डॉ. किशोर महाबळ
विद्यार्थी अज्ञानी, अननुभवी असतात. त्यांचा स्वभाव चंचल असतो, एकाग्रता कमी असते. चांगले काय, वाईट काय… हे त्यांना नेहमीच सांगावे लागते. त्यांना स्वतःतील गुण, अवगुण, बौद्धिक क्षमता, कुवत, उणीवा यांची जाणीव नसते. विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करण्याची गरज असते, असा बहुतांश शिक्षक आणि पालकांचा समज असतो. या समजामुळे मग या विद्यार्थ्यांनी किती आणि कोणते शिक्षण घ्यावे, कोणती नोकरी किंवा व्यवसाय करावा, अशा सर्व बाबतीत सर्व निर्णय शाळेत शिक्षक तर घरी पालकच घेऊ लागतात. अनेकदा तर आपल्या म्हणण्यानुसार वागायला भाग पाडतात. आपल्या पाल्याशी वेळोवेळी चर्चा करून त्याची आवडनिवड, स्वभाव, प्रवृत्ती, मनोभूमिका, कल, प्रेरणा, इच्छा आकांक्षा यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. कारण, मुळातच विद्यार्थ्यांना याबाबतीत निर्णय घेताच येणार नाही, ती क्षमताच त्यांच्यात नाही, असे शिक्षक आणि पालक गृहित धरतात. यामुळे अनेकदा न आवडणारे करिअर आणि अन्य निर्णय विद्यार्थ्यांवर लादले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रगतीपेक्षा त्यांच्या अपयशाचीच मुहूर्तमेढ रोवली जाते!
शालेय विद्यार्थी हे वयाने, अनुभवाने लहान असल्यामुळे वयानुसार त्यांची मते बदलत असतात, ती अनेकदा उथळ विचार करून मांडलेली असतात. त्यामुळे खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात काही प्रमाणात ही मुले अक्षम असतात असे मानणे, हे काही प्रमाणात बरोबर आहे. मात्र हे विद्यार्थी निर्णयच घेऊ शकत नाहीत किंवा ते पूर्णतः निर्बुद्ध असतात, असेही मानणे योग्य नाही. कारण, प्रत्येक विद्यार्थ्यात व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता (Intrapersonal intelligence) कमी अधिक प्रमाणात असते, असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे.
व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांत वेगळ्याच क्षमता असतात. त्यांनी आपली ही बुद्धिमत्ता प्रयत्नपूर्वक अधिक विकसित केली तर ते तत्त्वज्ञ, विचारवंत होऊ शकतात. हे विद्यार्थी नेहमी आत्मपरीक्षण करतात. त्यांना आपल्या भावभावना, स्वप्ने, क्षमता आणि उणीवा यांची पूर्ण जाणीव असते. ते स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे सतत विश्लेषण करीत असतात आणि स्वतःच्या विचार प्रक्रियेचे परीक्षण करू शकतात, ते स्वतःशीच, विविध विषयांवर तार्किक युक्तिवाद करतात. इतर व्यक्तींप्रति त्यांची भूमिका कशी असावी किंवा असली पाहिजे याचाही ते विचार करतात. त्यांना स्वतःची उत्तम ओळख असते. स्वत:बद्दल जाणून घेण्यासाठी, इतरांच्या मदतीची त्यांना क्वचितच गरज भासते. त्यांना त्यांच्या प्रेरणा आणि भावनांची स्पष्ट ओळख असते. त्यांना विविध सिद्धांतांची आणि विचारांची चिकित्सा करायला आवडते.
हेही वाचा – शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे वर्तन
शिक्षकांनी थोडा प्रयत्न केला तर, प्रत्येक शाळेत ही विशेष बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी निश्चितच आढळतील. तसेच, कमी प्रमाणात का होईना, पण अशी बुद्धिमत्ता सर्वच विद्यार्थ्यांमध्ये असते, हेही कळेल.
विद्यार्थी हे मातीच्या गोळ्यासारखे असतात आणि त्यांना आकार देण्याचे कार्य शिक्षकांना करायचे असते, हा विचार आता जुना झाला आहे. विद्यार्थी हे निसर्गत:च अनेक क्षमता घेऊन आलेले असतात. त्या क्षमता विकसित करण्यासाठी योग्य असे वातावरण, संधी उपलब्ध करून देणे ही शिक्षकाची भूमिका असली पाहिजे, असे आधुनिक मानसशास्त्राचे ठाम मत आहे. विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, आपले गुण-अवगुण समजण्याची क्षमता सर्वच विद्यार्थ्यांमधे कमी, अधिक प्रमाणात असतेच. ज्यांच्यात ती प्रकर्षाने आहे आणि ज्यांच्यात ती सुप्त रूपात असेल अशा सर्व विद्यार्थ्यांमधील ही बुद्धिमत्ता एका विशिष्ट स्तरापर्यंत विकसित करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे.
व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्तेच्या विकासामुळे विद्यार्थी स्वतःच्या जीवनाचा विचार करू लागतील. यामुळे अधिक अर्थपूर्ण जीवन जगणे त्यांना जमू शकेल. दुसरे असे की, आपले जीवन चांगले व्हावे, यासाठी प्रयत्न करणे ही आपलीच जबाबदारी आहे. आपल्यालाच यासाठी प्रयत्न करावे लागतील, अशी जबाबदारीची जाणीव विकसित होईल. आपल्यात कोणते गुणदोष, आहेत, कोणते गुण असणे आवश्यक आहे, आपण नवीन काय शिकले पाहिजे, याचाही विचार विद्यार्थी करू लागतील. असा विचार करणे ही त्यांच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. विचार करण्यास सुरूवात करणे, ही योग्य कृती करण्याची प्रथम पायरी असते. म्हणूनच, विचार करण्यास सर्वच विद्यार्थ्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमधील व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्तेचा विकास एका विशिष्ट स्तरापर्यत होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे करणे कठीण असले, तरीही ते आपल्याला करावयाचे आहेच.
विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल विचार करायला आपण प्रवृत्त करायचे आहे. याची सुरुवात एका छोट्याशा पण अत्यंत उपयुक्त अशा उपक्रमाने करूया. आपल्याला शाळेतील प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पाच गुण आणि अवगुण लिहायला प्रोत्साहन द्यायचे आहे. दिसायला हा उपक्रम अगदी सोपा आहे; पण प्रत्यक्षात जेव्हा विद्यार्थी आपले गुण, अवगुण लिहायला लागतात, तेव्हा हे किती कठीण आहे, हे त्यांच्या लक्षात येऊ लागते. कारण, अशा बाबींचा विद्यार्थ्यांनी कधी विचारच केलेला नसतो. बहुतांश विद्यार्थी हे प्रारंभी स्वतःचे बरेच अवगुण लिहितील आणि गुण मात्र कमी लिहितील, अशी शक्यता आहे… हे गृहित धरायचे आहे. आपल्या शिक्षणपद्धतीतून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अवगुणांची माहिती होईल, मात्र गुणांची ओळख क्वचितच होईल, अशी व्यवस्था आपण निर्माण केलेली असल्याने विद्यार्थी स्वतःचे जास्त अवगुण लिहिण्याची शक्यता अधिक आहे.
खरेतर, प्रत्येक विद्यार्थ्यांत काही ना काही सद्गुण असतातच. पण अनेक विद्यार्थ्यांना ते माहीतच नसतात, कारण असे गुण त्यांच्या लक्षात येण्याची संधीच कधी मिळालेली नसते. विद्यार्थ्यांनी कोणते गुण आणि अवगुण लिहिले आहेत, हे वाचून वर्गातील शिक्षकांनी त्यातून व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता कोणत्या विद्यार्थ्यांत प्राधान्याने आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करावा. ज्या विद्यार्थ्यांनी गुण नोंदविले नसतील, त्यांना स्वत:चे गुण शोधण्यास प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांत जे गुण आढळले असतील, ते गुण त्यांनी या विद्यार्थ्यांना सांगावेत. याच पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न विचारून, विचार करण्यास तसेच आत्मपरीक्षण करण्यास शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे. याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची नीट ओळख होण्यासाठी आणि त्यांना भविष्याचा, जीवनाचा, ध्येयाचा, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न शिक्षकांनी नेहमीच विचारले पाहिजेत.
पुढील काही प्रश्न आपण विद्यार्थ्यांना वेळोवेळी विचारल्याने ते या प्रश्नांबद्दल विचार करू लागतील आणि ती व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता विकसित करण्याची सुरुवात असेल.
- तुला काय आवडते आणि काय आवडत नाही?
- तुला भविष्यात कोण व्हावेसे वाटते?
- तू कोणकोणत्या गोष्टी उत्तमरित्या करू शकतोस?
- तुला कोणती गोष्ट करणे अशक्य किंवा कठीण वाटते?
- तुझा छंद कोणता?
- तुला कशा व्यक्ती आवडतात?
- कोणते वागणे तुला योग्य वाटते?
- तुझ्या हातून कोणत्या चुका वारंवार होतात?
- तुझ्या हातून चुका होऊ नयेत म्हणून तू काय करतोस?
- तुझे कोणते विचार चुकीचे आहेत, असे तुला वाटते?
- तू एकटा असतोस तेव्हा कोणत्या गोष्टीचा विचार करतोस?
- स्वतःशीच कोणत्या विषयावर नेहमी वाद होतो?
- इतरांशी वागताना तू कोणती काळजी घेतली पाहिजेस, असे तुला वाटते?
- तुझा स्वभाव कसा आहे?
- तुझे ध्येय कोणते आहे?
- तुझे आदर्श कोण आहेत?
- कोणता विचार तुला आवडत नाहीत आणि का?
- या प्रश्नांशिवाय कधी कधी एखादी घटना सांगून त्या घटनेबद्दल विचार करण्यासही सांगता येईल.
व्यक्तिमत्वविषयक प्रश्न शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच विचारले पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाहीत तरी, काहीही हरकत नाही. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा ते प्रयत्न तर करू लागले तरीही ते पुरेसे आहे.
हेही वाचा – सर्व शिक्षकांची बौद्धिक प्रगती
ज्या गोष्टींचा शालेय विद्यार्थी सहसा विचार करीत नाहीत, त्या गोष्टींचा विचार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, हे आपले उद्दिष्ट आहे. ते या प्रश्नांमुळे साध्य होऊ शकेल. यामुळे विद्यार्थी आत्मपरीक्षण करू लागतील. शालेय जीवनातच अशी सुरुवात झाली, तर ते त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीही खूपच उपयुक्त ठरेल. दुसरे असे की, या विषयांवर विचार केल्यामुळे आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचा ते विद्यार्थी नकळत प्रयत्न सुरू करतील.
विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करायला प्रवृत्त करणे हे आपल्याला करायचे आहे.


