आईचा साठावा वाढदिवस म्हणून समीराने आठ दिवसांची रजा घेतली आणि पुढील आठ दिवस आईसोबत घालवायचे हे तिने निश्चित केले. ती नवऱ्याला म्हणाली,
“सुबोध, मी आठ दिवस रजा घेते आहे.”
“का? अचानक? बरे वाटतं नाही की नोकरीचा कंटाळा आला?”
“नोकरीचा कंटाळा करून कसे चालेल? नोकरी मिळावी, पैसे मिळावे म्हणून तर एवढी वर्षं शिक्षण घेतले.”
“मग?”
“अरे, आईला पुढील शनिवारी साठ वर्षं पूर्ण होत आहेत, घरी एकटी आहे ती… बाबा गेल्यापासून एकटी झाली आहे, विवेक पण हॉस्टेलमध्ये आहे.”
“विवेक पण येणार आहे काय?”
“तो पण येईल. नाहीतरी आई वेडाच आहे तो… तुला पण जमले तर पोहोच ना शनिवारपर्यंत…”
“मी बघतो… शुक्रवारी रात्रीच्या फ्लाइटने मी येईन कदाचित… तू तिकीट काढलंस का?”
“उद्या बघते, रविवारचे तिकीट मिळते का?”
आईकडे नागपूरला जायचे आहे म्हणून समीराने खरेदी सुरू केली. आईला जे काही आवडते ते सारे घेत होती. आईसाठी छानशी साडी घेतली. काही घरातल्या आवश्यक गोष्टी घेतल्या. तिच्या मापाची चप्पल घेतली आणि रविवारी रात्री ती पुण्याहून नागपूरला गेली.
समीराची आई तिची वाटच पहात होती. दोन्ही मुले बाहेरगावी… लग्न झालेली समीरा पुण्यात आणि आयआयटीमध्ये शिकणारा विवेक खरकपूरमध्ये. दोन वर्षांपूर्वी तिचा नवरा गेला आणि ती एकाकी जगत आली. अमरावतीचे माहेर आणि नागपूर घर… दोन्ही विदर्भातील! समीरा तिला आपल्याकडे पुण्यात घेऊन गेली. पण मुलगी, जावई नोकरीनिमित्त बाहेर… त्यामुळे ती कंटाळली आणि परत नागपुरात आली. नागपूर तिला मानवायचं. इथली हवा… जेवण… आणि आपले घर…
टॅक्सी करून समीरा धंतोली भागातील घरी आली. आई एकटी रहात असल्याने ती स्वतःच्या जेवणाची आबाळ करत असणार आणि त्यामुळे ती बारीक झाली असणार, असा तिचा अंदाज होता. पण तिचा अंदाज खोटा ठरला. समीराच्या आईची तब्येत मागील वेळेपेक्षा सुधारली होती. शरीरावर तुकतुकी आली होती… समीराला बरं वाटलं. आपण आणि विवेक घरी नसतो तरी आईने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले नाही, उलट तिची तब्येत सुधारली आहे. शोभा नावाची एक बाई आईकडे धुणीभांडी करायला खूप वर्षांपासून यायची… त्या दोन मुलांची शोभा मावशीच झाली होती.
“अगं, एकटीच आलीस, सुबोध येणार होता ना?”
“तो येईल कदाचित रविवारी, तुझ्या वाढदिवसाला… मी पुढे आले म्हटले आईकडे रहावे आठ दिवस..”
“बरं केलस गं, कुणी घरात नसलं की कंटाळा येतो…”
“शोभा मावशी येत असते ना?”
“ती येते गं… पण तिला तिचा संसार नाही का? तिच्या पण मुलीचे लग्न ठरले आहे. आता आली संध्याकाळी की, सांगेल तुला…”
“अरे, छान बातमी… केव्हा आहे लग्न?”
“बहुतेक डिसेंबरमध्ये…”
“व्वा… म्हणजे डिसेंबरमध्ये परत नागपुरात फेरी होणार!”
“हो, यायलाच लागेल तुला आणि विवेकला. लहान होतात तेव्हा तिने खेळवलं आहे दोघांना…”
“खरं आहे,” असं म्हणत समीराने आपली बॅग आईच्या खोलीत ठेवली.
