कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ‘धो-धो’ सुरुवात होते, पण आमच्या विदर्भात मात्र पावसाचे आगमन जरा उशिरानेच होते. सध्या आकाशातील ढग हुलकावणी देऊन, वाकुल्या दाखवून पळून जात आहेत आणि उकाड्याने सगळेच त्रस्त आहेत. पण या वातावरणातही निसर्ग आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो, ती म्हणजे ‘संयम’!
मान्सूनपूर्व पावसामुळे आमच्या विदर्भातील ताडोबा, पेंच, मेळघाट आणि टिपेश्वर यासारखी घनदाट जंगले अबोलपणे हिरवाईची चादर ओढू लागली आहेत. त्या थोड्याशा पावसाने जंगलातील पशू-पक्षी आणि प्राण्यांच्या जिवाला सुखावणारा गारवा मिळतो. पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात वाघ किंवा रानगवे आनंदाने लोळताना, चिखलाने स्वतःचे अंग बरबटवून घेताना आणि हरणे उड्या मारताना, तर पक्षी पाण्यात डुबक्या मारताना पाहणे हा एक स्वर्गीय आनंद असतो. उकाड्याने तगमगलेल्या त्यांच्या जिवाला ही ओलसर माती आणि पहिल्या पावसाचे थंडगार पाणी मनाला शांतता देऊन जाते.
असं असलं तरीही आम्हाला ठाऊक आहे, एकदा का विदर्भात पाऊस मनसोक्त बरसायला लागला की, तो ‘थांब’ म्हटले तरी थांबणार नाही! निसर्ग पुन्हा एकदा कुस बदलेल, जंगले अधिकच समृद्ध होतील आणि जगाच्या नकाशावर आमचे हे वन-वैभव देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल. (तसेही, 15 जूननंतर पर्यटनासाठी बंद होणारी ही जंगले आता थेट ऑक्टोबरमध्येच खुली होतील.)
हेही वाचा – ताडोबा आणि वाघोबा…
एका विदारक सत्याने मन सुन्न झाले!
एकीकडे निसर्गाचे हे सुंदर रूप पाहत असताना, अलीकडेच वर्तमानपत्रात एक अत्यंत वेदनादायी फोटो आणि बातमी वाचनात आली. जंगलातील वाघाचे लहान बच्चे आपल्या तोंडात प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकची रिकामी पोती घेऊन फिरत आहेत!
दोन वर्षांपूर्वी एका वाघाने पाणवठ्यातील प्लास्टिकची बाटली तोंडात धरून बाहेर काढल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. थोडे दिवस या घटनांबद्दल हळहळ व्यक्त केली जाते, परंतु नंतर परत ‘जैसे थे’ अशी परिस्थिती निर्माण होते. जो निसर्ग, जी जंगले या मुक्या प्राण्यांचे हक्काचे घर आहेत, तिथे आपण मानवाने कचऱ्याचे साम्राज्य निर्माण केले आहे, हे आजचे विदारक वास्तव आहे.
आज आपण विकासाच्या नावाखाली शहरांमध्ये ‘काँक्रिटचे जंगल’ उभी करत आहोत. चहूबाजूंनी होणारे सिमेंटीकरण, रस्ते आणि इमारतींच्या जाळ्यांमुळे निसर्गाचा श्वास गुदमरत आहे. ही सिमेंटची जंगले जमिनीतील पाण्याचे झरे आटवत आहेत आणि उन्हाळ्यातील उष्णता अधिकच वाढवत आहेत.
या दुष्टचक्रातून आमचा विशाल सह्याद्री आणि त्याच्या डोंगररांगाही सुटल्या नाहीत. मध्यंतरी मी पुण्यात एका लग्नानिमित्त गेले होते. तिथल्या एका भागात डोंगराच्या अगदी पायथ्याशी, निसर्गाचा गळा घोटून उभी राहिलेली रिसॉर्ट्स आणि अपार्टमेंट्स पाहिली आणि मन सुन्न झाले. जो सह्याद्री कधी काळी दऱ्याखोऱ्यांनी आणि अथांग हिरवाईने नटलेला असायचा, तो आज मानवाच्या हव्यासापोटी या सिमेंटच्या दुष्टचक्रात सापडला आहे. हीच गत आज नाशिकसारख्या सुंदर आणि निसर्गरम्य शहरांचीही झाली आहे.
या सर्व परिस्थितीमुळे आता बिबट्यांसारखे प्राणी मानवी हद्दीत घुसखोरी करताना दिसतात. पर्यटनाच्या आणि राहण्याच्या नावाखाली निसर्गाचे चाललेले हे बाजारीकरण आपण वेळीच थांबवले नाही, तर भविष्यात त्याचे भयानक परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. जंगलांची ही परिस्थिती पाहून सहजच मनात एक प्रश्न उद्भवतो की, वाघ नरभक्षक आहे की माणूस अतिक्रमणकारी?
