रेवती पांडे
वर्नर हर्झॉग यांची Encounters at the End of the World ही जवळपास पावणे दोन तासांची डॉक्युमेंटरी आहे. पण त्यातला एक छोटासा प्रसंग जगभरात खूप व्हायरल झाला. त्या दृश्यात अनेक पेंग्विन्स अन्नाच्या शोधात समुद्राकडे चाललेले असतात. अचानक त्यांच्यातला एक पेंग्विन थांबतो… जणू काही क्षणभर विचार करतो… आणि मग बाकी सगळ्यांच्या विरुद्ध दिशेने— एका निर्जन पर्वताच्या दिशेने चालायला लागतो.
हा प्रसंग पाहून वर्नर हर्झॉग यांनी पेंग्विन्सवर वीस वर्षे संशोधन केलेल्या शास्त्रज्ञ डेव्हिड एन्ली यांना विचारले —
“तो असं का करतो?”
त्यावर डेव्हिड एन्ली यांनी सांगितले की, कधी कधी काही पेंग्विन दिशाहीन होतात. त्यांच्या दिशाज्ञानाच्या यंत्रणेत बिघाड होतो. अशा पेंग्विनला उचलून पुन्हा कॉलनीत आणले, तरी तो पुन्हा त्याच दिशेने चालायला लागतो. विज्ञानाकडे या वर्तनाचे स्पष्टीकरण आहे — दिशाभ्रम आणि मेंदूतील गोंधळ!
हेही वाचा – सहेला रे…
परंतु ही छोटी क्लिप इतकी लोकांच्या मनाला भिडली, याचं कारण केवळ वैज्ञानिक स्पष्टीकरणात सापडत नाही. अनेकांनी त्या पेंग्विनमध्ये स्वतःचा एक भाग पाहिला — तो भाग जो त्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांपासून वेगळा करतो. जो सगळ्यांसोबत चालत नाही; जो स्वतःची वाट शोधतो.
अनंत फंदी यांची कविता ऐकत ऐकत मोठे झालेले आम्ही —
“बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको”
हे इतकं घोकून घोकून मनात बिंबवलं आहे की, स्वतःची अशी वेगळी वाट शोधणे ही कल्पनाच सहज वाटत नाही. कारण धोपट मार्ग सुरक्षित वाटतो. त्या वाटेवर आधी चाललेले लोक असतात, अनुभव असतो, मार्गदर्शन असतं. त्यामुळे त्या मार्गावर चालताना भीती कमी वाटते.
पण प्रत्येक मनुष्य सारखा नसतो. कधी कधी माणसाचा आतला आवाज हा बाहेरच्या आवाजांपेक्षा मोठा होतो… आणि जेव्हा अंतर्मनाची हाक तीव्र होते, तेव्हा तो माणूस स्वतःची वेगळी वाट निवडतो.
स्वतःच्या वेगळ्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींना नक्की काय मिळत असेल?
कदाचित ते बाहेर काही शोधत नसतील; ते स्वतःलाच शोधत असतील. काही लोक समाजाच्या चौकटीत घुसमटतात. त्यांना फक्त गरजा पूर्ण व्हाव्यात असं वाटत नाही; त्यांना स्वतःमधील सर्वोच्च शक्यता जगायची असते. सगळ्यांनी चालून गुळगुळीत केलेला मार्ग नक्कीच सुकर असतो. पण स्वतःचा मार्ग शोधणे कठीण असते. कारण तिथे वाटाड्या नसतो. नकाशा नसतो.
फक्त आपण… आणि आपला शोध.
म्हणून त्या पेंग्विनची गोष्ट फक्त एका दिशाहीन पक्ष्याची राहत नाही. ती माणसाची गोष्ट बनते.
ना कारवाँ की तलाश है, ना हमसफर की तलाश है…
एकटा, मस्तमौला, स्वतःचं गाणं गात चालणारा…
आणि कदाचित म्हणूनच तो पेंग्विन आपल्याला इतका जवळचा वाटतो— कारण त्याच्यात आपल्याला आपलाच आतला ‘धुरंधर’ दिसतो; तो भाग, जो गर्दीत असूनही वेगळा असतो, जो हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला शोधण्यासाठी भटकत असतो.
हेही वाचा – …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!
समांतर
इतरांनी चालून गुळगुळीत केलेला धोपटमार्ग
आणि स्वतः शोधलेली नवखी पाऊलवाट
दोन्ही वाटा समांतर…
आयुष्य काढणे
आणि आयुष्य जगणे
यामध्ये इतकंच काय ते अंतर