जेवणाची वेळ झालेली. त्यामुळे समीराच्या आईने जेवण वाढायला घेतलं. समीरा वॉशरूममधून बाहेर येत असताना तिचं आईकडे लक्ष गेलं. आई वाढलेल्या ताटाचा फोटो घेत होती. तिला वाटलं, कदाचित ती मोबाइलने फोटो कसे काढायचे, हे शिकत असेल. नव्याने शिकत असताना आपणही असे अनेक फोटो काढत असतो…
समीरा जेवायला आली. आज ताटात ज्वारीची भाकरी आणि मस्त झुणका होता. शिवाय, लसणाची चटणी, घट्ट दही पण होतं. समीरा खूप दिवसांनी आईच्या हातचे जेवण पोटभर जेवली.
सायंकाळी शोभा मावशी आली. एकीकडे चटचट कामं आटोपताना, दुसरीकडे ती समीराशी बोलत होती. मुलीच्या लग्नाची बातमी पण तिने समीराला सांगितली. समीराने लग्नाला यायचं कबूल केलंच, पण काय मदत हवी असल्यास सांग, असेही सांगितले. संध्याकाळी नेहेमीच्या वेळेस विवेकचा फोन आला. समीराताई आज दुपारी येऊन पोहोचली, याचा त्याला आनंद झाला. मग समीराने फोन घेतला…
“बोल ताई…”
“अभ्यास कसा चाललाय?”
“अगं छानच. पण इकडे उन्हाळा पण फार आहे गं!”
“नागपुरात काय कमी गरम होतं? बरं, आईचा वाढदिवस आहे रविवारी, तो पण साठावा… केव्हा पोहोचणार आहेस?”
“रविवारी दुपारपर्यंत पोहोचतो. दिल्ली ते नागपूर प्लेनचे तिकीट आज घेईन. सुबोधदादा येणार आहे ना?”
“तो पण रविवारी येईल, मग रात्री वाढदिवस करू…”
“होय. ठेवतो मी फोन.”
0000
दोघी थोडं फिरून आल्या. मग तुळशी वृंदावनशेजारी बसल्या. समीराने मोबाइलवर किशोरीताईंची एक बंदिश लावली. आईला किशोरीताईंचे गाणे फार आवडायचे. त्या स्वरात भिजत भिजत दोघी घरात आल्या.
दुपारचे जेवण होतेच. समीराने पापड भाजून घेतले आणि आई ताटे वाढायला लागली. मग आईने त्या वाढलेल्या ताटाचा फोटो घेतला. समीराला आश्चर्य वाटले. सकाळी पण तिने वाढलेल्या ताटाचा फोटो घेतला होता…
“आई, जेवण वाढलेल्या ताटाचा तू फोटो का घेतेस?”
“अगx सहज… मला आवडत ते. काही वेळा काल काय स्वयंपाक केला होता, हे आठवत नाही… म्हणून!”
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी
“मग तुला विस्मरण होते का?”
“नाही गं… उगीच तुझं काही तरी… चल जेवायला घे…”
आणि त्या दोघी जेवायला लागल्या.
दुसऱ्या दिवशी पण समीराने पाहिले, जेवण ताटात वाढल्यावर आईने मोबाइलने त्याचा फोटो घेतला! ती का फोटो काढते, हे तिला कळेना. मग तिने कामाला आलेल्या शोभा मावशीला विचारले…
“मावशी, माझी आई रोज जेवणाच्या ताटाचा फोटो का काढते?”
“अगं, तो फोटो काढून ती विवेकला पाठवते.”
“विवेकला? का?”
“ते मला माहीत नाही, पण विवेकने तिला वाढलेल्या ताटाचा फोटो पाठवायला सांगितला; पण तिला फोटो काढता येत नव्हता, म्हणून मी माझ्या मुलीला इथे बोलावले आणि तिने तुझ्या आईला फोटो कसा काढायचा आणि व्हॉट्सॲपवर पाठवायचा, हे शिकवले.”
