समजूतदारपणा आहे, एकमेकांवर विश्वास आहे… तिथेच खरं स्थैर्य आहे. आज जेव्हा मुलीचे वडील म्हणतात, “फक्त एवढंच बघतो – हा माणूस माझ्या मुलीला आनंदी ठेवू शकेल का?”
हेही वाचा – बिघाड
तेव्हा त्या वाक्यात खऱ्या अर्थाने पित्याचं प्रेम दिसतं. तो बाप आजच्या स्पर्धात्मक जगातही एका गोष्टीवर विश्वास ठेवतो – “माणूसपण.”
“लग्नासाठी पगार किती हवा? की मन किती मोठं हवं? घर किती खोल्यांचं हवं? की त्याच्या मनात तुमच्या मुलीसाठी जागा किती आहे, हे विचारायला हवं?”
मुलगा लाखोंचं पॅकेज घेऊनही तुमच्या मुलीला समजून घेईलच, याची शाश्वती नाही… पण तो जर समजूतदार अस प्रेमळ असेल, आणि तिच्या डोळ्यातलं दुःख शब्दांशिवाय ओळखू शकत असेल… तर तो तिच्यासाठी सोन्याहून अधिक मौल्यवान आहे.
आता निर्णय आपलाच – लग्नासाठी ‘पगार’ महत्त्वाचा, की ‘माणूस’?”
किमती गिफ्ट्सपेक्षा किमती भावना संसार वाचवतात.
—
लेखातील विचार माझे वैयक्तिक आहेत आणि कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.