नुकतीच चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिला कामगारांना वाघाने ठार केल्याची अत्यंत वेदनादायक घटना घडली. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे, पण शांत डोक्याने विचार केला तर, यात त्या वाघाचा तरी काय दोष? ती जंगलाची जमीन, ती हद्द त्या वाघाची आहे. मानवाने रोजगाराच्या किंवा इतर कारणांनी त्याच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे. कोणताही प्राणी स्वतःच्या आणि आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी समोर येणाऱ्यावर हल्ला करणारच ना? जंगले आक्रसत चालल्यामुळे आणि मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळेच आज हे मानव-वन्यजीव संघर्ष पेटत आहेत.
जंगल सफारीच्या नावाखाली वाघांची कोंडी केली जाते, हेही एक सत्य आहे. आपण जेव्हा जंगलात सफारीला जातो, तेव्हा वाघाला पाहण्याच्या हव्यासापोटी पर्यटकांच्या आणि जिप्सी गाड्या त्याला चारही बाजूंनी घेरतात. कॅमेऱ्यांचे फ्लॅश, गाड्यांचा आवाज आणि माणसांची आरडाओरड यामुळे त्या बिचाऱ्या वाघाला अशा परिस्थितीत काय करावे, तेच सुचत नाही. माणसांच्या या अतिरेकामुळे तो तरी किती आणि कधीपर्यंत संयम बाळगणार? वन्यजीव पर्यटन हे प्राण्यांना त्रास देण्यासाठी नसून, त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दुरून आणि आदरपूर्वक पाहण्यासाठी आहे, याचे भान पर्यटकांनी ठेवायलाच हवे. चंद्रपूरची घटना हृदयद्रावक आहे, हे चिंताजनक आहे पण त्याचबरोबर सफारीदरम्यान वाघांना घेरण्याचा अतिरेक देखील थांबवण्यात यावा, हे वन विभागाने लक्षात घेतलं पाहिजे.
निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण बदल्यात आपण त्याला काय देतोय? केवळ सिमेंट, प्लास्टिक, प्रदूषण आणि त्यांच्या हक्काच्या घरावर आक्रमण?
हे ध्यानी घेता, सर्वांना एक कळकळीची विनंती करावीशी वाटते की, आपल्याला ही जंगले, हे वाघोबा आणि निसर्गाचे सौंदर्य पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवायचे असेल, तर काही साधे पण महत्त्वाचे नियम पाळायला हवेत.
- जंगलात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी : जंगलात जर काही बांधकाम होत असेल तर, तेथे काम करणाऱ्या लोकांना प्लास्टिकचा कचरा जंगलात टाकण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. बांधकाम कंत्राटदारांना याबाबत सक्तीच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य व्हायला हवे, तसेच कठोर शिक्षा देखील असावी. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ समजून त्याची विल्हेवाट ही संबंधित व्यक्तीने योग्य तऱ्हेने लावावी.
- पर्यटनावर निर्बंध : जंगल हे प्राण्यांचे घर आहे, आपण तिथे पाहुणे आहोत. त्यांच्या घरात गाड्या लावून त्यांना वेढणे आणि त्यांचा संयम पाहणे थांबवले पाहिजे. वन्यजीव सफारीचे नियम कडक पाळले पाहिजेत.
- सिमेंटीकरणाला ‘हिरवा’ पर्याय : शहरात राहतानाही आपण झाडे लावून काँक्रीटच्या जंगलाला थोडी तरी हिरवाईची जोड दिली पाहिजे.
- प्राण्यांच्या अधिवासाचा आदर: जंगलाच्या बफर झोनमध्ये आणि गावांलगत मानवी हस्तक्षेप कमीत कमी कसा राहील, यासाठी शासनाने आणि आपण प्रयत्न केले पाहिजेत. वृक्षतोड थांबवण्यासाठी शक्य होतील ते प्रयत्न करणे आवश्यक आहे.
निसर्ग आपल्याला संयम शिकवतो, प्रेम देतो; आता वेळ आली आहे आपण निसर्गाला ‘सुरक्षा, शांतता आणि मोकळा श्वास’ देण्याची!
हेही वाचा – व्याघ्रदर्शनाच्या प्रदीर्घ हुलकावणीनंतर ‘जय’ झालाच!
आपल्या विकासामुळे आणि निष्काळजीपणामुळे कोणत्याही वन्यजीवाचे घर आणि आयुष्य धोक्यात येणार नाही, इतकी छोटीशी गोष्ट जरी आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून लक्षात घेतली, तर या वनराईला आणि त्या अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांना मोठा दिलासा मिळेल. पर्यायाने, आपण असे काम करून पर्यावरण संवर्धन करण्यास नक्कीच हातभार लावू शकतो, हे खरं नाही का? असे कार्य केल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेसोबतचं आपण निसर्गाचा श्वास कोंडणे थांबवू शकतो.
प्राण्यांच्या या हक्काच्या घरात आपण करत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल तुम्हाला काय वाटते? आपण मानवाने आता तरी स्वतःच्या हव्यासाला आवर घालायला नको का? हे तरी पटतयं ना? या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या नाहीत तर, भविष्यात वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष जास्त विकोपाला जाईल हे नक्की!



1 Comment
Mi Anita Rane MI jhaad taiyar karun free madhe Whatapp karte pratyek an aapalya Ghara samor 2 Moti jhade lavavi as mala watate