“पण का? आणि तो विवेक तिकडे एवढा लांब कॉलेजात आणि आईला रोज सकाळ-संध्याकाळ जेवणाचा फोटो काढून परत तो व्हॉट्सॲपवर पाठवायला सांगतो… बघते मी त्या विवेकला आणि मला काही न सांगणाऱ्या माझ्या आईला.. नाहीतरी माझ्यापेक्षा तो विवेकच हिचा लाडका!”
रागारागाने समीरा, खोलीत पुस्तक वाचत असलेल्या आईच्या समोर जाऊन उभी राहिली.
“आई, खरं सांग… तू सकाळ-संध्याकाळ वाढलेल्या ताटाचा फोटो काढतेस, तो विवेकला पाठवतेस ना? त्याला कशाला लागतो फोटो? आणि माझ्यापासून का लपवतेस हे?”
“तुला कोणी शोभाने सांगितले का? आहेच मेली चुगलीखोर…”
“तिला मी विचारले म्हणून तिने सांगितले. पण विवेकला रोज भरलेल्या ताटाचा फोटो का हवाय?”
“अगं, तो मला म्हणाला – आई, हॉस्टेलमधील जेवण माझ्या गळ्याखाली जात नाही. कंटाळा येतो… म्हणून तू आपल्या घरी जेवण बनवतेस ना, त्याचा फोटो पाठव… ते भरलेले ताट बघून मला जेवणाची इच्छा होईल. म्हणून मी रोज जेवण बनवते, ते ताटात वाढते… त्याचा फोटो काढते आणि त्याला पाठवते… मग तो हॉस्टेलचे जेवण भरपूर जेवतो.”
“मग मला का नाही सांगितले?”
“अगं, तू आत्ता चिडलीस ना, तशी चिडणार… त्याच्यावर आणि माझ्यावर! म्हणून सांगत नव्हते… पण ही शोभा…”
“बरं झालं शोभा मावशीने मला सांगितले ते… आता रविवारी विवेक येतो आहे ना, त्याला विचारते – अरे बाबा, तू जेवावंस म्हणून आईला का त्रास देतोस?”
“तू त्याला काही विचारू नकोस समीरा.”
“मी त्याला विचारणारच! येऊदे त्याला…”
समीरा धुसफुसत होती… साठ वर्षांच्या आपल्या आईला रोज जेवणाचा फोटो काढून व्हॉट्सॲपवर पाठवायला सांगणाऱ्या तिच्या धाकट्या भावाचा, विवेकचा आणि तो सांगतो तसे करणाऱ्या आईचा तिला राग आला होता. त्याला तिला जाब विचारायचा होता, पण फोनवर व्यवस्थित बोलता येणार नाही, त्याऐवजी तो रविवारी येईल तेव्हाच त्याला खडसावू आणि आईने रोज जेवणाच्या ताटाचा फोटो काढणे बंद करू, असे तिने ठरविले.
आपली मुलगी चिडलेली आहे, हे आईने ओळखले होतेच. त्यामुळे विवेकचे नाव तिच्यासमोर घ्यायचे नाही, असे तिने ठरविले.
शेवटी रविवार उजाडला. आईचा वाढदिवस म्हणून समीरा मार्केटमध्ये गेली आणि आईच्या आवडीच्या भाज्या आणि फळे घेऊन आली. शिवाय, केकचीही तिने ऑर्डर दिली.
आज तिचा भाऊ विवेक आणि नवरा सुबोध दोघेही यायचे होते… त्यामुळे तिने फ्रुटसॅलडचा बेत केला. पण तिचे लक्ष होते, दुपारी अकराच्या फ्लाइटने निघालेला विवेक केव्हा पोहोचतो, याकडे.
दुपारी तीनच्या सुमारास विवेक घरी आला. तो पहिल्यापासून मातृभक्त! आला तो आईकडे धावला… आई त्याची वाटच पहात होती. दोघा मायलेकरांचे खूपवेळ हितगुज चालले होते… मग त्याच्या लक्षात आले, समीराताई सोमवारीच आली आहे; पण आपण आल्यापासून ती बाहेर आलीच नाही! असे कधी होत नाही. त्याला आश्चर्य वाटले. तो ताईच्या खोलीकडे गेला तर खोली आतून बंद होती.
विवेकने दार वाजवले आणि तो हाका मारायला लागला…
“ताई… ताई…”
घुश्श्यात असलेल्या समीराने दार उघडलं.
“ताई, मी येऊन अर्धा तास झाला, तू बाहेर आली नाहीस?”
“मग काय, आरती ओवाळायला हवी होती?”
“अगं तसं नाही… पण एरवी…”
“त्यासाठी तसं वागायला लागतं विवेक…”
“म्हणजे? काही वावगं वागलो का मी?”
“मग! आईला रोज जेवणाच्या ताटाचा फोटो काढायला लावून परत तो व्हॉट्सॲपवर तुला पाठवायचा? का, तर म्हणे तुला हॉस्टेलचे जेवण जात नाही! अरे, मी पण होते, संभाजीनगरमध्ये हॉस्टेलवर चार वर्षे… पण अशी थेरं केली नाहीत कधी… मला सांग, का असा रोज त्रास देतोस तिला?”
“अगं ताई, म्हणून तुझा राग का? बरं आता सांगतो. चार महिन्यांपूर्वी मी घरी आलो होतो, तेव्हा आईची तब्येत रोडावलेली दिसली. मी तिला खोदून खोदून विचारले, ‘आई, तू अशक्त का दिसतेस? तब्येतीचे काही प्रॉब्लेम्स आहेत काय?’ तर ती ‘नाही’ म्हणाली. मग मी शोभा मावशीला विचारले, तेव्हा ती म्हणाली – तुझे वडील या जगात नाहीत. लग्नानंतर तुझी ताई पुण्याला गेली, तू लांब हॉस्टेलवर राहून शिकतोयस… त्यामुळे तुझी आई घरी एकटीच. मग ती फारसे जेवणच करत नाही. कधी एखादी भाकरी केली तर… तीसुद्धा चहाबरोबर खायची. अनेकदा रात्री पाणी पिऊन झोपायची. कधीतरी थोडा भात शिजवून दुधासोबत गिळायचा… भाजी नाही, कोशिंबीर नाही, दही-ताक नाही… ती जवळजवळ रोजच अर्धपोटी असते.. म्हणून तुला ती अशक्त दिसते..
ताई, मला वाईट वाटले. तू आणि मी रोज भाकरी, भाजी, भात-आमटी जेवतो आणि आपली आई…! म्हणून मी आईला म्हटले, मला हॉस्टेलच्या जेवणाचा कंटाळा येतो. घास घशाखाली जात नाही. तेव्हा तू आपल्या घरी जे बनवतेस, त्याचा फोटो पाठवत जा.”
“मग काय झालं?”
“मग, मला ताटात वाढलेल्या जेवणाचा फोटो पाठवायचा म्हणून ती भात, आमटी, कोशिंबीर, दही, भाजी बनवायला लागली; तेच अन्न तिच्या पोटात जाऊ लागलं आणि तिची तब्येत सुधारली, अशक्तपणा दूर झाला!”
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’
हे सर्व ऐकून समीरा चकित झाली.. जेमतेम एकोणीस वर्षांचा आपला भाऊ असा आगळावेगळा विचार करत असेल, याचे तिला आश्चर्य वाटले आणि अभिमान पण वाटला. काही कळायच्या आत ती पुढे झाली आणि तिने विवेकला मिठीत घेतले.
“किती वेगळा विचार केलास तू विवेक, आईसाठी… तिने रोज जेवावे म्हणून! मला हे सुचलंच नसतं. मी समजत होते, सध्याची तरुण पिढी वाया गेली. पण नाही… दारू, ड्रग्ज घेणारे जसे आहेत, तसे वेगळे विचार करणारे पण… जेन झी!”
“तुझं वाईट मत आहे का ताई, जेन झीबद्दल?”
“मला माहीत आहे, नवनवीन कल्पना तरुणांनाच सुचतात. पण तरुण पिढी या समाज माध्यमामुळे बहकली, असे मला वाटत होते. पण तुझ्यासारखे तरुणही आहेत… आगळेवेगळे! मला तुझा अभिमान वाटतो माझ्या भावा… तुझ्यामुळे आई मला टवटवीत दिसली… तू आहेस खरा जेन झी.”


